शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

हळदीकुंकू आणि लुटालूट



रेल्वे स्टेशनच्या दिशेने महिलांचे लोंढे अतिशय उत्साहाने येत होते. म्हणजे या त्याच रोजच्याच महिला होत्या, ज्या लोकलमधून रांगेत लटकत प्रवास करत आॅफीस गाठत होत्या, पण आज त्यांच्यातला उत्साह वाखाणण्यासारखा होता, कारण बुधवारी संक्रांतीचा दिवस होता. संक्रांत हा पारंपारिक सण असला, तरी तो शहरात आपल्या जीवनशैलीशी जुळवून घेत साजरा केला जात होता. त्यासाठी या सगळ्या लोकलमधून प्रवास करणाºया रोजच्या डब्यातल्या महिला होत्या. प्रत्येकीने त्यादिवशी काळ्या रंगाची साडी नेसली होती. दागिने घातले होते. हातात बांगड्या घातल्या होत्या आणि नटून थटून आल्या होत्या. रोज ड्रेसमध्ये किंवा जीन्समध्ये वावरणाºया या महिला तेव्हा मात्र साडी परिधान करून आपल्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी लोकलच्या गर्दीत घुसत होत्या. तसं बहुतेकींनी लेट येणार असल्याचे किंवा हाफ डे चा अर्ज टाकून रोजच्या लोकलची वेळ टाळून गर्दी कमी असलेल्या दुपारच्या वेळी त्या जमा झाल्या होत्या.प्लॅटफॉर्मवर लोकल येताच सगळ्या जणी लगबगीने पुढे आल्या आणि डब्यात बसल्या. दुपारची वेळ असल्यामुळे सहज गाडीत शिरताही आले आणि सर्वांना जागाही मिळाली. मग सर्वात प्रथम एका महिलेने आपल्या बॅगमधून कुंकवाचा करंडा काढला आणि लोकलच्या सीटला, दरवाजाला लावला. तिथे तिळाची वडी ठेवली आणि लोकलला नमस्कार केला. ‘‘तीळगूळ घे, गोड बोल... म्हणजे या डब्यात बसणाºया सगळ्या महिलांना गोड बोलता येईल अशी सेवा दे, तू आमच्या जीवनाचा एक भाग असल्यामुळे सगळ्यात पहिला हळदीकुंकवाचा मान तुला गं बाई..’’ असं म्हणून लोकलच्या त्या महिला डब्याला नमस्कार केला. त्यानंतर सगळ्या महिलांनी लोकलला नमस्कार केला आणि आपली लोकलबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
मग बराच वेळ एकमेकींच्या साड्यांबाबत चर्चा झाली. काय छान साडी आहे गं? बांबू सिल्क दिसते. कुणाची कांजीवरम, कुणाची आणखी कसली, पण प्रत्येकीने कटाक्षाने काळी साडी नेसली होती. म्हणजे कसलाही निषेधाचा दिवस नसताना काळी वस्त्र घालण्याचा परवाना असलेलाच हा सण. आज नेहमीचा डबा अत्यंत उत्साहाने सळसळत होता. मग एकेकीने ओळीने प्रत्येकीला कुंकू लावलं, तिळाचा लाडू, हलवा दिला. त्याशिवाय काही छोट्या वस्तू एकमेकींना गीफ्ट म्हणून दिल्या.याला गिफ्ट म्हणायचं नाही हं... त्यातल्या त्यात वरिष्ठ असलेल्या बार्इंनी आपल्या संस्कृतीचा गोडवा गाण्यास सुरुवात केली. ‘‘अगं किती छान वाटतंय म्हणून सांगू? आमच्या लहानपणी असे कुणी गिफ्ट दिले ना की खूप आनंद व्हायचा. म्हणजे लग्नाच्या अगोदर संक्रांतीच्या हळदीकुंकवाला कोण काय देणार याची उत्सुकताच लागलेली असायची. पण या गिफ्टला गिफ्ट नाही म्हणायचं तर लुटायला काय आणलं असं विचारायचे. आनंद लुटण्यासाठी हा सण असतो ना. दुसºयाला काहीतरी देण्यात आणि कुणाकडून काही मिळण्यात खरंच किती आनंद असतो. इथं काय दिलंय याला महत्त्व नाही, पण दिलंय याला महत्त्व असतं. ते दिलेलं पदरात घेताना होणारा आनंद आणि चेहºयावर दिसणारा आनंद हाच महत्त्वाचा असतो. आज तोच मला इथे मिळाला आहे.’’
तिचे बोलणे ऐकून नवीन लग्न झालेल्या प्राचीने बोलायला सुरुवात केली. ‘‘मला तर सासुबार्इंची सारखी बोलावणी येत होती. संक्रांतीच्या सणाला गावी ये, पण रजा नाही ना.. आणि किती रजा घ्यायच्या यालाही मर्यादा आहेत. आपण काय रजेवर जाण्यासाठी कामावर येतो का? कामापेक्षा महिलांच्या रजाच जास्त होतात, म्हणून आधीच पुरुष कर्मचारी ओरडत असतात.’’‘‘अगं मग त्यांना पण आज आॅफीसला गेल्यावर तीळगूळ दे ना... म्हणजे गोड बोलतील’’ प्राचीच्या मैत्रिणीने सल्ला दिला तशा सगळ्या महिला जोरात हसल्या, पण तासभराच्या या प्रवासात त्यांनी छानपैकी हळदीकुंकू उरकून घेतले. एकमेकींना काही वस्तू वाटल्या, कुणी रुमाल दिले, कुणी नॅपकीन दिले, कुणी सेफ्टी पिना वाटल्या, तर कुणी कंगवे. एकीने चक्क पाण्याच्या बाटल्या वाटल्या होत्या. रोजच्या महिलांकडून अशा अनेक वस्तू प्रत्येकीला मिळाल्याने प्रत्येकीच्या पिशव्या फुगल्या होत्या. ते ओझं घेऊनच त्या आपल्या नियोजित स्टेशनवर उतरत होत्या, पण हे ओझं आनंदाचं ओझं होतं. हळदीकुंकू आणि लुटालुटीच्या सणाने ओसंडून वाहणारा आनंद पिशवीत घेऊन जात होत्या त्या.
वातावरणाशी, परिस्थितीशी जुळवून घेण्याचं शिक्षणच ही मुंबई देत असते. या मुंबईतील महिलांना हा इव्हेंट साजरा करण्यासाठी लोकलचा डबा आपला रोजचा प्रवासाचा डबा हे उत्तम साधन होतं. म्हणजे गावाकडं संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही हळदीकुंकू केलं जातं. एकमेकींच्या सवडीने तिळाचं वाण, तिळवण साजरा केला जातो, पण इथे वेळेची बचत आणि आनंदाची देवाण-घेवाण याची सांगड घालायची असते. शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस असले, तरी ते दिवस हळदीकुंकवासाठी वाया घालवणे शक्य होत नाही. सकाळी लवकर जायचे आणि रात्री उशिरा परत यायचे. मग कसले हळदीकुंकू करणार? शेजारीपाजारी तर जायला वेळच नाही. त्यापेक्षा रोजच्या प्रवासातल्या सहकारी महिलांनाच हळदीकुंकू देऊन सण साजरा करायचा. काळाप्रमाणं आपणही बदललं पाहिजे ना? त्यामुळेच सगळ्यांनी मिळून हे हळदीकुंकू या लाइफलाइनमध्ये साजरे केले. विशेष म्हणजे प्रत्येकीने काही ना काही तरी खायलाही आणले होते. कुणी गुळाच्या पोळ्या, कुणी खिचडीचे पॅकेट्स, कुणी नारियल पाण्याच्या श्री जलचे पॅकेट, तर कुणी सोलकढीचे पॅकेट आणले होते. सगळ्या जणींनी आनंदाने संक्रांत साजरी केली.गावाकडं सुगडी, बोळकी आणून त्यात वाणवशाचे पदार्थ भरले जातात. नवी आलेली धान्य, ऊस, गाजर, हरभºयाचे घाटे असे बरेच काही टाकून ते बोळके भरले जाते. बºयाच वेळा ते वाया जाते. गहू, भाज्याचे तुकडे आणि त्यात चिकट झालेला तीळगुळाचा लाडू याने भरलेल्या त्या बोळक्याचा काय उपयोग होतो? त्यापेक्षा एकेकीने कुणी अर्धा अर्धा किलोचे गाजराचे पॅकेट, कुणी हरभºयाचे पॅकेट, कुणी उसाचे करवे, कुणी साखरेचे पॅकेट, कुणी छोट्या गुळाच्या ढेपा लुटून हे पदार्थ वाया जाणार नाहीत याची घेतलेली काळजी फार महत्त्वाची होती. सण आनंद देण्यासाठी असतात. तो आनंद लुटण्यासाठी या महिलांना लोकलचा आधार मिळाला होता. तेवढ्यात घोषणा झाली की, अगला स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अन् त्यातली एकजण पटकन म्हणाली, खरंच या बाईला हळदीकुंकू देण्याचे मात्र राहून गेले. रोज बिचारी न कंटाळता अगला स्टेशन अमुकतमुक सांगत असते. सगळ्या जणी यावर खो खो हसल्या आणि म्हणाल्या, अगं लोकलच्या डब्याला हळदीकुंकू वाहिले ते तिलाच लागले ना.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: