मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

युद्धाची झळ भारताला

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे जर युद्ध झालेच, तर याचा सर्वाधिक फटका भारताला बसेल असे दिसते. हे युद्ध झालेच तर अमेरिकेच्या भूमीवर असणार नाही. इराणला फक्त अमेरिकेचे हल्ले परतवावे लागतील. अमेरिकेचे नुकसान करणे शक्य होणार नाही. अमेरिका मित्र राष्ट्रांच्या सैन्याच्या मदतीने हे युद्ध करणार आहे, त्यामुळे अमेरिकेचे थेट नुकसान काहीच होत नाही, परंतु भारतासारख्या विकसनशील आणि महासत्तेचे स्वप्न पाहणाºया देशाला मात्र याचा सर्वाधिक फटका बसेल. त्यामुळे या संभाव्य युद्धात भारत काय भूमिका घेणार हे फार महत्त्वाचे असणार आहे. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष काहीही करून सर्वात जास्त त्रास हा आपल्या देशाला होण्याचीच शक्यता याठिकाणी दिसते आहे. कारण अमेरिकेत ज्या प्रमाणात भारतीय आहेत, त्याहीपेक्षा जास्त या आखाती प्रदेशातही आपला नोकरदार आहे. त्यांना परत आणण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल.
इराकमध्ये इराणचे अमेरिका विरोधी गनिमी सैनिक कार्यरत असल्यामुळे अमेरिकेने बगदादमधील इराकच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोनचा हल्ला करून, इराण रिव्होल्यूशनरी गार्ड कोअरमधील कुद फोर्स या अतिजहाल गनिमी शाखेचा सर्वेसर्वा लेफ्टनन्ट जनरल कासीम सुलेमानी आणि इराकी संघटना कताईब हेझबुल्लाच्या अबु महदी अल मुहंदीस व मोहम्मद रेधा अल जबरी या नेत्यांसह सात लोकांना ड्रोनच्या अचूक फायरिंगने कंठस्नान घातले. जागतिक संरक्षणतज्ज्ञांनी याला टार्गेटेड किलिंग म्हणून संबोधले. अमेरिकेने हे काही पहिल्यांदाच केले असे नाही. ते त्यांचे कायमच धोरण असते. त्यामुळे मोठ्या युद्धाला तोंड फुटते. यापूर्वी १९४१ मध्ये एका जपानी अ‍ॅडमिरलची हत्या केल्यानंतर जवळपास ८० वर्षांनंतर अमेरिकेने पहिल्यांदा एका कार्यरत अतिवरिष्ठ सैनिकी अधिकाºयाला लक्ष्य करून त्याची हत्या केली आहे. त्यामुळे संपूर्ण जग हे महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर इराणने तात्काळ इस्माईल कानी यांना कुद फोर्सचा कमांडर म्हणून नियुक्त केले आहे. सुलेमानीच्या हत्येनंतर इराणमध्ये आधी धक्का, मग चीड आणि सरते शेवटी अमेरिकेबद्दल तिरस्कार व बदल्याची ज्वलंत भावना निर्माण झाली. राष्ट्रपतींपासून सेनाध्यक्षांपर्यंत सर्वांनी अमेरिकेला कठोर उत्तर देऊ असा इशारा दिला, तसेच अमेरिकेच्या इराकमधील हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला करून पुढील भूमिकेची चुणूकही दिली. त्यामुळे आगामी काळ हा अशाच कुरापती आणि धुसफुशीचा राहील यात शंकाच नाही. सुलेमानीच्या हत्येमुळे इराणमधील जनता इराण सरकार व आर्मीमागे ठामपणे उभी ठाकली. याच कारवाईबरोबर अमेरिकन जहाजांनी इस्लामिक स्टेट आर्मीशी लढ्यात सक्रिय मदत करणाºया कताईब हेझबुल्लावर हल्ला केला. आयआरजीसीच्या कुद फोर्सनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे इराकच्या सरकारी सेनेने इस्लामिक स्टेट आर्मीला इराकमधून हुसकावून लावले होते.
इराणजवळ अमेरिकेसारखे अतिशय लांबवर जाऊन शत्रूचा मारा करणारे, अत्याधुनिक ड्रोन्स नसले, तरी त्यांच्या गुप्तचर शाखेत आणि सैन्यामध्ये प्रशिक्षित स्नायपर्स, स्फोटतज्ज्ञांची कमतरता नाही. त्यामुळे अमेरिकी जनरल्स, राष्ट्रपती किंवा इतर लोकांना आपल्या मर्जीनुसार मारणे हा इराणी जिहाद्यांच्या डाव्या हातचा मळ आहे. इराण हा इराक आणि लिबीयाप्रमाणे सामुग्रीबाबत कमकुवत नसल्यामुळे त्याच्याशी सर्वंकष युद्ध अमेरिका व दोस्त राष्ट्रांसाठी अतिशय महागडे ठरेल. त्याचा परिणाम आशियाई देशांवर विशेषत: भारतावर मोठा होईल हे लक्षात घेतले पाहिजे.याबाबत अनेक मुद्दे उपस्थित होतात. ते म्हणजे, या घटनेनंतर तेहरान या घटनेची कशी मीमांसा करतो, त्याला कोणते पर्याय उपलब्ध आहेत, त्याची आंतरिक-बाह्य राजकीय, आर्थिक संकटांना तोंड देण्याची शक्ती यावर बदल्याची तीव्रता अवलंबून राहील. जर बदला यथायोग्य घ्यायचा असेल, तर या क्षेत्रातील अमेरिकन जागर, आखातामधील अमेरिकी लष्करी तळ तसेच बहरीनस्थित अमेरिकन फिफ्थ फ्लिट यांच्यावर इराणची गाज कोसळू शकते. अर्थात उघडपणे इराण हा पर्याय अवलंबणार नाही, कारण यावरील तीव्र अमेरिकन प्रतिसादामुळे इराणच्या लष्करी क्षमता व साधनसामुग्री पूर्णत: नष्ट होतील.
याशिवाय अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांना तेहरान नेहमी सारखा धक्के लगावत राहील. इराणने छोटे तीव्र हल्ले करून, अमेरिका व मित्रराष्ट्रांची मोठी हानी करेल आणि त्याचा मोठा प्रचार करून आपली प्रतिमा इराण जगात उज्ज्वल करेल. आज इराण बदला घेण्यासाठी योग्य त्या वेळ काळाची प्रतीक्षा करेल असे असले, तरी तो बदला अटळ आहे. त्यामुळेच आज संपूर्ण जग तिसºया महायुद्धाच्या सावटाखाली असण्याची भीती आहे. अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेच्या वरिष्ठ सैनिकी अथवा नागरी अधिकाºयांची हत्या करून कासीम सुलेमानीचा बदला घेण्याचा प्रयत्न इराण करील.कासीम सुलेमानीच्या हत्येमुळे अमेरिका व इराणमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून, जग सध्या तिसºया महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभे ठाकले आहे. इराणला रशिया, चीन, येमन, इराक, लेबनान, अफगाणिस्तान तसेच युरेशियन व आफ्रिकन राष्ट्रांचा पाठिंबा आहे. अमेरिकेला ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, सौदी अरब, कुवेत, अरब अमिरात व नाटो देशांचा पाठिंबा आहे. भारताला आपली भूमिका संदिग्धच ठेवणे भाग आहे. इराणने युक्रेनचे विमान चुकून पाडल्याची कबुली दिल्यानंतर तणाव आणखी वाढला आहे.
या संभाव्य युद्धाचा भारताशी काय संबंध असेल हे पाहणेही तितकेच आवश्यक आहे. कारण आज भारताचे नागरिक असलेल्या २४ कोटी मुसलमानांपैकी ४८ टक्के शियापंथी मुसलमान असल्यामुळे अमेरिका इराण युद्ध झाल्यास भारतातील मुस्लिमांमध्ये शिया- सुन्नींची धार्मिक यादवी सुरू होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. या एयर स्ट्राइकनंतर अमेरिकेने पाकिस्तानला लष्करी प्रशिक्षण देण्याची तयारी केली आहे, ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. कारण या नंतरचे स्वाभाविक पाऊल, पाकिस्तानला अमेरिकेची आर्थिक व सामरिक मदत मिळण्याचेच असेल. अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्ये भारताचे आर्थिक व सामरिक संबंध गुंतलेले आहेत. इराणने जर या देशांविरुद्ध कारवाई करायचे ठरवले, तर या भारतीय नागरिकांना तेथून बाहेर काढण्याचे काम भारतीय वायुसेना व विमान कंपन्यांना करावे लागेल. तसेच या नागरिकांकडून येणारी ४५ अब्ज डॉलर्स विदेशी गंगाजळी आटून आपल्या विदेशी चलन साठ्यावर त्याचा अतिशय प्रतिकूल परिणाम होईल.हे युद्ध झाल्यास इराणकडून आपल्या मागणीच्या ६० टक्के होणारी खनिज तेलाची आयात पूर्णत: ठप्प पडून तेलाच्या किमती गगनाला भिडून भारतात महागाईचा भडका उडेल. कदाचित भारतीय रुपयाचे अवमूल्यनही करणे आपल्याला भाग पडून भारताची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल आणि हे युद्ध जर अणुयुद्धात अथवा तिसºया महायुद्धात परिवर्तीत झाले तर होणाºया रेडिएशन व अण्वस्त्र धुळीमुळे एकूणच भारतावर अतिशय प्रतिकूल परिणाम होईल. त्यामुळे अमेरिका इराण यांच्यातील तणावाचा फार मोठा फटका भारताला बसेल असे दिसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: