रविवार, ८ जुलै, २०१८

पवार ‘द गेम चेंजर’


आजकाल हिंदी मराठी चित्रपटसृष्टीत चरित्रपट काढायची लाट आलेली आहे. गेल्या तीन-चार वर्षात महेंद्रसिंग धोनीपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत, अण्णा हजारेंपासून संजय दत्तपर्यंत अनेक महान व्यक्तिंच्या जीवनावर चित्रपट येऊ लागले आहेत. त्या चित्रपटाच्या नावातही इंग्रजी टॅग असते. महेंद्रसिंग धोनी-द अनटोल्ड स्टोरी... वगैरे वगैरे. त्यामुळे राजकारणातील दिग्गज असलेल्या शरद पवारांवर जर असा चित्रपट बनवायचा झाला, तर त्याला नाव मात्र ‘पवार- द गेम चेंजर’ असे काहीसे असेल असे वाटते. कारण ऐनवेळी खेळ खल्लास करायचा किंवा त्याचा मार्ग बदलायचा आणि कुणाचे कसे उट्टे काढायचा हे सगळे खेळ शरद पवारांइतके कोणालाच ठाऊक नसतील. 

शरद पवारांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी असाच एक गेम सुरु केलेला आहे. त्या खेळाचे सूत्रधार होऊन सगळी प्यादीच नव्हे तर हत्ती, घोडे, उंट यांची ताकद मिळवून आपण वजीर होण्याचा पट त्यांनी मांडलेला आहे. या पटावरील सोंगट्या कशा हालतात हे येत्या सहा महिन्यातील या खेळातील रंजन असेल. चारच दिवसांपूर्वी एका इंग्रजी वर्तमानपत्राला मुलाखत देताना शरद पवारांनी स्पष्ट केले की काँग्रेस आणि राष्टÑवादी यांच्यात आघाडी झालेली आहे. राहुल गांधींबरोबर तीन बैठकीत हा निर्णय झालेला असून जागावाटप मात्र प्रादेशिक पातळीवरील उभय पक्षांचे नेते ठरवतील, त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. पण भाजपला रोखण्यासाठी आम्ही ही आघाडी महाराष्टÑात केलेली आहे. या बोलण्याचा नेमका अर्थ समजून घेतला पाहिजे. आघाडी झालेली आहे. ती सोयीची असली तर कायम राहिल. नाहीतर प्रादेशिक पातळीवरील नेते ती मोडून टाकण्यास सक्षम आहेत. कोणत्याही परिस्थितीत महाराष्टÑात काँग्रेस वरचढ झाली नाही पाहिजे, काँग्रेसच्या मतांचा आपल्याला फायदा मिळाला पाहिजे पण काँग्रेस आपल्या ताब्यात राहिली पाहिजे हे शरद पवारांचे गणित आहे. त्यादृष्टीने त्यांनी हा नवा गेम महाराष्टÑातून सुरु केलेला आहे.कोणाला कधी डोक्यावर घ्यायचे, कोणाला कधी खांद्यावर घ्यायचे आणि कोणाला कधी गुडघे टेकायला लावायचे हे पवारांना बरोबर समजते. त्यादृष्टीने डिनर डिप्लमसीतून सोनिया गांधीनी विरोधकांना एकत्र आणायचा विचार मांडल्यावर त्यावरच शरद पवारांनी व्यूहरचना केलेली दिसते. देशात सगळ्यात मोठे दोनच पक्ष आहेत. एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा काँग्रेस. या दोघांना बरोबर घेतल्याशिवाय कोणाचेही सरकार येणार नाही हेही नक्कीच झालेले आहे. त्यामुळे काँग्रेस हा जवळचा पर्याय असताना त्या काँग्रेसला छोटी करत आघाडी मोठी कशी करायची याची आखलेली रणनीती म्हणजेच शरद पवारांचा हा नवा गेम. हा गेम खेळताना स्वत: सेफ राहता आले तरच तो जिंकायचा नाहीतर तो उलटवायचा ही रणनीती या गेम चेंजर नेत्याची स्पष्टपणे दिसते आहे.मंगेश पाडगांवकरांची एक कविता आहे, ‘एक जिप्सी आहे माझ्या मनात दडून...’ ही जिप्सी म्हणजे समुद्रकिनारी वाळूमध्ये घर उभे करण्यात रमलेली मुले. आई-वडिल किंवा बरोबर आलेली मोठी माणसं गप्पात गुंतलेली असताना ही मुलं हा खेळ खेळत किल्ला घर तयार करतात. सुंदर कलाकृती निर्माण होत असतानाच आई-वडील म्हणतात चला अंधार पडू लागला जाऊया आता.. मग ते उभारलेले वाळूचे शिल्प, घर, किल्ला ती मुलं लाथेने उधळून लावतात आणि नष्ट करतात. आपल्या हातानेच उभारायचे आणि आपल्या हातानेच संपावायचे या वृत्तीलाच कदाचित जिप्सी म्हणत असावेत. अशी ‘जिप्सी’ शरद पवारांमध्ये चांगलीच दडलेली दिसून येते. त्यामुळे कोणता गेम केव्हा ते चेंज करतील हे सांगता येत नाही.आताही आघाडी उभारताना सगळ्या प्रादेशिक पक्षांची आघाडी झाली पाहिजे. या प्रादेशिक पक्षांबरोबर काँग्रेसला जोडायचे. कारण देशभर पसरलेला पक्ष असल्यामुळे प्रत्येक राज्यात काँग्रेसची काही टक्का मते आहेत. त्याचा लाभ सर्व प्रादेशिक पक्षांना मिळाला पाहिजे, प्रादेशिक पक्षांच्या खासदारांची संख्या वाढली पाहिजे पण काँग्रेसचा आकडा मात्र वाढता कामा नये. आज काँग्रेसचा दोन अंकी पन्नासच्या आत असलेला आकडा आहे तो वाढता कामा नये पण भाजपच्या जागा कमी झाल्या पाहिजेत याची ही रणनीती आहे. जेणेकरून आघाडीचे संख्याबळ बहुमताच्या जवळ गेले तर आघाडीचे, पर्यायाने सरकारचे नेतृत्व, पंतप्रधानपद काँग्रेसकडे जाणार नाही याची खबरदारी घेत हा खेळ पवारांना खेळायचा आहे. त्यामुळे त्यांच्या मनासारखे झाले नाही तर ते पुन्हा गेम चेंजर या भूमिकेत यशस्वी होतील.शरद पवारांना खरं तर या पंतप्रधानपदाने वेळोवेळी हुलकावणी दिलेली आहे. १९९१ च्या राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमधून जी पहिल्या फळीतील नेतेमंडळी पंतप्रधानपदाचे दावेदार होते त्यात पी. व्ही. नरसिंहराव यांच्याबरोबरच प्रणव मुखर्जी, शरद पवार आणि माधवराव शिंदे (सिंधिया) यांच्यासह अन्य काही नावे चर्चेत होती. नरसिंहरावांचा नंबर लागला. पण त्या काळात घोटाळे आणि दुर्घटना इतक्या झाल्या की पुढची निवडणूक जिंकणे काँग्रेसला शक्यच नव्हते. १९९६ ची निवडणूक काँग्रेस हरल्यावर वाजपेयींचे आणि नंतर देवेगौडांचे सरकार आले. तेंव्हा पवारांचे महत्व चांगलेच वाढले होते. भाजपचे प्रमुख विरोधक म्हणून शरद पवारांचे नाव झाले आणि नंतर १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत ते लोकसभेतील विरोधी पक्षनेतेही झाले. त्यामुळे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ते होते. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी ‘सोनिया लाओ देश बचाओ..’ अशी हाक दिली. देश काही धोक्यात नव्हता, पण काँग्रेस वाचवायची होती. सोनिया गांधींना पक्षाच्या अध्यक्षा करण्यापेक्षा त्या ब्रँड अ‍ॅम्बेसिडरच्या भूमिकेत राहून पक्षासाठी मॉडेलिंग करतील आणि त्याचा फायदा सहानुभूती निर्माण करून काँग्रेसच्या जागा वाढण्यात होईल असा होरा पवारांचा त्यावेळी होता. परंतु काँग्रेसमधील गांधीनिष्ठ काही नेत्यांनी सोनिया गांधींना पक्षाध्यक्षच केले आणि पंतप्रधानपदाच्या दावेदारही केल्या. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी असताना, वाजपेयींचे सरकार एक मताने कोसळवण्याची ताकद असलेल्या शरद पवारांनी आपला पंतप्रधानपदाचा मार्ग सोनिया गांधींमुळे रोखला जाऊ शकतो हे लक्षात आल्यावर काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचा तुकडा पाडून राष्टÑवादीची निर्मिती केली. त्यांच्यातील जिप्सी जागृत झाली आणि हा उभारलेला किल्ला मोडला. १९९९ च्या निवडणुकीत भाजपप्रणित रालोआ सत्तेत आली. वाजपेयी पंतप्रधान झाले आणि सोनिया गांधी विरोधी पक्षनेत्या झाल्या. पवारांची अवस्था अवघड झाली. पंतप्रधानपद नाही, विरोधी पक्षनेतेपदही गेले. हा या गेम चेंजर हिरोच्या जीवनातील फार मोठा धक्का होता.म्हणजे, २००४ ला जेव्हा भाजप सत्तेतून गेली आणि काँग्रेसची आघाडी झाली तेव्हा सोनिया गांधींच्या पंतपप्रधानपदाचा तांत्रिक मुद्दा निर्माण झाल्यावर डॉ. मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदाची लॉटरी लागली. यावरुन ‘द अ‍ॅक्सीडेंटल प्राईमिनीस्टर’ नावाचा अनुपम खेर यांनी भूमिका केलेला चित्रपटही येत आहे. त्यावेळी जर शरद पवार काँग्रेसमध्ये असते तर कदाचित शरद पवारांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली असती. मनमोहन सिंगांऐवजी आज बोहरा ब्रदर्सनी शरद पवारांवर ‘द स्ट्रगलर प्राईममिनिस्टर’ नावाचा चित्रपट बनवला असता. २१ डिसेंबर २०१८ ऐवजी तो १२ डिसेंबरला रिलीज झाला असता. पण मनात जिप्सी दडलेल्या या गेमचेंजर हिरोला इथे फार मोठा धक्का बसला. शरद पवारांनी २००४ ते २०१४ या दहा वर्षात कृषी खात्याची जबाबदारी सांभाळून आपली प्रतिमा देशव्यापी ठेवली. शेतकºयांचे नेते अशी प्रतिमा निर्माण केली. या दहा वर्षात विशेषत: यूपीए-२ च्या काळात काँग्रेस जास्तीत जास्त बदनाम झाली तरी शरद पवारांवर कसलाही शिंतोडा उडाला नाही ही प्रतिमा त्यांनी निर्माण केली. साहजिकच त्याचा फायदा आत्ताच्या आघाडीसाठी पवार उठवत आहेत. यात पवारांचे वजन वाढले पाहिजे, प्रादेशिक पक्षांचे वाढले पाहिजे फक्त काँग्रेस दबली पाहिजे हे धोरण आहे.हे कसे करायचे, केव्हा काय पावले टाकायची हे शरद पवारांना चांगले जमते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्टÑात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. भाजप, काँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना हे मुख्य पक्ष परस्पर विरोधात लढल्यावर भाजप सर्वात मोठा पक्ष आहे हे लक्षात आल्यावर सगळ्यात अगोदर सरकार स्थापनेसाठी त्यांना पाठिंबा देण्याचे काम पवारांनी केले. कारण त्यांना काँग्रेस आणि शिवसेना यांना धडा शिकवायचा होता. नंतर शिवसेना लाचार होऊन सरकारमध्ये गेली आणि आपली चूक सुधारली हा भाग वेगळा. पण शरद पवारांनी नेमके काम केले होते.पवार आणि राज ठाकरे यांचे काही फार सख्य नव्हते. शिवसेना सोडल्यावर राज ठाकरेंवर मनसे स्थापनेपूर्वीही पवारांनी टिका केली होती. लवकर उठावं लागतं असा टोमणा मारून राज ठाकरेंना चिमटे घेतले होते. पण आज त्याच राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते आहे म्हटल्यावर त्यांच्याशी जवळीक साधली आहे. जे आपल्याला बोलून कोणत्याही जातीची मते गमवायची नाहीत ते राजच्या तोंडून बोलवण्यासाठी बोलका बाहुला असा नवा गेम शरद पवारांनीच सुरु केलेला आहे. ही सगळी कणाकणाने मते खेचण्याचे काम पवार करत आहेत. राज ठाकरे हे भाजप, मोदी, शिवसेना, काँग्रेस सर्वांवर टीका करतील, त्यांचे बोलवते धनी पवार असतील आणि प्रत्यक्ष या कोणालाच न दुखावता सर्वांबरोबर जाण्याचे आपले मार्ग मोकळे असतील याची पक्की खबरदारी शरद पवारांनी घेतलेली दिसते.आगामी लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे नेतृत्व आपल्याकडे आले पाहिजे तरच आघाडीचा विजय होईल, नाहीतर हातातोंडाशी आलेला सामनाही गमावता येईल याची तयारी या खेळात करण्याची तयारी पवारांनी केलेली दिसते. भारतीय क्रिकेटचे अध्यक्षपद पवारांकडे का आणि कसे आले हे आता समजेल. म्हणजे मॅच कशी जिंकायची, केव्हा हारायचे, कशी फिक्स करायची हे सगळे छक्के-पंजे त्यांना माहित आहेत. अशाच इराद्याने ते आता नवा खेळ खेळायला उतरले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: