शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

राजकीय व्हॅलेंटाइन!



‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणांचा’ अशी आपल्याकडे उक्ती आहे. त्याप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्षाला सत्तेसाठी सतत कोणाच्या तरी प्रेमाची भूक असते. या प्रेमाच्या आधारावरून आपले स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण आंतरजातीय विवाह करतात. या ठिकाणी आंतरजातीय म्हणजे भिन्न विचारांच्या पक्षांशी तडजोड करून सत्ता ग्रहण करतात आणि चालेल तोपर्यंत संसार टिकवतात. अशा काही प्रेमाच्या संसारांचा आढावा व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपण घेणार आहोत.आमची नैसर्गिक युती आहे या विचारावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रेम केले आणि आपला व्हॅलेंटाइन साजरा केला. या काळात व्हॅलेंटाइनला विरोध करण्याचा कार्यक्रमही शिवसेनेने हाती घेतला होता, पण नंतर युवा पिढी आली आणि व्हॅलेंटाइन ही काळाची गरज आहे हे लक्षात घेतल्यावर तो विरोध मावळला, पण हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप-शिवसेनेला लागलेला प्रेमरोग सप्टेंबर २०१४ पर्यंत टिकला होता. पुढे त्यांच्यात फुट पडली. पुन्हा फेब्रुवारी २०१५ च्या व्हॅलेंटाइनला हे प्रेमीयुगुल एक आले आणि पाच वर्षे भांडत नांदणारा हा प्रेमविवाह २४ आॅक्टोबर २०१९ ला मोडला. ही राजकीय व्हॅलेंटाइनची सेना-भाजपची शोकांतिका होती. २५ वर्षांच्या या प्रेमविवाहातून युतीला मुख्यमंत्रीपदाची दोन अपत्ये झाली. ती १९९५ ते १९९९ या काळात. मनोहर जोशी आणि नारायण राणे ही त्यांची नावे. मधल्या काळात वेगळे झाल्यावर कमळाबाईला मुख्यमंत्रीपदाचे अपत्य झाले. कालांतराने युतीच्या नावाखाली त्या अपत्यालाही युतीच्या व्हॅलेंटाइनने दत्तक घेतले, पण कालांतराने या दत्तक पुत्राच्या कर्तबगारीने युतीचे कुटुंब हैराण झाले आणि युतीपेक्षा पुत्र मोठा होत आहे या भीतीने पुन्हा घटस्फोट झाला. प्रेमाचे चिन्ह बदाम-बाण असते. कमळ हे प्रेमाचे प्रतीक असते, पण बाण बदामात न जाता कमळाचर देठ तोडला आणि बाण दुसरीकडे घुसण्याचा प्रकार झाला.राजकीय व्हॅलेंटाइनमधील दुसरा प्रेमविवाह म्हणजे सोनिया गांधींच्या पंतप्रधानपदाच्या दाव्याला विरोध करत काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली. १९९९ ची निवडणूक ही युती विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी झाली. यात युतीला सर्वात मोठा कौल मिळाला होता, पण बहुमतापासून लांब होती. त्यामुळे केवळ युतीच्या हातात सत्ता जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीच्या काळजात टिक् टिक् होऊ लागली आणि त्यांनी काँग्रेसकडे प्रेमाचा हात मागितला. काँग्रेसनेही मोठ्या मनाने या प्रेमाचा स्वीकार केला. मग त्यांचा संसार तब्बल पंधरा वर्षे चालला. यामध्ये आघाडीला मुख्यमंत्रीपदाची अनेक अपत्ये झाली, पण त्या अपत्यांवर काँग्रेसचे नाव लागले. यामध्ये विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या अपत्यांचा समावेश करावा लागेल, मात्र काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे अपत्य होण्याची इच्छा असणाºया नारायण राणे या बाळाचा या प्रेमातून जन्म होण्यापूर्वीच प्रत्येक वेळी गर्भपात होत राहिला.राजकारणात यशस्वी व्हायचे असेल, तर चांगला प्रेमी आपल्याला मिळाला पाहिजे. त्यामुळे राजकीय पक्ष हे सतत आपल्याला साथ देईल, अशा प्रेमिकाचा शोध घेत असतात. महाराष्ट्रात शिवसेना २०१९ मध्ये अशाच नव्या प्रेमिकाच्या शोधात होती, पण आता केवळ एका प्रियकरासोबत राहून संसार करणे शक्य नसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा आघाडीशी त्यांनी प्रेमविवाह केला आणि त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून जन्माला आले ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नावाचे अपत्य. तडजोडीच्या प्रेमातून हे अपत्य जन्माला आले असले, तरी आपल्या जुन्या प्रेमाची आठवण त्यांना कधी कधी आल्याशिवाय राहात नाही. अनेक कार्यक्रमांतून या जुन्या प्रेमाची आठवण बाहेर येते. कारण पहिले प्रेम हे पहिले असते. ते विसरता कधीच येत नसते. साहजिकच आज आपल्याबरोबर असलेली ही प्रेमिका आपल्या हातात राहील काय? असा सवाल राष्ट्रवादीला पडतो. त्यामुळे ते हाताकडे पाहतात, तर किती काळ राहणार यासाठी काँग्रेस घड्याळात पाहात असते, मात्र हा प्रेमविवाह अ‍ॅरेंज करणारे संजय राऊत मात्र एका हातात घड्याळ बांधून दुसºया हातात धनुष्य उचलतात आणि म्हणतात, ‘ये फेव्हिकॉल का जोड हैं, टुटेगा नहीं!’ फेव्हिकॉल लावलेला हा राजकीय व्हॅलेंटाइन पूर्ण काळ टिकेल अशी अपेक्षा जनता करत आहे.तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रेमी राज ठाकरे यांची मात्र गेल्या तेरा वर्षांत जुळता जुळता जुळत नाही अशी अवस्था आहे. नक्की कोणावर प्रेम करावे या गोंधळलेल्या स्थितीत अव्यक्त प्रेमाची कहाणी गाताना दिसतात. त्यासाठी अनेकांवर लाइन मारून झाली. काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांवर प्रेम व्यक्त करत राहिले. हे लग्न जमवण्यासाठी व्हिडीओ कॅसेट काढल्या, पण या व्हिडीओत काँग्रेस-राष्ट्रवादी हे वधू-वरच नसल्याने त्या विवाहाचा व्हिडीओ लोकांना आवडला नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे जमले नाही आणि राज ठाकरे यांना दत्तक घेण्याचे स्वप्न भंगले. त्यानंतर सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असा प्रेमविवाह झाल्यावर आता मनसेला नवा प्रेमी कोण? असा प्रश्न पडला, पण आता थेट प्रेम न करता छुपे प्रेम करायचे, त्यासाठी भगवा खांद्यावर घेऊन भाजपपासून अलग झालेल्या शिवसेनेची पोकळी भरून काढण्याचा फंडा समोर आला. आता हे प्रेम बहरायला किती वेळ लागतो, हे पाहण्यासाठी पुढचे दोन व्हॅलेंटाइन वाट पाहावी लागेल. कारण मुंबई, नाशिक, ठाणे महापालिका निवडणुका २०२२ मध्ये असतील, तेव्हा या प्रेमाचे फळ काय मिळते, हे दिसून येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: