राज ठाकरे हे एक फार मोठे वादळ आहे, पण हे वादळ कोणत्या दिशेने वाहील हे सांगता येत नाही. वादळ आल्यावर त्याकडे पाठ करण्याची पद्धत आहे, तरच त्यात वाहून जात नाही, पण या वादळापुढे समोर तोंड केले, तर त्याचा अर्थ बदलतो हे नक्की. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप, मोदी, शहा यांच्याविरोधात वादळ उठवले होते. अर्थात त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादीला झाला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रचाराचे मॉडेल ठरलेल्या राज ठाकरे यांना शरद पवारांनी लांबच ठेवले. त्यामुळे राज ठाकरे यांना राज्यातील निवडणुकीतील अनपेक्षित आघाडीमुळे आपली दिशा बदलावी लागली. आपला मोर्चा बदलावा लागला. ती बदललेली दिशा आपल्याला रविवारच्या मोर्चातून पहायला मिळाली. हा मोर्चा भाजपपुरस्कृत असल्याचा आरोप विरोधकांनी केला असला, तरी राज यांनी आपली चांगली ताकद दाखवून दिली हे नक्की. त्यामुळे महाविकासआघाडीलाही आता विचार करावा लागेल हे नक्की.गेल्या वर्षी शरद पवार यांच्या प्रेमात पडून राज ठाकरे यांनी नुकसान सोसलेले आहे आणि आता उद्धव ठाकरे त्यांचे अनुकरण करीत आहेत, पण त्याचवेळी आपली चूक सुधारून राज ठाकरे पुन्हा आपल्या पाळेमुळांकडे वळायला निघालेले आहेत. मनसे हा मुळातच शिवसेनेतून फुटून निघालेला पक्ष होता आणि बाजूला होतानाही राज ठाकरे यांनी शिवसेनेच्याच मूळ भूमिकेचा वारंवार उल्लेख केलेला होता. त्यामुळे हा मोर्चा केवळ पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांविरोधात नाही, तर शिवसेनेच्या विरोधातही तितकाच आहे, कारण तुम्ही भूमिकेपासून भरकटला आहात म्हणून भगवा आम्हाला डोक्यावर घ्यावा लागत आहे हे राज ठाकरे यांनी अधोरेखित केले आहे. राज यांच्या या भूमिकेमुळे नाराज शिवसैनिक व मतदारांचा प्रतिसादही मिळालेला दिसला.नाराज शिवसैनिकांना राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीही जवळ केले होते. मोदी, शहा नको हे दाखवण्यासाठी आणि झाला तर अप्रत्यक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीला फायदा करून देण्याच्या भूमिकेने महाराष्ट्रात काहीच फरक पडला नव्हता, पण नाराज शिवसैनिक आपल्याकडे वळत आहेत हे त्यांचे यश होते. मनसेच्या स्थापनेनंतर कधीही स्पष्ट भूमिका न करणाºया राज यांनी लोकसभेपूर्वी थेट शरद पवारांशी संधान साधले होते, पण त्यांना पूर्णपणे दिशाहीन करण्याचे उत्तम मार्गदर्शन शरद पवारांनी केले. अखेरीस आपण कोण व आपली भूमिका काय; त्याचेही स्मरण राजना उरले नाही. मग पवारांनी मनसेकडे पाठ फिरवून शिवसेना नावाचा नवा तगडा मित्र आपल्या गळाला लावलेला आहे. आता कुठे राज ठाकरे यांना जाग आलेली असून, त्यांनी आपला वारसा शोधून पुन्हा त्या दिशेने वाटचाल करायचे ठरवलेले आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेला मुहूर्तच सूचक होता.पंधरा दिवसांपूर्वीच बाळासाहेबांच्या जन्मदिनी म्हणजे २३ जानेवारीला राज यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल केला. त्यावर छत्रपतींची राजमुद्रा आली आणि वातावरण एकदम ढवळून निघाले. बाजारात मूळचा ओरिजिनल माल उपलब्ध असताना कोणी त्याची नक्कल वा ड्युप्लिकेट पत्करायला सहसा राजी होत नाही, पण मूळच्या वस्तूची गुणवत्ता वा दर्जा घसरू लागला, मग लोक जवळीक सांगणाºया पर्यायाकडे वळत असतात. शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळवल्यापासून आपल्या मूळच्या भूमिका व वारशाला फाटा देण्याचा सपाटा लावला आहे. सहाजिकच त्यासाठीच सेनेकडे आकर्षित झालेला वर्ग बिथरलेला होता. त्याला त्या वारसाच्या खाणाखुणा दिसतील अशा बाजूला त्याने वळणे स्वाभाविक आहे. मनसे त्याच दिशेने वळण घेण्याच्या तयारीत आहे आणि शिवसेनेची शक्ती खेचणे, हाच त्यांचा मनसुबा आहे. साहजिकच हा मनसेचा मोर्चा पाक, बांगलादेशी घुसखोरांपेक्षा शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दबावामुळे शिवसेनेला स्वत:चा अजेंडा राबवता येत नाही. त्यामुळे नाराज शिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्याची हीच ती वेळ आहे हे गणित राज ठाकरेंनी मांडले आहे. म्हणजे पाक, बांगलादेशी घुसखोरांना हाकला आणि आमचे कोंडमारा झालेल्या शिवसैनिकांना बोलवा, असा दुहेरी अजेंडा या मोर्चात होता हे नक्की. शिवसेना कायम छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीप्रमाणे करते. सरकारने काही वर्षांपूर्वी १९ फेब्रुवारी ही तारीख नक्की केल्यावरही शिवसेनेने आपला हट्ट सोडला नव्हता, पण आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना डिवचल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करणार असल्याचे सांगावे लागले. त्याचवेळी ती शिवजयंती सरकारची, मुख्यमंत्री म्हणून करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर शिवसेना पक्ष म्हणून तिथीप्रमाणेच साजरी करणार, अशी भूमिकाही घेतली. या दुहेरी भूमिकेत त्यांची कोंडी होत आहे. शिवसेनेला आपले विचार गुंडाळावे लागत आहेत. हिंदुत्व, सावरकर अशा विषयांपासून दूर होत काँग्रेसवासी होण्याची वेळ येत आहे. त्यामुळे शिवसेनेचे, बाळासाहेबांच्या विचारांचे रक्त असलेले शिवसैनिक नाराज होत आहेत, दुखावत आहेत. त्यांना पर्याय दाखवण्याचे काम या मोर्चातून राज ठाकरे यांनी केले आहे. शरद पवारांच्या जवळकीने राज यांना एका दगडात दोन पक्षी कसे मारायचे ही कला अवगत झाल्याचे ही साक्ष आहे.म्हणजे मनसेला शिवसेनेच्याच पाठीराख्यांना जिंकायचे असेल, तर तिथला अनुयायी व पाठीराखा नाराज होण्याला प्राधान्य असते. शिवसेनेविषयी त्यांच्याच समर्थकांत अस्वस्थता, साशंकता येणे खूप महत्त्वाचे आहे. ते काम सेनेच्या प्रस्थापित विचार, मूल्ये व भूमिकांपासून शिवसेनेने फारकत घेण्यातून होत आहे. गेल्या महिन्याभरात हे काम झपाट्याने संजय राऊत यांनी हाती घेतले होते. सावरकर असो वा शिवरायांचे वंशज असोत, त्यावरून जे वादळ उठवण्यात आले आणि वाद पेटवण्यात आले होते, त्यात शिवसेनेला आपली खास आक्रमक भूमिका घेणे अशक्य होऊन गेले होते. सत्ता टिकवायची तर भूमिकेला मुरड घालण्याशिवाय पर्याय नाही, पण त्यातून आपोआपच राज ठाकरे यांना तीच भूमिका अतिशय आक्रमक पद्धतीने पेश करण्यासाठी मैदान मोकळे करून देण्यात आलेले आहे. सावरकरांविषयी राहुल गांधींनी अनुदार उद्गार काढले आणि त्यांना माघार घ्यायला भाग पाडणे शिवसेनेला साधले नाही. उलट तशी भूमिका घेणाºया योगेश सोमण यांना शिवसेनेची सत्ता असताना विद्यापीठातून सक्तीच्या रजेवर धाडण्याची शिक्षा मात्र झालेली आहे. म्हणजे मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी सेना आपल्या भूमिकेलाच तिलांजली देत असल्याची स्थिती निर्माण झाली वा केली गेली आहे. आपोआप ती मनसेसाठी पोषक स्थिती झालेली आहे. मनसे त्यावर तुटून पडली, तर सेनेतले अस्वस्थ समर्थक काय करतील? म्हणजे हा मोर्चा बांगलादेशी, पाकी घुसखोरांविरोधात नव्हता तर अडचणीत सापडलेल्या, कोंडमारा झालेल्या शिवसैनिकांना खुणावणारा, पायघड्या घालणारा होता हे लक्षात घेतले पाहिजे. आता २३ जानेवारीच्या सभेत मार्चमध्ये आपण स्पष्टपणे बोलणार असल्याचे सांगितले होते. हा स्पष्टपणा या महाविकासआघाडीच्या गोधडीतील लक्तरे काढण्यासाठी असणार हे नक्की.शिवसेनेचा काँग्रेस, राष्ट्रवादीकडून झालेला कोंडमारा आणि त्याचवेळी संजय राऊत यांनी शिवरायांच्या वारसांकडे ते खरेच वंशज असल्याचे पुरावे मागण्यापर्यंत मजल मारली आहे. त्या आगीत तेल ओतण्यासाठी शरद पवारांनी शिवराय व समर्थ रामदास हा मुद्दा उकरून काढला आहे. सर्वसाधारण परिस्थितीत एव्हाना शिवसेना या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात मराठी अस्मिता म्हणूनच रस्त्यावर आली असती, पण पक्षप्रमुख त्याविषयी मूग गिळून गप्प आहेत आणि सामना त्या नाकर्तेपणालाच पुरुषार्थ ठरवून शिवरायांच्या वारसांनाच आव्हान देत आहेत. यापेक्षा मनसेला आणखी काय हवे होते? मनसेचे शेत सुपीक व्हायला संजय राऊत यांनी मशागत करूनच चांगला हातभार लावला होता. म्हणजे मधल्या काळात ज्या घटना वेगाने घडल्या, त्या मनसेला नवी संजीवनी देण्यासाठी मोठ्या उपकारक ठरत आहेत हे नक्की. अर्थात याचे मुख्य कारण लक्षात घेतले पाहिजे. आजही इतके होऊन जितक्या प्रभावी पद्धतीने त्यावर भाष्य व्हायला पाहिजे, तितके कोणी करू शकलेला नाही. कारण तितकी मुलूखमैदान तोफ अन्य कुठल्या राजकीय गोटात नाही. ती फक्त मनसेकडे आहे. त्यामुळे राज ठाकरे नवे वादळ निर्माण करतील ते नेमके कसे असेल हे आता पुढच्या काही महिन्यांत दिसेल, पण शिवसेनेत अपेक्षाभंग झालेले संजय राऊत हे अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना नवे मुद्दे फिड करून शिवसेनेचा अजेंडा राबवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मोर्चाची दिशा ही फार वेगळी आहे. महत्त्वाकांक्षी आहे हे नक्की. भाजप, शिवसेना आणि सर्वांकडूनच लाभ मिळवायचा आणि मोठे होण्याचा हा फार मोठा प्रकार आहे.
मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०
मोर्चाची दिशा वळवली
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा