शिवसेनेच्या नाणार विरोधाचे ढोंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शुक्रवारी उघडे पाडले. अगदी स्पष्टपणे शिवसेना नेत्यांचा बुरखा विधानसभेच्या सभागृहात टराटरा फाटला. पडलं तरी नाक वर आणि नाक कापलं तरी अजून भोक आहेच, अशा थाटात आमचा नाणारला विरोध आहे, नाणार होऊ देणार नाही, अशा केविलवाण्या वल्गना करत, शिवसेना नेत्यांकडून कोकणवासीयांची फसवणूक चालवली आहे. पण, शिवसेना कोकणवासीयांची फसवणूक किती वेळा करेल? ‘लांडगा आला रे आला’ या कथेतील पो-याप्रमाणे शिवसेनेला फटका बसल्याशिवाय राहणार नाही. नाणारचा प्रकल्प कोकणात आणण्यात शिवसेनेचाच पुढाकार होता. सगळ्या विभागांची मंजुरी मिळवून देण्याचा आटापिटा केला. प्रकल्पाची अधिसूचना काढली आणि प्रकरण अंगलट येताच, ‘मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली’ म्हणत पोबारा करायचा प्रयत्न केला. पण, शिवसेनेची ही ढोंगबाजी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उघड केल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यावर एका अक्षराने प्रतिक्रिया देत नाहीत. राम मंदिराचा आणि नोटाबंदीचा विषय चघळत बसतात. या फसवेगिरीला आता कोकणवासीय फसणार नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे.नागपूर अधिवेशनात शुक्रवारी शिवसेना आमदार आणि मंत्र्यांच्या सभागृहातील वर्तणुकीतून नाणारला शिवसेनेचा विरोध नाही हेच स्पष्ट झाले. नाणार प्रकल्पाचे संपूर्ण सादरीकरण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मान्य होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला. त्यावर ना सुभाष देसाई यांनी काही स्पष्टीकरण दिले, ना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काही अवाक्षर काढले. ही ढोंगबाजी करून आता या अपत्याचे बाप आपण नाही, असा विश्वामित्री पवित्रा घेत शिवसेना भाजपकडे बोट दाखवत असले तरी, हे पितृत्व त्यांना नाकारता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी पार डीएनएच सादर केल्यावर आता शिवसेना कानावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत असली तरी, कोकणवासीय जनता आता या भूलथापांना बळी पडणार नाही. मुख्यमंत्री एकीकडे सुभाष देसाई आणि शिवसेनेचा बुरखा टराटरा फाडत होते आणि दुसरीकडे शिवसेनेचे आमदार नाणार रद्द करण्यासाठी सभागृहात गोंधळ घालत असल्याचा दिखावा करत होते. त्यांचे मंत्री मात्र, खुशाल कामकाजात सहभागी होऊन विधेयक मंजूर करून सरकारला मदत करीत होते.त्यामुळे एकीकडे विरोध करायचा, दुसरीकडे सरकारला मदत करायची यावरून शिवसेनेच्या नाणार विरोधाचे ढोंग दिसून आले. आता सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आणि अंतिम आठवडा सुरू होईल. नाणार प्रश्नावरून भाजपला शिवसेना आतून समर्थन आणि बाहेरून विरोध अशा दुटप्पी भूमिकेत असली तरी, काँग्रेससह सर्व विरोधक एकवटले आहेत. विशेषत: युवा आमदार नितेश राणे यांनी जे वातावरण पेटवले आणि विरोधाचा बॉम्ब टाकला आहे, त्याने सगळेच विरोधी पक्ष अवाक् झाले. नितेश राणे यांच्या या आक्रमकतेचे सर्वत्र कौतुक झाले आणि लोकप्रतिनिधी या नात्याने तरुण आमदार किती आक्रमक होऊ शकतात, आपल्या मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी काय करू शकतात, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे आता या आठवडय़ात हा प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी हीच अपेक्षा आहे. युवा आमदार नितेश राणे आणि त्यांचे समर्थन करणारे काँग्रेस आदी विरोधी पक्ष याशिवाय गप्प बसणार नाहीत हे निश्चित आहे; परंतु मुख्यमंत्र्यांनी जसा शिवसेनेचा बुरखा टराटरा फाडला, तशीच हा प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा आता करावी, हीच अपेक्षा या आठवडय़ात करायची आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा विरोध कसा असतो याचा दाखला देताना स्पष्ट केले की, समृद्धी मार्गाला शिवसेनेचा विरोध होता.आता मात्र, त्यांचा विरोध नाही. असे सांगून मुख्यमंत्र्यांनी समृद्धी प्रकरणात अगोदर विरोध करून शिवसेनेने पुन्हा कशी मांडवली केली, हे सभागृहाच्या अप्रत्यक्षपणे निदर्शनास आणून दिले. प्लास्टिक बंदीबाबतही शिवसेनेच्या मंत्र्यांनी अशीच मांडवली केली काय, अशी शंका आता सर्वचजण व्यक्त करत आहेत. कारण, फक्त किराणा मालाच्या पिशव्यांवरील बंदी उठवली. नंतर हॉटेलचालकांची बंदी उठवली. अशी टप्प्याटप्प्याने मांडवली केली काय, असा प्रश्न आहे. त्यामुळे नाणारमध्येही काही मांडवलीत गडबड झाल्यामुळे शिवसेना विरोध करण्याचे नाटक करत असावी, हे कोकणवासीयांनी ओळखले आहे. स्थानिक लोकांचा विरोध वाढल्यानंतर त्याचा निवडणुकीत परिणाम होईल म्हणून आता शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध असल्याचे चित्र निर्माण केले आहे. मात्र, हा त्यांचा देखावा आहे, हे शुक्रवारी सभागृहात स्पष्ट झाले. नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेच्या बेगडी प्रेमाचा बुरखा विधानसभेत टराटरा फाटला. सत्तेत राहायचे, विरोध केल्याचे नाटक करायचे आणि तेथील जनतेची फसवणूक करायची, अशी शिवसेनेची नौटंकी सुरू आहे. ही नौटंकी आता समोर आलेली आहे. कोकणवासीयांवर असलेले शिवसेनेचे प्रेम हे पुतनामावशीला फुटलेल्या पान्ह्यासारखे आहे.त्यामुळे शिवसेनेवर कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. शिवसेनेने मराठी माणसांवर असलेले प्रेम दाखवत, मराठी माणसांचाच घात केला. शिवसेना मुंबईच्या ताब्यात असताना, मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. पार रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात लांबवर फेकला गेला आणि सगळी मुंबई परप्रांतीयांना आंदण देण्याचे काम सेनेने केले. ना इथली गिरणी वाचली, ना गिरणी कामगारांची घरे शिल्लक ठेवली. आता कोकणच्या दिशेने ही शिवसेना फसवणूक करायला चालली आहे, हे कोकणवासीयांना चांगलेच समजून चुकले आहे. एकीकडे सरकारमध्येही राहायचे, विरोधही करायचा आणि आपला डाव साधला की, गप्प बसायचे. समृद्धी महामार्गाला अगोदर शिवसेना विरोध करीत होती. मात्र, आज मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकरणात शिवसेनेचा विरोध मावळला असल्याचे सांगितले. म्हणजे अगोदर विरोध करायचा आणि आपली पोळी भाजली की, पुन्हा लोकांना वा-यावर सोडून द्यायचे, हे शिवसेनेचे धोरण नाणार प्रकल्पातही सुरू आहे; परंतु त्यांचा ढोंगीपणा उघड झाल्यामुळे कोकणी जनता आता कधीही शिवसेनेवर विश्वास ठेवणार नाही. त्याचप्रमाणे अधिवेशनाच्या अखेरच्या आठवडय़ात मुख्यमंत्र्यांनी नाणार रद्द करणार, अशी घोषणा करून कोकणवासीयांना दिलासा द्यावा आणि तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून आपला विरोध नोंदवावा, हीच अपेक्षा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा