गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

भोंगा



काही काही आवाज हे स्वत:ची ओळख निर्माण करणारे असतात, म्हणजे गायक-गायिकांचे आवाज असतात, तसेच यांत्रिक आवाजही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे असतात. यामध्ये काही तरी जाणीव करून देण्याची, कसला तरी सूचक इशारा देण्याची ती कृती असली, तरी त्या आवाजाला कोणतीही वेगळी भाषा लागत नाही. ते जगभर तसेच असतात. यामध्ये काही आवाज हे धडकी भरवणारेही असतात. ती का भरते माहिती नाही, पण गर्दीतून प्रवास करत असताना अचानक येणारा अ‍ॅम्ब्युलन्सचा आवाज, सगळ्या वाहनांची रस्ता मोकळा करून देण्याची चाललेली धडपड. यामध्ये आतल्या पेशंटला त्या आवाजाचा त्रास होत नाही का? असेलही कदाचित, पण ‘मी खूप आजारी आहे, मला तातडीची सेवा हवी आहे, माझी वाट सोडा’ असा आक्रोशच त्या अ‍ॅम्ब्युलन्सच्या आवाजातून होत असतो. अंगावर शहारा आणणारा तो आवाज असतो. आपल्या ओळखीचे, जवळचे तर या गाडीत नाही ना, अशी उगाचच चिंता लावणारा तो आवाज असतो. तसाच आणखी एक भयानक आवाज म्हणजे पोलिसांच्या वाहनाच्या सायरनचा. जो गोंगाट करत ती गाडी, तो ताफा येतो की, ऐकणाºयांच्या अंगाचे पाणी पाणी होते. कुठे तरी दरोडा पडला असावा, कुठे तरी काही तरी भयानक प्रकार घडला असावा अशी चिंता देणारा तो आवाज. याशिवाय आणखी एक धडकी भरवणारा आवाज म्हणजे अग्निशमन दलाच्या सायरनबरोबर घंटी वाजवत जाणारा आवाज. कुठे आग लागली? आपल्या घराजवळ तर नाही ना? अशी चिंता निर्माण करणारा आवाज. हे आवाज आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे रौद्र स्वरूपाचे आहेत. अशाच आवाजात एक कालबाह्य होत असलेला आणि काही अंशी झालेला आवाज म्हणजे भोंगा.भोंगा ही एक आपल्याकडची कामगार संस्कृती होती. भोंग्याचा कर्कश आवाजही छातीत धडकी भरवणाराच होता, पण कित्येक मैल दूरवर तो पोहोचायचा. गावाकडच्या निरव शांततेत तर खूप लांबवर तो ऐकायला यायचा. औद्योगिक वसाहती जशा आपला विस्तार करू लागल्या, तसा या भोंग्याचा पसारा वाढत होता, म्हणजे उद्योग-धंद्याचे विकेंद्रीकरण करण्यासाठी आणि मुंबईकडे येणारे लोंढे थांबवून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्यासाठी औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या. या एमआयडीसीतून असे भोंगे वाजू लागले आणि गावोगाव त्यांचा आवाज पोहोचला, म्हणजे पूर्वी गिरणगावात किंवा मुंबईतील कारखान्यांमधून हा भोंगा ऐकायला जायचा. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांवर हा भोंगा ऐकायला मिळायचा. पुण्यातही पूर्वी महापालिकेचा भोंगा वाजायचा. साडेदहा वाजले की, पुण्याच्या टिळक रोडवरून तो आवाज यायचा. तो संपूर्ण नारायण पेठ, नाना पेठ, सदाशिव पेठेत जागवून जायचा. रास्ता पेठेत एमएसईबीचाही भोंगा वाजायचा. औद्योगिक वसाहती असलेल्या ग्रामीण भागातून सकाळी ८, दुपारी १२, सायंकाळी ४ आणि रात्री ८ चा भोंगा हा हमखास वाजायचा. आज हा भोंगा अनेक ठिकाणी कालबाह्य झालेला आहे.कारखान्यात आता काम सुरू करा, असा आदेश देणाराच तो भोंगा असायचा. आता जेवणाची सुट्टी झाली, आता काम थांबवा, असा आदेश देणारा तो भोंगा असायचा. दोन भोंग्यांच्या मध्ये आपले सगळे आटोपले पाहिजे ही वेळेचे महत्त्व जाणवून देणारी भावना त्या भोंग्यांमध्ये असायची, पण हा भोंगा वाजला की, अनेक प्रकारच्या भावना त्यातून निर्माण व्हायच्या. औद्योगिक वसाहतीत काम करणाºया कामगाराची पत्नी त्या भोंग्यावरच आपले वेळापत्रक ठरवायची. सकाळची शिफ्ट आहे, आठच्या भोंग्याला पोहोचायचे आहे. घरातून तो साडेसातला तरी बाहेर पडला पाहिजे. त्याच्या आत डबा तयार करून त्याला द्यायचा आहे. डबा घेऊन पती बाहेर पडल्यावर जेव्हा आठचा भोंगा वाजायचा तेव्हा तिला समाधान वाटायचे. गेले वेळेवर कामावर. मग क्षणभर डोळे मिटून ती समाधानाने आपला संसार पाहायची. मग मुलांच्या शाळेची तयारी. ते झाल्यावर मग आवराआवर आणि सर्वात शेवटी स्वत:कडे लक्ष द्यायचे. मुलं साडेदहा-अकराला शाळेत गेली की, ती एकटीच घरात असायची. मग झाडलोट कर, आवराआवर कर, धुणं धू, निवडणं-टिपणं कर. सगळा स्वयंपाक तयार असला, तरी स्वत:च्या जेवणाची तिला घाई नसायची. मग बाराचा भोंगा झाला की तीला आनंद व्हायचा. दहा मिनिटे ती दरवाजाकडेच डोळे लावून बसायची. मग पुन्हा छोटा भोंगा वाजायचा. मग ती उठून जेवणाची तयारी करायची आणि स्वत:चे भोजन करायची. पहिला बाराचा भोंगा वाजला म्हणजे आपले पतीराज आता जेवणार. त्यानंतर दहा मिनिटांनी वाजलेला भोंगा म्हणजे जेवण झाल्याची जाणीव करून देणारा भोंगा असायचा. हा भोंगा म्हणजे जेवणानंतरचा आलेला ढेकरच असायचा. मग ती आनंदाने उठून स्वत: जेवायची. घरात एकटी आहे म्हणून कधीही जेवण करण्याचा तिचा स्वभाव नव्हताच. पती जेवल्याशिवाय, त्याची खात्री झाल्याशिवाय ती जेवायची नाही. ही संस्कृती या भोंग्यात होती.सगळं आयुष्य त्या भोंग्याशी जोडलं होतं. चारचा भोंगा वाजला म्हणजे आता थोड्या वेळात तो घरी येईल. आल्या आल्या हातात गरम चहा, पोहे, नाही तर काही तरी नाश्ता त्याला द्यायचा आहे, याची जाणीव होऊन ती कामाला लागायची. त्याचे हसतमुखाने स्वागत करायचे यासाठी तिचा आटापिटा असायचा. तिने बाहेरून आल्यावर हसतमुखाने स्वागत केले म्हणजे दिवसभराचा सगळा कामाचा शिणवटा त्याचा नाहीसा व्हायचा. त्यामुळे कामगाराच्या आयुष्यात हा भोंगा अत्यंत महत्त्वाचा होता. कारखानदारीत तो भोंगा म्हणजे कामगारांचा आवाज होता. आता हा कामगारांचाच आवाज अत्यंत क्षीण झालेला आहे. कामगारांचा आवाज जसा दडपला जाऊ लागला आहे, तसाच हा भोंगाही आता वाजेनासा झाला आहे. कामाची जाणीव करून देणारे आणि औद्योगिक वसाहतीचे वातावरण निर्माण करणारे जे घटक होते, त्यात भोंगा फार महत्त्वाचा होता. चिमणीतून सुटणारा धूर आणि भोंग्याचा आवाज आला म्हणजे ही कामगारांची वसाहत आहे, ही कारखानदारी आहे, हे सगळे वातावरण असायचे. छोटे छोटे पंधरा-वीस फुटी चकाचक डांबरी रस्ते, कडेला तारेचे कम्पाऊंड, त्याच्या कडेकडेने लांबवर बैठी घरे, घरापासून जवळच वाटावा, पण प्रत्यक्षात चार-पाच किलोमीटर अंतरावर असणारा कारखाना.मंदीच्या लाटेत, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणामुळे, परदेशी बाजारपेठांनी केलेल्या आक्रमणामुळे अनेक कारखाने बंद पडले. संप, ताळेबंदी, बंदीमुळे कारखाने बंद झाले. कामगार बेरोजगार झाले. कारखान्यांच्या जमिनींवर टॉवर उभे राहिले. औद्योगिक शहरे म्हणून ओळख असलेली शहरे ही वसाहतींची शहरे झाली. अनेक इस्टेट या औद्योगिक इस्टेट म्हणून ओळखल्या जात होत्या. त्या इस्टेटवर आता टॉवर आले आणि भोंगे बंद झाले. भोंगे बंद करून कामगारांचा आवाजच बंद झालेला आहे. सगळीकडे तीच परिस्थिती आहे. कामगारांची मुले रोजगारासाठी वणवण हिंडत आहेत. आता त्यांच्या मनाचा आक्रोशही कोणाला ऐकू येत नाही. हा मूक आक्रोश हजारो भोंग्यांपेक्षा जास्त आहे, पण तो सरकारपुढे, व्यवस्थेपुढे पोहोचत नाही. भोंगे बंद झाले, कामगारांची तोंडे बंद झाली. आता कंत्राटी कामगार. उद्या कामावर राहू याची कोणाला शाश्वती नाही. त्यामुळे भोंग्यांच्या तालावर चालणारे कामही आता आऊट आॅफ डेट झाल्याचे दिसते, पण हा भोंगा म्हणजे कामगारांना प्रेरणा, ऊर्जा देणारा आणि चैतन्य निर्माण करणारा आवाज होता. धडकी भरणारा असा कर्कश आवाज होता. कामावर जाताना ‘घाई करा, घाई करा’ असे म्हणायचा, तर कामावरून सुटताना ‘आता घरी जाऊन आराम करा’ म्हणायचा. तो आवाज आता ऐकायलाच येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: