ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे

उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका - स्वामी विवेकानंदप्रत्येक माणसाला आपले ध्येय समजले पाहिजे. ते ध्येय निश्चित केले गेले पाहिजे. आपले नेमके ध्येय काय आहे, हे जेव्हा माणसाला समजत नाही, तेव्हा तो भरकटत राहतो. यासाठी संपूर्ण जगाला सर्वात महत्त्वाची शिकवण देण्याचे काम स्वामी विवेकानंदांनी केले. धर्म म्हणजे नेमके काय हे खºया अर्थाने स्वामी विवेकानंदांना समजले होते. भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी जे अर्जुनाला कर्म, कर्मयोग, स्थितप्रज्ञता याबाबत ज्ञान दिले होते, ते सर्वस्वी स्वामी विवेकानंदांच्या अंगात होते. त्यामुळे सध्या या देशात धर्मांतर, घरवापसी, एनआरसी यावरून जो हैदोस चालला आहे, त्या परिस्थितीत स्वामी विवेकानंदांचे विचार आणि शिकवण या देशाला मार्गदर्शक ठरणार आहे.
स्वामी विवेकानंद हे भारताचे थोर संत व नेते होते. ते थोर तत्त्ववेत्ते आणि काळाच्या पुढे पाहणारे असे व्यक्तिमत्त्व होते. विवेकानंदांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. रामकृष्ण परमहंस यांचे विवेकानंद हे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. या मिशनच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन, सभ्य संस्कृती, मर्यादा, अभ्यास याचे चांगले शिक्षण आणि संस्कार केले जातात.आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे म्हणून केवळ त्यांचे स्मरण करायचे हे अत्यंत चुकीचे आहे. स्वामी विवेकानंदांना, त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला, तर विश्वबंधुत्वाचा प्रसार आपोआप होईल. धर्म-जात यात अडकलेले राजकारण बाहेर पडेल आणि हा देश एका नव्या विचाराने प्रभावित होईल.
कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३ ला विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र असे ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्ता उच्च न्यायालयात (वकील) अॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबींत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथांच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा मोलाचा वाटा होता. हे इथे सांगण्याचे कारण म्हणजे उत्तम विचारांचे आई-वडील हेच आपले अपत्य चांगल्या प्रकारे घडवू शकतात. आपण अनेक गुन्हेगार, कुमार्गी माणसे या जगात पाहतो. याचे कारण त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले नसतात. त्यांच्या भोवतीचे वातावरण तसे असते, म्हणून स्वच्छ वातावरण निर्माण करणे हे या देशापुढचे फार मोठे आव्हान आहे.स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्रनाथांना दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदी धार्मिक साहित्यात त्यांनी विशेष आवड दाखवली. विवेकानंदांना शास्त्रीय संगीताचीदेखील जाण होती. त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले.
निरोगी आरोग्य, व्यायाम याकडे विवेकानंदांचे विशेष लक्ष होते. तरुणांनी व्यायाम केला पाहिजे, निर्व्यसनी असले पाहिजे, असे विवेकानंदांना कायम वाटायचे. किशोरावस्थेपासूनच व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये विवेकानंद सक्रिय सहभाग घेत असत. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्यांनी लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. जातीव्यवस्था, भेदभावामुळे या देशात भिंती पडतील आणि हा देश दुभंगेल याची चिंता विवेकानंदांना होती. यासाठी कला, क्रीडा, व्यायाम आणि निरोगी राहण्याने चांगल्या विचारांची जडण-घडण होऊ शकते हे विवेकानंदांनी दाखवून दिले होते. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन याचे छंद होते.स्वामी विवेकानंदांनी म्हणजे नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. आपल्या शिक्षणाला सुरुवात शाळेपासून नाही, तर घरापासून होत असते, याची जाणीव त्यांना लहान वयात असताना झाली होती. त्यामुळे आपल्या पालकांसमवेत, कुटुंबीयांसमवेत असलेले बालपणीचे जीवन ही एक फार मोठी शाळा आहे, हे त्यांनी दाखवून दिले होते. ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. कोणत्याही निष्कर्षापर्यंत येण्यापूर्वी त्या गोष्टीचा सखोल अभ्यास केला पाहिजे, हे विवेकानंदांचे विचार होते. आज या गुणाची गरज आहे. अभ्यास न करता बोलणारे राजकारणी, त्यांचे अनुयायी, त्यांचे भक्त, त्यांचे कार्यकर्ते केवळ अफवांवरून देश वेठीस धरतात. अमूक एका चित्रपटात तमूक एकाचा अवमान केला आहे, असे कोणी तरी सोशल मीडियावर टाकतो आणि लगेच तो चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच दंगा सुरू होतो. चित्रपट न पाहताच कसा काय विरोध केला जाऊ शकतो? हा अभ्यासाचा अभाव असतो. अभ्यास करणे, तो अनुभवणे आणि त्याचे सिद्धांतात रूपांतर करणे ही खरी अध्ययनाची पद्धती आहे. ती विवेकानंदांनी अवलंबली होती. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कांट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, आॅगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन या विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतीवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या द एज्युकेशन या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ ते स्पेन्सर यांच्या संपर्कातही होते. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढा अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले, त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हसी यांनी विवेकानंदांबद्दल म्हटले होते की, नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले, परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही. त्यांना श्रुतिधारा (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल, असे मला वाटले नव्हते, असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.राजा अजितसिंग खेत्री यांनी १० मे १८९३ या दिवशी स्वामीजींना विवेकानंद असे नाव दिले. ११ सप्टेंबर १८९३ ला अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्युट येथे सर्व धर्मीय परिषद भरली होती. सुरुवातीस थोडे नर्व्हस असूनदेखील त्यांनी अमेरिकेतील ‘माझ्या बंधू आणि भगिनींनो...’ अशी भाषणास सुरुवात केली आणि सात हजारांच्या जमावाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. हा कडकडाट दोन मिनिटे अखंड चालू होता. ‘जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाºया संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो’ या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना वेदांतावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी असे केले. न्यूयॉर्क क्रिटिकने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की, ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच, परंतु त्यांचे धीरगंभीर उद्गारदेखील त्यांच्या भगव्या वस्त्रात शोभून दिसणाºया तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत. वेदांत आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर, तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदांत सोसायटी स्थापली. भारत हा जगाचा आध्यात्मिक गुरू आहे, हे त्यांनी त्या काळात पुन्हा सिद्ध करून दाखवले होते.
स्वामीजी हिंदू तत्त्वज्ञानाच्या वेदांत शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्यशंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान सांगितले होते. त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच शिवभावे जीवसेवा हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले. अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे, अशी स्वामी विवेकानंदांची शिकवण होती.कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ती मिळवली पाहिजे. आपले ध्येय निश्चित करण्यासाठी माणसाने जागे झाले पाहिजे. त्यासाठी उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, असा संदेश स्वामींनी जगाला दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा