बॉलिवुडमध्ये श्रीदेवीचे झालेले पदार्पण आणि तिची वाढती लोकप्रियता, यशाची शिखरे पादाक्रांत करणे आणि काँग्रेसला उतरती कळा लागणे, हा कालावधी एकच आहे. एकीकडे श्रीदेवी वर वर जात होती तर काँग्रेस खाली खाली येत होती. ‘हिंमतवाला’ झालेल्या श्रीदेवीने मात्र आपली ताकद वाढवत नेली होती.बॉलिवुडची अभिनेत्री श्रीदेवीचे अकाली निधन झाले. गेली तीस-पस्तीस र्वष श्रीदेवी रसिकांचे कायम आकर्षण राहिलेली आहे. सर्वसामान्य माणसांवर बॉलिवुड आणि रुपेरी पडद्यावरील झगमगत्या ता-यांचा नेहमीच प्रभाव असतो. पण, राजकीय लोकांवरही तिचा प्रभाव होता. म्हणजे राजकारणात अभिनेत्रीने येणे किंवा पडद्यावरील तारे-तारकांनी येणे हे काही नवीन नाही. ते आपल्याकडे सातत्याने आहेच. पण, श्रीदेवीचे वेगळेपण हे आहे की, प्रत्यक्ष राजकारणात न येता राजकीय नेत्यांना तिचे आकर्षण होते. अर्थात हे आकर्षण फक्त तिच्याभोवती असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाचे होते. बाकी कसले नाही. याचे कारण श्रीदेवी ही १९८० च्या दशकात इतकी व्यस्त अभिनेत्री होती की, सुपरस्टार अमिताभ बच्चननंतर सर्वाधिक मानधन घेणारी ती अभिनेत्री आहे, असा तिचा बोलबाला होता. अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी ती त्या काळातील कलाकार होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्याच तत्कालीन दिग्गज वलयांकित अभिनेत्यांबरोबर तिचे चित्रपट येत होते. त्यामुळे ते सगळेच सुपरहिट होत होते. एकीकडे पद्मालयातून दाक्षिणात्य मसाल्याचे जितेंद्र बरोबरचे होते, तर दुसरीकडे अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, रजनीकांत या सुपरस्टारबरोबर तिचे चित्रपट होते. याशिवाय कमल हसन, सनी देओल, ऋषी कपूर, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ यांच्याबरोबरही तिचे चित्रपट येत होते. प्रत्येक हिरोचा कोणता ना कोणता तरी सुपरहिट चित्रपट येत असताना त्यात श्रीदेवी असायचीच.त्यामुळे ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून गणली गेली होती. तिची लोकप्रियता एका उंचीवर पोहोचलेली होती. केवळ तरुणांना किंवा पुरुषांनाच आवडणारी नाही तर स्त्रियांनाही आवडणारी अशी ती अभिनेत्री होती. तिचे वैशिष्टय़ असे होते की, तिने कोणताही ड्रेस घातला तरी तो छानच दिसायचा. लांबसडक वेणी आणि कोपरापर्यंत ब्लाऊज असलेला, मोठा पदर काढून पिनअप केलेल्या साडीतील खानदानी श्रीदेवी असो की, अगदी उनाड मैना वाटावी अशी आईस्क्रीम खाओगी, मम मिया, प्यार की गाडी तेज चलाओ म्हणत जितेंद्र बरोबर बेलबॉटम किंवा जिन्स टी-शर्ट घालून तिचा वावर असला तरी छानच दिसायची. साहजिकच प्रत्येकाच्या मनात या ८० च्या दशकात तिने धुमाकूळ घातला होता. साहजिकच राजकीय नेत्यांना तिचे आकर्षण वाटले नाही तरच नवल. पण, हे आकर्षण जेव्हा काँग्रेसचे नेते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांना वाटले आणि त्यांनी श्रीदेवीचा वापर आपल्या सभागृहातील भाषणासाठी केला तेव्हा सगळ्यांनीच विठ्ठलराव गाडगीळांचेही कौतुक केले होते. याचे कारण म्हणजे बॉलिवुडमध्ये श्रीदेवीचे झालेले पदार्पण आणि तिची वाढती लोकप्रियता. यशाची शिखरे पादाक्रांत करणे आणि काँग्रेसला उतरती कळा लागणे हा कालावधी एकच आहे. एकीकडे श्रीदेवी वर वर जात होती, तर काँग्रेस खाली खाली येत होती. १९८० च्या दशकात इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुका वगळता काँग्रेसला आपले अस्तित्व दाखवता आले नाही. काँग्रेस स्वबळातून आघाडीमध्ये घुसली. त्याच काळात ‘सोलवा साल’सारख्या फारसा न चाललेल्या चित्रपटातून पदार्पण करणा-या नंतर ‘हिंमतवाला’ झालेल्या श्रीदेवीने मात्र आपली ताकद वाढवत नेली होती.त्यामुळे तिच्या लोकप्रियतेचा वापर करण्याचे राजकारणातील चतुर किंवा पुणे काँग्रेसमधील साडेतीन शिरोमणी म्हणतात, त्यापैकी एक असलेल्या बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांनी तिचा वापर खुबीने सभागृहात केला होता. त्यामुळे प्रत्यक्ष राजकारणात न येताही श्रीदेवी लोकसभेत सभागृहात पोहोचली होती. बॅ. गाडगीळ म्हणजे विद्वत्तापूर्ण वक्तव्य करणारे नेते. त्यांची सभागृहातील भाषणे ऐकायला विरोधी पक्षही सरसावून कान देऊन बसायचा. याचे कारण ते आपल्या भाषणात नेहमीच छानसे किस्से, चुटकुले सांगायचे. एकदा त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू होता. अध्यक्षांचे कोणीच ऐकत नव्हते. दोन गट एकमेकांशी जोरजोरात वाद घालत होते. विशेष म्हणजे हे वाद घालणारे दोन विभिन्न पक्षांचे गट नव्हते किंवा सत्ताधारी आणि विरोधक असेही नव्हते. दोन्ही गटात सगळ्याच पक्षांचे आणि सत्ताधारी, विरोधी पक्षांचे नेते होते. असा प्रकार नवीनच होता. एक गट होय म्हणत होता तर दुसरा गट नाही म्हणत होता. शेवटी अध्यक्षांनी ओरडून विचारले की, नेमका वाद काय आहे? तुम्ही कशावरून भांडत आहात, होय-नाही म्हणत आहात ते सांगा अगोदर. त्याचा निवाडा करू मग सभागृहाचे कामकाज करू. तेव्हा अध्यक्षांना कोणीतरी सांगितले की, श्रीदेवीचे लग्न ठरले आहे. यातील एक गट म्हणतो ठरले आहे, तर दुसरा गट म्हणतो नाही ठरले.त्यावरून हे सभागृह दणाणले आहे. अध्यक्ष म्हणाले, मग तुम्ही थेट श्रीदेवीलाच फोन लावा अन् विचारा. तिने काय ते सांगितल्यावर आपोआप वाद मिटेल, तुम्ही का भांडता? ताबडतोब संसदेच्या कार्यालयातून श्रीदेवीला लायटनिंग कॉल लावला गेला. त्याकाळी मोबाईलच काय एसटीडीही नव्हता. त्यामुळे र्अजट कॉलसाठी लायटनिंग कॉल लावला जायचा. तसा तो लावला गेला. नेमकी श्रीदेवी घरात होती अन् तिने फोन उचलला. तिला विचारण्यात आले की, ‘बाई तुझे लग्न ठरले हे खरे की अफवा?’ तेव्हा तिने सांगितले की, माझे लग्न ठरले होते हे खरे आहे. पण ते मी मोडले आहे हे लेटेस्ट बुलेटीन आहे. कारण माझे लग्न एका लाल नावाच्या माणसाशी ठरले होते. लग्नानंतर माझे नाव श्रीदेवीलाल झाले असते आणि सध्या श्रीदेवीलाल इतके बदनाम नाव कोणतेच नाही. त्यामुळे माझ्या कारकिर्दीला, लोकप्रियतेला धक्का लागू नये म्हणून मी हे लग्न मोडले आहे. गाडगीळांनी हा किस्सा सांगितल्यावर उपस्थित किमान तासभर हसत होते. याचे कारण उत्तर भारतातील राजकारणात ताउची भूमिका बजावणारे देवीलाल हे उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले असले तरी त्यांच्या किंगमेकरच्या भूमिकेमुळे ते सतत वादग्रस्त आणि बदनाम चर्चेत राहिले. काँग्रेसने त्यांच्यावरील राग काढण्यासाठी गाडगीळांच्या मुखातून असा वचपा काढला. त्यासाठी श्रीदेवीला काल्पनिक का होईना; संसदेतून फोन लावला गेला होता.
रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८
श्रीदेवी, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ आणि राजकारण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा