रविवार, २९ जुलै, २०१८

जोरू का भाई एक तरफ..

जोरू का भाई एक तरफ और सारी दुनिया एक तरफ, अशी अवस्था सध्या शिवसेनेची झालेली दिसून येते. वेळ काय, प्रसंग काय आणि आपण नेमके करतो काय, याचे कसलेही भान नसल्यासारखी अवस्था आज या पक्षाची झाल्यामुळे शिवसेनेतील ज्येष्ठांमध्ये अस्वस्थता आहे, तर तरुणांमध्ये अस्थिरता आहे. मुद्दे सोडून भलतीकडे पळणे या धोरणाला काय म्हणावे?अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्याची घोषणा शिवसेनेने केली. हेतू काय, तर म्हणे हिंदू मते आपल्याकडे वळवावीत. त्यासाठी भाजपकडे असलेली हिंदू मते आपल्याकडे खेचण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा हातात घेण्याची उपरती सेना नेत्यांना झाली आणि ‘चलो अयोध्या, चलो वाराणसी’ करत त्यांनी सगळ्या मुंबईभर पोस्टर्सही लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या आणि वाराणसीत जाऊन राम दर्शन आणि गंगा पूजा करण्याची घोषणा करताच, मुंबईत फ्लेक्स झळकायला लागले. भाजपकडून राम मंदिराचे आश्वासन पूर्ण होत नसल्याने, हिंदू मतांना शिवसेनेकडे वळवण्यासाठी पक्षाने ही खेळी खेळल्याचे सांगितले जाते.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाराणसी आणि अयोध्या दौ-यात शिवसैनिकांनी सामील व्हावे, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ‘देशाच्या राजकारणातील महत्त्वाकांक्षी पाऊल’, असाही उल्लेख करण्यात आला असून, या दौ-यात २०१९च्या निवडणुकीत भाजपची कोंडी करून हिंदू मते स्वत:कडे वळवण्यासाठी शिवसेनेने या दौ-याचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे हे पाऊलच ‘जोरू का भाई एक तरफ..’ अशा प्रकारचे आहे.वास्तविक शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर कोणीही विचारत नाही. त्यांची महाराष्ट्राबाहेर कसलीही ताकद नाही. महाराष्ट्राबाहेर शेजारी गुजरात, गोवा, कर्नाटक राज्यात निवडणुकीत उतरण्याचा शिवसेनेने केविलवाणा प्रयत्न केला, पण तिथे उमेदवारही मिळायची मारामार ते मतदार कुठून मिळणार, अशी अवस्था झाली. इतके असले तरी आम्ही भाजपला दणका देणार, भाजपला संपवणार हा एकच घोष शिवसेना करत आहे. हा अत्यंत हास्यास्पद प्रकार म्हणावा लागेल. म्हणजे ‘नवरा मेला तरी चालेल पण, सवत विधवा झाली पाहिजे’ या हेतूने भाजप विरोधात ठाकलेली शिवसेना म्हणजे भलत्या दिशेने चाललेली वाटचाल म्हणावी लागेल.उत्तर प्रदेशाचे काय घेऊन बसली आहे शिवसेना, अजून पुरता महाराष्ट्र पादाक्रांत करता आलेला नसताना ‘चलो अयोध्या, चलो वाराणसी’ हा प्रकार अत्यंत गमतीशीर म्हणावा लागेल. शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादित असताना, मराठी मतांना गोळा करायचे सोडून रामाच्या नावावर हिंदू मते गोळा करायला चालले आहेत. म्हणजे एकीकडून सांगितले जाते की, भाजपकडून शिवसेनेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेने मात्र आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. वास्तविक शिवसेना कितीही मोठय़ा गोष्टी करीत असली तरी, शिवसेनेचे भाजपशिवाय काही चालणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. भाजपच्या सरकारमध्ये आपण गेलो नाही, तर संपून जाऊ याची जाणीव झाल्यामुळेच तर विरोधात लढून, सरकार स्थापनेचेवेळी विरोधी पक्ष म्हणून दावा करून नंतर सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अलीकडेच म्हणाले होते की, आम्ही जर सरकारमध्ये गेलो नसतो, तर भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार चालवले असते. ते होऊ नये म्हणून आम्ही सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आमच्या मंत्र्यांनाही कामकाजाचा अनुभव मिळेल असे वक्तव्य त्यांनी केले होते. म्हणजे सरकारचे फक्त फायदे घ्यायचे आणि सरकार विरोधात बोलायचे एवढाच अजंडा शिवसेनेचा असल्याचे स्पष्ट दिसते. म्हणजे महाराष्ट्राची पूर्ण सत्ता हातात येण्याची चिन्हे नाहीत, तेवढी ताकदही नाही तरीही आज आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष असल्याचा आव आणत महाराष्ट्र सोडून शिवसेना अयोध्येकडे जायला निघाली आहे. यालाच ‘जोरू का भाई एक तरफ और सारी दुनिया एक तरफ’ असे म्हणतात.खरे म्हणजे शिवसेनेने महाराष्ट्रात आपली ताकद आजमावून पाहिली असती, तर बरे झाले असते. अयोध्येत रामलल्लांचे दर्शन घेऊन हिंदू मते गोळा करायला शिवसेना निघाली आहे, पण शिवसेना हे मंदिर बांधणार आहे का? हा विषय न्यायप्रविष्ठ असताना आणि त्याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असताना, आत्ताच शिवसेनेला रामाची आठवण का झाली? म्हणजे काही मुस्लीम संघटनाही अलीकडे राम मंदिराबाबत अनुकूल मते व्यक्त करत असताना, हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. त्याबाबत तोडगा निघून न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेच राम मंदिराचे बांधकाम सुरू होऊ शकते. प्रत्यक्षात राम मंदिराचे दगड, खांब आणि स्ट्रक्चर सगळे तयार आहे. एकदा का न्यायालयाचा निर्णय झाला की, ते झटपट उभे राहील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राम मंदिराची चिंता शिवसेनेला करण्याचे काहीच कारण नाही. पण, आता हे काम होण्याची शक्यता दिसू लागल्यावर, न्यायालयाचा निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाल्यावर शिवसेनेने ‘चलो अयोध्या’ अशी घोषणा दिली आहे, याला चक्क संधीसाधूपणा म्हणतात. हा प्रकार म्हणजे क्रिकेटच्या सामन्यात २०० धावांचे लक्ष असेल तर, १९९ धावा रोहित शर्मा, विराट कोहली यांनी काढायच्या आणि शेवटची धाव काढायला शेवटच्या फळीतल्या एखाद्या गोलंदाजाने यावे आणि एक रन काढावी. सामना जिंकावा आणि माझ्यामुळेच सामना जिंकला असा त्याने डंका पिटावा, तसा प्रकार आहे हा. राम मंदिर होणारच आहे. भाजप आणि सगळ्या संघ परिवारातील हिंदू संघटनांनी ‘मंदिर वही बनायेंगे’ अशी हाक देऊन अनेक वर्षे मेहनत घेतली आहे, ती काय उगाच का? ऐनवेळी अशी शिवसेनेने घोषणा देऊन मंदिर उभे राहील असे वाटते का? उद्या हीच शिवसेना ‘चलो कोकण’ म्हणून आम्ही कोकणात हापूस आंबे लावतो, असे सांगून त्या हापूस आंब्याचे श्रेय घेण्यासही कमी करणार नाही. हापूस आंब्याचा रंग केशरी आहे, कारण तो शिवसेनेचा आहे असा प्रचारही केला जाऊ शकतो. पण, शिवसेनेच्या असल्या पोरखेळाला कोणीही फसणार नाही.शिवसेनेवर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? दिल्लीच्या वर्तुळात नाणार प्रकल्पाला विरोध करायचा नाही, राज्य सरकार त्या प्रकल्पाचे समर्थन करत असताना सभागृहात शिवसेना त्याला विरोध न करता संमती देते आणि दुसरीकडे विरोधकांच्या कळपात घुसून ‘आमचा विरोध, आमचा विरोध’ असा गाजावाजा करते. त्यावर कोण विश्वास ठेवणार? मेंढरांच्या कळपात लांडगा शिरला आणि त्यांनी बे बे असा आवाज काढला, तरी ही बकरी नाही, तर हा लांडगा आहे हे सर्वाना समजते. तसाच प्रकार शिवसेनेचा आहे. त्यामुळे या अयोध्येच्या नाटकावर फसण्याइतके हिंदू लोक तकलादू आहेत, असे शिवसेनेला वाटते का?मागच्या आठवडय़ात संसदेतील अविश्वास प्रस्तावातही शिवसेनेने तटस्थ भूमिका घेत, भाजपला म्हणे हादरा दिला आहे. पण, प्रत्यक्षात शिवसेनेच्या खासदारांनीच शिवसेना नेतृत्वाला हादरा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख अविश्वास ठरावाच्या वेळी आम्ही मोदींबरोबर असल्याचे मुंबईत जाहीर करतात. दिल्लीत त्यांच्याच पक्षाचे खासदार आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर करतात.म्हणजे पक्षप्रमुखाचे ऐकायची शिस्त ज्या पक्षात नाही त्या पक्षावर कोण विश्वास ठेवेल? हिंदू मते गोळा करण्यापेक्षा आपल्या पक्षाचे खासदार आपल्याबरोबर आहेत का, हे एकदा शिवसेनेला पडताळून पाहावे लागेल.

शिवसेनेने भाजपवर टीका करण्यापेक्षा आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे. आज शिवसेनेला राज्यातील सत्तेचे डोहाळे लागले आहेत. राज्यात स्वबळावर शिवसेनेची सत्ता आणायचे स्वप्न शिवसेना पाहते आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, तर सतत त्याबाबत बोलत आहेत. विधान भवनावर भगवाच फडकेल. अहो, पण तो भगवा सेनेचा का भाजपचा हे काळच ठरवेल. अजून शिवसेनेला शंभरचा आकडा इतक्या वर्षात गाठता आलेला नाही. महाराष्ट्र विधानसभेतील १४५ चा बहुमताचा आकडा शिवसेना कोणाच्या भरवशावर गाठणार आहे? म्हणजे भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेऊन सरकार चालवू नये, असे सांगणारे उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्याच मदतीने सरकार स्थापन करणार का? हा शिवसेनेचा दुटप्पीपणा मराठी आणि हिंदू माणसांचा विश्वासघात करणारा नाही का? खा. संजय राऊत यांनी तर एका वाहिनीवर नुकतेच स्पष्टही केले की, आम्ही शंभर जागा मिळवून कोणाच्याही मदतीने सरकार बनवू. भाजपला सत्तेपासून लांब ठेवू असा त्यांचा होरा दिसत होता. एकीकडे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील, असे सांगितले जाते. दुसरीकडे उद्धव ठाकरे आमच्या आमदारांना मंत्रीपदाचा अनुभव हवा म्हणून सरकारमध्ये शिरल्याच्या गमजा करतात. मग कसलाच अनुभव न घेता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची स्वप्न कशी बघतात. ते पक्षाचे प्रमुख असतील, पण त्यांना अजून जनाधार आहे कुठे? कोणती निवडणूक लढवण्याचा तरी अनुभव आहे का? हे सगळेच विचित्र प्रकार आहेत. राज्याचे, शेतक-यांचे, मुंबईकरांचे प्रश्न बाजूला ठेवायचे, मुंबई महापालिकेतही स्वबळावर सत्ता आणणे शक्य नसताना विधानसभेचे स्वप्न पाहायचे आणि त्यासाठी महाराष्ट्र सोडून ‘चलो अयोध्या, चलो वाराणसी’ अशी घोषणा म्हणजे ‘जोरू का भाई एक तरफ’ असाच नाही का?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: