माझ्या मराठी मातीचालावा ललाटास टिळाहिच्या संगाने जागल्यादºयाखोºयातील शिळा॥किती सहज शब्दातून आपल्या मराठी भाषेचा गौरव कुसुमाग्रजांनी केलेला आहे. मराठी भाषेतील अद्भूत साहित्यिक कवी कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर अर्थात तात्यासाहेब शिरवाडकर यांचा आज जन्मदिन. हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून गौरवला जातो. कुसुमाग्रजांचाच जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून का गौरवला गेला आहे, यासाठी त्यांच्या कार्यावरून एक धावती नजर मारणे आवश्यक आहे. धावतीच, कारण शिरवाडकरांचे साहित्य इतक्या सहजासहजी पचनी पडेल आणि एका लेखात त्याचा आढावा घेता येईल असे नाही. म्हणून फक्त ओळखच करून घेता येईल.मराठीतील एक अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक अशा अनेक अंगांनी वि. वा. शिरवाडकरांनी आपले योगदान दिलेले आहे. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस म्हणजे २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. त्यांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे.कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते. वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले. कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले. एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे, अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. १९३३ साली त्यांनी ‘ध्रुव मंडळा’ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ. ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले. केवळ कवी असलेले वि. वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले. सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे, या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णत: लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्यावेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि अविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात.कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाच वेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. कुसुमाग्रजांची नाविन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे. नाविन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामिलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाजजीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात.साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. माणसे मर्त्य असतात, पण त्यांनी उच्चारलेला वाङ्मयीन शब्द मात्र अजरामर असतो. पृथ्वीवरच्या नाशवंत पसाºयामध्ये हीच एक शक्ती अशी आहे की, जिला चिरंजीवनाचे वरदान लाभलेले आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते. देशादेशांतील अंतर या शब्दाने कमी होते आणि युगायुगांची साखळी या शब्दानेच जोडली जाते. या प्रभावी शक्तीचे, शब्दाचे अवतारकार्य कोणते? माणसांच्या मनावर संस्कार करणे हे एकच एक त्यांचे अवतारकार्य होय. संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव आहे. साहित्य हे शब्दाश्रित असल्यामुळे तेही वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या मनावर कोणते न कोणते संस्कार केल्याविना राहत नाही.अनुभवावर आधारित लेखनाला कुसुमाग्रजांनी प्राधान्य दिलेले आहे. माणसे संपत नाहीत, माणसाचे अनुभव संपत नाहीत, विषय संपत नाहीत. त्यामुळे साहित्यसरितेचा प्रवाह सतत जिवंत, वाहता आणि वाढता ठेवण्याचे कार्य मुख्यत: अनुभवाकडून होत असते. शिवाय साहित्याला कलाकृतीचे स्वरूप अनुभवामुळेच येते. योग्य अनुभवाच्या अभावी साहित्याला श्रेष्ठ कलाकृतीचे रूप येणार नाही.कुसुमाग्रजांच्या मते, काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद असतो. आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसºयापर्यंत पोहोचवणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यांची ‘कणा’ ही कविता जगभर प्रसिद्ध आहेच, पण आणखी एक कविता मला फार आवडते. ती म्हणजे ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार...’ ही कविता बंडखोरांना आणि नव्याने काही करू पाहणाºयांना प्रेरणा देणारी आहे. ते एक क्रांतीचे महान गीत झालेले आहे. कायम इतिहासात रमणाºयांना आपल्या एका कवितेतून कुसुमाग्रज सुनावतात, पन्नशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका। मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका॥ काव्य हा कवीचा आत्मविष्कार असला तरी आत्माविष्काराची परिणती जेव्हा शब्दांच्या द्वारा संवादात होते, तेव्हाच काव्याचा उदय होतो. हा आविष्कार जेव्हा शब्दाचा म्हणजे सामाजिक व्यवहाराच्या माध्यमाचा आश्रय घेतो, तेव्हा तो काव्यरूप पावतो. शब्द ही एक सामाजिक घटना आहे. म्हणून शब्दांचा वापर करणे म्हणजे स्वत:कडून इतरांकडे, आविष्कारातून संवादाकडे जाणे या मताचे कुसुमाग्रज होते. शब्दांची सामाजिकता आणि कवीची कल्पकता यांची प्रक्रिया येथे घडून येते. म्हणून मराठी भाषा गौरव दिन म्हणून त्यांची जन्मतारीख निवडली गेली आहे. शिरवाडकरांचे आनंद हे पुस्तक काव्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यातील आनंदच्या मुखी गुंफलेल्या कविता मनाचा ठाव घेतात. ऋषिकेश मुखर्जींचा आणि पहिला सुपरस्टार आणि उगवता सुपरस्टार या राजेश खन्ना, अमिताभ बच्चनच्या आनंद या चित्रपटाचा स्रोत हाच आहे, हे अनेकांना माहिती नाही.कुसुमाग्रज हे नाटककार होते. त्यामुळे त्यांच्या नाट्यविचारातही लेखकसापेक्षता आहे. नाटक हे रम्य काव्य आहे, म्हणून इतर साहित्यप्रकाराप्रमाणेच चांगले नाटक हे वाङ्मयीन गुणांचा आविष्कार करणारे हवे. त्याला चांगली वाचनीयता हवी. नाटकाची वाचनीयता म्हणजे वाचकांच्या मानसिक रंगभूमीवर होणारा त्याचा प्रयोग असतो. नाटकातील ही गुणवत्ता हरवली तर सारेच हरवले. म्हणूनच कुसुमाग्रजांचे नटसम्राट, विदूषक ही नाटके प्रचंड गाजली, पण त्यांनी कर्णावर लिहिलेल्या नाटकातून कर्णाचे एक वेगळेच आणि खरे रूप दाखवण्याचे काम त्यांनी धाडसाने केले होते. कौंतेय या नाटकात त्यांनी उभा केलेला कर्ण हा उदारमतवादी नव्हता. कर्णाला महान केला तो शिवाजी सावंतांच्या ‘मृत्युंजय’ कादंबरीने, पण कर्णाचे वास्तव स्वरूप कौंतेय या नाटकातूनच समोर येते. म्हणूनच ते पचवणेही कठीण आहे, पण एखादा महान साहित्यिकच त्यावर भाष्य करू शकतो.कुसुमाग्रजांच्या मते, साहित्याने प्रत्यक्ष क्रांती होत नसली, तरी क्रांती ही साहित्याची प्रेरणा होऊ शकते. तसेच साहित्य लहानमोठ्या परिवर्तनास आवश्यक अशी मनोभूमिका निर्माण करू शकते. केवळ कलात्मक प्रेरणेचा आग्रह धरणे म्हणजे साहित्याच्या स्वाभाविक विस्ताराला मर्यादा घालणे असते. कुसुमाग्रजांच्या मते, लेखक हा सुसंस्कृत मनुष्य असतो. आपल्या मनावरील नीतिमत्तेचे प्राथमिक संस्कार त्याला कधीही पुसता येत नाही. लेखक नीतिबाह्य असू शकत नाही. प्रचलित नीतिकल्पनांच्या संदर्भात तो नीतिविरोधी असू शकेल. जुने नीतिनियम हे न्याय देण्यास असमर्थ होतात, मनावर अत्याचार करू लागतात, समाजाच्या प्रगतीस अडथळा आणतात. प्रस्थापित नीती ही नीतीचे नाटक असते. अशावेळी रूढ नीतीचे उल्लंघन लेखक करतात. तेव्हा त्यांच्या प्रतिभेला, माणसाला माणुसकी देणाºया शुद्ध सनातन नीतीचे दर्शन व्हायला हवे. नीतीची ही कल्पना बुद्धिवादी आहे, पारंपरिक नाही. साहित्यात, अश्लिलतेचा प्रश्न सामाजिक बंधनाचा आहे, तसाच तो अनुभव प्रामाणिकतेचाही आहे. ही भूमिका एकदमच निराळी आहे.अशा अत्यंत विशाल अभ्यासकाने मराठी भाषा ही किती खोल, अथांग आहे हे आपल्या साहित्यातून दाखवून दिले आहे. त्या कुसुमाग्रजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०
मराठी राजभाषा दिन आणि कुसुमाग्रज
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा