निर्भया बलात्काराच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यावर बरीच चर्चा झाली. ती देण्यातही अनेक वेळा विरोध, दावे, विलंब केला जात आहे, पण त्यानिमित्ताने वास्तव जीवन आणि चित्रपट याचा संबंध जोडून चित्रपटात दिली गेलेली फाशी यावर नजर मारल्याशिवाय राहवत नाही. तसे अनेक ऐतिहासिक चित्रपट किंवा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहेत, त्यात फाशी झालेली आहे. त्यामध्ये मनोजकुमारचा शहीद, त्यानंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यावर बॉबी देओल, अजय देवगण यांनी केलेल्या चित्रपटातही फाशी दाखवली गेली आहे, पण ते ऐतिहासिक आणि सत्य घटनेवर आधारित होते, पण कथानकात फाशीची शिक्षा ठोठावण्याची वेळ येते, तेव्हा नेमके काय घडले आहे, हे पाहूया.तशा आमच्या मराठी, हिंदी चित्रपटात गुन्हेगारांना फारशी कुणी फाशी दिलेली नाही. अगदी खून, दरोडे, बलात्कार असे अनेक दे मार गुन्हे केलेले महाभाग पडद्यावर धुमाकूळ घालत असले, तरी पोलिसांनी त्यांना पकडले की, दी एंडची पाटी येते. मग आपणच समजायचे असते की, आता त्यांना पोलिसांनी पकडले म्हणजे शिक्षा होईल, पण काही कथानके ही फाशी दाखवल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. त्यात मात्र फाशीची शिक्षा दाखवली आहे, पण ज्यांना ज्यांना फाशी दिलेली दाखवली आहे, त्यात अनेक जण विनाकारण फासावर गेल्याचेही दाखवले गेले आहे.मराठीतील व्ही. शांताराम यांचा प्रचंड गाजलेला चित्रपट म्हणजे पिंजरा. या चित्रपटात गुरुजी असलेल्या डॉ. श्रीराम लागू यांनाच अखेर फाशीची शिक्षा होते. विशेष म्हणजे स्वत:च्याच खुनाच्या आरोपात दोषी ठरून त्याला फाशी होते, हे विचित्र रम्य असे कथानक होते. प्रत्यक्षात बाजीरावाचा खून कृष्णकांत दळवीने केलेला असतो, पण संध्याच्या नादाला लागून मास्तरचा पाय घसरतो आणि स्वत:चा मुखवटा बदलण्यासाठी गुरुजींचे कपडे, चष्मा त्या प्रेताला घालून गुरुजींचा खून केला आहे असे भासवले जाते. गुरुजींचा तमाशातील मास्तर होतो. पोलीस तपासात हातावरचे ठसे आणि पुरावे श्रीराम लागूंच्या विरोधात जातात, पण आपला खून झालेला नाही, आपण जिवंत आहोत हे तो सांगत नाही, तर आपल्या हातून एका आदर्शाचा खून झालेला आहे, अशी कबुली देऊन फाशीची शिक्षा स्वीकारतो. कथानकाची रंजकता आणि इथली फाशी म्हणजे निर्दोष व्यक्तीला दिलेली फाशी आहे, असेच दिसते. न्यायदेवता कशी आंधळी असते आणि पुराव्यांच्या वजनावर न्यायाचे तागडे तोलले जाते, हाच संदेश चित्रपट देताना दिसतात.मराठी चित्रपटात मेगा फाशीची शिक्षा झालेली आहे, ती म्हणजे माफीचा साक्षीदार या चित्रपटात. पुण्यात १९७६-७७ मध्ये घडलेल्या जोशी अभ्यंकर खून खटल्यातील सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट १९८६ मध्ये आला होता. यात माफीचा साक्षीदार होतो, तो अविनाश खर्शीकर. कसे दहा खून केले याची तो साक्ष देतो आणि जक्कल, सुतार, जगताप, मुनवर शाह यांची भूमिका करणाºया नाना पाटेकर, किशोर जाधव, बिपिन वर्टी अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली जाते, पण मधुसुधन कालेलकरांनी या चित्रपटाला आपल्या मेलो ड्रॅमेटीकपणे टच देऊन चित्रपटाचा शेवट थोडा वेगळाच केला आहे. प्रत्यक्षात या चौघांबाबत असे काही घडले नव्हते. जक्कलच्या जाळ्यात सापडून आपण खून केले याची जाणीव झाल्यावर आणि त्यामुळे आपल्याला फाशीची शिक्षा होणार आहे, हे समजल्याने पोलिसांच्या गाडीतून नेत असताना हे उर्वरित गुन्हेगार नाना पाटेकरला बेदम मारहाण करतात. तो रक्तबंबाळ होतो. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात. नाकात नळ्या, सलाईन, आॅक्सिजन अशा अवस्थेत त्याच्यावर उपचार होत असतात. तो बरा झाल्याशिवाय फाशी होणे शक्य नाही. त्यामुळे ती फाशी लांबते. त्यावेळी नाना पाटेकरची आई हॉस्पिटलमध्ये येते आणि अशा नालायक पोराला जगण्याचा हक्क नाही, म्हणून तो आॅक्सिजन, त्या नळ्या काढून टाकते आणि त्याला मरायला सोडते असे दाखवले आहे. बाकीच्या तिघांना रीतसर फाशी होते. हा मेलोड्रामा चित्रपटाचे स्वातंत्र्य म्हणून प्रेक्षकांना खूश करण्यासाठी घेतल्या आहेतच, पण त्याहीपेक्षा गुन्हेगार गुन्हेगार असतो, संपूर्ण कुटुंब गुन्हेगार नसते हे त्यातून दाखवले आहे. कोणतीही आई आपला मुलगा खुनी व्हावा असे स्वप्न पाहात नाही, त्यामुळे अशा मुलांमुळे कुटुंबांना वाळीत टाकण्याचे प्रकार होऊ नयेत, हा संदेश या चित्रपटातून दिला गेला आहे.हिंदी चित्रपटातील फाशीची शिक्षा झालेल्या काही चित्रपटांचा उल्लेख या ठिकाणी करायचा झाला, तर कर्मयोगी या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. कारण या चित्रपटात राजकुमार या अभिनेत्याला दोन वेळा फाशी झालेली आहे. राजकुमारचा यात डबल रोल आहे. बाप आणि मुलगा. त्यातला बाप फासावर जातो, तो चित्रपटाच्या मध्यंतराला आणि मुलगा राजकुमार फासावर जातो, तो चित्रपट संपताना. देवीसमान सज्जन असलेल्या मालासिन्हाचा राजकुमार पती असतो, पण चोºया करणे, गुन्हे करणे यात त्याला रस असतो. त्यामुळे आपल्या मुलाला तो तसाच बिघडवतो. दोघे वेगळे होतात. मुलाला घेऊन राजकुमार जातो. गुन्हेगारी जगतात मोठा होतो. इकडे मालासिन्हाला सोडताना ती गरोदर असते, ती एका सज्जन मुलाला म्हणजे जितेंद्रला जन्म देते. त्याच्यावर चांगले गीतेचे, कर्मयोगाचे संस्कार करते आणि वकील बनवते, पण गुन्हेगारी जगतात डॉन झालेला राजकुमार पकडला जातो आणि अनेक खून, गुन्हे सिद्ध झाल्याने तो फासावर जातो. मध्यंतरानंतर तो मुलगा पुन्हा राजकुमारच असतो. तोही डॉन बनतो आणि बदले की भावना घेऊन वावरतो. कोर्टात गोळ्या घालून तो पुरावेच देतो आणि फाशीची शिक्षा होते. यातही एक भावनिक प्रसंग आहे की, थोडे दिवस का होईना आईपाशी राहिलेल्या राजकुमारला फासावर जाताना आई भेटायला येते. तेव्हा तो गीतेतील श्लोक म्हणून त्याचा अर्थ सांगतो. केलेल्या कर्माचा सिद्धांत सांगतो. फासावर जातो. धमाल मसालापट, राजकुमारची डायलॉगबाजी याने प्रचंड गाजलेला चित्रपट, पण यातील डबल रोल केलेल्या बाप-मुलाची भूमिका केलेल्या राजकुमारला दोन वेळा फाशी होते हा कथानकाचा भाग आश्चर्यकारक असाच होता. गुन्हेगार बापाबरोबर गेलेल्या आणि गुन्हेगार बनलेल्या राजकुमारला आईच्या संस्कारात वाढून वकील झालेल्या जितेंद्रलाच फाशीच्या शिक्षेची मागणी करण्याची वेळ येते, हा कथानकाचा चमत्कारही रंजक होता. आपला भाऊ आहे, हे समजल्यावर ही केस लढवावी की नाही, या द्विधा मन:स्थितीत सापडलेल्या जितेंद्रला आई त्याच्या कर्माची आठवण करून देते आणि केस लढायला सांगते. यात सुधीर दळवी हा न्यायाधीश दाखवला आहे. रेखा, रिना रॉय या दुय्यम भूमिकांतच आहेत. कारण सगळे कथानक गुन्हेगारी जगत आणि राजकुमारभोवती फिरत होते.याशिवाय १९८५ मध्ये सुभाष घई यांचा आलेला एक चित्रपट म्हणजे मेरी जंग. अनिल कपूरला हीरो म्हणून चांगली संधी मिळालेला हा चित्रपट. यात लहान असताना अनिल कपूरचे वडील गिरीश कर्नाड याला ठकराल हा वकील म्हणजे अमरिष पुरी एका खोट्या खुनाच्या घटनेत अडकवून फासावर लटकवतो. ती फाशीची शिक्षा पाहून गिरीश कर्नाडची पत्नी वेडी होते. हा बदला घेण्यासाठी अनिल कपूर शिकून वकील होतो. ठकराल अमरिष पुरीला अद्दल घडवतो. ही वकिली डावपेचाची जंग इथे दाखवली आहे, पण यात निरपराध्यालाच फासावर चढवल्याचे दाखवले आहे. त्यामुळेच कोणाही निरपराध्याला शिक्षा होऊ नये यासाठीच अनिल कपूरची जंग इथे लढताना दिसते.बॉलिवूड पटांनी निरपराध्यांना फाशी होते, असेच अनेक वेळा दाखवायचा प्रयत्न केला आहे. सत्य घटनेवरील २६/११ मध्ये कसाबला फाशी दाखवली आहे, पण वीस वर्षांपूर्वी आलेल्या फिर भी दिल हैं हिंदुस्थानी या चित्रपटात एका निरपराध्याला फाशी देताना वाहिन्या कशा खोटेपणाने वागतात आणि बाजार मांडतात, याचे बिभत्स दर्शन या चित्रपटात शाहरूख खान, जुही चावला यांच्या ड्रिम्स अनलिमिटेडने दाखवले आहे. यात परेश रावलला होणारी फाशी आणि स्पॉन्सरर यावर अत्यंत ब्लॅक कॉमेडी दाखवली आहे.बॉलिवूडने जरी निरपराध्यांना फाशी होते, असे दाखवले असले, तरी असली गुन्हेगारांना भरपूर संधी दिली गेलेली आहे. त्यामुळे ते सुटता कामा नयेत, हे नक्की.
रविवार, १९ जानेवारी, २०२०
पडद्यावरील फाशी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा