शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

विनयकुमार तुमचा जावई आहे का?



दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार-खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी त्या गुन्हेगारांचे वकील आटापिटा करत आहेत. दोन वेळा फाशीची तारीख पुढे ढकलल्यानंतर आता मार्च महिन्याच्या ३ तारखेला पहाटे ६ वाजता फाशी देण्याचे निश्चित झाले आहे, पण ही फाशी पुन्हा एकदा पुढे ढकलली जावी यासाठी दोषींच्या वकिलांचे प्रयत्न सुरू आहेत, हे अत्यंत वेदनादायी आहे. म्हणून या वकिलांना विचारावेसे वाटते की, हे आरोपी, विनयकुमार तुमचा जावई आहे का? विनयकुमारने दोन दिवसांपूर्वी तुरुंगातील भिंतीवर डोके आपटून जखम करून घेतली. फाशी देण्यासाठी निरोगी आणि मानसिक स्थिती योग्य असल्याशिवाय देता येत नाही. त्यामुळे या आरोपीची फाशी पुढे ढकलली जावी अशी याचिका गुन्हेगारांच्या वकिलाने केलेली आहे. आता याचेच अनुकरण अन्य आरोपीही करतील आणि फाशी पुढे ढकलण्याचा नवा फंडा वकील त्यांना शिकवतील. या लोकांना जगवून वकिलांना काय मिळणार आहे? गुन्हेगार हे या वकिलांचे जावई आहेत म्हणून का ते असा आटापिटा करत आहेत?या आरोपींना मनोरुग्ण, मानसिक आजारी, जखमी ठरवून त्यांची फाशी रोखण्याचा बहाणा हे वकील करत असतील, तर ते फार भयानक आहे. सामूहिक बलात्कार करून खून करणाºया निर्दयींना जगता येते आणि निर्भयांना मरावे लागते, हाच संदेश यातून जाईल. त्यामुळे देशभर भीती, अंदाधुंदी माजेल. त्याला हे वकील जबाबदार राहतील. आता दोन वेळा डेथ वॉरंट रद्द करून त्यांचे मरण पुढे ढकललेत. आता ३ मार्चची फाशी जर या गुन्हेगारांच्या वकिलांमुळे पुढे ढकलली, तर देशभर गुन्हेगार मोकाट सुटतील. दिसेल त्या तरुणीवर बलात्कार करतील. कारण त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल की, विनयकुमारच्या वकिलासारखे नराधम वकील या देशात आहेत तोपर्यंत आम्हाला कसलीही भीती नाही. म्हणूनच डेथ वॉरंट निघाल्यानंतर वकिलांनी लुडबूड थांबवली पाहिजे. आपली अक्कल जादा पाजळायची गरज नाही. आता हे आरोपी नाहीत, तर गुन्हा सिद्ध झालेले लोक आहेत. त्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. अगदी तुमचे ते जावई असले तरी त्यांना वाचवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुमचे वकिली डावपेच चांगल्या कामासाठी वापरा, असे सांगावेसे वाटते.आरोपी विनयकुमारची वैद्यकीय उपचारांसाठी याचिका दाखल करून आता हे विद्वान वकील म्हणतात की, विनयकुमार शर्मा याने त्याच्या आईसह अनेकांना ओळखले नाही. तो मानसिकदृष्ट्या दुर्बल आहे, असा बचाव करून त्याची फाशी वाचवण्याचा प्रयत्न करणारे वकील हे अत्यंत क्रूर असे आहेत, असेच म्हणावे लागेल. या नराधमांनी त्या निर्भयावर एकदाच बलात्कार केला, पण हे वकील असे मानसिक बलात्कार वारंवार करत आहेत आणि बलात्काºयांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे जर या नराधम वकिलांमुळे विनयकुमार आणि निर्भयाच्या बलात्काºयांची फाशी ३ मार्चला पुढे ढकलली, रद्द केली गेली, तर देशातील तमाम जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल. अशा वकिलांनाही शिक्षा करा, अशी मागणी करावी लागेल. जनतेला आपला न्याय आपणच करावा लागेल. तिकडे ती निर्भयाची आई आक्रोश करते आहे आणि या वकिलांना गुन्हेगारांना वाचवण्याचे वेध लागले आहेत.अत्यंत नीच प्रवृत्तीचे हे वकील आहेत असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. कारण वकिली डावपेच म्हणूनच त्याला डोके आपटायला सांगितले गेले असावे. वाईट या गोष्टीचे वाटते की, देशभरातील नामांकित प्रसारमाध्यमे अजूनही या चौघांचा उल्लेख आरोपी असा करत आहेत. त्यांना दोषी ठरवले गेले आहे, त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, तरीही त्यांचा उल्लेख गुन्हेगार, दोषी असा न करता आरोपी असा केला जात आहे. त्याचा गैरफायदा हे वकील घेत आहेत. त्यांच्या मते दिल्ली सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीने मानसिक विकार, स्मृतिभ्रंश आणि डोक्याला व हाताला झालेल्या जखमांवर अधिक चांगले उपचार करण्याची मागणी करणारी याचिका केली असून, त्याबाबत तिहार कारागृह प्रशासनाला बाजू मांडण्याचे आदेश गुरुवारी दिल्ली न्यायालयाने दिले. या प्रकरणातील आरोपी विनयकुमार शर्मा याने ही याचिका केली असून, त्याबाबत शनिवारपर्यंत म्हणणे मांडावे, असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती धर्मेंद्र राणा यांनी तिहार कारागृह प्रशासनाला दिला आहे. शर्मा याने स्वत: तिहार कारागृहातील भिंतीवर डोके आपटून इजा करून घेतली आहे, असे कारागृहातील अधिकाºयांनी सांगितले. त्याचा जर स्मृतिभ्रंश झालेला आहे, तर त्याला याचिका करायची अक्कल कशी सुचली? तिथे का नाही विस्मरण झाले? आई-बापाला ओळखले नाही असा बचाव करून त्याची फाशी लांबवण्याचा प्रयत्न हे वकील करत आहेत, पण हे आई-बाप तरी काय म्हणून अशा नराधम कार्ट्याला भेटायला जात आहेत? त्याने काय पुरुषार्थ गाजवला आहे म्हणून तुरुंगात त्याला भेटायला आले पाहिजे? असली पोरं जन्माला घातली याचा पश्चाताप या आई-बापाला वाटायला पाहिजे. तो आता देशाचा गुन्हेगार आहे, तुमचा मुलगा राहिलेला नाही. तुम्ही मूल जन्माला घातलं होतं, गुन्हेगार नाही. त्यामुळे गुन्हेगाराने ओळखले नाही म्हणून वाईट वाटून घेण्याची गरज नाही. आई-बापाचा मुलगा हा गुन्हेगार नसतो, त्यामुळे त्याने ओळखले नाही, तर त्याचा ऊहापोह वकिलांनी करून फाशी लांबवण्याची संधी साधू नये.१६ तारखेच्या रविवारी दुपारी कारागृह क्रमांक तीनमध्ये ही घटना घडली, त्यामध्ये विनयकुमार याला किरकोळ दुखापत झाली आणि त्यावर कारागृहातच उपचार करण्यात आले, असे अधिकाºयांनी सांगितले. सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाने या याचिकेला विरोध केला. विनयकुमार शर्मा याने त्याच्या आईसह अनेकांना ओळखले नाही, असे त्याच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले. शर्मा याच्या नातेवाईकांच्या विनंतीवरून वकिलांनी कारागृहात जाऊन त्याची भेट घेतली, तेव्हा विनयकुमार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे, उजवा हात मोडल्याने त्याला प्लास्टर केल्याचे, मानसिक विकाराने व स्मृतिभ्रंशाने त्रस्त असल्याचे आपल्याला आढळले, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. शर्मा याने कारागृहात त्याची आई आणि वकिलांनाही ओळखले नाही, असेही याचिकेत म्हटले आहे. हे कारण दाखवून फाशी लांबवली जात आहे, यासारखे दुर्दैव कोणते?याबाबत पाकिस्तानच्या न्यायालयाचा आदेश आदर्श म्हणावा लागेल.पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना काही दिवसांपूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी मुशर्रफ बाहेरच्या देशात आणि आजारी असल्याचे जेव्हा न्यायालयाला समजले, तेव्हा न्यायालयाने मुशर्रफ यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या प्रेताला तीन दिवस फासावर लटकवावे, असे आदेश दिले होते. मग असेही यांना मारायचेच आहे, या गुन्हेगारांना मारायचेच आहे, तर डोकी आपटली, फुटली, जखमा झाल्या असतील तरी त्यांना त्या अवस्थेत फासावर लटकवले पाहिजे, पण काही केल्या आता ३ मार्च ही तारीख पुढे जाता कामा नये.
फाशी देण्यापूर्वी दोषींचे आरोग्य ठीक असणे महत्त्वाचे
तुरुंग मॅन्युअलनुसार, फासावर चढवण्यापूर्वी दोषींचे आरोग्य पूर्णपणे सामान्य असणे आवश्यक आहे. दोषी हा शारीरिक, तसेच मानसिकदृष्ट्या उत्तम असला पाहिजे. फासावर चढवण्यापूर्वी दोषीने संपूर्ण प्रक्रियेचा सामना केला पाहिजे हा त्यामागील उद्देश आहे. दोषीचे आरोग्य ठीक नसल्यास त्याला फासावर चढवण्यात येत नाही. फासावर चढवण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर दोषींना त्यांनी केलेला गुन्हा आणि शिक्षा याबाबतीत वाचून सर्व माहिती दिली जाते. आपण काय केले आहे, याची त्याला जाणीव व्हावी हा यामागचा हेतू असतो, पण याचा गैरफायदा वकील घेत आहेत. ते मानसिकदृष्ट्या योग्य नाहीत आणि शारीरिक तंदुरुस्त नाहीत या बहाण्याने ही फाशी लांबवली जाण्याचे प्रयत्न हे अत्यंत हीन-दीन असे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: