सोमवार, २७ जानेवारी, २०२०

नवा राजमार्ग



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी गोरेगाव येथे महाअधिवेशनात पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून, त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. विशेष म्हणजे यावेळी अमित ठाकरे यांचा राजकारणातील प्रवेश जाहीर करतानाच त्यांची मनसेच्या नेतेपदी निवडही करण्यात आली, म्हणजे आता राज ठाकरे अधिक परिपक्व झालेले आहेत आणि सर्वच पक्षांच्या नेत्यांप्रमाणे त्यांनीही आपल्या पुढच्या पिढीला आणले आहे. महाराष्ट्राच्या नव्या राजकारणात युवा पिढीचे झालेले आगमन लक्षात घेऊन अमित राज ठाकरे यांचे पदार्पण हा महत्त्वाचा टप्पा आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार, धिरज देशमुख, ऋतुराज पाटील, अदिती तटकरे अशा दिग्गज नेतापुत्रांचा राजकारण प्रवेश झाल्यावर अमित ठाकरे यांचे पदार्पण हे महत्त्वाचे होते. विशेष म्हणजे या नव्या पिढीकडे एक चांगला दृष्टिकोन, खेळीमेळीचे वातावरण असल्याचे दिसत आहे. रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांचे अभिनंदन करणे हे त्याचेच द्योतक आहे. त्यामुळे भविष्यात राज्याचे राजकारण एका नव्या वळणावर असेल, त्या वळणावरच हा मनसेचा नवा राजमार्ग आहे.गुरुवारी गोरेगाव येथील नेस्को ग्राऊंडवर पार पडलेल्या पक्षाच्या महाअधिवेशनासाठी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि कन्या उर्वशी ठाकरे आदी सकाळी नऊ वाजताच दाखल झाले होते. त्यामुळे या अधिवेशनाला एक प्रकारे उत्सवाचेच स्वरूप प्राप्त झालेले होते. गेल्या काही दिवसांत विशेषत: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला आलेल्या अपयशानंतर आलेली मरगळ यामुळे झटकली गेली असेल, हे नक्की. लोकसभेला जरी त्यांनी उमेदवार उभे केलेले नसले, तरी विरोधकांचे ते स्टार प्रचारक होते. त्याचा काहीही परिणाम झालेला नव्हता. त्यामुळे ते अपयशच होते. त्यामुळेच ही मरगळ झटकण्याच्या इराद्याने मनसेच्या महाअधिवेशनासाठी राज्याच्या कानाकोपºयातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले होते. सभेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनसेने यानिमित्ताने तीन रंगांचा जुना झेंडा बदलून भगव्या रंगाचा ध्वज स्वीकारला. यापूर्वी पक्षाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांचे फोटो असायचे. गुरुवारी त्यांच्यासोबत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फोटोलाही मनसेकडून व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. जे शिवसेनेने सोडले, नाकारले, दुर्लक्षिले ते उचलायचे हे यातून स्पष्ट होते आहे. कारण शिवसेना आता व्यासपीठावर सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी असल्यामुळे सावरकरांना स्थान देणार नाही, हिंदुत्वाला जवळ करणार नाही, हे अधोरेखित करण्याचे काम या झेंडा आणि फोटोवरून दिसून आले.त्यानंतर अमित ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशही जाहीर करण्यात आला. मनसे विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाºयांनी अमित ठाकरे यांना यावेळी तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. मनसेचा नवा झेंडा फडकवत अमित ठाकरे यांनी पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी अमित यांनी शिक्षण आणि क्रीडा विषयक ठराव मांडले. मनसेच्या चौदा वर्षांच्या काळात प्रथमच असे अधिवेशन झाले आहे, हे विशेष.या अधिवेशनावरून एक लक्षात घेतले पाहिजे की, मनसेचा हा चौदा वर्षांचा वनवास आता संपला का? राज्यात मनसे आपली जागा आता निर्माण करणार का? तर एकूणच गुरुवारच्या उत्साहावरून ही पोकळी दूर करण्याचा प्रयत्न मनसे करणार, हे दिसत आहे.आज शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक थोडासा अस्वस्थ आहे. त्यांना त्यांच्या मनातले काही बोलता येत नाही. शिवसैनिकांमधील ही अस्वस्थता मनसेला लाभदायक होईल असे वाटते. आपल्या मूळ विचारांपासून शिवसेना दूर जात असेल, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक नवा मार्ग शोधतील आणि ते मनसेकडे वळतील, असा होरा यानिमित्ताने मनसेकडून मांडला जात आहे, पण हा बदललेला मनसेचा ट्रॅक त्यांना किती फायद्याचा होतो हे पाहण्यासाठी महापालिका निवडणुकांचीच वाट पाहावी लागेल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपबरोबर जाऊन जागा वाटप करून चांगले संख्याबळ कमवायचे आणि शिवसेनेकडून महापालिका काढून घेण्यासाठी मनसेने हे धोरण आखले असावे. नाशिक आणि मुंबई महापालिका ही दोन लक्ष्य आता मनसेने ठेवलेली आहेत हे लक्षात घेण्यास हरकत नाही.मनसेच्या महिला आघाडीने रक्षाबंधनसारख्या उपक्रमातून महिलांच्या सुरक्षेसाठी उघडलेले दालन फार महत्त्वाचे आहे. शिवसेनेची प्रत्येक भागातील शाखा, प्रत्येक शाखाप्रमुख हा नगरसेवकाप्रमाणे होता, तो जनतेची कामे करत असे, परंतु आता तशी कामे होत नाहीत. त्यामुळे शिवसेनेची ही पोकळी भरून काढून शहरातील नागरिकांच्या हृदयात प्रवेश करण्याचे धोरण मनसेने आखलेले दिसते आहे. त्याचप्रमाणे शिक्षण आणि क्रीडा या धोरणाला प्राधान्य देऊन अमित ठाकरे यांनी भावी पिढी, तरुणांना आपलेसे करण्याचे प्रयत्न असणार याची चुणूक दाखवून दिलेली आहे. शॅडो कॅबिनेटचा प्रयोग करून प्रत्येक मंत्र्यावर वॉच ठेवण्याच्या निमित्ताने सरकारवर वचक ठेवण्याचे काम मनसे करणार. त्यामुळे ही सगळी पावले पाहता शिवसेनाप्रमुखांनी प्रारंभीच्या काळात संघर्ष करून जनतेच्या मनात स्थान मिळवले होते, ते स्थान मिळवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांचा असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शिवसेना गेल्याने आगामी निवडणुकीत शिवसेनेला मतदार नाकारतील असा अंदाज बांधून शिवसेनेला पर्याय देण्याची रणनिती या नव्या राजमार्गात आहे. त्यामुळे सेना-भाजप युतीप्रमाणे मनसे-भाजप युतीचे प्रयत्न केले जातील, असेही अंदाज आहेत. त्यामुळे हा गुरुवारचा उत्साह येत्या काही दिवसांत वाढवत मनसे कशी वाढते ते पाहणे आवश्यक आहे. एक नवा फॉर्म्युला, नवा राजमार्ग राज्याच्या राजकारणात तयार होताना दिसत आहे, हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: