रविवार, १ जुलै, २०१८

वाढती हिंसक मनोवृत्ती चिंताजनक

गेल्या काही दिवसांत सामान्य माणसांमधील सहनशक्ती संपुष्टात आल्याचे चित्र समोर दिसत आहे. माणसा-माणसांमधील हिंसक प्रवृत्ती वाढीस लागत आहे. त्याचा परिणाम म्हणून खून आणि आत्महत्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. फक्त आठवडाभरातीलच घटनांचा विचार केला तर, मागच्या शनिवारी मुंबईतील बांद्रा येथील सरकारी वसाहतीतील एका मंत्रालय कर्मचा-याने आपल्या दोन मुलांसह पत्नीला विष पाजून स्वत:ही आत्महत्या केली. त्या अगोदर कफ परेड येथे एकाच घरातील तिघांनी आत्महत्या केली. पंढरपूरच्या एका १७ वर्षाच्या मुलीने शिक्षणाचा खर्च आई-वडिलांना झेपत नाही म्हणून आत्महत्या केली. त्यानंतर बोरिवलीतल्या एका नववीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या ९व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. नागपूरमध्ये तर एका व्यक्तीने आपली बहीण, मेहुणा, जावई अशा एकूण पाच माणसांची हत्या केली आणि पंजाबात पळून गेला, त्याला लुधियानात अटक केली. तो घरी येईल, या भीतीने त्याच्या आईने विहिरीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. साता-यात उंब्रजजवळ एका व्यक्तीने पत्नीवर वार करून स्वत: व आईवर वार करून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यात पत्नीचा मृत्यू झाला. या झाल्या महाराष्ट्रातील काही घटना. अजूनही अशा कितीतरी घटना असतील. महाराष्ट्राबाहेर तर बोलायलाच नको.रविवारी दिल्लीत एका घरात तब्बल ११ मृतदेह सापडले. सगळय़ांची तोंडे बांधलेली होती आणि फास लावलेले होते. अशा घटनांमध्ये खूप वाढ झालेली आहे. माणसं हिंसक बनत चालली आहेत. मनावरचे नियंत्रण सुटत आहे. हे कशामुळे होते आहे, याचा शोध घ्यावा लागेल. हे सगळं कशाने घडत आहे, याचा शोध घेतलाच पाहिजे. कारण, हे फार घातक आहे. जगातले सगळे प्रश्न जर जीव देऊन किंवा जीव घेऊन सुटत असते, तर निम्मी माणसे मारून आणि निम्मी मृत्यूला कवटाळून संपतील आणि एक दिवस हे जग माणसांविना असेल. मारून किंवा मरून प्रश्न सुटत नसतात. प्रश्नांना, संकटांना धैर्याने सामोरे जाणे हा पुरुषार्थ असतो. संकटांचा सामना करण्यासाठी संवाद महत्त्वाचा असतो. आज घराघरातला संवाद हरवला आहे. प्रचंड ताणतणाव आणि आर्थिक विवंचनेत माणसे होरपळली जात आहेत. या तणावातून कुठेतरी व्यक्त होणे गरजेचे असते. राग, ताणतणाव मनात साचत गेला, तर मनुष्य आजारी पडून, हृदयविकारासारखे रोग होऊन तरी संपतो किंवा डिप्रेशनमध्ये जाऊन वैफल्यावस्थेत, नैराश्याने आत्महत्या करतो, स्वत:ला संपवतो. पण, हा त्यावरचा उपाय नाही. बदललेली जीवनशैली, हातात आलेला स्मार्ट फोन, पाठीवर असलेली लॅपटॉपची बॅग किंवा घरातील सर्व सुखसोयी या खरे सुख देतात का? हातात आलेला मोबाईल लांबवरचा संवाद साधण्यास उपयुक्त असेल कदाचित, पण त्या नादात आपण जवळची माणसे तर दुरावत नाही ना, याचा विचार करावा लागेल. कुटुंबातील संवाद हरवला आहे, त्यामुळे एकमेकांना धीर देणारे जोडीदार लांब झाले आहेत. माणूस एकाकीपणा अनुभवत आहे.घरात असलेले पती-पत्नी आणि मुलं हे फक्त लॉजिंग बोर्डिगसारखे घरात फक्त झोपण्यासाठी येत असतील, तर त्यांच्यात प्रेम आणि संवाद राहणार नाही. भौतिक, ऐहिक सुखाच्या मागे लागताना आत्मिक सुख-समाधान माणूस गमावत आहे. त्या असमाधानी वृत्तीतून वैफल्यावस्था प्राप्त होते. हे जग आपल्या कामाचे नाही, असे वाटून हिंसक प्रवृत्तीला जवळ करतो. हे वाढते प्रकार फार वेदनादायी आहेत. वाढते खर्च, अनियमित असणारे पगार यामुळे सामान्य माणूस चिंताग्रस्त आहे. कर्जबाजारी झालेला आहे. यातील अनेक घटनांमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून हत्या, आत्महत्या अशा घडलेल्या आहेत. माणसाचे व्यवहार हे नियमित उत्पन्नावर अवलंबून असतात. पगार नियमितपणे ठरावीकपणे वेळेत मिळाला तर, माणसाला उधारी, उसनवारी करावी लागत नाही, कर्ज घेण्याची गरज भासत नाही. पण, पगार वेळेवर न मिळणे यामुळे देणेकरी रांग लावतात, तेव्हा सतत अपमानास्पद वागणूक माणसाला मिळत जाते. अशा परिस्थितीत कोणी जवळ करत नाही. माणूस एकाकी पडतो आणि आत्महत्या करतो. यासाठी कौटुंबिक संवाद व्यवस्थित होत असेल, एकमेकांना विश्वासात घेऊन काही मार्ग काढला तर त्यावर मात करता येते. पण, तसे होताना दिसत नाही. शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून पंढरपूरची मुलगी आत्महत्या करते, हे फारच वेदनादायी आहे. वास्तविक तिला आई-वडिलांनी काही तसे सुचवले नसेल. आई-बाप काय वाटेल ते करतील, पण मुलांना शिकवतील.तरी या मुलीने उगाचच आई-वडिलांची चिंता केली. तिने जर आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या असत्या, तर काहीतरी तोडगा निघाला असता. पण, संवाद हरपलेला आहे. कोणाला कोणाशी बोलायला वेळच नाही. हे फार चिंताजनक आहे. तोच प्रकार बोरिवलीतल्या त्या मुलीचा. असे काय घडले की, तिच्या मनात आत्महत्येचे विचार आले आणि तिने ९व्या मजल्यावरून उडी टाकून जीव दिला? घरच्यांशी चर्चा करायला, बोलायला ती घाबरली होती का? अशा वाईट गोष्टींचे अनुकरण होत जाते. रोगाप्रमाणे याची साथ पसरते. एकाने आत्महत्या केली की दुसरा करतो. पण, हा काही उपाय नाही. माणसाने मन शांत ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या विकारांवर विजय मिळवला पाहिजे. चित्तवृत्ती स्थिर ठेवून शांतपणे निर्णय घेतला पाहिजे. आत्महत्या करून किंवा हत्या करून कोणाचे प्रश्न सुटले आहेत? तरीही माणसे असे का करतात? त्यांच्यातील याच एकाकीपणाला बाहेर काढले पाहिजे. एकमेकांशी बोलले पाहिजे, कुटुंबातले एक जेवण तरी एकत्र बसून सर्वानी घेतले पाहिजे. यावेळी सर्वानी आपल्या अडचणी, सुख-दु:खे एकमेकांना सांगितली, तर त्यावर तोडगा निघू शकतो. आपले कुटुंब, समाजव्यवस्था यांच्यात साधला जाणारा संवाद फार महत्त्वाचा आहे. अगदी देवधर्म करा किंवा मंदिरात जाऊन मनाला शांती मिळवा असे नाही, पण निदान कधीतरी समुद्रकिनारी किंवा शांत वाटेल अशा ठिकाणी जाऊन मन शांत करून आले पाहिजे, तरच हे प्रकार टळतील. मनातील या हिंसक प्रवृत्तीला बाहेर काढणे ही आजची गरज आहे. इथूनपुढे तणाव वाढतच जाणार आहेत, त्याला सिद्ध होण्याची ही वेळ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: