शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

बचतीचा सिद्धांत आणि काटकसर



असलेल्या उत्पन्नातून सगळे खर्च वजा झाल्यावर उरते ती शिल्लक किंवा बचत, पण आजकाल महागाई इतकी वाढली आहे की, बचत करणेच शक्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना काटकसर करावी लागणार आहे, पण ती काटकसर इतकी पराकोटीची करावी लागणार आहे की, अक्षरश: दात टोकरून पोटे भरावी लागणार की, काय? असा प्रश्न पडतो, म्हणूनच आज सादर होणाºया अर्थसंकल्पात काय बॉम्ब पडतात आणि सामान्यांची कशी बोंब होते, हेच पाहावे लागेल असे दिसते. कारण गेल्या दोन दिवसांपासूनच बातम्या येत आहेत की, स्वयंपाकाचा सिलिंडर महागणार, अमूक महागणार, तमूक महागणार, वगैरे, वगैरे, पण बचतीचा सिद्धांत आणि काटकसर हे डोक्यात ठेवले, तरी अर्थशास्त्राला छेद देणारेही विरोधाभासाचे सिद्धांत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.बचत करणे म्हणजे खरेदी कमी होणे, म्हणजे तेवढी अर्थव्यवस्थेतील उलाढाल कमी होणे, उत्पादनात आणि उत्पन्नातही त्यामुळे घट होणार. त्यामुळे बचत आणि काटकसर केल्याने अर्थव्यवस्थेचेच नुकसान होते असा विरोधाभासाचा सिद्धांत सांगतो, पण असलेल्या उत्पन्नात पुरेशी क्रयशक्ती नसेल, तर काय करणार सामान्य माणूस? पगारवाढ नाही, रोजगारवाढ नाही, वाढते ती फक्त महागाई. अशा परिस्थितीत सामान्य माणसाने नेमकी काटकसर कशी करायची? हाच प्रश्न आहे.आमच्या लहानपणी आमच्या शेजारी एक कुटुंब होतं. त्यांच्यात अतिशय काटकसर केली जायची. आसपासचे लोक त्यांच्या कंजूसपणाला, काटकसरीला, चिक्कूपणाला हसायचे, नावे ठेवायचे, पण त्यांनी कधीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यांच्यावरून ‘पायजम्याचे अळू करणे’ ही म्हण आमच्याकडे रूढ झाली होती, म्हणजे त्या कुटुंबातला प्रमुख एक पायजमा शिवायचा. तो तब्बल दोन वर्षे वापरायचा. दोन वर्षांनंतर तो पायजमा विटला किंवा रंग उतरला की, तो मांडीपर्यंत कापून त्याची अंडरपँट केली जायची. खालच्या भागाच्या पिशव्या केल्या जायच्या. ते वर्षभर वापरल्यानंतर जीर्ण झालेला लेंगा, पिशवी याच्या बारीक चिंध्या केल्या जायच्या. त्यातली रोज एक चिंधी बंब पेटवायला वापरली जायची. बंबात झालेल्या राखेचा वापर भांडी घासण्यासाठी केला जायचा. भांडी घासून धुतलेले ते राखेचे पाणी अळवाच्या खड्ड्यात टाकले जायचे. तिथे उगवलेल्या अळवाचे फदफदे करून मिटक्या मारून खाल्लेजायचे. त्याला पायजम्याचे अळू करणे म्हणतात, पण आज अनेक दशकांनंतर बाकीच्या घरांकडे पाहिले, तर त्यांची चैनीची वृत्ती वाढली आहे, तर त्या पायजम्याचे अळू करणाºया कुटुंबाने माडीवर माडी बांधून सोने-नाणे जमवले आहे. यात काही अतिरेक असला, तरी थोडीफार तरी काटकसर आता सरकार करायला लावणार हेच दिसत आहे. ही काटकसर संचयासाठी नाही, तर जगण्यासाठी करावी लागणार आहे.पगारवाढ नाही, उत्पन्नवाढ नाही, कसली उत्पादन वाढ नाही. वाढ होत आहे, फक्त दरात. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत आहे. बाकी सगळे जैसे थे आहे, म्हणजे एका गावात एका घरात एका मुलीचा जन्म झाला. तिला खायला-प्यायला घातले, तरी तिची वाढ काही केल्या होत नव्हती. डॉक्टर झाले, वैद्य झाले, हकीम झाले, औषधे, जडीबुटी दिली गेली. मुलीची वाढ काही होत नव्हती. जन्माला आल्यापासून होती तेवढीच फूटभर होती. चालायला लागली, बोलायला लागली, दात आले, पण शरीराची वाढ नाही. ‘आई, मी वाढणार कशी?’ सारखा तिचा प्रश्न असायचा. अंगारे केले, धुपारे केले, काही केल्या मुलीची वाढ होत नव्हती. कुणी तरी सांगितले की, शेजारच्या गावात एक साधू आला आहे. तो सगळे उपाय सांगतो. सगळ्या समस्या सोडवतो. त्याला दाखवून आणा म्हणजे ही मुलगी वाढेल. साधू म्हणजे बेरोजगारीवरचा रामबाण उपाय असतो. नोकरी मिळत नाही, छोकरी मिळत नाही. मग व्हा साधू. संधीसाधूंच्या या जगात नोकरीची संधी मिळत नसेल, तर सामान्यांना असे साधू व्हावे लागते. त्याप्रमाणे झालेला हा साधू आपले बस्तान मांडत होता. त्याच्याकडे गेले सगळे आणि त्या मुलीला दाखवले. ‘महाराज, जन्माला आल्यापासून या मुलीची काही वाढ होत नाही. आता चार वर्षांची झाली, पण फूटभरच आहे ही मुलगी.’ साधूने क्षणभर पाहिले त्या मुलीकडे आणि म्हणाला, हिचे नाव महागाई ठेवा, आपोआप वाढेल.’आज या देशात फक्त महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्यांना पोटाला चिमटा घ्यावा लागत आहे. हा चिमटा घेताना काटकसरीचा अतिरेक करण्याचे ट्रेनिंग देणारी कोणती यंत्रणा आहे का? अर्थसंकल्पात आज काय पदरी पडते आणि काय होणार स्वस्त, काय होणार महाग, याकडे लक्ष देताना आता कशात काटकसर करायची, याची चर्चा करावी लागणार आहे. पूर्वी सकाळचा चहा, नाश्ता, मग नाश्त्यानंतर चहा, दुपारचे भोजन, दुपारची न्याहारी, मग सायंकाळचा चहा, मग रात्रीचे जेवण, फावल्या वेळात अबरचबर खाणे असे प्रत्येकाचे राहणीमान होते. आजकाल दोन वेळचे जेवण करणेच परवडते. सामान्यांना शिवभोजन थाळीही दहा रुपयात मिळत नाही. कारण हजारो भुकेलेले जीव असताना एका केंद्रावर शंभर, दीडशे इतकी मर्यादित ताटे दिली जातात. त्यामुळे नेमकी काटकसर कशी करायची हाच सामान्यांचा प्रश्न आहे. आजचा अर्थसंकल्प आम्हाला काय अर्थ सांगतो, हेच पाहावे लागेल. कोणतीही गोष्ट स्वस्त होईल, अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. कारण आजकाल स्वस्त हा शब्दच महाग झालेला आहे. आपल्याकडे पेन्शन किंवा निवृत्तीवेतन नसणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. फंडाचे मिळालेले काही पैसे बँकेत ठेवून त्यावर दरमहा मिळणाºया मासिक व्याजावर ही माणसे जगतात, पण व्याजदर इतके कमी झाले आहेत की, त्यांचा मासिक खर्च सोडा, त्यांचा औषधोपचाराचाही खर्च भागत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार काही करणार आहे की नाही? सामान्यांनी काटकसर म्हणजे किती करायची हो? महागाईचा भस्मासूर वाढत असताना पायजम्याचे आळू करून त्याचे फदफदे करायचे म्हटले, तरी आजकाल नवा पायजमा घेण्यासाठीच पैसे नसतील, तर सामान्यांचे होणार काय? सामान्य माणसांच्या हातात पैसा येईल, त्यांची क्रयशक्ती वाढेल असे काही धोरणात्मक निर्णय सरकारने घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: