शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

डोळे कशासाठी?


लोकलमधून प्रवास करताना विशेषत: सेंट्रल आणि वेस्टर्न लाइनवर अनेक वेळा आपल्याला अंध लोक भेटतात, पण हे अंध इतके डोळस असतात की, त्यांचे आश्चर्यच वाटते. मुंबईच्या लोकलमध्ये आणि स्थानकांवर हजारो अंध आहेत, पण ते इतके डोळस आहेत की, त्यांच्यापेक्षा अनेक प्रवासी आंधळे असल्यासारखे वाटतात. त्यामुळे मुंबई लोकलमधून प्रवास करताना या आंधळ्यांचे मला नेहमीच आकर्षण वाटते.आजकाल या आंधळ्यांना भीक मागण्याशिवाय पर्याय नाहीये. कर्जत ते सीएसटी, कसारा ते सीएसटी आणि विरार ते चर्चगेट या मार्गावर १८ हजारांपेक्षा जास्त अंध आहेत. त्यापैकी कोणी स्थानकातच बसून भिक मागतात, तर कोणी गाडीतून भीक मागतात, पण हे अंध अतिशय सावध असतात, त्याचे कौतुक वाटते. गेली अनेक वर्षे हे अंध लोकलमधून प्रवास करत आहेत. लोकल हाच त्यांच्या जीवनाचा भाग आहे, म्हणजे मुंबईतील चाकरमानी फक्त जाण्या-येण्यासाठी या लोकलमध्ये आहे, पण या अंधांचा संसारच लोकलच्या वातावरणात आहे. लोकल रेल्वे हेच त्यांचे जग आहे.फार पूर्वी या अंधांना जगण्याचा एक मार्ग म्हणजे लॉटरीची तिकिटे विकणे हा होता, पण आजकाल आॅनलाइन, डिजीटल लॉटरी सुरू झाली. काही लॉटरी बंद झाल्या. त्यामुळे या अंधांना स्वयंरोजगाराचे साधन राहिले नाही. लोकलमधून ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी, महाराष्ट्र राज्य मिनी लॉटरी तिकीट घ्या, एक रुपयात आपले भाग्य बदला’ असे ओरडत हे अंध फिरायचे. अनेक जण आपले नशीब आजमवायचे आणि त्याच्याकडून तिकीट खरेदी करायचे. ‘गरिबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा, तुम एक रुपया दोगे, वो एक लाख देगा’ असे गाणे म्हणत हे अंध तिकिटे खपवायचे. आपल्या दृष्टिहीन नेत्रांनी प्रवाशांना लाखोंची स्वप्ने दाखवण्याची ताकद त्यांच्यात होती, पण लॉटरी बंद झाली. त्यामुळे रेल्वेतून फिरणाºयांना भिक मागण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. खरे तर हे भिकारी नव्हेत. त्यांच्यावर निसर्गाने अन्याय केल्यामुळे त्यांना असे झगडावे लागते आहे. कित्येक आंधळ्यांच्या तीन तीन पिढ्या अंध आहेत. त्यांची लग्ने झालेली आहेत. नवरा-बायको-मुले सगळेच आंधळे आहेत, पण जगण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.या अंधांमध्ये खूप एकजूट आहे. त्यांचे नेटवर्कही चांगले आहे. त्या नेटवर्कची गती पाहिली, तर आमचा सोशल मीडिया, मोबाइल, स्मार्टफोन मागे पडतील इतकी ताकद त्यांच्या नेटवर्कमध्ये आहे. अमूक एक वाजता सर्व अंधांनी विशिष्ट ठिकाणी जमायचे आहे, असा निरोप दिला तर अवघ्या दीड तासात कर्जत, कसारा, वसई, विरार, सीएसटी, चर्चगेट या सर्व टोकांवरून सगळे अंध गोळा होतात. इतक्या व्यवस्थित निरोप पोहोचवला जातो त्यांच्यापर्यंत. यामध्ये दुर्दैवाची आणखी एक गोष्ट अशी आहे की, या अंधांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे, तर पुरुष कमी आहेत. या मागचे कारण फार विचित्र आहे. संघर्ष करण्याची, परिस्थितीशी मिळवून घेण्याची ताकद महिलांमध्ये जास्त असते. त्यामुळे अंध असल्या तरी जगण्याचा संघर्ष त्या सोडत नाहीत. त्याप्रमाणात आपण अंध उपजलो या कल्पनेनेच पुरुष हाय खाऊन मरतात. त्यामुळे अंध पुरुष लवकर मरतात, स्वत:ला संपवून घेतात, तर स्त्रिया संघर्ष करत जगत असतात, हे वास्तव आहे. त्यांच्या या सहनशिलतेला सलामच ठोकावा लागेल. अर्थात, या महिलांनाही अवहेलना, अपमान, अत्याचार या सर्वांना तोंड द्यावे लागते, पण त्यांचे अश्रू कोणाला दिसणार? डोळसांचे अश्रू पाहणारा समाज अंधांच्या डोळ्यांत अश्रू आहेत, हे विसरून जातो. छेड काढणारे, अत्याचार करणारे या महिलांनाही सोडत नाहीत, पण त्यांची कुठे तक्रार येते? निमूटपणे अत्याचार सहन करणे हे त्यांचे जीवन बनलेले असते. निसर्गानेच फार मोठा अत्याचार केल्यावर त्यापेक्षा मोठा अत्याचार कोण करणार, हे वास्तव त्यांनी स्वीकारलेले असते.लोकलमधून हिंडताना कुणी गाणी म्हणतात. आपला आवाज कोकिळेचा नाही याची जाणीव असली, तरी फुकट भिक घ्यायला नको, त्याच्या बदल्यात काही तरी ऐकवावे आणि त्याची दाद म्हणून एखादा रुपया पदरात पडावा हीच त्यांची अपेक्षा असते. कित्येक वर्षांत त्यांच्यासाठी फेमस गाणीच सापडलेली नाहीत. कारण बहुतेक वेस्टर्नवरचे भिकारी हे ‘परदेसी परदेसी जाना नहीं’ हेच गाणे म्हणतात, तर सेंट्रलचे ‘तारीफ तेरी निकली हैं दिलसे, आयी हैं लब पे बनके कव्वाली... शिर्डीवाले साईबाबा’ हे गाणे म्हणताना दिसतात. काय योगायोग आहे पहा. अमर अकबर अँथनी या १९७७ च्या चित्रपटात ऋषी कपूर हे गाणे आळवत असताना अंध झालेल्या निरुपा रॉयला डोळे येतात असा चमत्कार दाखवला आहे, पण हे वास्तवात शक्य नाही, हेच तो करुण आवाज सांगत असतो.या अंधांना भिक मागतानाही कमी त्रास होत नाही. हातात पेटी, कसले तरी वाद्य वाजवत, त्यावर भिकेसाठी थाळी, वाटी ठेवलेली असते. प्रवासी एक, दोन रुपये टाकतात. या डब्यातून त्या डब्यात ते कधी एकटे, तर कधी जोडीने जातात, पण गर्दुल्ले, चोरटे त्यांच्या वाटीत, थाळीत हात घालून कित्येकदा पैसे हिसकावून घेतात, पण तरीही हे अंध तक्रार करत नाहीत. काय पळवून नेणार जास्तीत जास्त? निसर्गाने अगोदरच आमचे नशीब, डोळे चोरून नेले आहेत. त्यापेक्षा जास्त काहीच चोरता येणार नाही, हे समजून ते तक्रारही करत नाहीत, पण समोर आंधळ्यांना रेल्वेतील गुंड लुटत असताना डोळसही मदत करू शकत नाहीत, याचीच खंतच वाटते. कारण त्यांना कसलीच भीती नाहीयं. त्यांचे डोळे अगोदरच गेले आहेत, पण आपण जर त्यांना विरोध केला, तर हे गुंड आपलेच डोळे काढून घेतील आणि लोकलमधून फिरायला लावतील, अशी भीती सामान्य माणसांना असते.पण एक फार मोठी ऊर्जा या अंधांमध्ये असते. त्यांना कळते ती स्पर्शाची भाषा. कधी लोकलमधून उतरताना किंवा चढताना त्यांना हात देऊन पहा. त्या हाताच्या स्पर्शाची ओळख हे अंध कधी विसरत नाहीत. हात दिल्याबद्दल धन्यवाद म्हणतील, नाव विचारतील. नंतर वर्ष, सहा महिन्यांनी भेटल्यावर न सांगता आपल्या स्पर्शाने ते तुम्हाला ओळखतील. ही दिव्य दृष्टीच त्यांना असते. याबाबत आणखी एक चित्र फार लक्षात राहणारे आहे. ते म्हणजे डोंबिवली स्थानकात काही वर्षांपूर्वी एक अंध जोडपे मधल्या जिन्यावर ब्रीजवर बसलेले असायचे. त्यांना एक मूलही झाले होते. त्या मुलाला पाय फुटले होते, ते रांगत कुठेही पळून जात होते. त्यामुळे त्या जोडप्याने त्या बाळाला दोरीने बांधून ठेवले होते. अगदी एखादे कुत्रे बांधावे तसे. त्यामुळे ते मूल त्या दोरीची लांबी तेवढ्या आकारातच गोलाकार फिरायचे. त्याहून लांब जाऊ शकत नव्हते. कारण आई-बापांनी त्याला मायेच्या पाशातच बांधून ठेवले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: