जुलै महिन्यातील पहिल्याच पावसाने मुंबईला जोरदार दणका दिला. मंगळवारच्या सकाळीच अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा रेल्वे पुलाच्या पादचारी मार्गाचा काही भाग कोसळला. त्यामुळे चाकरमान्यांची खूपच गैरसोय झाली.अर्थात कोणत्याही संकटावर मात करत कामाला लागणे ही मुंबईकरांची खासीयत असल्यामुळे पर्यायी मार्ग काढून उशिराने का होईना चाकरमानी आपल्या कामावर पोहोचले. पण या पूल दुर्घटनेनंतर जे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले ते अत्यंत हीन पद्धतीचे राजकारण म्हणावे लागेल. या पुलाची दुरुस्ती होऊन तो बांधला जाईल पण जबाबदारी झिडकारण्याचे राजकारण जे शिवसेनेने सुरू केले आहे आणि सरकारवर टीका करण्याचा जो प्रयत्न केला तो प्रकार म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. त्यामुळे शिवसेनेबद्दल मुंबईकरांना थोडाफार असलेला आपलेपणा आणखी कमी झाला. मुंबईकरांची कसलीही जबाबदारी न घेता शिवसेनेच्या महापौरांचे सुरू असलेले गलिच्छ राजकारण ही अत्यंत शरमेची बाब म्हणावी लागेल. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या गोखले पुलाच्या दुरवस्थेवरून रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिकेत जुंपण्याची चिन्हे आहेत. गोखले पुलाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेची असून या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनच जबाबदार आहेत, असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. काही गरज होती का हा आरोप करायची? पण कारण नसताना आरोप आणि टीका करायची आणि आपली निष्क्रियता झाकायची ही शिवसेनेची खासीयत झालेली आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली. या दुर्घटनेमुळे गोखले पुलाच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा पूल मुंबई महापालिकेने बांधला असून त्यांनीच देखभाल-दुरुस्ती करणे अपेक्षित होते, असे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी सांगून शिवसेनेच्या पदरात त्यांची चूक घातली. किरीट सोमय्या यांच्या या विधानानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना राहवले नाही. महापौरांनी आपल्या आणि शिवसेनेच्या स्वभावाप्रमाणे लगेच आरोप झिडकारून टाकला. अर्थात आपल्या मानगुटीवरचे दुस-याच्या मानगुटीवर टाकल्याने पाप लपून राहते का? महापौर म्हणतात, हा पूल पूर्वी महापालिकेने बांधला असला तरी त्याच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. पुलाच्या देखभाल- दुरुस्तीचा खर्चही महापालिकेकडून दिला जातो, असे त्यांनी सांगितले. मात्र, पूल धोकादायक स्थितीत असताना त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पाठपुरावा का केला नाही, याचे उत्तर देणे महापौरांनी टाळले. ही जबाबदारी पालिकेची की रेल्वेची हा प्रश्न नाही तर पालिका आणि रेल्वे यांनी सहकार्याने काम करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. रेल्वेच्या पुलाची देखभाल वेळेत होते की नाही याची जबाबदारी महापौर कशी काय झटकू शकतात? पालिकेने बांधलेला पूल रेल्वेच्या हद्दीत आहे, त्याचा दुरुस्तीचा आणि देखभालीचा खर्च जर महापालिका देत असेल तर त्या पैशाचा विनियोग झाला आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी पालिकेची नाही का? पण फक्त चांगल्या कामाचे श्रेय लाटायचे आणि काही वाईट झाले की ते राज्य सरकारने, केंद्र सरकारने, भाजपने, रेल्वेने केले म्हणून शंख करायचा. शिवसेनेचा हा पोरकटपणाच म्हणावा लागेल. या अपघातात पाच-सहा जण जखमी झाले आहेत. जीवितहानीचे कुठलेही वृत्त नसले तरी त्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी पालिकेने घ्यायला हवी होती. ही वेळ टीका करण्याची नसते. अपघात हा अपघात असतो. पूल हे काही पाडण्याकरिता बांधले जात नाहीत. शिवसेनेने हा पूल निकृष्ट दर्जाचा बांधला असे तर कोणी म्हटले नव्हते. तरीही शिवसेनेने त्याचे भांडवल करून रेल्वेच्या माथी खापर फोडण्याचा जो पोरकपटपणा तो अत्यंत गलिच्छ म्हणावा लागेल. आता तरी महापालिकेने शहाणपणा दाखवावा. अपघात घडल्यानंतर कांगावा करण्यापेक्षा आणि मदत देण्यापेक्षा अगोदरच महापालिकेच्या ताब्यात, महापालिकेने बांधलेले, रेल्वेच्या हद्दीत असलेले किती जुने पूल आहेत याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. त्या पुलांची अवस्था काय आहे याचा विचार करून त्याची देखभाल दुरुस्ती नीट होते की नाही याचा शोध घ्यावा आणि मुंबईकरांच्या जीवाशी खेळणे थांबवावे. मुंबईकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहण्याचे काम शिवसेनेकडून सातत्याने होताना दिसते आहे. हा राग मुंबईकर मतपेटीतून काढतील आणि कधी पुलावरून शिवसेनेचा कडेलोट करतील याचा आता नेम नाही. त्यामुळे जबाबदारी झिडकारण्यापेक्षा अन्य जुने मोडकळीस आलेले पूल, सार्वजनिक जागेतील मोडकळीस आलेल्या इमारती, धोकादायक इमारती यांचा तपशील पाहून त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. रेल्वेनेही आपली जबाबदारी स्वीकारत लोकलसेवा सुरक्षित आणि सुरळीत कशी राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दुर्घटनेनंतर संपूर्ण रेल्वे बंद न ठेवता रेल्वेने प्रवाशांची कमीत कमी अडचण, गैरसोय होईल यासाठी प्रयत्न केले हे नाकारून चालणार नाही. चर्चगेट ते वांद्रे आणि अंधेरी ते विरार लोकल सुरू ठेवण्याचे कामही केले. मधल्या फक्त काही भागाचा प्रश्न होता. यातही विशेष कौतुक करावे लागेल ते त्या मोटरमनचे. पूल कोसळत असल्याची शंका आल्यामुळे तातडीने ब्रेक दाबून लोकल थांबवली आणि शेकडो जीव वाचवले. अशा गोष्टींचे कौतुक करायचे सोडून त्यावरून होणारे राजकारण हे अत्यंत गलिच्छपणाचे लक्षण आहे. कोसळलेले पूल बांधता येतील पण यामुळे दुखावलेली मने मात्र जोडली जाणार नाहीत. महापालिका ही स्थानिक पातळीवरच्या कामासाठी अग्रेसर असली पाहिजे. हा अपघात महापालिकेच्या दुर्लक्षामुळेच झालेला आहे. अशाच प्रकारचे मुख्य पुलाला लागून अनेक पादचारी पूल पश्चिम रेल्वेच्या मार्गावर आहेत. त्यांचीही देखभाल होणे गरजेचे आहे. यामध्ये एल्फिन्स्टन रोड पुलाच्या बाजूचा दगडी पूल, माटुंगा ते माटुंगा रोड जोडला जाणारा पादचारी पूल अशी अनेक उदाहरणे आहेत. त्या सगळय़ांचेच आता स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची तातडीने देखभाल-दुरुस्ती महापालिकेने करावी. रेल्वे त्यांची यंत्रणा, रेल्वेलाईन दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेते. त्याच काळात महापालिकेने आपली कामे करून घ्यावीत.
मंगळवार, ३ जुलै, २०१८
पूल दुर्घटनेनंतर महापौरांचे राजकारण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा