दोनच दिवसांपूर्वी ‘मुंबई चौफेर’च्या ‘बिटवीन द लाइन्स’मधून ‘गुन्हेगारांचे मनोबल उंचावणारा निर्णय’ हा लेख प्रसिद्ध झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्या लेखाचे स्वागत झाले. विदर्भ, मराठवाडा, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातून दिवसभर फोन येत होते आणि आपल्या मनातील भावना व्यक्त केल्याचे सांगितले. कठोर कारवाई न होण्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे, फास्टट्रॅकचा उपयोग काय? असे सवाल यातून उपस्थित केले जात होते. ते खरे ठरले आहे. कारण सोमवारीच पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा भयानक प्रकार हिंगणघाट येथे घडला. कायद्याची भीती नसल्यामुळे, त्वरीत शिक्षा होत नसल्यामुळे गुन्हेगारीकडे तरुण झुकत आहेत, याचे आणखी काय प्रमाण हवे? आमच्या न्यायव्यवस्थेला आपल्या दिरंगाईचा विचार करावा लागेल. असे झाले नाही, तर या अराजकतेमुळे लोक रस्त्यावर उतरतील, यात शंका नाही.एकतर्फी प्रेमातून समाजमन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे सोमवारी घडली. एका विवाहित तरुणाने भररस्त्यात प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४० टक्के होरपळली असून, चेहरा पूर्ण जळाल्याने तिला वाचा आणि डोळे कायमचे गमवावे लागण्याची भीती आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, त्याला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी संतप्त विद्यार्थी आणि नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. राज्य सरकारने हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवू असे म्हटले आहे, पण त्याचा उपयोग काय होणार आहे? निर्भयाचा खटलाही फास्ट ट्रॅकवर चालला. आज आठ वर्षे झाली. इतक्या फास्ट फास्ट खटले असतील, तर जे खटले साध्या ट्रॅकवर आहेत, त्याचा निकाल कधी लागणार? यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे.हिंगणघाटच्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयासाठी अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेली तरुणी सोमवारी सकाळी आपल्या घरून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर आधीच दबा धरून बसला होता. तिला पाहताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि अतिशय निदर्यतेने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर काहींनी तिच्या अंगावर पाणी ओतून आगीवर नियंत्रण आणले, मात्र, तोपर्यंत ती ४० टक्के भाजली होती. तिला आधी हिंगणघाट रुग्णालयात आणि नंतर नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिचा चेहरा पूर्णपणे जळाला असून, ती वाचाही गमावण्याची भीती आहे, तसेच डोळे गमावण्याचीही शक्यता आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. पीडित तरुणी आणि आरोपी रोज बसने प्रवास करीत होते, मात्र सोमवारी आरोपी दुचाकीने आला. त्याने कट रचून हे क्रूर कृत्य केले. ही प्रवृत्ती का वाढीस लागत आहे? आम्हाला न्यायालयालाच आता आरोपीच्या पिंजºयात उभे करावे लागेल. न्याय मिळत नाही, आरोपींना फाशी होत नाही म्हणून दिल्लीत निर्भयाची आई तडफडते आहे. गुन्हेगार सुरक्षित आहेत आणि न्यायालय आमचा पुढील आदेश येईपर्यंत फाशी देऊ नये, असे सांगते. कशाला कोण गुन्हा करताना घाबरेल? आता रोज, नव्हे क्षणाक्षणाला अशा घटना बघायला मिळतील. या देशात मुली सुरक्षित असतील तर त्याला आमची कायदा आणि सुव्यवस्था (‘सु’ कसली? गैरव्यवस्था) जबाबदार असेल. वकिलांची कारस्थाने आणि त्यामुळे न्यायालयाकडून होणारा विलंब गुन्हेगारीला प्रोत्साहित करत आहे, असेच वाटू लागले आहे. याप्रकारे गुन्हेगारांचे समर्थन, त्यांना वाचवणाºया वकिलांना मुली नाहीत का? बहिणी नाहीत का? त्यांच्या घरात असा प्रकार झाला, तर हे वकील असेच वागतील का? हा प्रश्न आज जनता विचारत आहे. या वकिलांच्या प्रवृत्तीमुळेच हिंगणगाव प्रकरणातील तरुणाला बळ मिळाले आहे. आम्हाला शिक्षा देण्याइतकी आमची न्यायव्यवस्था खंबीर नाही याचा विश्वास गुन्हेगारी जगतात निर्माण करण्याचे काम आमच्या वकील आणि न्यायव्यवस्थेने केलेल्े आहे.हिंगणगाव प्रकरणाती, आरोपीचे लग्न झाले असून, त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. नुकताच तो रेल्वेत नोकरीला लागल्याचे सांगण्यात आले. तीन महिन्यांपूर्वी त्याने पीडितेला त्रास दिला. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावले होते. सोमवारच्या घटनेनंतर शहरात संताप व्यक्त होऊ लागताच पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी हिंगणघाटला भेट दिली. यावेळी पोलीस ठाण्यापुढे शेकडोंचा जमाव ठिय्या देऊन बसला होता. हा जमाव आता देशभर लाखो कोट्यवधींचा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पोलीस, वकील आणि न्यायव्यवस्था गुन्हेगारांना वाचवण्यासाठी धडपडत असतील, मानवी हक्क आयोगाच्या नावाखाली काही तथाकथित सुधारणावादी जर गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर सामान्य माणसापुढे दोनच पर्याय उरतात, त्यांनी आत्महत्या करून स्वत:ला संपवावे किंवा जनतेने रस्त्यावर उतरून दबाव आणावा. असेही आपण असुरक्षित असू, तर रस्त्यावर उतरून तुरुंगात जावे आणि तिथे सुरक्षित जीवन जगावे. गुन्हेगारांना सरकार वाचवते, पोसते आहे, तर आम्हाला पोसायला त्यांना काहीच हरकत नसावी.हिंगणघाटातील घटनेनंतर सहा तासांनी आरोपी नगराळे यास टाकळघाट येथून अटक करण्यात आली. सायंकाळी हिंगणघाट शहरातून संतप्त नागरिकांचा मोर्चा निघाला. मुलींनी स्वतंत्र मोर्चा काढला. ही सुरुवात आहे. जनता आता रस्त्यावर उतरेल आणि न्यायव्यवस्थेला खडसावून प्रश्न विचारेल. निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्याचे आदेश न्यायालयाने स्थगित केले आहेत. त्यामुळे असे गुन्हे घडणार आहेत हे न्यायव्यवस्थेला आता जनता रस्त्यावर उतरून दाखवून देणार आहे. वेळप्रसंगी यातून हिंसक प्रकार घडू शकतात. या सर्व गोष्टींना आमची न्यायव्यवस्था जबाबदार असणार आहे. आमचे राज्यकर्तेही त्याबाबत कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत.हिंगणघाट प्रकरणातील विकेश हा पीडितेवर एकतर्फी प्रेम करीत होता. यातून काही महिन्यांपूर्वी तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. याबाबत तिने आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर काही नातेवाईकांनी त्याला मारहाण केली होती. त्यावेळी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हे प्रकार गेली अनेक दशके सुरू आहेत. १९९० च्या दशकात शाहरूख खानचे डर, बाजीगर असे काही चित्रपट आले होते. एकतर्फी प्रेम आणि हत्या असे पाठोपाठ चित्रपट आल्यानंतर नकारात्मक नायकाविरोधात महिला आक्रमक झाल्या होत्या. आता कायदा आणि न्यायव्यवस्थेकडून होणारा हा अन्याय महिला वर्ग संघटना कशा काय खपवून घेत आहेत? १ फेब्रुवारीची होणारी फाशी टळली म्हणून कोणतीही महिला संघटना रस्त्यावर उतरली नाही, निषेध नाही, नाराजी व्यक्त केली गेली नाही. त्यामुळेच हिंगणघाटातील ही घटना घडलेली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. आता मात्र खरोखरच फाशीचे थेट प्रक्षेपण करून संपूर्ण जगाला दिसले पाहिजे अशा प्रकारे ती दिली गेली पाहिजे, असे वाटते. गुन्हेगारी प्रवृत्तीला न्यायाचा धाक बसला पाहिजे, नाही तर आपल्याला रोज हिंगणघाट बघावा लागेल.काय दोष होता त्या तरुणीचा? हिंगणघाटपासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावरील दारोडा गावात राहणाºया या कुटुंबातील ही तरुणी. मुलगी हुशार. त्यामुळे तिचे वडील अरुण आणि आई संगीता यांनी तिच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून मुलीला आठवीनंतर हिंगणघाटच्या शाळेत प्रवेश दिला, तेव्हापासून ही पोर रोज सकाळी न चुकता बसने शाळेला जायची. असेच शिकत तिने हिंगणघाटच्या बिडकर कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. तेथून बीएससीचे पदवी शिक्षण घेतल्यानंतर ती वर्धेच्या जे. बी. सायन्स कॉलेजमध्ये एमएससीसाठी दाखल झाली. शिक्षण घेऊन प्राध्यापक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या या कन्येने भविष्यात आपल्या आयुष्यात काय दिवस लिहून ठेवला आहे, याची कल्पनाही केली नसेल. जाचक महाविद्यालयातून बी. एड.चे शिक्षण घेत असलेल्या या कन्यारत्नाने आपल्या हिमतीवर बॉटनी हा विषय शिकविण्यासाठी तासिका तत्त्वावर कॉलेजमध्ये प्राध्यापकपदावर काम सुरू केले, मात्र इथेच तिचा घात झाला. तिच्या मागावर असलेल्या त्या माथेफिरूने सोमवारी तिला कॉलेजकडे जात असताना सकाळी सातच्या सुमारास नांदुरी चौकात गाठले आणि तिच्यावर पेट्रोल फेकत आग लावली. किती भयानक प्रकार आहे हा?असे प्रकार आपल्याला आता वारंवार पहावे लागणार आहेत, कारण आमच्याकडे गुन्हेगारांना शासन मिळत नाही, तर संरक्षण मिळते. त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. फास्ट ट्रॅकच्या नावाखाली वर्षानुवर्षे खटला रखडवला जातो आणि गुन्हेगारांना पोसले जाते. त्यामुळे गुन्हेगार बिनधास्त आहेत, तर सामान्य माणूस एका भीतीखाली, दडपणाखाली, दहशतीखाली आहे, ही या देशाची शोकांतिका आहे.
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०
न्यायविलंबामुळेच गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा