गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

पर्याय तयार होऊ शकतो!




या देशाची जनता कोणालाही केंद्रात दहा वर्षांपेक्षा जास्त सत्तेवर राहू देणार नाही. दहा वर्षांत नवा पर्याय उभा राहू शकतो यावर मतदारांचा आता विश्वास बसत आहे. त्यामुळेच आता मोदी सरकारची ही अखेरची चार वर्षे असू शकतात. कारण यूपीए-२ च्या काळात जे घडत गेले, तेच आता मोदी-२ सरकारबाबत होताना दिसत आहे. यूपीए-२ मध्ये डॉ. मनमोहन सिंग सरकारला प्रचंड नाराजीला, टीकेला सामोरे जावे लागले होते. आता तोच प्रकार मोदींच्या वाट्याला येताना दिसत आहे. त्यामुळे नवा पर्याय तयार होण्याच्या दृष्टीने विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. मोदींच्या उणिवा दाखवून त्यांची कामे झाकण्याचे प्रकार इथून पुढे पाहायला मिळतील. ज्या कलम ३७०, एआरसी, सीएए यामुळे मोदी सरकारचे कौतुक झाले, तेच त्यांना शापव्रत ठरतील काय? अशी भीती आता निर्माण झालेली आहे. विशेषत: महाराष्ट्रातील समीकरण आणि दिल्लीतील निकालावरून हे स्पष्ट झाले आहे की, आगामी काळात भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येणे अवघड आहे. ज्याप्रमाणे २०१३ च्या सुरुवातीला नरेंद्र मोदींना विकासपुरुष म्हणून भाजपने गोवा मार्गे पुढे आणले, तसाच एखादा उदय येत्या दोन वर्षांत होईल. काही तरी वेगळे घडेल असे वातावरण तयार होताना दिसत आहे.दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देशभक्तीच्या मुद्यावरून घेरलें तेव्हा केजरीवाल यांनी आपण 'कट्टर देशभक्त' असल्याचं सांगितलं. त्यांनी किती तरी वेळा याचा उल्लेख केला की, भाजपने त्यांना अतिरेकी म्हटलं असलं, तरी ते 'कट्टर देशभक्त' आहेत. ११ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागला आणि आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाला, तेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह पक्ष कार्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांना 'कट्टर देशभक्त' म्हणाले, पण हेच केजरीवाल काही तरी चमत्कार करू शकतात. आज दिल्लीपुरती मर्यादित असलेली ताकद ते येत्या दोन वर्षांत देशभरात वाढवू शकतात. पक्षबांधणी करताना अनेक पक्ष विलीन करून घेऊ शकतात. अर्थात, केजरीवाल यांचे वैशिष्ट्य आहे की, ते विरोधासाठी विरोध करत नाहीत, म्हणजे आज काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष विरोधासाठी विरोध करतात. सरकार हा आपला शत्रू आहे या प्रकारे वागतात, तसे केजरीवाल यांचे नाही. दिल्लीने दिलेला निकाल मोदींच्या धार्मिक धोरणांविरोधात नाही. अरविंद केजरीवाल हे पहिले नेते होते, ज्यांनी काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. अरविंद केजरीवाल यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नोंदणी रजिस्टर याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनापासून स्वत:ला दूर ठेवलं, तर मागच्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियानाचे आवाहन सर्व देशाला केले, तेव्हा हातात झाडू घेऊनही केजरीवाल उतरले होते. त्यामुळेच आपले वेगळेपण त्यांनी जपले आहे. त्यामुळे त्यांना मोठे होण्यास वाव आहे.अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या रणनीतीला आव्हान दिलेलं नाही. केजरीवाल यांनी या निवडणूक प्रचारात भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाचा विरोध केला नाही. केजरीवाल यांच्या संपूर्ण प्रचार मोहिमेतून हाच संदेश गेला की, त्यांना धार्मिक राजकारणाची अडचण नाही, मात्र ते उघडपणे हे बोलणार नाहीत. ही सगळी मोदींच्या २०१४ च्या पावलावर पाऊल टाकण्याची लक्षणे आहेत. नरेंद्र मोदी नावाचे वादळ जेव्हा २०१४ ला आले, त्यापूर्वी वर्ष-दीड वर्ष ते निर्माण करताना सकारात्मकता दाखवली गेली होती. त्यांची प्रतिमा विकासपुरुष अशी केली होती, म्हणूनच अच्छे दिन आयेंगे असे स्वप्न निर्माण केले. त्यांनी थेट काँग्रेसवर टीका त्यावेळी केली नाही, तर मीच कसा चांगला आहे हे दाखवले होते. याउलट काँग्रेस प्रत्येक निवडणुकीत मोदींवर प्रचंड टीका करत होती. त्यामुळे ती मनातून उतरत गेली. एकीकडे विकासपुरुष, हिंदुत्ववादी आक्रमक असा चेहरा तरुणांमध्ये लोकप्रिय होत असताना, त्याला मौत का सौदागर संबोधून काँग्रेसने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला होता. तोच प्रकार आज भाजप करत आहे. केजरीवाल यांच्यावर चुकीची टीका करताना कधी त्यांना देशद्रोही म्हटले, तर कधी आणखी काही, पण केजरीवाल यांनी आपल्या कामावर मते मागितली. त्यामुळे हाच पर्यायी चेहरा येत्या दोन वर्षांत परिपक्व नेता म्हणून नव्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार बनू शकतो, किंबहुना आघाडी न होता १९७७ साली जसे अनेक पक्ष एका जनता पक्षाच्या नांगरधारी शेतकरी या झेंड्याखाली एक झाले. त्यात डावे, उजवे, जनसंघवाले एक झाले, तसेच आम आदमी पार्टीबाबत होउ शकते. कारण आता मोदी विरोधाची प्रचंड लाट निर्माण होताना दिसत आहे.विशेष म्हणजे, मोदींना जशी विजयाची सवय झाली आहे, तसेच केजरीवाल निवडणूक जिंकण्यात पटाईत झाले आहेत, मात्र त्यांना हे ठरवावं लागेल की, निवडणूक जिंकणारी मशीन व्हायचं आहे की, देशाच्या राजकारणात काही निर्णायक भूमिका बजावायची आहे. भाजप आणि मोदी यांची जी राजकीय वचनबद्धता आहे, त्याचा सामना केजरीवाल आपल्या राजकारणाने करू शकतील. त्यामुळेच मोदी आणि भाजपबद्दल जी भीती आहे, त्यावरचा तोडगा केजरीवाल आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. वीज आणि पाणी स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचं काम कुठलाही राजकीय पक्ष करू शकतो. भाजपसुद्धा करू शकतो, मात्र आज देशाच्या लोकशाहीला केवळ वीज आणि पाणी हे प्रश्न भेडसावत आहेत का? मोदींचा विरोध करणारे केजरीवाल यांच्या विजयावर खूश होऊ शकतात, मात्र हा विजय पुन्हा त्याच भीतीत बदलू नये.राहुल गांधी यांनी कलम ३७०, सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी यांचा संसदेपासून रस्त्यापर्यंत विरोध केला आहे, मात्र काँग्रेसला दिल्लीत एकही जागा मिळाली नाही. इतकंच नाही तर त्यांचा व्होट शेअरही २०१५ च्या तुलनेत घसरला.दिल्लीचा जनादेश मोदींच्या धोरणाविरोधात असता, तर काँग्रेसचा विजय झाला असता, आम आदमी पक्षाचा नव्हे. कारण मोदींच्या धोरणाचा उघडपणे विरोध राहुल गांधी यांनी केला आहे, अरविंद केजरीवाल यांनी नव्हे. एका मोदीचा पराभव करण्यासाठी घाईघाईत दुसरा मोदी तयार होऊ नये, अशी स्थिती निर्माण केली जात आहे. त्यामुळेच भारतीय राजकारण एका नव्या वळणावर आलेले आहे. आता कोणाला पक्ष, नेता याच्याशी काही पडलेले नाही. देशासाठी, सामान्यांसाठी, जनतेसाठी काय करणार बोला. दहा वर्षे काँग्रेसला दिली, दहा वर्षे भाजपला दिली आहेत. आता काँग्रेसकडे पर्याय नाही, पण केवळ पर्याय नाही म्हणून भाजपला, मोदींना पुन्हा निवडून देण्याची मतदारांची मानसिकता नाही. त्याचा फायदा उठवत आप हा पक्ष मोठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला आपले काम चोख करावे लागेल. कामावर बोलावे लागेल. वाचाळवीरता कमी करावी लागेल. वादग्रस्त विधाने करणाºया नेत्यांना लांब ठेवावे लागेल. यूपीए-२ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचा कोणी विचारच करत नव्हते. काँग्रेसचे दिग्विजय सिंग, कपिल सिब्बल, मणिशंकर अय्यर हे काहीही बोलत होते आणि राहुल गांधी त्यांच्या सुरात सूर मिसळत होते. त्यामुळे राहुल गांधींचे हसे होत होते. आज असेच वाचाळवीर भाजपमध्ये तयार होताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपला हा धोक्याचा सिग्नल म्हणावा लागेल.तसं पाहिलं तर मोदी आणि केजरीवाल यांच्यात अनेक साम्यं आहेत, म्हणूनच केजरीवाल त्यांना पर्याय होण्याचा प्रयत्न करतील. दोघांनाही पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर विरोध सहन होत नाही. भाजपमध्ये मोदींना प्रश्न विचारणारा कुणी नाही, त्याचप्रमाणे आम आदमी पक्षातही केजरीवाल यांना प्रश्न विचारणारा कुणी नाही. दोघांचाही निवडणूक प्रचार व्यक्तीकेंद्रित असतो. दोघांसाठीही मंत्रिमंडळ आणि सभागृह यापेक्षाही वर त्यांचं मन आहे. आपण मोदींवर धर्मनिरपेक्षतेबाबत विश्वास ठेवू शकत नाही, तर ते केजरीवाल यांच्या भरवशावरही सोडू शकत नाही. ८ फेब्रुवारीला मतदानाला जाण्याआधी अरविंद केजरीवाल आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाला. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईला भेटायला अहमदाबादला जातात, तेव्हा ते दृश्य टीव्हीवर लाइव्ह दाखवण्यात येतं.म्हणजे एकीकडे मोदींचा पर्याय, त्यांच्या पद्धतीनेच कार्यपद्धती असलेले नेतृत्व, तीन वेळा मुख्यमंत्रीपद अगदी दिल्लीचे का असेना, पण सांभाळत आहेत. कारण भाजपला दिल्ली सांभाळता आलेली नाही. त्या तुलनेत ती काबिज करणे सोपे नाही. त्यामुळे ज्या प्रकारे यूपीए-२ मध्ये लोकप्रियता घसरत गेली, तशीच आता भाजपची अवस्था होण्याची शक्यता आहे. यूपीए-१ पेक्षा यूपीए-२ मध्ये काँग्रेसला लोकसभेत जास्त जागा मिळाल्या होत्या. भाजपचेही तसेच झालेले आहे. त्यामुळे वाढते वाचाळवीर, महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, जनतेची भरकटल्यासारखी संभ्रमावस्था. ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी सरकार कोणतेही प्रयत्न करत नसल्यामुळे त्याचा फायदा उठवत नवी शक्ती १९७७ च्या जनता पक्षाच्या फॉर्म्युल्यातून तयार होऊ शकते. खूप मोठा विकास केलेला चेहरा नसला, तरी सामान्यांना हवे असलेले विषय उचलण्यात केजरीवाल मातब्बर आहेत. त्यामुळे सामान्यांपर्यंत ते पटकन पोहोचू शकतात. त्याचा फायदा २०२४ ला पर्याय निर्माण करण्यासाठी होऊ शकतो. भाजपचा मार्ग रोखण्याचे काम ते करू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: