१९७० च्या अखेरच्या टप्प्यात आणि १९८० च्या दशकात तिने नायिका म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि चित्रपटसृष्टीत एक नवे युगच तिने निर्माण केले. म्हणजे जयश्री गडकर, आशा काळे आणि उषा चव्हाण या तिघी मराठी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालत असतानाच या तिघींना एकाचवेळी पर्याय देण्याचे काम तिने केले. या तिघींमधल्या मर्यादा ओळखून ती गॅप भरून काढण्याचे काम तिने केले. मराठीला एक हरहुन्नरी अभिनेत्री मिळाली. ती अभिनेत्री म्हणजे रंजना. नाव रंजना किंवा रंजना देशमुख असलेली ही अभिनेत्री खºया अर्थाने मनोरंजनासाठी जन्माला आली होती. त्यामुळे ती रंजना नसून मनो‘रंजना’ होती.मराठी चित्रपटात विनोद हा फक्त पुरुष कलाकारांनीच करायची प्रथा असताना एक उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री म्हणून रंजनाने नावलौकीक मिळवला. या विनोदी भूमिका करताना अनेकवेळा तिच्याबरोबर अशोक सराफ हा नायक म्हणून होता. त्यावेळी दोघांची जुगलबंदी प्रेक्षकांना पहायला मिळायची. त्यामुळे हाऊसफुल चित्रपटगृहात रंजनाचे नाव सोनेरी अक्षरांनी लिहिले जात होते. तो काळ राजा गोसावी, अशोक सराफ, दादा कोंडके यांच्या विनोदाने गाजत असताना विनोदाची राणी म्हणून ओळख मिळवत रंजनाने ‘गोंधळात गोंधळ’, ‘सासू वरचढ जावई’, ‘बिनकामाचा नवरा’ अशा चित्रपटांतून विनोदाचे टायमिंग साधले आणि मराठी चित्रपटसृष्टीला आश्चर्याचा धक्का दिला.म्हणजे एकीकडे सोशिक, सोज्वळ अभिनेत्री चित्रपटात रडत असताना रंजना सर्वांना हसवण्यात मग्न होती. सुलोचना, जयश्री गडकर, आशा काळे, उमा भेंडे या अभिनेत्रींनी सोशिकपणाचा कळस केला होता. हंसा वाडकर, उषा चव्हाण, लीला गांधी, उषा नाईक, माया जाधव, लक्ष्मीछाया या चित्रपटातून तमाशाचा फड गाजवत होत्या. परंतु मराठी चित्रपटातील नायिका त्याही पलीकडची आहे हे रंजनाने दाखवून दिले, म्हणूनच तिचे वेगळेपण लक्षात राहते.केवळ विनोदीच भूमिका केल्या असे नाही, तर रंजनाने वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. रंजना रवींद्र महाजनी आणि रंजना अशोक सराफ या जोड्या प्रचंड गाजल्या. प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या. परंतु नायिका म्हणून रंजनाने राजा गोसावी, निळू फुले, कुलदीप पवार यांच्याबरोबरही कामे केली.राजा गोसावीचा तो निवृत्तीचा काळ किंवा चरित्र अभिनेता म्हणून उतारवयाचा काळ होता. त्या काळात रंजनाने असला ‘नवरा नको गं बाई’ या चित्रपटात त्याची नायिका म्हणून काम केलेले होते. थोडासा गूढ आणि गंभीर स्वरूपाची भूमिका असलेल्या या चित्रपटातही रंजनाने राजा गोसावी, शरद तळवलकर यांच्यासमोर आपली छाप पाडली होती. १९७० च्या दशकात हा चित्रपट गाजला होता. श्रीमंत घरातील मस्तवाल मुलीचे काम तिने केले होते. ती रंजना पाहिल्यावर रंजना विनोदी भूमिका करू शकेल असे कोणालाही वाटले नसते.गीतकार जगदीश खेबुडकर यांनी निर्माण केलेला एक चित्रपट म्हणजे ‘देवघर’. या चित्रपटात रंजना, रवींद्र महाजनी हे नायक-नायिकेच्या स्वरूपात आहेत. दोघेही डॉक्टर आहेत. त्यात अशोक सराफ हा खलनायक आहे. पद्मा चव्हाणची श्रीमंत घरातील लाडकी डॉक्टर मुलगी अशी नकारात्मक खाष्ट भूमिका या चित्रपटात रंजनाने केलेली होती. म्हणजे एक विनोदी अभिनेत्री हा नावलौकीक मिळवण्यापूर्वी किंवा गावंढळ अशा भूमिका करण्यापूर्वी तिची शहरी नायिकाही गाजली होती. हे तिच्या भूमिकेतील वैविध्य होते.रंजना म्हटल्यावर नऊवारी, कुंकू, नथ घातलेली अशी अस्सल मराठमोळी प्रतिमा समोर येत असली, तरी तिने सुशिक्षित अशा भूमिका साकारलेल्या आहेत. यामध्ये वकिलाची भूमिका तिने दोन वेळा केलेली आहे. अनंत मानेंच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटात रवींद्र महाजनीची नायिका असलेली आणि खलनायक असलेल्या निळू फुलेची बहीण अशी भूमिका करणारी रंजना इथे वकील म्हणून समोर येते. भाऊ आणि पती यांच्यात पतीचे वकीलपत्र घेऊन त्याला निर्दोष सोडवण्याचे सहज काम तिने केलेले पहायला मिळते, तर दुसºयांदा प्रकाश भेंडे, उमा भेंडे यांच्या गाजलेल्या ‘भालू’ या चित्रपटात ती दुसºयांदा वकील झाली आहे. त्यातही नाना पाटेकर, निळू फुलेंच्या विरोधात उभी राहून वकिली चातुर्य दाखवण्याचे काम तिने केलेले दिसते. या भूमिकेतही कुठे विनोदाचा लवलेश नव्हता. त्यामुळे रंजना ही विनोदी भूमिका करू शकते हे हा चित्रपट पाहिल्यावर कोणालाही खरे वाटले नसते, पण भूमिका समजून करण्याची तिची क्षमता अफाट असल्यामुळे तिने तशी प्रतिमा निर्माण केलेली होती.रंजनाच्या कारकिर्दीतील एक वेगळा आणि गाजलेला चित्रपट म्हणजे ‘सुशीला’. सत्यघटनेवर आधारित अशा या चित्रपटात अनंत माने यांनी त्यांची हुकमी नायिका, एका कडक शिस्तीच्या शिक्षिकेवर बलात्कार झाल्यामुळे तिचे आयुष्य बदलते आणि कोल्हापुरात येऊन चित्रपटाच्या तिकिटांचा काळा बाजार करणे, सिगारेट ओढणे अशा मवाली महिलेची भूमिका रंजनाने साकारून आपण अभिनयात कोणत्या थराला पोहोचू शकतो हे दाखवून त्या काळात प्रेक्षकांना थक्क केले होते. त्यामुळे सुरुवातीच्या तिच्या भूमिका या गंभीरच होत्या. त्यामुळेच तिच्यातील विनोदाचे टायमिंग प्रेक्षकांना समजायला थोडा वेळ लागला.याच सुमारास १९८० मध्ये हीच खरी दौलत मल्टिस्टारकास्ट चित्रपट आला होता. त्यात रंजना रवींद्र महाजनी, आशा काळे, यशवंत दत्त, अशोक सराफ, कामिनी भाटिया या जोड्या होत्याच, पण कथानक फिरत होते ते श्रीराम लागू आणि निळू फुले या दोन स्वातंत्र्य सैनिकांच्या घरांभोवती. त्यात स्वातंत्र्यसैनिकाने उभा केलेला हातमाग आणि यंत्रमाग उद्योग. त्यात रंजना खलनायिका म्हणून रवींद्र महाजनीची बायको आणि श्रीराम लागूची सून म्हणून येते. यात तिची कारस्थानं आणि खलप्रवृत्ती पाहून ही भविष्यात मोठी खलनायिका होणार असेच सर्वांना वाटले असावे, पण ती इमेज लवकरच तोडून कोणत्याही एका इमेजमध्ये अडकायचे नाही हे रंजनाने दाखवून दिले. ती संधी साधली त्याच वर्षी आलेल्या ‘दुनिया करी सलाम’ या चित्रपटातून. यात बेरोजगार असलेल्या रवींद्र महाजनी, अशोक सराफ आणि रमेश भाटकर यांच्यासमवेत भोंदुगिरी करून जनतेला गंडवणाºया टोळीतील नायिकेचे काम तिने केलेले आहे. ही बºयापैकी विनोदी ढंगाची भूमिका होती, पण तीन नायकांसमोर स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्याचे कौशल्य तिने पार पाडले होते.त्यानंतर बेलबॉटम, मॅक्सी, जीन्स आणि ड्रेसला तिलांजली देत तिने अस्सल मराठमोळ्या भूमिकांकडे लक्ष केंद्रित केले. नऊवारीतील खानदानी मराठी महिलेला तिने समोर आणले. यात सावकारी पाशात अडकलेल्या शेतकरी महिलेचा गाडा तिने ‘अरे संसार संसार’ या भूमिकेतून हाकला. बºयापैकी ‘मदर इंडिया’ या नर्गिसच्या चित्रपटाशी मिळतेजुळते कथानक असलेल्या या चित्रपटात लग्न होऊन घरात पदार्पण करणारी नववधू ते ७० वर्षांची म्हातारी अशा विविध भूमिका तिने साकारल्या. विशेष म्हणजे ऐन तिशीत तिने सादर केलेली म्हातारी लक्षणीय होती. अत्यंत करुण असा असलेला हा चित्रपट शोकांतिकाच होता. त्यात मराठी प्रेक्षकांना रडवण्याचे काम तिने काकणभर जास्तच केले. त्यामुळे या बाई कधीकाळी लोकांचे मनोरंजन करण्यासाठी विनोदी भूमिका करतील असे वाटलेही नव्हते.रंजनाला भूमिकेची लांबी, रूंदी महत्त्वाचे वाटलेच नव्हते कधी. समोर नायक कोण आहे याचाही तिच्याशी कधी संबंध नव्हता. मुळात जन्मापासूनच चित्रपटक्षेत्राशी निगडीत असल्यामुळे सततच त्या वातावरणात ती असायची. त्यामुळे ‘बहुरूपी’ या नायकप्रधान अशोक सराफच्या या चित्रपटात एका पतिता विधवेची भूमिका तिने केली होती. चेहºयावर हास्याची कुठेही स्मितरेषाही उमटवायची संधी नसलेला हा चित्रपट तिच्या वाट्याला आला होता, पण रंजनाने व्ही. के. नाईक यांच्या प्रॉडक्शनमध्ये कामाला सुरुवात केली आणि एकापाठोपाठ तिच्यातील विनोदी अभिनेत्री बहरत गेली. श्रीमंत बाबाची बिघडलेली हट्टी अशी डॅशिंग मुलगी म्हणून ‘गुपचूप गुपचूप’मध्ये तिने घातलेला धुडगूस बघण्यासारखा. एकाच वेळी अशोक सराफ, कुलदीप पवार यांना गंडवत आशालता आणि वडील श्रीराम लागू यांनाही शेंडी लावणारी खट्याळ भूमिका तिने जबरदस्त केली होती. यातील दुहेरी भूमिका असल्याचा भास निर्माण करताना तिने केलेली धावपळही अफलातून. कॉलेजमध्ये धोंड नावाच्या प्रोफेसरची भूमिका करणाºया अशोक सराफची फिरकी घेणारी आणि गायक असलेल्या कुलदीप पवारशी जवळीक साधणारी रंजना या चित्रपटात भरपूर वैविध्य दाखवते.तिच्या गावरान विनोदी भूमिकांमध्ये ‘बिनकामाचा नवरा’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘चंदनाची चोळी’, ‘सासू वरचढ जावई’ या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. ‘बिनकामाचा नवरा’मध्ये टोप्या घालणारा नवरा आणि त्याला पुरून उरणारी वस्ताद बायको पाहताना मजा येते. अशोक सराफ आणि रंजनाची इथे जुगलबंदी पहायला मिळते. तोच प्रकार ‘सासू वरचढ जावई’ या चित्रपटात असते. गंगू तेलीण म्हणजे पद्मा चव्हाण या खाष्ट बाईच्या मुलीची भूमिका करताना तिने आणि अशोक सराफने केलेली विनोदाची मिसळ एकदम जबरदस्त वाटते. खेडवळ अडाणी बाईबरोबरच तिने मुंबईत राहणारी अडाणी बाईही रंगवून विनोदाची धमाल केलेली होती. तो चित्रपट म्हणजे ‘गोंधळात गोंधळ’. व्ही. के. नाईक यांचा हा आणखी एक मल्टिस्टार चित्रपट. रवींद्र महाजनी, अशोक सराफ, संजय जोग, प्रिया तेंडुलकर, कविता किरण यांच्यासमवेत रंजना अशोक सराफची नायिका म्हणून या चित्रपटात येते. यात तिची मंगला आणि पँटवालं म्हणून हाक मारण्याची पद्धत खूप गाजली होती. अशोक सराफच्या तोडीस तोड विनोदी अभिनय तिने इथे केला होता.एकीकडे विनोदी आणि दुसरीकडे वेगळ्या अशा भूमिका करणारी रंजना डाकू बनून ‘जखमी वाघीण’ या चित्रपटातून येते. ‘भुजंग’मध्ये निळू फुले या भस्म्या रोग झालेल्या शापीत घरातील बाईची भूमिका तिने केली होती. कोणत्याही विशिष्ट भूमिकेत अडकून न पडता समोर आलेली भूमिका समजून करण्याचे कसब तिच्यात होते, म्हणून ती खºया अर्थाने मनोरंजनाची राणी ठरली. रंजना नाही तर मनो‘रंजना’ होती.
रविवार, ५ जानेवारी, २०२०
मनो‘रंजना’
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा