शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

केवळ फादर म्हणून विरोध नको


उस्मानाबाद येथे शुक्रवारपासून ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. साहित्य संमेलनाला म्हणजे वादालाही सुरुवात झाली. वादाशिवाय आपल्याकडे साहित्य संमेलने होतच नाहीत. अर्थात, हे तात्त्विक, वैचारिक वाद असते, तर आनंद झाला असता, पण ज्या कारणांवर वाद घातले जातात, ती चिंताजनक आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत म्हणून वाद निर्माण झाला आहे. ते धर्मगुरू आहेत, फादर आहेत म्हणून विरोध होत असेल, तर ते चुकीचे आहे. कारण आपल्याकडे साहित्यात संतसाहित्यही विचारात घेतले जाते. आध्यात्मिक साहित्य, तत्त्वज्ञानही जर विचारात घेतले जाते, तर एखादा फादर या पदावर आला तर चिंता करायचे कारण नाही. साहित्य संमेलन हे शेवटी वैचारिक देवाण-घेवाण असते. त्यांची मते ऐकून घेतल्याने काही झोळीत धोंडा पडत नाही. फादर अध्यक्ष झाल्याने काही कोणी धर्मांतराची दीक्षा देईल अशी शंका घेण्याचे कारण नाही, म्हणून सांगावेसे वाटते की, केवळ फादर म्हणून विरोध करू नका.याला सुरुवात त्यांच्या निवडीनंतरच झाली. दिब्रिटोंचं साहित्य धर्मप्रसारासाठीचं साहित्य असल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे, पण फादर दिब्रिटो यांनी स्पष्ट केले आहे की, मी धर्मप्रसार करतो म्हणजे काय करतो? जे प्रभूने सांगितलंय ते सांगतो की, शत्रूवर प्रेम करा, सगळ्यांना सामावून घ्या. गोरगरीबांना कवेत घ्या. याच्यात कोणाला धर्मप्रचार वाटत असेल, तर माझा नाईलाज आहे, पण असा विरोध करणे चुकीचं आहे. आपण साहित्याबाबत नेहमीच व्यासोच्छिष्ट म्हणतो. जगात महाभारत आणि रामायण लिहून झाल्यानंतर काहीच लिहिलं गेलं नाही. फक्त त्याच विचारांचा प्रसार-प्रचार जगभर झाला आहे. कोणत्याही धर्मातील, भाषेतील, प्रांतातील साहित्य हे या दोन भोवतीच फिरते. मग फादरना विरोध करायचे कारण काय? आपलं साहित्य कधी सुरू झालं? रामायण - महाभारत लिहिलं, तेव्हा सुरू झालं. भगवद्गीता लिहिली गेली, तेव्हा सुरू झालं. बायबल लिहीलं गेलं, तेव्हा साहित्याला सुरुवात झाली. संतांचं साहित्य हे साहित्य नाही का? तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वरी, दासबोध साहित्य नाही का? तो एक प्रांत आहे. मग केवळ अन्य धर्मांतील आहे म्हणून अध्यक्षाला आणि साहित्य संमेलनाला विरोध करणे चुकीचे आहे. साहित्याला धर्म नसतो. साहित्याचा धर्म हा साहित्यधर्म असतो. अशा धर्माची अ‍ॅलर्जी का?असा विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार आहे. या विचारानं सोशल मीडिया आणि माध्यमंही थोड्या प्रमाणात एकसुरी होत आहेत, पण फादर दिब्रिटो यांना नीट समजून घेतले पाहिजे. आणीबाणीदरम्यान त्यांनी एक भूमिका घेत साधनामध्ये लिहिलं होतं. लोकांनी बोलायला हवं. साहित्यिकांनी न भिता बोलावं. हे जागृत साहित्यिकाचं लक्षण आहे.साहित्य संमेलन म्हणजे चांगली व्याख्याने, चर्चासत्रे, कवी संमेलने, पण आज फक्त वाद दिसतात. आम्ही आमच्या चांगल्या प्रथेवर पाणी फिरवत आहोत का? आम्हाला चांगले चांगले वक्ते ऐकायची सवय होती. ते गेले कुठे? त्यांना घालवलं कोणी? हे भीतीतून झालेलं आहे. चांगल्या विचारांवर बंदी का? लोकांनी बोलले पाहिजे. त्यांचे विचार ऐकले पाहिजेत. फादरनाही ऐकायला काय हरकत आहे? खरं तर वाद जर बौद्धिक असतील, तर त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. मतमतांतरं असतात. अशा वादाला न घाबरता त्याचं स्वागत करायचं, पण अशा प्रकारचा वाद हा निर्माण करण्यात आलेला आहे. त्यांनी त्यांचं मत लोकशाही मार्गाने मांडावं. वादाला धार्मिक आणि जातीय स्वरूप न येता ते वैचारिक असलं पाहिजे. ज्या संमेलनावरून सीमावादावर मंथन झाले. तिथे आपण धर्मवादावर येते आहोत, हे चुकीचे आहे. आपले सगळे वाद  आपण लोकशाही मार्गाने सोडवायला हवेत. भारतीय घटनेचं उल्लंघन करू नये. संविधानाने आपल्याला खूप स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण आमने-सामने वाद न करता व्यासपीठावर येऊन वाद न घालता ते लांबून-दुरून केले जातात. सोशल मीडियावरून केले जातात, हे चुकीचे आहे.सोशल मीडियावरच्या पोस्टद्वारे अनेकांनी फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या 'धर्मगुरू' असण्यावर आक्षेप घेतला. ते आहेत धर्मगुरू. त्यांनीही ते कधीही नाकारलेलं नाही. ते स्वीकारलेलं आहे. त्या पदाच्या अडचणीही त्यांनी स्वीकारलेल्या आहेत, पण धर्मगुरूने चर्चच्या कम्पाऊंडमध्ये राहता कामा नये, अशी त्यांची भूमिका आहे. लोकांच्या सुख-दु:खाच्या प्रश्नांशी आमचं नातं आहे. इतर धर्मांमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. डबक्यामध्ये राहू नका. बाहेर पडा. तुमचं व्यक्तिमत्त्व विकसित होईल. असा सिद्धांत मांडणारे ते एक अभ्यासक आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. फादर दिब्रिटोंची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महामंडळाच्या कार्यालयात धमक्यांचे फोन आले, पण यामुळे ते खचून गेले नाहीत. गुरुवारीही ना. धो. महानोरांना यावरून धमकी आली होती, पण त्याला कोणीही भीक घातली नाही.साधारणपणे गेली तीस-चाळीस वर्षे फादर दिब्रेटो हे पर्यावरणाचा लढा देत आहेत. तेव्हाही त्यांना धमक्या आल्या होत्या, पण ते मुळात अहिंसावादी आहेत. त्यांची अशी धारणा आहे की, प्रभूने सांगितलंय की, एका गालावर कोणी मारलं, तर दुसरा गाल पुढे करा. फादर यांनी ज्ञानोबा, तुकोबांच्या संतसाहित्याचा प्रचंड अभ्यास केलेला आहे. फक्त ख्रिस्ती साहित्य आणि धर्म याचा अभ्यास केलेला नाही. त्यांच्या विचारांवर आणि लेखनावर ज्ञानेश्वर, तुकाराम यांचा मोठा प्रभाव असल्याचं दिब्रिटो सांगतात. ते अभिमानाने सांगतात की, ‘मी घरी बायबल शिकलो आणि शाळेत माझी ज्ञानोबा, तुकोबा, जनाबाई यांच्याशी ओळख झाली. मला त्यांचा लळा लागला. तुकोबा जे सांगतात तेच येशू सांगतो. फक्त त्यांची पद्धत निराळी आहे. मी पुण्याला वारीतही काही वेळ घालवलेला आहे. मला वारीविषयी प्रचंड आकर्षण आहे. मी एम.ए. साठी ज्ञानेश्वर अभ्यासले. त्यांनी सांगितलेली स्थितप्रज्ञतेची लक्षणे मी चिंतनासाठी घेतो, प्रवचनातून सांगतो. ही शिकवण मला अचंबित करते. त्यामुळे अशा अभ्यासू साहित्यिकाला विरोध करणे कितपत योग्य आहे? साहित्याला जात, धर्म कधीच नसतो. साहित्याचा संबंध हा सृजनशिलतेशी असतो. कलेशी आहे. आपण रफींच्या तोंडून भक्तिगीते ऐकतो, रेहमानच्या संगीताने मंत्रमुग्ध होतो. लता मंगेशकरांच्या आवाजाने स्वर्गीय सुख मिळते, तसेच साहित्याचे असते. म्हणूनच केवळ फादर आहेत म्हणून विरोध करणे चुकीचे आहे. ही आपल्या संतांचीही शिकवण नाही. साहित्याला ते अभिप्रेत नाही. मन मोठं केलं पाहिजे. साहित्य संमेलन हे विचारांचे व्यासपीठ बनलं पाहिजे. कोण हिंदू, कोण मुसलमान, कोण ख्रिस्ती याला महत्त्व नाही. आपण प्रथम भारतीय आहोत. भारतीयच राहू.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: