शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

हे लोक तेव्हाच का बोलत नाहीत?



आपल्याकडे अनेक नेत्यांची, निवृत्त अधिकाºयांची आत्मचरित्रे प्रसिद्ध होतात. त्यात अनेक वादग्रस्त विषय निर्माण होतात. कोणी कशी मुस्कटदाबी केली आणि कोणी कसे वाईट काम केले, हे त्यात नमूद केलेले असते, पण त्यामुळे प्रश्न पडतो की, आत्मचरित्र लिहिणारे लोक पुस्तकात बोलतात, ते तेव्हाच का बोलू शकत नाहीत? त्यामुळे आत्मचरित्रे ही खरी किती आणि खोटी किती? असा प्रश्न यातून निर्माण झालेला आहे. यापूर्वी पी. व्ही. नरसिंह राव, नारायण राणे अशा अनेक आत्मचरित्रांतून वादग्रस्त विषय पुढे आलेले आहेत, पण त्याच्या सत्यासत्यतेबाबत मात्र प्रश्नचिन्ह उभे राहते आहे.आत्मचरित्र लिहिणे हे तितके सोपे नसते. कारण त्यात सत्य कथन करावे लागते. खरे बोलणे हे सर्वात कठीण काम आहे. महात्मा गांधींनी ‘माझे सत्याचे प्रयोग’मध्ये अनेक गोष्टींची कबुली दिली आहे. आत्मचरित्रातून स्वत:च्या चुकाही कबूल केल्या जातात. महात्मा गांधी ते सांगतात. हा कबुलीनामा एकप्रकारे कधी तरी आपल्या वागण्यामुळे दुरावलेली मने जोडण्यासाठी केलेले प्रयत्न असतात. आपल्या चुका कबूल करून पापमुक्त होण्यासाठी चर्चमध्ये कन्फेशनबॉक्स असतो. तसाच प्रकार आत्मचरित्रातून व्यक्त होत असतो, पण आजकालचे नेते, अधिकारी यांची आत्मचरित्रे ही बदनामी करणारी, कोणाला तरी अडचणीत आणून वाद निर्माण करणारी दिसतात. यात त्यांनी स्वत:च्या चुका कुठेही कबूल केलेल्या दिसत नाहीत, म्हणूनच ती खोटी वाटतात. म्हणूनच प्रश्न पडतो की, हे लोक तेव्हाच का बोलत नाहीत?मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या 'लेट मी से इट नाऊ' आत्मचरित्रात 'अजमल कसाबला हिंदू दहशतवादी म्हणून दाखविण्याचा प्रयत्न होता' असे नमूद केल्याने वादळ उठले आहे, पण हे कोण करणार होते, त्याचे तपशील त्यांच्याकडे असतील, तर त्यांनी तेव्हाच याला का विरोध केला नाही? या खटल्यात त्याचा उल्लेख करण्याचे औचित्य का दाखवले नाही? त्यामुळे अधिकारी असताना तोंड गप्प ठेवून देशाशी प्रतारणा केली असेच म्हणावे लागेल.अर्थात, मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यासंबंधातील खटल्यातील विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी याबाबत महत्त्वाचा तपशील सांगितला आहे. ते म्हणतात, पाकिस्तानी दहशतवाद्यांचा ते हिंदू दहशतवादी असल्याचे दाखवण्याचा कट होता, या मताशी मी सहमत नाही. मुंबईवर हल्ला करणाºया १० पैकी ९ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते, तर कसाबला जिवंत पकडण्यात आले होते. या सर्वांकडेच ओळखपत्रं सापडली होती आणि त्यावर हिंदू नावं होती, असेही निकम यांनी नमूद केले, म्हणजे उज्ज्वल निकम यांनी जरी हे नाकारले असले, तरी त्या दहशतवाद्यांकडे असलेल्या ओळखपत्रांवर हिंदूंची नावे लिहिली गेली होती. याचा अर्थ राकेश मारिया यांच्या बोलण्यात कुठे तरी तथ्य आहे, असावे, पण हे त्यांच्या आज लक्षात आलेले नाही ना? ही शक्यता त्यांनी कोर्टात त्या तपासावेळी का नाही सांगितली? हा खरा प्रश्न आहे. आता कसाबला फाशी देऊनही सात वर्षे होऊन गेली. त्याच्यावर चित्रपट येऊनही गेला. इतके सगळे झाल्यानंतर हे आत्मचरित्रातून बाहेर येणे योग्य नाही. तेव्हाच ही शंका किंवा माहिती दडवून ठेवण्याचे नेमके कारण काय? हे समोर येणे गरजेचे आहे.अजमल कसाबकडे जे ओळखपत्र सापडले होते, त्यावर समीर चौधरी, हैदराबाद असे नाव होते, हे सत्य आहे, असे नमूद करत सर्वच ओळखपत्रे बोगस असल्याचे चौकशीतून, तसेच पुराव्यांतून स्पष्ट झाले होते. कसाबकडे आढळलेल्या ओळखपत्राची कसून चौकशी करण्यात आली होती. याबाबत हैदराबादमधील कॉलेजच्या प्राचार्यांची साक्षही नोंदवण्यात आली होती, असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. आपण पकडलो गेल्यास कट उघड होऊ नये या उद्देशानेच ही बोगस ओळखपत्रे तयार करण्यात आली होती. भारतातील विद्यार्थी असल्याचे भासवावे हा त्यामागील डाव होता. कसाबने जो जबाब कोर्टात दिला होता, त्यात त्याने बोगस ओळखपत्रांबाबत कबुली दिली होती. काफाने त्यांना मिल्ट्री ट्रेनिंग दिलं होतं. त्यानेच सर्व १० दहशतवाद्यांना ही बोगस ओळखपत्रं दिली होती. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीच ही ओळखपत्रे होती, दुसरा कोणताही उद्देश नव्हता. कोर्टात हे सिद्ध झालेले आहे. इतके सगळे स्पष्ट असताना राकेश मारिया यांना जर याबाबत शंका होती, तर त्यांनी ती त्याचवेळी का मांडली नाही? पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले, त्यात याचा कुठे तरी उल्लेख असणे आवश्यक होते. आता सगळे मरून गेल्यावर कसला पुरावा मिळणार आहे? गाडलेली मढी पुन्हा उकरण्यात काय अर्थ आहे? त्याहीपेक्षा आपण अधिकारात असताना मूग गिळून गप्प बसतो आणि नंतर ती तोंडाची वाफ एखाद्या पुस्तकातून कालांतराने बाहेर काढतो, हे कितपत योग्य आहे? याचा विचार होणे गरजेचे आहे.विशेष म्हणजे यावरून राजकारण्यांना लगेच जोर आला आहे. २६/११च्या हल्ल्यानंतर हा हल्ला हिंदू दहशतवाद्यांनी केल्याची आवई पाकिस्तानने उठवली होती. काँग्रेसच्या नेत्यांनीही पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळून हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा केला होता, मात्र मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या आत्मचरित्रातून काँग्रेसच्या या आरोपांचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळणाºया काँग्रेस नेत्यांची आणि या प्रकरणाची या दिशेने नव्याने चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. यावरून निव्वळ राजकारण किती करायचे याचाही विचार होणे गरजेचे आहे. असे झाले तर कोणाच्याही आत्मचरित्रावर विश्वास ठेवता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल.माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. त्यात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने कसाबसह त्याच्या साथीदारांना हिंदू नावं असलेली ओळखपत्रं दिली होती. हिंदूंनी हा दहशतवादी हल्ला केल्याचं चित्रं निर्माण व्हावं यासाठी हा बनाव करण्यात आला होता, असं या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. साहजिकच याचे राजकारण आता होणार, हे नक्की, पण पुस्तकातून मागाहून बोलणारे नेते, अधिकारी त्याचवेळी गप्प बसतात आणि त्यामुळेच अंदाधुंदी माजते, हेही नक्की. नीतिशास्त्राप्रमाणे समोर गुन्हा होत आहे, काही तरी चुकीचे होत आहे, हे माहीत असूनही गप्प राहणे हे तितकेच चुकीचे असते. त्यामुळे त्यावेळी गप्प बसणारेही तितकेच दोषी ठरतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: