शनिवार, १८ जानेवारी, २०२०

नेमके किती विरोधक जन्माला घातले?

 
गेल्या चार दिवसांपासून चर्चेत आलेले एक नाव म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत. तसे ते गेली तीन महिने माध्यमांसमोर येत आहेत, पण या तीन दिवसांत त्यांनी किती विरोधक जन्माला घातले, याचा विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे अपुºया माहितीवर आणि चुकीचे संदर्भ देऊन आपले अज्ञानही अनेक ठिकाणी त्यांनी प्रकट केले आहे. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणूनही उद्धव ठाकरे काहीच बोलत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेना नेत्यांना मुख्यमंत्रीपद मिळवून देण्यात राऊत यांचा मोठा वाटा असल्याने ते गप्प बसत आहेत का? राऊत यांच्या भावाला मंत्रीपद न मिळाल्याने ते शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना डिवचत आहेत का? अशा अनेक प्रश्नांचा जन्मही संजय राऊत यांच्या मुलाखतीमुळे आणि त्यानंतरच्या वक्तव्यांमुळे होताना दिसत आहे.संजय राऊत यांना महाविकासआघाडीचे शिल्पकार असल्याचे म्हटले जाते. अशा परिस्थितीत या सरकारला धोका निर्माण होईल अशी कृत्ये करणे त्यांनी थांबवले पाहिजे. आघाडीतील तिसºया क्रमांकावरचा असला, तरी त्यांनी पाठिंबा काढला, तर हे सरकार कोसळू शकते. त्यामुळे काँग्रेसला दुखावतील अशी वक्तव्ये करू नयेत याचेही भान त्यांनी ठेवले नाही, याचे आश्चर्य वाटते. ते स्वत: मी संपादक, पत्रकार आहे, मी बोलणारच, असे म्हणत असले, तरी त्यांच्या तोंडून येणारी भाषा ही शिवसेनेची आहे, असे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे राऊत बोलले म्हणजे ते संजय उवाच नाही, तर ठाकरे यांच्या प्रेरणेने आहे, असाच अर्थ निघतो, म्हणून त्यांना आवर घातला पाहिजे. इंदिरा गांधी करीम लाला यांच्या संबंधाचा उल्लेख करून काँग्रेसला विरोध केला. काँग्रेसकडून त्यांचा निषेध झाला आणि आपले वाक्य परत घ्यावे लागले. दिलगिरी व्यक्त करावी लागली. त्यामुळे पुन्हा अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा शांत, संयमी अशा बाळासाहेब थोरात यांनीही दिला, म्हणजे महाशिवआघाडीतील एक घटक पक्षाला विरोधक म्हणून जन्म देण्याचे काम संजय राऊत यांनी केले. भाजपचे नेते हे विरोधक आहेतच, पण असे स्वकीय विरोधक निर्माण करणे हे सरकारच्या दृष्टीने धोक्याचे आहे, याचे भान संजय राऊत यांनी ठेवले पाहिजे. विशेष म्हणजे करीम लाला आणि इंदिरा गांधी भेट, त्या पायधुणीला येत होत्या हे राऊत यांचे म्हणणे अनेकांनी खोडून काढले आहे. अगदी ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांनीही हे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चुकीचे संदर्भ देऊन केवळ रंजन करण्याचा प्रयत्न केला होता का?
या मुलाखतीत केवळ काँग्रेसलाच नाही, तर अजित पवारांना स्टेफनी म्हणून संजय राऊत यांनी गौरविले (?) होते. त्यामुळे कधीही आपली मते व्यक्त न करणारे पवार कुटुंबीयांतील श्रीनिवास पवार यांनीही नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीलाही दुखावले. असे संजय राऊत किती विरोधक जन्माला घालत आहेत?सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संजय राऊत यांनी या मुलाखतीत आमचं आधीच ठरलं होतं, असं सांगत भाजपबरोबर निवडणूक लढवायची आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करायचे असे ठरल्याचे सांगितले. भाजप शब्द पाळणार नाही म्हणून निवडणुकीपर्यंत भाजपचा वापर करायचा आणि नंतर राष्ट्रवादीबरोबर जायचे शिवसेनेचे ठरले असल्याचा गौप्यस्फोट केला. हा तर फारच भयानक दावा होता, म्हणजे अप्रत्यक्षपणे शिवसेनेने भाजपला फसवले, गंडवले, पाठीत खंजीर खुपसला, यूज अँड थ्रो केले, असेच राऊत यांनी दाखवून दिले. यामुळे शिवसेनेला बदनाम करण्याचे काम संजय राऊत यांनी केले. शिवसेनेचा तो राजकीय डावपेच असला, तरी तो अशाप्रकारे जाहीर करणे म्हणजे पक्षाची गुप्तता भंग करण्याचे कामच संजय राऊत यांनी केले का? आपल्याच शिवसेनेच्या विरोधातली ही कृती नाही का? त्यामुळे शिवसेना अशी स्वार्थी निर्णय घेते, असा संदेश संजय राऊत यांनी पोहोचवला आहे. लबाडी केल्याचे संजय राऊत यांनी सांगून सेनेच्या निष्ठावंतांना विरोधात ढकलले आहे.
हे कमी की, काय त्यांनी या मुलाखतीचे पडसाद उमटल्यावर काँग्रेसच्या दबावाने इंदिरा गांधींविरोधात केलेले वक्तव्य मागे घेतले, पण महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या छत्रपतींच्या वंशजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर मात्र विधान मागे घेतले नाही, याचे आश्चर्य वाटते. यातून छत्रपती उदयनराजे यांचा नाही, तर साक्षात शिवछत्रपतींचा अवमान झाला होता, हे त्यांच्या का लक्षात आले नाही. त्यामुळे राज्यभर त्याचे पडसाद उमटलेच, पण त्यावर त्यांनी जी वक्तव्ये केली, पुन: पुन्हा मुलाखती देऊन त्यांनी चुकीचे संदर्भ दिले. गुरुवारी त्यांनी वंशज या विषयावर स्पष्टीकरण देताना राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले या शिवसेनेत होत्या, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती, असे वक्तव्य केले. छत्रपती कल्पनाराजे भोसले या शिवसेनेत १९९१ ला होत्या, पण त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही, तर श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. माध्यमांसमोर जाताना अचूक माहिती दिली पाहिजे, याचे भान संजय राऊत यांनी ठेवले नाही. तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना नवखे असल्यामुळे ही गोष्ट माहिती नव्हती, पण एखादा जाणकार पत्रकार त्या ठिकाणी असता तर त्याच ठिकाणी ही चूक विचारली असती, पण संजय राऊत यांचे नशीब चांगले म्हणून त्यांचे त्यावेळी माध्यमांपुढे पितळ उघडे पडले नाही.संजय राऊत यांनी आणखी एका अपुºया माहितीवर वक्तव्य केले. ते म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले पंतप्रधान मोदींना पेढेवाले मोदी म्हणाले होते, पण बातमी न वाचता, अपुºया माहितीवर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले होते. उदयनराजे भोसले नेमके काय म्हटले होते, हे त्यांना सांगावे लागेल. छत्रपती उदयनराजे म्हणाले होते, मी कोणा मोदींना ओळखत नाही, मी फक्त पेढेवाल्या मोदींना ओळखतो. सातारचे मोदी पेढे हे खूप प्रसिद्ध आहेत. बाळप्रसाद मोदी, तुळजाराम मोदी, अशोक मोदी ही त्यातील नावे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मी बाकी कोणाला ओळखत नाही, मला मोदी म्हणजे फक्त पेढेवाले मोदी माहिती आहेत, असे ते म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते पेढेवाले म्हणालेच नव्हते. त्यामुळे संजय राऊत यांनी भ्रम निर्माण करून जनतेला भडकवण्याचे काम करणे चुकीचे आहे. चुकीची माहिती आणि चुकीचे संदर्भ देऊन वादळ निर्माण करून त्यांनी अनेक विरोधक जन्माला घातले आहेत. हे त्यांनी थांबवले पाहिजे. उदयनराजे हे राष्ट्रवादीत असताना भाजपच्या विरोधात असताना त्यांनी ते वक्तव्य केले होते, त्याचा आत्ता काय संबंध? संजय राऊत यांनी, शिवसेनाप्रमुखांनी, उद्धव ठाकरे यांनीही विरोधात असताना काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या विरोधात वक्तव्ये केली होतीच की. शरद पवारांवर टीका केली जात होतीच ना? मग आता ते एकत्र आहेत तर ते जुने उकरून काढणार का? संदर्भहीन बोलणे राऊत यांना शोभत नाही, हे सांगावेसे वाटते.
संजय राऊत बोलतात की, मी संपादक आहे, पत्रकार आहे. मग त्यांनी समाजाच्या, जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. महाविकासआघाडीत बिघाडी निर्माण करून चालत्या गाडीला खिळ घालण्याचे प्रयत्न करू नयेत, हीच अपेक्षा आहे.हे पण चुकीचे वक्तव्यसंजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यात जे काही म्हटले, त्यात त्यांनी उदयनराजे हे भाजप नेते आहेत, भाजपचे माजी खासदार आहेत, असे म्हटले होते. भाजप नेते आहेत इतपत ठीक आहे, पण भाजपचे माजी खासदार आहेत, हे अगदी चुकीचे आहे. छत्रपती उदयनराजे तीन वेळा खासदार झाले. तीनही वेळा ते राष्ट्रवादीच्या तिकिटावरच निवडून आले आहेत. पहिल्यांदा २००९ ला, मग २०१४ आणि २०१९ ला, मात्र तीन महिन्यांत त्यांनी राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आणि भाजपमधून खासदारकीची निवडणूक लढवताना मात्र ते पराभूत झाले. त्यामुळे ते भाजपचे माजी खासदार नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: