२०२० या नव्या वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे. नवीन वर्ष चांगले असले पाहिजे, काही तरी छान घडले पाहिजे, आपल्या आयुष्याला सकारात्मक, कलाटणी देणारे ठरले पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण वर्ष संपताना प्रत्येक जण त्याचा हिशोब करू लागतो. वर्ष सुरू होताना कधीच त्याचा विचार करत नाही. १ जानेवारीपासून मी अमूक एक करणार, मी तमूक एक करणार असे संकल्प करणारे आपल्याकडे खूप लोक असतात, पण किती जणांचा संकल्प पूर्ण होतो? काही तरी निमित्त आणि अडचणी, सबबी सांगून तो संकल्प पूर्ण झालाच नाही, आता काय मोडलाच आहे तर जाऊ दे हे वर्ष असेच, असे म्हणत पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरू होतात. २०२० या वर्षाचे महत्त्व खूप आहे. कारण साधारण पंधरा-सोळा वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आणि एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती असताना २०२० ला भारत महासत्ता होईल, असे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न भंगले आहे. मधली दहा वर्षे आणि गेल्या काही वर्षांतील उलथापालथ पाहता हे महासत्तेचे स्वप्न पूर्ण झाले नाही. त्यामुळे केलेला संकल्प कुठे थांबला? याचा विचार केला पाहिजे. अर्थात, संकल्प नेहमीच चांगले असतात, पण ते पूर्ण होत नाहीत आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले जात नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे.विशेषत: चांगल्या कामाचा संकल्प नसेल कदाचित, पण अनेक जण ठरवतात की, नवीन वर्ष सुरू झाले की, मी धूम्रपान करणार नाही, मी मद्यपान करणार नाही, मी मांसाहार करणार नाही, पण काही तरी सबब सांगून चोविस ते अठ्ठेचाळीस तासांत तो संकल्प मोडतो. याचे कारण संकल्प पूर्ण करण्याचा आपला निर्णय आणि निश्चय दृढ नसतो. कोणताही निर्णय जेव्हा दृढ असतो, तेव्हा तो प्रामाणिकपणे केलेला असतो. असा निश्चय पूर्ण झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला नवीन वर्षासाठी कसलाही संकल्प करायचा असेल, तर तो पूर्ण करण्यासाठी करा, मोडण्यासाठी संकल्प करू नका. आपण हा संकल्प पूर्ण करू शकू या विश्वासाने करा. आपण केलेला संकल्प हा कधी निसर्गावर अवलंबून राहणारा नसतो, तो सर्वस्वी आपल्या इच्छेवर असतो. तो ईश्वरी इच्छेवर अवलंबून नसतो, तर ती आपली इच्छा असते. आपली इच्छा संकल्पाद्वारे आपण पूर्ण करू शकत नसू ,तर आपल्यातच कुठे तरी कमीपणा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.आपल्या या मनाच्या कमकुवतपणाला आवर घालता आला पाहिजे. १ जानेवारीपासून नियमीत व्यायाम करेन किंवा नियमीत योगा करेन, असे एखाद्याने ठरवले असेल, तर निसर्गाचे संकट आले, अतिवृष्टी झाली, कडक उन्हाळा आला तरी त्या संकल्पात बाधा निर्माण होेण्याचे काहीच कारण नसते, पण मनुष्यस्वभाव हा संकल्प पूर्ण करण्यापेक्षा कारणे शोधण्यात वेळ घालवतो. कोणत्या कारणांनी हा संकल्प पूर्ण होणार नाही याचा विचार करीत बसतो. त्या नकारात्मक विचारांनी मनातील संकल्पाला दाबून धरले जाते. संकल्प करण्यापेक्षा तो मोडण्याचे पाप आपण करत असतो. एक वेळ संकल्प केला नाही तरी चालेल, पण केलेला संकल्प मोडणार नाही असा संकल्प करायला पाहिजे, तर चांगले काम उभारू शकते.संकल्पामागच्या आपल्या हेतूवर त्या संकल्पाची पूर्तता अवलंबून असते. एखाद्या तरुणाने ठरवले की, त्याला अमूक एक मुलगी आवडती आहे. तिने आपल्यावर खूश झाले पाहिजे. तिच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी तो व्यायाम करून शरीर कमावण्याचा विचार करतो, परंतु ती मुलगी जेव्हा अन्य कोणावर तरी प्रेम करते, असे समजते तेव्हा त्याचा व्यायामाचा, शरीर कमावण्याचा संकल्प सुटतो आणि तो व्यसनाच्या आहारी जातो. यामध्ये हेतू शुद्ध नव्हता. मला माझे आयुष्य निरोगी जगायचे आहे. त्यासाठी नियमीत व्यायाम केला पाहिजे, असा विचार करून व्यायामाला सुरुवात केली असती, तर निश्िचतच एखादी मुलगी आपणहून मागे लागली असती.आपल्याला फळ आधी हवे असते. मुळे खोलवर रुजली पाहिजेत यासाठी प्रयत्न करण्याची तयारी नसते. पी हळद अन् हो गोरी असले इन्स्टंट परिणाम हवे असतात. इथेच संकल्प तुटून पडतात, म्हणूनच नवीन वर्षात पूर्ण होणारेच संकल्प करावेत. मनाची आणि जनाची फसवणूक करण्यासाठी काही तरी करायचे म्हणून केलेला तो संकल्प असता कामा नये. केवळ लोकांना फसवण्यासाठी संकल्प करायचा नसतो. संकल्पामागचा हेतू शुद्ध असावा लागतो. तो तपासावा लागतो. तो शुद्ध असेल तरच सिद्ध होतो.आपल्या देशात प्रत्येक जण काही ना काही कारणाने खोटे बोलत असतो. बुरख्यांच्या जगात वावरत असतो, त्याचे वास्तव वेगळेच असते हे आमिर खानच्या पीके या चित्रपटातून चांगल्यापैकी दाखवून दिले आहे. परग्रहावरून आलेला एक मनुष्य की, ज्याला कपडे, पैसा हे काही माहीत नाही. त्याला दुसºयाचे ओरबाडून घेणे माहीत नाही, पण आपल्या देशात आल्यावर सर्वात प्रथम त्याला सामोरे जावे लागते, ते चोरीला. इथे प्रत्येक जण कसा फसवत असतो, चुकीच्या मार्गाला कसा लागत असतो? याचे उत्तम कथानकासह सादरीकरण पीके या चित्रपटात दाखवले आहे. आमच्या ग्रहावरील माणसे खोटं बोलत नाहीत, पण इथल्या ग्रहावरील माणसे खोटं बोलतात, हे आमिर खान ठळकपणे नोंदवतो, हे लक्षात घेतले पाहिजे. खोटे बोलण्याची, दुसºयाला खड्ड्यात घालण्याची, अडकवण्याची प्रवृत्ती आमच्यात मोठ्या प्रमाणात असते, म्हणून आमचे संकल्प कधी पूर्ण होत नाहीत. हे खोटेपण पीकेच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्याचे धाडस आमिर खानने केल्यामुळेच काही लोक दुखावले आणि आमच्या धर्माच्या भावना दुखावल्या असा कांगावा करू लागले. या चित्रपटात भावना दुखावण्यासारखे कोणतेही काम केलेले नाही, पण आपला बुरखा फाटला की काय? या विचाराने, या भितीने त्याला विरोध होऊ लागला, पण या चित्रपटामागचा आमिर खानचा हेतू शुद्ध असल्यामुळेच त्याचा या चित्रपटाचा संकल्प पूर्ण झाला आहे. त्याला आर्थिक यशही चांगले मिळाले होते.नवीन वर्षात संकल्प करायचाच असेल, तर तो पूर्ण करण्यासाठी करा. दिखाऊपणासाठी करू नका. कारण जगाला फसवलं तरी आपण मनाला फसवू शकणार नाही. त्याने अधिकाधिक दु:ख पदरात पडेल. त्यापेक्षा संकल्प न करण्याचाच संकल्प करा, हे उत्तम. आपल्याकडे उद्या करायचं ते आज करा. आज करायचं ते आता करा, असे म्हटले जाते. याचे कारणच उद्या कधी येत नसतो. संकल्प तसाच असतो. संकल्प आज करा आणि संकल्पाच्या दिशेने पावले टाका. काही गोष्टी चांगल्या असणे हे मागासपणाचे लक्षण कोणाला वाटते, म्हणजे मी दारू पित नाही, सॉरी मी ड्रिंक्स करत नाही, असं कोणी म्हटलं तर तो मागास ठरतो. ड्रिंक्स म्हटल्याने प्रतिष्ठा वाढते, दारू म्हटल्याने ती गळालेली???? असते म्हणे, पण दोन्ही एकच असतात, पण तो न पिणारा एखादा असेल, तर तो या जगात राहण्यास लायक नाही, असा समज गेल्या काही वर्षांपासून युवा पिढीत दिसतो. ड्रिंक्स करत नाहीस? नॉनव्हेज खात नाहीस? असे प्रश्न तरुण मुले एकमेकांना विचारतात, तेव्हा ते विचारणाºयाच्या मनात ड्रिंक्स न करणारा या जगात राहायला लायक नाही, असेच भाव असतात. म्हणून ३१ डिसेंबरला किंवा नवीन वर्षाच्या स्वागताला आपल्या या मद्यपींच्या जगातील लोकसंख्या वाढवण्याचा अनेकांचा संकल्प असतो. असे संकल्प मोडले पाहिजेत, पण चांगले संकल्प प्रत्यक्षात येत नाहीत, पण नको ते संकल्प मात्र पूर्णत्वास जातात, हे फार मोठे सामाजिक विडंबन म्हणावे लागेल.पण कोणताही संकल्प पूर्ण करताना त्यामागचा हेतू चांगला असला पाहिजे. ओशो रजनीश यांनी आपल्या एका प्रवचनात सांगितलेले उदाहरण फार महत्वाचे आहे. ते म्हणतात की, तुम्ही असे अनेक कठीण खडक-दगड पाहिले असतील की, ते मोठ्या छन्नीनेही तुटत नाहीत. त्यांच्यावर पहारही चालत नाही, पण त्याच खडकाला भेगा पाडण्याचे काम एक छोटेसे रोपटे करू शकते. आपल्या अत्यंत नाजूक मुळांनी खडकावर पडलेले बीज त्यात आपले पाय रोवते आणि त्यावर वटवृक्ष, पिंपळ असे महाकाय वृक्ष उभे राहतात. कठीण खडकाला भेदून ते वृक्ष मोडून काढतात. याचे कारण मोठे होण्याचा, उर्ध्वपातीत होण्याचा त्या रोपट्याचा संकल्प हा दृढ आहे. त्यामुळे ते मोठे असते. संकल्प हे असे असले पाहिजेत. आपल्या संकल्पसिद्धीत अनेक अडचणी येणार आहेत, अडथळे येणार आहेत, खडक येणार आहेत हे अगोदर गृहीत धरूनच ते करायचे असतात, तरच ते पूर्णत्वास जातात, म्हणून संकल्पासाठी दृढ निश्चय आणि ईच्छा शक्ती फार महत्वाची असते.केवळ राजकीय इच्छाशक्ती, प्रयत्न, निष्क्रीयता आणि राजकारण, सत्तेची उलथापालथ यामुळे आम्ही अजून महासत्ता म्हणून नावलौकीक प्राप्त करू शकलेलो नाही. ते अवघड आहे असे नाही. पण त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. ते आपल्या दृष्टीक्षेपात आहे. त्यासाठी आपण २०२० या वर्षात निदान त्यादृष्टीने पावले टाकण्याची गरज आहे. आपले संकल्प अपूर्ण राहण्याची कारणे अनुत्पादक आहेत. सृजनशीलतेला महत्व दिले पाहिजे. अकारण आपली शक्ती आपण किती वाया घालवतो याचा विचार केला पाहिजे. सगळे संकल्प सरकारने नाही, तर सरकारी संकल्प पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. स्वच्छतेचा संकल्प सरकारने केला, पण आम्ही कचरा करणार नाही, असा संकल्प केला असता तर तो पूर्ण झाला असता. अमूक एक शहर अस्वच्छ आहे ही टीका करणे सोपे आहे, पण ती अस्वच्छता पसरण्यासाठी आमचा कणभर भाग आहे, हे कोण लक्षात घेणार. प्रत्येकाने आपला कचरा मनातील आणि प्रत्यक्षातील साफ केला, तर कोणताही संकल्प पूर्ण होण्यास काहीच अडचण येणार नाही, म्हणून असा संकल्प आता केला पाहिजे. तो पूर्ण होण्यासाठी सर्वांना शुभेच्छा!
बुधवार, १ जानेवारी, २०२०
संकल्पपूर्तीची इच्छा!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा