शुक्रवार, ६ जुलै, २०१८

एका पावसात दोघांनी भिजायचं..

‘पाऊस’ हा फक्त बॉलिवूडलाच भुरळ घालतो असे नाही, तर मराठी चित्रपटांनाही त्याची भुरळ पडलेली आहे. अनेक सुंदर आणि श्रवणीय गीते मराठी चित्रपटांनी पावसावरील दिलेली आहेत. मात्र, मराठीत पावसाच्या गाण्यांचा वापर फक्त प्रियकर-प्रेयसीची प्रणयाराधना इथपर्यंत मर्यादित न राहता विविध भावविश्वात ही गाणी घेऊन जातात. प्रेमाचे पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी ते मातृप्रेमापर्यंत अनेक भाव पावसातून टिपण्याची कमाल मराठी चित्रपटांतून केलेली दिसते.या लेखाच्या मथळय़ाचे असलेले गीत हे १९८६ला प्रदर्शित झालेल्या ‘तुझ्यावाचून करमेना’ या चित्रपटातील आहे. अलका कुबल आणि अशोक सराफ हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार असले, तरी हा अलकापट नव्हता, म्हणजे रडुबाईचा चित्रपट नव्हता. अलका कुबलच्या वेगळय़ा चित्रपटांपैकी हा एक होता. त्यातील हे गाजलेले पाऊस गीत. यात अलका कुबल ऑर्केस्ट्रातील गायिका असते. ती आपल्या पतीबरोबर अशोक सराफबरोबर हे पावसाचे गाणे गाते. ‘गुज ओठांनी ओठांना सांगायचं, एका पावसात दोघांनी भिजायचं ’ हे गाणे उषा मंगेशकर यांनी गायलेले आहे आणि सुहासचंद्र कुलकर्णी यांचे या गाण्याला संगीत आहे. पावसातील अशोक सराफ आणि अलका कुबलचे हे गाणे सहजसुंदर प्रणयगीत आहे. मराठी संयमी मर्यादा राखून कुठेही मर्यादा भंग न करणारे असे हे सुरेख गाणे. पाण्यात भिजण्यासाठी अलका कुबलला या चित्रपटात साडीची गरज नव्हती, तर चक्क पंजाबी ड्रेसमधील अलका कुबल बघायला मिळते. प्रचंड लोकप्रिय झालेले हे मराठीतील चित्रगीत आहे. गाण्याच्या चालीतही विविधता आणि शब्दांना न्याय देण्याचे काम या गीताने केलेली आहे.मराठीतील आणखी एक गाजलेले पावसाचे गीत म्हणजे, सर्जा चित्रपटातील पूजा पवारवर चित्रित केलेले, ‘चिंब पावसानं रानं झालं आबादानी,’ हे गीत. ना. धो. महानोरांच्या या गीताला हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेले असून, लता मंगेशकर आाणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील हे गीत १९८७ साली निघालेल्या ‘सर्जा’ चित्रपटातील आहे. अजिंक्य देव आणि पूजा पवार यांच्यावर चित्रित झालेले गीत अत्यंत मराठमोळं आणि रांगडं आहे. ऐतिहासिक शिवकालीन अशा या चित्रपटातील सर्जा आणि कस्तुरी या डोंबारी समाजातील प्रेमिकांचे हे प्रणयगीत आहे. अत्यंत सुंदर आविष्कार असलेले हे मराठी चित्रपटातील पाऊसगीत.१९७७ साली आलेल्या ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातील पाऊस गीत हे वेगळय़ा धाटणीचे आहे. ‘आला आला वारा.. संगे पावसाच्या धारा’ हे पाऊस गीत सदाबहार मराठी गीत म्हणून ओळखले जाते. शेतात काम करणा-या महिलांचे हे गाणे, माहेरवाशिण आणि सासुरवाशिणीची लगभग दाखवणारे ठेकेबाज गाणे आहे. सुधीर मोघेंच्या या पाऊस गीताला हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले असून, आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांनी हे गीत गायले आहे. मराठी वाद्यवृंदांना भुरळ घालणारे आणि प्रेक्षकांना सुखावणारे असे हे पाऊस गीत प्रेमगीत नाही तर, नववधू सासरी जाताना येणारा उमाळा यातून फुटल्याचे दिसते.मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवलेला अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणजे दादा कोंडके. हीट गाणी हे दादांच्या चित्रपटाचे बलस्थान असायचे. त्यांचे असेच एक पाऊस गीत म्हणजे ‘ढगाला लागली कळ, पानी थेंब थेंब गळं..’ या गीतात पावसाची दृष्यं कमी आणि इतर बाबी जास्त असल्या, तरी पावसाच्या गीतात आणि शेतीच्या वर्णनाचे हे धमाल गीत आहे. बँकेने कर्जपुरवठा केल्यावर त्याच्या उद्घाटन समारंभातील हे गीत आहे हे सांगूनही कोणाला पटणार नाही. पण, हे एक संपूर्ण शेतीचे वर्णन असले, तरी गाण्याचे ध्रुवपद मात्र पावसाशी संबंधित असल्यामुळे या गाण्याने हसून-हसून भिजायला होते. याशिवाय दादा कोंडके यांच्या पहिल्याच १९७१ साली आलेल्या ‘सोंगाडय़ा’ चित्रपटातील एक लावणी पावसावरची आहे. ‘अहो राया मला पावसात नेऊ नका’ ही पुष्पा पागधरे यांनी गायलेली लावणी पावसावरची आहे. या गीताला राम कदम यांचे संगीत आहे.पाऊस गीताचे उत्तम वर्णन, उत्तम शब्द, सुंदर आवाज आणि सर्वागसुंदर संगीत असलेले गीत म्हणजे ‘भरून भरून आभाळ आलंय भरून भरून’ हे गीत. ‘वारसा लक्ष्मीचा’ या लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव यांच्या चित्रपटातील हे सुंदर आविष्कार असलेले गीत. सुकन्या कुलकर्णी या अभिनेत्रीवर चित्रित झालेल्या या गीताला आवाज होता तो अनुराधा पौडवाल यांचा आणि श्रीधर फडके यांनी आपल्या संगीताची कमाल या गाण्यात केलेली आहे. कुसुमाग्रजवि. वा. शिरवाडकरांच्या गीताला चाल देणे हे सोपे काम नसते. त्यातील प्रत्येक शब्दाचा अचूक अर्थ पोहोचवण्याचे कसब या गाण्याने केलेले आहे. स्त्रीला पूर्णत्व येते ती मातृत्वाची चाहूल लागल्यावर. म्हणूनच तो आनंद काही वेगळाच असतो. तिच्या संसाराची ही बहरत जाणारी वेल आणि निसर्गाचे नाते जोडणारे हे गीत. डोहाळेजेवणाला किंवा गर्भवतीच्या मनातील भावनांना वाट करून देणारे हे गीत म्हणजे पावसातील भरून भरून आभाळ आलंय भरून भरून. उत्कृष्ट शब्द आणि रचना म्हणजे हे गीत. त्या गीताचे चित्रीकरणही इतके सुंदर आहे की, पावसाचा आणि माणसाचा सुरेख संगम साधत, पावसाचा खराखुरा आनंद देण्याचे काम हे गीत करते.एकूणच मराठी चित्रपटात फिरवलेली पावसाची गाणी ही फक्त प्रेमगीतांशी संबंधित नसून प्रेमाचे सर्व प्रकार दाखवण्यासाठी त्यांचा वापर केलेला दिसून येतो. म्हणजे ‘वारसा लक्ष्मीचा’ यातील प्रेमाचा अंकुर फुटून गर्भवतीच्या भावना सांगणाराही पाऊसच आहे, तर दुसरीकडे ‘शामची आई’ चित्रपटात साने गुरुजींच्या जीवनावरील कथाभाग असलेल्या चित्रपटात शामची आई गेल्यानंतर घरी परत येणारा शाम पावसात भिजत येतो. त्यावेळी माधव वझे या बालकलाकाराच्या तोंडी दिलेले, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे गाणे पावसात घेतले आहे. तेव्हा पावसाने ओल्या होणा-या शामपेक्षा प्रेक्षकांची मने अधिक हृदय पिळवटल्यामुळे ओली झालेली असतात. त्यामुळे पावसाचा वापर हा मराठी चित्रपटात प्रेमगीतांव्यतिरिक्तही केलेला दिसून येतो. भयपट असलेल्या हा ‘खेळ सावल्यांचा’मध्ये संजीवनी बिडकर आपला पती नरसू मेल्यानंतर वेडी होते आणि तिचे विरह गीत हे सुद्धा पावसातील आहे. ‘काजळय़ा रातीनं ओढून नेला साजन माझा..’ हे गीत ऐकताना आणि पाहताना अंगावर काटा येतो, इतके ते सुंदर चित्रित केलेले आहे. त्यामुळे पावसाचा वापर मराठी चित्रपटातून विविध भाव प्रकट करण्यासाठी केलेला दिसून येतो. मराठीतही असंख्य पाऊस गीते आहेत. फक्त त्यातील काहीच गीतांचा उल्लेख याठिकाणी केलेला आहे. ही गाणी अशी आहेत की, पाऊस म्हटल्यावर ती पटकन ओठांवर येतात अशी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: