गुरुवार, २ जानेवारी, २०२०

माझ्या आईचं पत्र हरवलं...!



आऊट आॅफ डेटविषयी


बदलत्या युगाबरोबर, तंत्रज्ञाबरोबर काही गोष्टी कालबाह्य होत जातात, पण कालबाह्य झालेल्या या गोष्टींचाही एक इतिहास असतो, एक संस्कृती असते. त्यांचेही एक योगदान असते. ते विसरून जाणे कधीच शक्य नसते. अशा कालबाह्य झालेल्या, परंतु आठवणींसाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवरून नजर मारणार आहोत. आपण प्रत्येक गुरुवारी, ‘आऊट आॅफ डेट’ या सदरातून.
.......

‘माझ्या आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’ असा पूर्वीच्या काळी शाळेतून खेळ खेळला जायचा. पत्र येणं हे एक सुखद अनुभव असायचा, त्या काळातील हा खेळ. आजकाल पोस्टमनकडून पत्र येणंच बंद झालं आहे. त्यामुळे हा खेळही काळाच्या मागे पडला आहे.आजकाल पोस्टमन आपल्या घरी येतो, पण तो फक्त व्यावसायिक पत्र घेऊन येतो. कसल्या नोटिसा, बिले, सरकारी दस्तऐवज अशी व्यावसायिक कागदपत्रेच आणून देण्याचे काम पोस्टमनला सध्या करावे लागत आहे, पण एक काळ असा होता की, आपल्या भावनाही एका टोकावरून दुसºया टोकावर पोहोचवण्याचे काम या पोस्टमनने केले होते. घरात पत्र येणे यासारखा आनंद नसायचा.
कोणत्याही घरातील कर्ता पुरुष संध्याकाळी घरी आल्यावर त्याचा पहिला प्रश्न ‘काही पत्र आलं आहे का?’ असा असायचा. बाहेरून आलेल्या कुटुंबप्रमुखाला आल्या आल्या पाणी, चहा आणि त्याबरोबर आलेलं पत्र देणे हे गृहिणीचे कर्तव्य असायचे. सुखी कुटुंबाची साक्ष पत्र असायचं. फोन आले, मोबाइल आले, स्मार्टफोन आले. आता पत्र लिहायची गरज आहे कुणाला? पटकन फोन केला, व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज सोडला. पुढच्या क्षणात निरोप पोहोचला. गतीमान जगात औपचारिकता आली, कोरडेपणा आला, पण पत्रातला ओलावा मात्र गेला. आज पत्र येणं हे बंद झालं आहे. कारण पत्र कालबाह्य झालं आहे.पोस्टकार्ड, आंतरदेशीय, पाकीट अशा किती तरी प्रकारची पत्रे आपल्याकडे येत असत. कुणाचा जन्म झाला, मृत्यू झाला तर साधं कार्ड पाठवलं जायचं. खेडेगावात साक्षरता नसतानाच्या काळात लाल रंगात लिहिलेलं पत्र किंवा पत्रात वर श्री लिहिलेलं नाही असं लक्षात आलं, तर वाचायला न येणारे लोकही आधीच रडायला सुरुवात करायचे. लाल अक्षरात पत्र पाठवायचे नाही, असा संकेत होता. काही तरी अशुभ वार्ता घेऊन आलेलं आहे हे पत्र म्हणून धडकी भरायची. तारेचंही तसंच होतं. एखाद्याच्या घरात तार आली म्हणजे कोणाच्या तरी निधनाची बातमीच आली असाच समज व्हायचा आणि रडारड सुरू व्हायची. पोस्टमन वाचून दाखवायचा आणि कोण गेले ते समजायचे.
आंतरदेशीय पत्रात मोठा मजकूर, खुशाली कळवली जायची. थोडी गुप्तताही असायची. जास्तच मोठा संवाद साधायचा असेल, तर पाकिटाचा वापर व्हायचा. त्याप्रमाणे दररोज थैलीभर पत्रं घेऊन आपल्या गल्लीत, पेठेत, चाळीत पोस्टमन यायचा. त्याची येण्याची वेळ झाली की, प्रत्येक जण दरवाजात उभा असायचा. पोस्टमन... पत्र आहे का? असे विचारून त्याच्या ताब्यातून पत्र आपल्या घरी आले याचा कोण आनंद असायचा.सासरी गेलेल्या लेकीचं पत्र, सीमेवर गेलेल्या सैनिकाचे पत्र, कुणाचे लग्न ठरल्याचे, नवीन वर्ष, संक्रांत, दिवाळीसाठी येणारी शुभेच्छा पत्रं, तर कुणाला नोकरीचा येणारा कॉल हे सगळं पोस्टामार्फत व्हायचं, पण आज हे पत्र हरवलं आहे. भावना कोरड्या झाल्या आहेत. माध्यम बदललं आणि ई-मेल यायला लागले. पेपरलेस होण्यासाठी ई-मेलचा, समाजमाध्यमांचा वापर होऊ लागला. त्यामध्ये भाषेचा आणि भावनांचा ºहास होताना दिसू लागला.
पत्र लिहिताना ते अचूक आणि ठरावीक असायचे. त्यावर असलेली तारीख, मध्यभागी श्री, सनविवि वगैरे मायना, मग विषय आणि त्यानंतर आशय, समारोप. त्यातून काही राहिलेच तर ता. क. अर्थात ताजा कलम असायचा. त्यात मजा असायची. पत्रातील अक्षर चांगले असावे, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मजकूर लिहिता यावा यासाठी मेहनत असायची. या पत्राच्या माध्यमातूनही फार मोठे साहित्य या देशात उभे राहिले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी तुरुंगातून आपल्या कन्या इंदिरा गांधी यांना पत्रं लिहिली होती. त्यातून त्यांनी संस्कार आणि देशभक्तीची भावना निर्माण केली होती. साने गुरुजींनी सुधाला लिहिलेल्या पत्रातूनही फार मोठे संस्कार आणि परिस्थितीचे भान असायचे, जाणीव करून दिलेली असायची, म्हणजे अगदी सात दिवस पाऊस लवकर आल्याने लोकांची कशी तारांबळ उडाली, हे पत्रातून त्यांनी कळवलेले असायचे. तेव्हा डोळ्यापुढे चित्र उभे राहायचे. पत्रांच्या माध्यमातून हे फार मोठे साहित्य उभे राहिलेले आहे. व. पु. काळे यांचा प्लेझर बॉक्स हा तर पत्रांचा संग्रह. ते म्हणायचेच की, माझ्या घरी पत्र टाकण्यासाठी जी पेटी आहे, त्याला मी लेटरबॉक्स असं न म्हणता प्लेझर बॉक्स असं म्हटलेलं आहे. कारण घरात पत्र येणं यासारखे दुसरे प्लेझर नाही. आज हा ओलावा, आनंद, प्लेझर आपल्यातून कमी झालेला आहे. माझ्या आईचं पत्र हरवलं आहे. आज सीमेवरचा सैनिकही व्हॉट्सअ‍ॅपवरून, व्हिडीओकॉल करून आपल्या कुटुंबीयांशी बोलतो आहे. सासरी गेलेली मुलगी फोनवरून आईला रेसीपी विचारते आणि सासरच्यांना खूश करू पाहते आहे. सगळं काही सहजसाध्य झाल्याने ओढ कमी झालेली आहे. कधी येणार पत्र, कधी येणार पत्र ही लागलेली ओढ आता कमी झाली आहे,. त्यामुळे माणसामाणसातील ओढही कमी झालेली आहे. निव्वळ औपचारिकता आणि कोरडेपणा निर्माण झालेला आहे. भावनाशून्य व्यवहारांची औपचारिकता निर्माण झाली आहे. कारण माझ्या आईचं पत्र हरवलं आहे.या पत्रलेखनाला केवळ घरातच नाही, तर नाटक, सिनेमा यातूनही संधी होती. तिथेही पत्र घेऊन येणारा पोस्टमन हा दीर्घकाळ राहिलेला आहे. चांदणे शिंपित जा या नाटकात पोस्टमन एसएससीचा रिझर्ल्ट घेऊन येतो. घरोघरी हीच
बोंबमध्ये दाजिबा एक्स्प्रेस ‘डिलिव्हरीचे काही पत्र आहे का?’ म्हणून येरझाºया घालतात. अनेक नाटकांत नवे कलाकार फक्त पोस्टमनचे काम करत होते. चित्रपटातही पोस्टमन, पत्र यांना खूप वाव होता. पोस्टमन हा चित्रपटाचा नायकही झालेला आहे. राजेश खन्नाने त्याची भूमिका केलेली आहे. डाकिया डाक लाया हे गाणं गात तो जेव्हा गावात येतो तेव्हा आनंदाचा खजिना घेऊन आला आहे आणि तो वाटत चालला आहे असेच वाटायचे, म्हणजे २५ डिसेंबरला सांता जशी बक्षिसांची पोतडी भरून आणतो, तशीच पोतडी आमच्या पोस्टमनची होती. तो रोजचाच आमचा सांता होता तर, पण आता हा सांता येणं बंद झालं आहे. शोलेमध्ये पोस्टमनकडून अहमद(सचिन)च्या नोकरीचा प्रयत्न करणारा इमाम (ए. के. हंगल), त्या पोस्टमनची थट्टा करणारी आणि त्याचा चष्मा आपल्याकडे असल्याचे दाखवणारी हेमामालिनी असं सगळं घरगुती आणि आनंद देणारे क्षण असायचे. असे किती तरी चित्रपट सांगता येतील. अगदी राज कपूरच्या चित्रपटात ये मेरा प्रेमपत्र पढकर के सारखे गाणे असेल किंवा त्याच्याच राम तेरी गंगा मैलीमध्ये पहाडी भागात आपल्या पतीची खुशाली काही समजली का म्हणून डाकबाबूकडे आतुरतेने येणारी मंदाकिनी असो, पत्रांना फार मोठे स्थान संस्कृती, साहित्य आणि समाजजीवनात होते. ते पत्र आता हरवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: