किती जणांना सामावून घेते ती लोकल? कुणी कामावर जाण्यासाठी, कुणी शिकायला जाण्यासाठी, कुणी नोकरीच्या शोधात इंटरव्ह्यू देण्यासाठी, कुणी व्यवसायाच्या जागी पोहोचण्यासाठी, तर कोणी फक्त फिरायला म्हणून या लोकलमधून प्रवास करत असतात. अखंड धावत असणारी ही मुंबईची लाइफलाइन रोजगारालाही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देताना दिसते, म्हणजे इथे लोकलमधून फिरणारे अधिकृत-अनधिकृत विक्रेते यांच्याशिवाय किती तरी बिझनेस लोकलमध्ये होत असतात.‘सर आपका डॉक्युमेंट रेडी करो, आपके खाते में पक्का लोन ट्रान्सफर होगा’, ‘जी आप इसमे इन्व्हेस्ट करेंगे तो आपको बहुत बेनिफिट होगा’, ‘हमारी बँक आपको क्रेडिट कार्ड आॅफर कर रहीं हैं, जीसका कोई चार्ज आपको नहीं पे करना हैं, बिल्कूल फ्री सर्व्हिस हैं’, ‘आप ट्रेडिंग करते हो? डीमॅट अकाऊंट हैं? इन्ट्राडे में इंटरेस्ट हैं?’ ‘या कंपनीच्या म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी केली, तर चांगले रिटर्न मिळतील आपल्याला’ असे सतत आपल्याला फोन येत असतात किंवा आपण लोकलमधून जाताना अनेकांची फोनवर बोलणी ऐकत असतो.हे लोक कुठून बोलत असतात याचा कोणालाही पत्ता नसतो. आम्ही तयार आहोत, तुमचे आॅफिस कुठे आहे? असे विचारले तर लगेच उत्तर येते, ‘आपको आने की जरुरत नहीं हैं सर, मेरा बंदा डॉक्युमेंट कलेक्ट करने आयेगा।’ ‘आपको मैं व्हॉट्सअॅप पर हाय करती हूँ, आप मुझे व्हॉट्सअॅप पे डॉक्युमेट सेंड करो।’ म्हणजे आपल्याला हा फोन येत असतो, पण तो कुठून येतो? ते कॉलसेंटर आहे का? ते नेमके कोणाचे आहे? ज्या बँकेने, कंपनीने सांगितले आहे, त्यांचा-यांचा खरेच संबंध आहे का? ज्या बँकांची नावे सांगून कर्जाची आॅफर दिली जाते, क्रेडिट कार्डची आॅफर दिली जाते किंवा कोणत्याही व्यवसायाची आॅफर दिली जाते, त्याचा थांगपत्ता लागू दिला जात नाही. फक्त फोनवरून डिलिंग केले जाते.काही कंपन्यांची चांगली कॉलसेंटर असतीलही, पण त्या कंपन्यांचे हे डॉकमॅन किंवा कागदपत्रे गोळा करणारे अहोरात्र लोकलमधून फिरत असतात. ‘कुठे स्टेशनवर डॉक्युमेंट द्या, आज दिली तर संध्याकाळच्या आत लॉगीन करतो’ असे सांगून तो बिचारा काकुळतीला येऊन दिवसाकाठी चार-पाच फायली जमा करतो आणि त्याच्या कार्यालयात पोहोच करतो. वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, ट्रान्सहार्बर अशा वेगवेगळ्या लाइनवरून प्रवास करून कार्यालयात फायली, कागदपत्रे पोहोचवायची. कार्यालयात त्याला आत यायलाही परवानगी नसते, बाहेरच घुटमळत असतो. कुठे खुर्चीही नसते. सिक्युरिटी गार्डच्या बाजूला उभा राहून फाइल सादर करतो. त्याचा फोन जमा करतो आणि घरी जातो. असे शेकडो तरुण मुंबईच्या लोकलमधून दिवसभर फिरत असतात. कारण त्यांना दुसरे कार्यालय नसते. त्यांचे व्यवसायाचे, नोकरीचे कार्यालय म्हणजे लोकलच झालेली असते.कॉलसेंटर किंवा कंपनीकडून एक फोनची यादी मिळते, त्या यादीवरील क्रमांकावर फोन करून पुन्हा माहिती द्यायची, पत्ता घ्यायचा आणि कागदपत्रांसाठी फिरत राहायचे. कर्ज मिळाले का नाही, गुंतवणूक झाली का, व्यवसाय सुरू झाला की नाही, याचा कसलाही संबंध या तरुणांशी नसतो. नंतर ते कोणाचा फोनही उचलत नाहीत. कागदपत्रे देणारा आपली कागदपत्रे नेमकी कुठे गेली या गोंधळात राहतो. त्यामुळे या कागदपत्रांचा कुठे दुरुपयोग होतो का? अशीही शंका अनेकांना येते.पण हे डॉकमन अक्षरश: लोकलमधून अखंड बडबड करत मिळेल त्या स्टेशनला उतरून कागदपत्रेगोळा करत असतात. तहान लागली, तिथेच पाणी प्यायचे, मिळेल तिथे वडापाव खायचा. स्टेशनवरच्या बाकड्यावर, पायºयांवर बसायचे किंवा गर्दी कमी असेल, तर गाडीत बसायचे. त्यांना कुठे खुर्ची नसते, टेबल नसते. त्यांचे कार्यालय रेल्वेचा डबा, प्लॅटफॉर्मच असते. आज फार मोठा बिझनेस रेल्वेच्या डब्यांमधून होताना दिसतो. मोठा रोजगार अशा तºहेने तरुणांना मिळत असतो. कोणतेही कार्यालय नसताना फक्त लोकलमधून फिरत्या विक्रेत्यांप्रमाणे कर्ज देणे, गुंतवणूक करणे, विमा उतरवणे, मेडिकल ट्रिटमेंट अशा अनेक सेवा देण्यासाठी बिझनेस करणारे अनेक लोक असतात. त्या सर्वांना केवळ एका मासिक पासाच्या मोबदल्यात ही मुंबईची लाइफलाइन आपल्यात सामावून घेत असते.मुंबईची लोकल ही फक्त प्रवासाचे साधन राहिलेली नाही, तर एक ट्रेड सेंटर बनताना दिसत आहे. कित्येक वेळा फोनवर डिलिंग लोकलमध्ये होत असते. त्यावेळी दोघेही लोकलमध्येच असतात. एकाच लोकलमध्ये परस्परांना फोन करून डिलिंग पूर्ण करतात. एकमेकांना पाहिलेलेही नसते, असेही व्यवहार होताना दिसतात. डिजीटल युगात, आॅनलाइन व्यवहारात मुंबई लोकलला ट्रेड सेंटरचे स्वरूप आलेले दिसत आहे, म्हणजे पूर्वी फक्त विक्रेते होते. सुया, पिना, कानातली, नाकातली, बांगड्या, कंगवे विकणाºयांपासून हेडफोन, चार्जर, बॅटरी, खेळणी, खाण्याचे पदार्थ, फळे असेच विकले जात होते. त्यावेळी लोकलची ती बाजारपेठ होती, पण आता त्या बाजारपेठेचा व्याप फार मोठे ट्रेड सेंटर इतका झालेला आहे. लोकलमधील बिझनेस हेही या लाइफलाइनचे वैशिष्ट्य आहे. फक्त हे व्यवसाय असुरक्षित आहेत. याला कुठे तरी अधिकृतपणा आला आणि तो करणाºयांना कुठे तरी पाठबळ मिळाले, तर त्यांच्यातील ऊर्जेचा चांगला वापर होऊ शकतो. टार्गेट पूर्ण करण्यासाठी वेस्टर्नवरून हार्बर, हार्बरवरून सेंट्रल असा प्रवास करणारे टार्गेट पूर्ण न झाल्याने अनेक वेळा वैफल्यग्रस्त झालेले दिसतात. संध्याकाळच्या वेळी असे अनेक तरुण चिडचीड करताना दिसतात. त्यामुळे अनेक जण व्यसनाधीन होतात. अशा शक्तीला संरक्षण देण्याचीही गरज आहे. त्यांच्यातील असुरक्षितता, अनिश्चितता संपवली पाहिजे. या व्यवसायाला कुठे तरी अधिष्ठान प्राप्त करता आले, तर यातून निर्माण होणारे दुरुपयोग, गुन्हेगारी, फसवाफसवी कमी होईल. महिला, प्रथम वर्ग, अपंग यांच्याप्रमाणे एक डबा वाढवून तो ट्रेड सेंटरचा करावा. त्याचे तिकीट जादा घ्यावे. प्लॅटफॉर्मवर असे काही बुथ बनवून त्याचे भाडे आकारले, तर मुंबई लोकलला अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होईल.
शुक्रवार, १० जानेवारी, २०२०
बिझनेस
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा