राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आलेल्या अपयशानंतर विरोधकांबरोबर शिवसेनेनेही टिका केलेली आहे. शिवसेनेचे खासदार असलेले आणि सध्या काँग्रेसच्या नाहीतर राष्टÑवादीच्या मांडीला मांडी लावून बसणाºया संजय राउत यांनी ही टिका केलेली आहे. त्यामुळे ही टिका शिवसेनेची की फक्त राउत यांची हा प्रश्नच आहे. याचे कारण शिवसेनेत असलेली गटबाजी आणि मतभेद यामुळे संजय राउत यांच्या मताशी सहमत किती आमदार खासदार आहेत याचा शोध अजून सेनेने घेतलेला दिसत नाही. तरीही भाजपच्या अपयशावर टिका करून स्वबळाचा बाण सोडल्याची भाषा ते करत आहेत. गुजरात ट्रेलर, राजस्थान इंटरव्हल आणि पिक्चर अजून बाकी है म्हणणाºया संजय राउत यांनी गुजरातमध्ये शिवसेनेच्या ४० उमेदवारांचा ट्रेलर दाखवून महाराष्ट्रात पिक्चर बाकी करणार काय याचा विचार करावा.स्वबळाची भाषा केव्हा शोभते, जेव्हा बोलणी आणि करणी एक असते तेंव्हा. आज सेनेच्या नेत्यांची अवस्था ही गरजेल तो पडेल काय अशी झालेली आहे. संजय राउत जे बोलतात त्याला पक्षात कितपत किंमत आहे हा प्रश्नच आहे. सत्तेत राहुनही सतत सरकारवर टिका करण्याचा ते करत असलेला विनोद आता त्यांचे हसे करत आहे. सरकारमधून बाहेर पडणार, बाहेर पडणार अशी सतत धमकी देवून शिवसेना आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. ही सेनेची धडपड अत्यंत हास्यास्पद आणि केविलवाणी अशी आहे. कोणताही मुद्दा नसला की सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी द्यायची हा एकच अजंडा शिवसेनेपुढे आहे. कधी राजीनामे खिशात आहेत असे बोलायचे. तर कधी सरकारच्या धोरणावर टिका करायची. सहा महिने राजीनामे खिशात ठेवून घालवले. १ वर्ष लवकरच सत्तेतून बाहेर पडणार हे जाहीर करून घालवले. शिवसेना पक्षप्रमुख वेगळेच काहीतरी बोलतात. या अधिवेशनानंतर बाहेर पडणार, नव्या वर्षात आम्ही वेगळे होवू असा कांगावा करूनही झाला. त्यामुळे शिवसेनेची राज्यभर दयनीय अवस्था झालेली आहे. स्थानिक पातळीवरही पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेमके काय करावे हे न समजल्याने कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. पण केबिनमध्ये बसून भाजप विरोधी बाण सोडणाºया संजय राउत यांना त्याची फिकीर नाही की पक्षप्रमुख उध््दव ठाकरे यांना त्याची काळजी नाही. अशा भरकटलेल्या अवस्थेत हवेतले बाण सोडून शिवसेनेची अवस्था हवा बाण हर डे अशी झालेली आहे.मागच्या आठवड्यात नव्या नेत्यांच्या निवडी झाल्या. प्रवक्तयांच्या नेमणुका झाल्या. पण प्रवक्ते, नेते, पक्षप्रमुख आणि संजय राउत यांची मते वेगवेगळी आहेत. जे सत्तेत आहेत, ज्यांच्याकडे मंत्रिपदे आहेत त्यांना सत्तेची उब हवी आहे. त्यामुळे ते जी मते जाहीर करतात ती संजय राउत यांच्या मतापेक्षा भिन्न असतात. त्यामुळे शिवसेनेच्या भरकटलेपणाचे दर्शन सातत्याने होताना दिसते आहे. संजय राउत म्हणतात स्वबळाचा बाण आता सुटला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तडजोड नाही. पण हा बाण धनुष्यापासून सुटला आहे का असा प्रश्न आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्य बाण आहे. धनुष्यापासून वेगळ्या विचारांचा शिवसेना आमदार, खासदारांचा बाण सुटला आहे हेच वास्तव आहे. बाण सुटला आहे तर सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे. सत्तेतून बाहेर पडायचे नाही. सत्तेची फळं चाखायची. सरकारवर टिकाही करायची. या दुतोंडीपणाला काय म्हणायचे? अर्थसंकल्पावर शिवसेनेने भरपूर टिका केली. केवळ टिका करायची, विरोध करायचा म्हणून अर्थहीन शब्दांचे बाण सोडण्याचे काम शिवसेनेकडून होताना दिसत आहेत.गुजरात हा ट्रेलर होता, राजस्थान इंटरवल आहे अजून पिक्चर बाकी है असे संजय राउत म्हणतात. पण याच गुजरातमध्ये शिवसेनेने ४० जागा लढवल्या होत्या. तिथे एकाही उमेदवाराचे डिपॉजीट शिवसेनेला वाचवता आले नाही. हा शिवसेनेचा ट्रेलर होता का ? कर्नाटकातही निवडणुका लढवण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. तिथे उमेदवार तरी मिळणार आहेत का? गोव्या सारख्या मराठी भाषिकांच्या राज्यातही शिवसेनेने घुसण्याचा प्रयत्न केला. तिथेही सेनेला इतकी कमी मते पडली की पुन्हा गोव्याचे नावही ते काढणार नाहीत. हा ट्रेलर शिवसेनेने पाहिला असेल तर महाराष्ट्रातला आगामी पिक्चर कसा असेल? सध्या जे शिवसेनेचे १८ खासदार आहेत त्यापैकी बहुसंख्य खासदार हे मोदी लाटेत २०१४ ला निवडून आले आहेत. तेंव्हा असं चित्र होतं की मोदींना मतदान करण्यासाठी म्हणून त्यांचे समर्थक असलेल्याय शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे कधी नव्हे इतके खासदार शिवसेनेला निवडून आणता आले. तेंव्हा जर लोकसभेला शिवसेना भाजप युती नसती तर हे खासदारही कदाचित भाजपचेच असते. शिवसेनेची ताकद लावून हे खासदार निवडून आले असते तर त्यानंतर सहाच महिन्यांनी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सेनेचे १०० पेक्षा जास्त आमदार निवडून यायला हवे होते. जागा वाटपात जितक्या जागा देण्यासा सेनेने भाजपला विरोध केला आणि युती मोडली त्यापेक्षा जास्त जागा भाजपने जिंकल्या. हा ट्रेलर शिवसेनेने पाहिला तर भाजप शिवाय लोकसभेत आपले खासदार निवडून येणार नाहीत हाच पिक्चर दिसेल. एखादा राजा घोड्यावरून दिमाखात येत असेल तर त्याला सगळे मुजरा करतात. पण त्या घोड्याला वाटते हा मुजरा मलाच आहे. त्यामुळेआपल्या पाठीवर बसलेल्या राजाला पाडायचा प्रयत्न करण्यासाठी घोडं उधळायचा प्रयत्न करतं. मग चाबकाचे फटके बसल्यावर वठणीवर येतं. नेमकी अशीच अवस्था शिवसेनेची झालेली आहे. नुसतं घोडं मिरवून बघा, लोक हाकलल्याशिवाय राहणार नाहीत. आज सत्तेत असलेल्या सेनेच्या मंत्र्यांना आपले अस्तित्व कोणामुळे आहे हे माहित आहे. त्यामुळे ते सरकारचे गोडवे गात आहेत. तर सत्तेत नसलेले आणि कसलाही अनुभव नसलेले नुसत्याच डरकाळ्या फोडत आहेत. आता डरकाळ्या फोडून फोडून पुरता आवाज बसला आहे. त्यामुळे तो कोणाला ऐकायलाही जात नाही आणि त्या आवाजाने कोणी घाबरतही नाही.
रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८
महाराष्ट्रात पिक्चर बाकी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा