मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

नटी म्हणून जगणारी पद्मा चव्हाण


मराठी, हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवरील सर्वात ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून पद्मा चव्हाणने एक काळ गाजवला. आपल्या सौंदर्य आणि मादकपणाचाही गर्व असलेली ही अभिनेत्री कायम नटी म्हणूनच जगली. प्रेक्षकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे, आपले कौतुक करून घेणे तिला कधीच आवडले नाही. प्रेक्षकांनी मला पाहायचे ते फक्त पडद्यावर आणि रंगभूमीवर, एरव्ही त्यांनी मला कधीच पाहायचे नाही, अशी तिची खास मतं होती. कारण नटीला ओळख असते, ती तिच्या कामामुळे. ते काम पाहावे. त्यांना खाजगीत कधी पाहू नये यासाठी पद्मा चव्हाण कायम आग्रही होती. तिने कायम स्वत:ला कोंडूनच घेतले होते. खाजगीतील पद्मा चव्हाण कुणाला दिसू नये म्हणून झाकून घेतले होते. कारण तिला नटी म्हणवून घेण्यात आनंद वाटायचा.कोणतीही भूमिका तिला शोभायची. नितळ स्वच्छ त्वचा आणि सुंदर दिसण्यासाठी ती कायम प्रयत्नशील असायची. सर्वसामान्य अभिनेत्रींंपेक्षा थोडी जास्तच उंची तिला होती. त्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतच तिने आपली अभिनयाची उंची वाढवली होती. नायिका, चरित्र अभिनेत्री, खलनायिका अशा सर्व प्रकारच्या भूमिका तिने केल्या, पण कुठेच तिने कमतरता दाखवली नाही. विनोदी आणि खाष्ट भूमिकाही तिने तितक्याच ताकदीने केल्या होत्या.स्वत:ला नटी म्हणवून घेण्यात आनंद मानणारी असल्यामुळेच असेल कदाचित, पण साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या लग्नाची बेडीमधील रश्मीची भूमिका तिने ताकदीने साकारली होती. त्यातली नटी रश्मी प्रेक्षकांनाच नाही, तर सहकलाकारांनाही वेड लावणारी ठरली. अत्यंत कमी कपड्यात वावरणारी रश्मी १९६० ते १९७० च्या दशकातील लग्नाची बेडी या नाटकाचे आकर्षण होती. त्यानंतर ते नाटक अनेक वर्षे चालले. त्यातील रश्मी बदलत गेली, पण पद्मा चव्हाणच्या रश्मीची सर कोणालाच आली नाही. बोल्ड भूमिका करणारी आशू या नाटकात रश्मीची भूमिका करण्यासाठी आली होती, पण तिचा बेढबपणा पाहता रश्मीचे पद्मा चव्हाणने उंचीवर नेऊन ठेवलेले पात्र कोसळले होते. रश्मी ही सुंदर दिसणारी होती, पण आशूने ती सतत सिगारेट पिणारी दाखवली. सिगारेट ओढणारी रश्मी पद्मा चव्हाण जेव्हा असायची तेव्हा ती सिगारेटही खुलून दिसायची. माझी बायको माझी मेहुणी आणि सखी शेजारणी ही नाटके तर खास पद्मा चव्हाण डोळ्यापुढे ठेवून लिहिली होती. तिने चित्रपटांच्या व्यस्ततेतून ती केली आणि थोडे प्रयोग करून सोडून दिली. त्यानंतर त्या भूमिका शलाका, आशू अशा अनेकांनी केल्या, तरी लक्षात राहिली होती ती पद्मा चव्हाणच.तिने ज्या ज्या भूमिका केल्या, त्या अत्यंत लक्षवेधी अशाच होत्या. त्यामुळे काकूबाई, रडूबाईच्या भूमिका करणारी नायिका पद्मा चव्हाणला कधी पटलीच नाही. ती मराठी अभिनेत्रींना अत्यंत नावे ठेवायची. काय त्या कळकट आहेत मराठी नट्या असे म्हणून ती आपले वेगळेपण दाखवून द्यायची, म्हणजे जयश्री गडकर, आशा काळे, सीमा, उषा चव्हाण अशा पडदा गाजवणाºया अभिनेत्री धुमाकूळ घालत होत्या, पण त्या मराठमोळ्या आणि रापलेल्या अशा दिसायच्या. पद्मा चव्हाण ही नेहमीच नितळ सौंदर्यवती दिसायची.ज्योतिबाचा नवस या चित्रपटातील तांबूस केसांची बेलबॉटममधली दरोडेखोर सर्जाच्या प्रेमातली असो वा बोट लावीन तिथं गुदगुल्या मधली कराटे खेळून सर्वांना धोपटणारी मेहुणीबाई असो, पद्मा चव्हाणनं धमाल उडवून दिली होती. जावयाची जातमधली हट्टी मुलगी ते नऊवारीत शेतात जाण्यासाठी तयार होणारी नववधूही तिने खासच रंगवली होती.गुपचूप गुपचूप मधली गव्हर्नेस रागीट खाष्ट असली, तरी ती विनोदी रंगाने तिने छान साकारली होती. सासू वरचढ जावईमधली गंगू तेलीण तिने ज्या प्रकारे रंगवली होती, त्यावरून तिचा संपूर्ण चित्रपटात धाक दिसत होता. अशोक सराफ, रंजना आणि निळू फुले असूनही चित्रपटात लक्षात राहते, ती पद्मा चव्हाणच. कारण तिला आपल्या सौंदर्याचा गर्व होता, तसाच भूमिकेवर ताबा मिळवण्याची जिद्द होती. ती हे दाखवून देत असे.अष्टविनायक या चित्रपटात ती खलनायिका होती. सचिन पिळगांवकर याच्या होम प्रॉडक्शनमध्ये दिग्गज कलाकार, हिट गाणी आणि भरगच्च कथानक असतानाही सावत्र आईचा तोरा तिने चांगलाच मिरवला होता. ती अखेरपर्यंत लक्षात राहिली होती. देवघर चित्रपटातही ती रंजनाची आई होती आणि खलनायिका होती. चंद्रकांत गोखले, रंजना, रवींद्र महाजनी यांच्या प्रमुख भूमिकांमध्येही पद्मा चव्हाण उठून दिसली होती. विशेष म्हणजे अष्टविनायकमध्ये खलनायिकेच्या कारस्थानात सामील होणारा भाऊ राजा गोसावी होता, तर देवघरमध्ये तिचा भाऊ सहखलनायक अशोक सराफ होता, पण लक्षात राहात होती, ती पद्मा चव्हाण. कारण तिने प्रत्येक वेळी आपले दिसणे आणि शिष्ठपणा जपला होता.सोज्वळपणा तिला कधी जमलाच नाही आणि तिने केलाही नाही. नटीने सुंदर दिसले पाहिजे आणि भाव खाऊन गेले पाहिजे, हेच तिला कळले होते. त्यामुळे आपल्या संपूर्ण कारकीर्दीत ती भाव खाऊन जाण्यात चांगलीच पटाईत होती. तेच तिचे वैशिष्ट्य होते. कारण नटी म्हणून जगण्यातच तिला आनंद वाटत होता.१९६० ते १९८८ पर्यंत तिने तीन दशके काम केले, पण आपले वेगळेपण जपले होते. हिंदी चित्रपटांबाबत बोलायचे झाले, तर १९६४ चा कश्मिर की कली हा चित्रपट शर्मिला टागोरला ओळख देणारा होता, पण या चित्रपटातही ही आपली महाराष्ट्राची कळी खुलून दिसत होती हे नाकारून चालणार नाही. १९८२ साली गाजलेला एक चित्रपट म्हणजे जीवनधारा. रेखा, राकेश रोशन, अमोल पालेकर, राज बब्बर, कंवलजीत, मधु कपूर असे दिग्गज कलाकारांचे मोठे कथानक होते या चित्रपटात. संपूर्ण चित्रपट हा रेखाभोवती फिरणारा होता, पण तरीही या चित्रपटातील पोटकथानकात पद्मा चव्हाणने धमाल उडवून दिली होती. आपल्या मुलीच्या प्रियकराच्या प्रेमात पडून त्याच्याशी प्रेमाचे चाळे करणारी आई तिने लक्षात राहील अशी रंगवली होती. विशेष म्हणजे मराठी अभिनेते आणि अभिनेत्री जेव्हा हिंदी सिनेमात काम करतात, तेव्हा त्यांच्यातील मराठीपण दिसून येते, पण पद्मा चव्हाण ही जेव्हा हिंदी चित्रपटात काम करायची तेव्हा ती हिंदी भाषिक असावी असेच वाटायचे. उच्चारांवर केलेली मेहनत आणि दिसण्यात हिंदी नट्यांना हेवा वाटेल असे सौंदर्य दाखवण्यात ती चलाख होती, म्हणूनच ती अखेरपर्यंत सुंदर दिसली आणि नटी म्हणूनच जगली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: