गिरणी कामगारांचे प्रश्न कधी सुटणार?

मुंबईतील गिरणी, गिरणगाव आणि गिरणी कामगार ही एक समृद्ध संस्कृती होती. भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख उद्योगात आणि सर्वाधिक रोजगार देणाºया उद्योगात या गिरणी कामगार आणि गिरण्यांची नोंद होती. गेल्या काही वर्षांत ही संस्कृतीही संपुष्टात आणली जात आहे आणि गिरणी कामगारांनाही देशोधडीला लावले जात आहे. सुंदर मुंबई, मराठी मुंबई असे आपण म्हणायचो, पण त्या मुंबईचे मराठीपण या गिरणी कामगारांनी जिवंत ठेवले होते. आज त्यांनाच मुंबईबाहेर काढले गेल्याने मुंबई मराठी माणसांची आहे का? असा प्रश्न पडतो. न्यायप्रविष्ठ असलेल्या बेळगांव, कारवारसह सीमाभागासाठी आम्ही आग्रह धरतो आहोत, पण आमचा हक्क असलेल्या मुंबईतून मराठी, मराठी माणूस, मराठी संस्कृती जपणारा गिरणी कामगार मुंबईबाहेर काढला, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे का? आज अनेक राजकीय नेते किंवा प्रथितयश अभिनेते सांगतात की, मी एका गिरणी कामगाराचा मुलगा होतो. अगदी माजी मुख्यमंत्री नारायण राणेही बोलताना आपण गिरणी कामगारांचा मुलगा होतो, हे सांगतात. लक्ष्मीकांत बेर्डेपासून आजच्या सिद्धार्थ जाधवपर्यंतचे कलाकार हे गिरणी कामगारांशी संबंधित आहेत, पण गिरण्या बंद पडल्यानंतर या गिरणी कामगारांना मुंबईतून बाहेर जावे लागले. त्यांना देशोधडीला लावले गेले, याचा फारसा विचार झाला नाही. मराठी जपण्यासाठी या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यासाठी वर्षानुवर्षे लढा देणाºयांचे समाधान झाले पाहिजे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जे १०५ हुतात्मे झाले, त्यात सर्वाधिक गिरणी कामगार होते. त्यामुळे त्यांचा या मुंबईवर हक्क आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे.
निवडणुका आल्या की, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवला जाईल, असे सगळेच राजकीय पक्ष सांगतात, पण ज्यांनी मुंबई घडविली अशा गिरणी कामगारांचा नंतर मात्र सर्वांनाच विसर पडतो. युतीप्रमाणेच दोन्ही काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीला गिरणी कामगारांच्या प्रश्नाचे सोयर-सूतक दिसत नाही. आता महाविकासआघाडीत युती आणि आघाडीतील पक्ष एकत्र आले आहेत, त्यांना तरी हे प्रश्न सोडवता येतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज गिरणगाव आणि गिरणी कामगारांच्या कुटुंबांत संतापाची भावना दिसत आहे, नाराजी दिसत आहे. वरळी, लालबाग, परळ, भायखळा, दादर अशा भागांत टॉवर संस्कृती रुजत असली, तरी अन्याय झालेल्या गिरणी कामगारांचे दु:ख कोणालाच दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. गिरण्या बंद पडून आता कैक वर्षे लोटली. त्यांच्या कुटुंबीयांना हक्काचे घर देण्यात येईल, अशी आश्वासने पूर्वीच्या सरकारांनी दिली, तरी अद्याप त्याची पूर्ण अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचेच चित्र आहे. मुख्य म्हणजे सध्याचा गिरणगाव हा आता उंचच उंच टॉवर्सनी वेढला गेला असून, जुन्या चाळीतील मराठी गिरणी कामगार व त्याचे कुटुंबीय या विभागातून हद्दपार होत चालल्यामुळे हा प्रश्नही निवडणुकीत कुठल्याही पक्षाच्या अजेंड्यावर नसल्याचे दु:ख लालबाग, परळ, वरळी, शिवडी या विभागांतील गिरणी कामगारांनी बोलून दाखवले आहे. गिरणगावातील तरुणांमध्येही ही खदखद स्पष्ट दिसते. गिरणगावातीलही अनेक तरुण आता उच्चविद्याविभूषित आहेत, मात्र नोकरीच्या बाबतीत भारतातील इतर तरुणांसारखेच त्यांच्यासमोरही प्रश्न आ वासून उभे आहेत. आपल्या वाडवडिलांच्या श्रमातून उभ्या राहिलेल्या मुंबईत चांगली नोकरी मिळवण्यासाठी धडपडणाºया अनेक तरुणांनी ‘आमचे प्रश्न कोणी सोडवेल काय?’ अशी साद घातलेली दिसते.
डॉ. दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांचा पुकारलेला प्रदीर्घ संप हा मुंबईच्या इतिहासात प्रचंड गाजला. या भागातून डॉ. दत्ता सामंत हे लोकसभेवर एकदा निवडून गेले होते. कामगार आघाडीचे आमदारही गिरणगावातून निवडून यायचे, मात्र त्यानंतर कायमच या भागावर शिवसेनेच वर्चस्व राहिले आहे, मात्र आता बदलत्या टॉवर संस्कृतीमुळे भविष्यात गिरणगावातील मतदारसंघातून गुजराती-मारवाडी मतदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या भाजपचा वरचष्माही होऊ शकतो, असेही येथील मराठी माणसांना वाटत आहे. अद्यापपर्यंत मराठी संस्कृती टिकवून ठेवलेल्या या गिरणगावात मराठी माणूस टिकवायचा असेल, तर येथे गिरणी कामगारांच्या कुटुंबीयांना घरे मिळाली, तरच हे होऊ शकते.
एक काळ असा होता की, महाराष्ट्राच्या कानाकोपºयातूनच नाही, तर संपूर्ण देशातून मुंबईत गिरणीत नोकरी लागेल म्हणून आशेने माणूस येत होता. प्रत्येक गावात एक भाऊ शेतकरी आणि दुसरा मुंबईत गिरणीत काम करणारा असे चित्र असायचे, म्हणजे शेतकºयाला तीन मुले असतील, तर एक शेती करायचा, एक मिलिटरीत जायचा आणि तिसरा मुंबईत गिरणीत काम करायचा. कुठल्या मिलमध्ये आहे काय आहे, हे काहीही गावाकडे माहिती नसायचे, फक्त मुंबईत कंपनीत कामाला आहे म्हटला तरी गावाकडची मुलगी त्याला मिळायची आणि लग्न करून ती मुंबईत यायची. मुंबईत अशाप्रकारे मराठी माणसांचे वास्तव्य होते. आज गिरण्यांच्या जागा विकासासाठी घेतल्या. गिरण्या बंद पडल्या. पडल्या की पाडल्या देव जाणे, पण नाटक, चित्रपटासह मराठी संस्कृती मुंबईत जगवली तो गिरणी कामगार बेघर झाला. या गिरणी कामगारांचे वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न सोडवून त्यांना मुंबईतच स्थायिक करणे ही महत्त्वाची गरज आहे. आज शिकून त्यांची पुढची पिढी नवनवे रोजगार मिळवत आहे, पण त्यांना वास्तव्यासाठी इथे घरांचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. या टॉवरमधून परप्रांतीय वाढले, तर मराठीचे अस्तित्व राहील का? मुंबईतील मराठी संस्कृती टिकवण्यासाठी गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवला पाहिजे. मराठी पाटीसाठी खळ्ळ खट्याक करून काही होणार नाही, तर इथला मराठी माणूस टिकवला पाहिजे. त्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळाली पाहिजेत.
गिरणी कामगार आणि चित्रपट
पूर्वी किती हिंदी चित्रपटांतून गिरण्या दाखवल्या आहेत. कापड मिल हा व्यवसाय चित्रपटंतून दिसायचा. चित्रपटातील संप असो, आनंद असो, तो चित्रपटातून दिसायचा. मजदूरसारख्या चित्रपटातून गिरणी कामगार आणि मालकांनी केलेले मार्केटिंग फार छान दाखवले होते. तुम्हारी कसम चित्रपटातही गिरणी कामगार दाखवले आहेत, गिरण्या दाखवल्या आहेत. सिंहासन चित्रपटाचे पार्श्वसंगीत हे तर गिरणीच्या पुकपुक अशा मोटरच्या आवाजात होते. आजकाल चित्रपटात बिझनेसमन दाखवतात, पण फक्त कार्यालय असते, काय व्यवसाय आहे हे कळतच नाही. गिरणी गेली, दाखवणार काय?
उत्सवप्रिय गिरणी कामगार
महाराष्ट्राची संस्कृती चांगल्या उत्सवांनी गिरणी कामगारांनीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवली आहे. मुंबईतील गणेशोत्सव असेल, गोकुळ अष्टमीच्या दहीहंडीतील गोविंदा हा देखील गिरणी कामगारांचा होता. त्यामुळे अनेक हिंदी, मराठी चित्रपटांत दहीहंडी आणि गणेशोत्सवातील गाणी चित्रित केलेली दिसून येतात. मुंबईतील ही संस्कृती, हे वैभव टिकवले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा