मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा!

गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. राष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू बॉक्सर प्रणव राऊत याने नुकतीच आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील तळोजामध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे दोन महिने होऊन गेले, तरी त्यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आले नव्हते. आपल्या शेजारीपाजारी कोण, केव्हा येते-जाते याकडे लक्ष न दिल्याने ही गोष्ट लपून राहिली, पण अशा घटना तणावातून होतात. आज मायानगरी मुंबईमधील नागरिक मानसिक तणावाखाली असल्याचे गेल्या काही दिवसांतील घटनांवरून उघडकीस आले आहे.त्याचप्रमाणे चारकोप परिसरात एका ४० वर्षीय महिलेने नोकरी गेल्याने आलेल्या नैराश्यातून इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याआधी २२ वर्षीय तरुणीने ठाण्यातील स्कायवॉकवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्याच सुमारास २१ वर्षीय तरुणीने प्रियकराने लग्नास नकार दिल्याने नैराश्यातून गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली होती, म्हणजे प्रत्येक समस्येचे समाधान हे आत्महत्येत कसे काय शोधले जाते? हाच अंतिम उपाय आहे का? आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतोच आहे, आता खेळाडू, सामान्य माणसे, नोकरदार, विद्यार्थी सगळेच आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. हे काय चालले आहे? एवढे नैराश्य मनात का निर्माण होते?आत्महत्येचे विचार मनात येणे हा मनाचा दुबळेपणा आहे. हा दुबळेपणा माणसाला झटकून टाकता आला पाहिजे. तो झटकला पाहिजे.मानसिक तणाव हे या घटनांमागील प्रमुख कारण असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, मुंबईतील आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आत्महत्यांच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्यामागे प्राथमिकदृष्ट्या मानसिक तणाव हे प्रमुख कारण असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.याशिवाय बेरोजगारी, भविष्याची चिंता, प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध आदी कारणेही आहेत.जीवनाप्रती नकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यानेच असे प्रकार वाढीस लागल्याचे दिसते. आत्महत्या करणाºयांमध्ये सुशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे. शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य व्हायला हवी, पण तसे होताना दिसत नाही. तणावात जगणे प्रत्येकाला शक्य होत नाही. संघर्षापासून पळ काढण्याची प्रवृत्ती निर्माण होत आहे, त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.केवळ रोगमुक्त असणे म्हणजे आरोग्यसंपन्न असणे नव्हे. त्याप्रमाणेच आपला दृष्टिकोन नकारात्मक नसणे याचा अर्थ तो सकारात्मक आहे असे नाही. सकारात्मक व्यक्तिमत्त्व काही ठळक गुणांमुळे उठून दिसते.सकारात्मकपणे जगले तरच सकारात्मक परिणाम मिळतील याचा विचार केला पाहिजे. मनातील नकारात्मकता दूर होण्यासाठी कुठे तरी श्रद्धा असली पाहिजे. पूर्वी आपण देवावर विश्वास ठेवत होतो. मनातले गा‍ºहाणे घालत होतो. आजकाल आमचा देवावर विश्वास राहिलेला नाही. कारण आम्ही सुशिक्षित झालो. नैराश्य निर्माण होते ते केवळ व्यक्त होता न आल्याने, मन मोकळे करता न आल्याने. साहजिकच मनाची घुसमट वाढत जाते. आपण देवाला साकडे घालून किमान त्याच्यावर सगळे सोडत होतो. त्यामुळे चिंतामक्त होतो. तो भोळा भावही शास्त्रीयच होता की, काय कोण जाणे, पण मनातील ही जळमटे, साचलेले कोणाला तरी सांगण्याची गरज असते. त्यासाठी मित्र असावे लागतात, चांगले नातेवाईक असावे लागतात. तेही नसतील तर एकांतात जाऊन एखाद्या दगडासमोर, झाडासमोर मन मोकळे करा आणि तणावाला मोकळी वाट करून द्या, पण मनातील नैराश्य झटकून टाकण्याची गरज आहे.आपल्या संस्कृतीत मंदिरे त्यासाठीच असतात. प्रार्थनास्थळे त्यासाठीच असतात. मशीद, चर्च, गुरुद्वारा ही सगळी मनाला उभारी देणारी स्थळे आहेत. आपल्या श्रद्धेप्रमाणे प्रार्थना करावी आणि मनाला शांती मिळवावी, जेणेकरून मनाला सकारात्मक ऊर्जा मिळेल असे काही करावे.प्रार्थनास्थळ नको असेल, तर वाचन करावे, नाटक, सिनेमा पाहावा, पण मन दुसरीकडे वळवून नकारात्मक विचार बाजूला केला, तर आत्महत्येचे विचार दूर होतील. मंगेश पाडगांवकर यांची कविता-भावगीत खूप लोकप्रिय आहे. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आपण आपल्या जगण्यावर प्रेम केले, तर त्यातील आनंद घेता येईल. आयुष्यात येणारे कटू प्रसंग हे जाण्यासाठी असतात. आत्महत्येने सगळे प्रश्न सुटत नाहीत. नैराश्य झटकण्यासाठी देवळात जा, निसर्गात जा, गाणी ऐका, पण मनाला आनंद मिळेल अशा गोष्टींचा वापर करा. मुंबईतील लोकांनी तर मस्तपैकी समुद्रावर जाऊन त्या अथांग सागराला साकडे घालावे. सगळं काही सामावून घेण्याची ताकद त्याच्यात आहे. सागर आपल्याला काय सांगतो? तो पोटात काही ठेवत नाही. तुम्ही समुद्रात कचरा फेकला, तरी तरी एक लाट येते आणि तो कचरा बाहेर फेकून देते. हे नैराश्य म्हणजे मेंदूतील कचरा आहे. तो फेकता आला, तर मन स्वच्छ होईल. आपोआप नैराश्य दूर होईल आणि आत्महत्येचे विचार दूर होतील.मन करा रे प्रसन्न हे संतांनी का सांगितले आहे? मनात चांगले विचार असतील आणि मन स्वच्छ असेल तर संकटावर मात करता येते. आज या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. नैराश्य दूर करण्यासाठी सामाजिक प्रयत्न व्हायला पाहिजेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: