बुधवार, ४ जुलै, २०१८

‘लाचार’सेनेने स्वाभिमान विकला

स्वाभिमानाचा आणि शिवसेनेचा काही संबंध राहिलेला नाही याचे चित्र नागपुरात दिसून आले. सत्तेसाठी शिवसेना किती लाचार झालेली आहे आणि मंत्रीपदे सोडण्याचे अथवा राजीनामे देण्याचे धाडस एकाही शिवसेनेच्या मंत्र्यामध्ये नाही हे पुन्हा पुन्हा दिसून येत आहे. किंबहुना भाजपबरोबर युतीत आहे तोपर्यंत सत्ता उपभोगायची आणि त्यासाठी वाटेल ती लाचारी करावी लागली तरी करायची हे शिवसेनेचे धोरण दिसत आहे.
शिवसेनेचा ढाण्या वाघ असा उल्लेख एकेकाळी असायचा. पण शिवसेनेचे नेतृत्व आता ज्यांच्याकडे आहे त्यावरून आता हा ढाण्या वाघ राहिलेला नाही, तर सोकावलेला कोल्हा झालेला आहे असे चित्र झालेले आहे. त्यामुळेच एकीकडे भाजपवर टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख आणि दुसरीकडे पक्षप्रमुखांना बेदखल करत मंत्रीपद टिकवण्यासाठी भाजपपुढे लाचार झालेले शिवसेनेचे मंत्री अशी अवस्था आहे. विनाशकारी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती; परंतु मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या निवेदनाला केराची टोपली दाखविली. एवढेच नव्हे तर नागपुरात पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या प्रश्नावर शिवसेनेच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी चकार शब्द काढू दिला नाही. त्यांचा आवाज जाहीररीत्या बंद केला. शिवसेनेत पूर्वीची धमक आणि आक्रमकता राहिलेली नसल्याने शिवसेनेची दखल घेतली नाही, तरी चालू शकते, इतका विश्वास मुख्यमंत्र्यांना आला आहे. त्यामुळे शिवसेनेचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे पुन्हा एकदा दिसून आले. स्वबळाच्या नुसत्या पोकळ घोषणा देऊन भाजपसोबत राहूनच सर्व लाभ उठवायचे हे शिवसेनेचे धोरण असल्यामुळे भाजपने शिवसेनेला अक्षरश: बटीक करून घेतलेले आहे. म्हणजे तोंडातली जीभ ही दातांची बटीक असते. दात आणि दाढांनी कितीही चावले तरी ती पाहिजे तशी वळते आणि स्वत:ला वाचवत न कुरकुरता दातांशी जमवून घेते. कधी घसरली तरी दात चावून तुकडा पाडतील अशी स्थिती असते. आज शिवसेना अशीच अभिमानशून्य लाचारपणे भाजपच्या दावणीला बांधली गेलेली आहे. आमचा भाजपला विरोध आहे, आमचा नाणारला विरोध आहे असे नुसतेच कोल्हेकुई करण्याचे काम शिवसेना करताना दिसत आहे. प्रत्यक्षात त्यांच्यात कसलीही हिंमत नाही. म्हणूनच सुरुवातीला त्यांना कोल्ह्याची उपमा दिली. कोल्हा स्वत: शिकार करत नाही, तर वाघ-सिंहांनी शिकार केलेल्या प्राण्यांचे उरलेले उष्टे अवशेष खाण्यात धन्यता मानतो. तशी अवस्था सेनेची झालेली आहे. त्यामुळेच शिवसेना किती शेळपट आहेत हे मंगळवारी नागपुरात दिसून आले. शिवसेनेचा नाणारला असलेला विरोध हा फक्त दिखावा आहे हे त्यांनी नागपुरात स्पष्ट केले. अपमान गिळून लाचार होत मुख्यमंत्र्यांपुढे लोटांगण घालण्याची वेळ आली यावरून दिसून आले. सत्तेतून बाहेर पडायची हिंमत सोडा, आता भाजपने पेकाटात लाथ घातली तरी चालेल पण आम्ही सत्तेतून बाहेर पडणार नाही, या मनोवृत्तीपर्यंत शिवसेनेचे मंत्री लाचार झाले आहेत. इकडे ‘मातोश्री’वर त्यांचे नेते सर्कशीतल्या पिंज-यातल्या वाघासारख्या डरकाळ्या फोडल्याचा आव आणत आहेत. त्याला बाजूला उभे असलेले विदूषक फक्त घाबरल्यासारखे करतात. बाकी ज्यांच्या पदरात मंत्रीपद पडले, त्यांना या पोकळ डरकाळ्या ऐकूही येत नाहीत. उलट काही करून आपले मंत्रीपद कसे टिकेल यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर लाचार होताना दिसतात. नाणार प्रकल्पाला नाटकी विरोध करणा-या शिवसेनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेत अपमान केला, तरी त्यांना जराशीही शरम वाटली नाही की पत्रकार परिषद सोडून जाण्याचे धाडस झाले नाही. शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते एवढा अपमान सहन करीत भर पत्रकार परिषदेत चिडीचूप बसले. यावरून सत्तेसाठी शिवसेना किती लाचार आहे, हे पुन्हा एकदा जाहीर पत्रकार परिषदेत पाहायला मिळाले. हा लाचारीचा किळसवाणा प्रकार मातोश्रीच्या पिंज-यातल्या वाघाला दिसला नाही बहुधा. आपल्या पक्षाच्या आमदारांचा इतका मोठा अपमान झाल्याचे आणि टीव्हीसह सर्व वर्तमानपत्रांतून त्याबाबत वृत्त झळकल्यानंतरही सेना नेते मूग गिळून गप्प बसले. यावरून लाचार शिवसेनेने सत्तेचा लाभ मिळविण्यासाठी आपला स्वाभिमान विकला असल्याचेच स्पष्ट झाले आहे. गमतीचा भाग म्हणजे जेव्हा पावसाळी अधिवेशन नागपूरला घेणार हे जाहीर झाले तेव्हा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन घेण्यास विरोध आहे, असे म्हटले होते. नाणार प्रकल्प नागपूरला न्या, मग हे अधिवेशन नागपूरला झाले तरी चालेल असे पोरकट विधानही उद्धव ठाकरे यांनी केले होते. म्हणजे नाणारचा प्रकल्प अजून रद्द झालेला नाही, तो नागपुरात गेलेलाही नाही तरीही या अधिवेशनाला शिवसेनेचे आमदार सर्वात अगोदर पोहोचले. नागपुरात अधिवेशन घेतले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, विरोध करू असे म्हणणारी शिवसेना या अधिवेशनावर बहिष्कार का टाकू शकली नाही? लोक विसराळू असतात असे शिवसेनेला वाटते का? या लाचारीचाच हिशोब जनता आगामी निवडणुकीत करेल आणि शिवसेनेला चार हात लांब ठेवेल. २०१४ ला मोदी लाटेमुळे शिवसेनेला यश मिळाले. आता जर शिवसेना भाजपच्या विरोधात गेली तर शिवसेनेला मतदार झुरळाप्रमाणे बाजूला फेकून देतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच भाजपकडून कोणताही अपमान झाला तरी तो गिळत त्यांचे दास म्हणून राहण्याची वेळ शिवसेनेवर आलेली आहे. एकीकडून भाजपच्या धोरणाला फक्त विरोध करायचा आणि भाजपला जे पाहिजे तेच करायचे असल्या धोरणामुळे शिवसेनेची छी थू होताना दिसत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांनी नाणारबाबत प्रश्न विचारला. शिवसेना सत्तेत आहे, त्यांचा नाणारला विरोध आहे. मग प्रकल्प कसा पुढे जाणार असे पत्रकारांनी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, नाणार प्रकल्प होणारच. शिवसेनेची काय भूमिका आहे, ती आम्ही यापूर्वीच समजून घेतली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की शिवसेनेची या प्रकल्पाला पूर्ण मंजुरी आहे. फक्त कोकणातली मते आपल्या विरोधात जाणार नाहीत यासाठी शिवसेना खोटेपणा करीत आहे. शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांकडे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्यासारखा स्वाभिमान नाही, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राणे यांनी, नाणार प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न झाला तर अलीकडेच मिळालेली खासदारकीही सोडण्याची हिंमत दाखवली आहे. शिवसेनेसारखी भाजपच्या नेत्यांसोबत एक आणि बाहेर दुसरी भूमिका राणेंनी कधीही घेतलेली नाही. शिवसेना लाचार आहे आणि आपल्या विरोधात जाणार नाही हा विश्वास मुख्यमंत्र्यांना असल्यामुळेच त्यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेचा आवाज दाबला. तरीही शिवसेनेचे मंत्री गप्प बसले. शिवसेनेचा नाणारला विरोध हा किती बेगडी आहे, हे पुन्हा दिसून आल्याने आता कोकणातील जनताच शिवसेनेचा फैसला करेल, यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: