२०१४ ला जशी मोदी लाट आल्याचा आभास निर्माण केला होता तसाच आता मोदी विरोधी लाट निर्माण झाल्याचा आभास निर्माण झालेला आहे. मोदी विरोधात सगळे विरोधक आणि काही माध्यमे तुटून पडायला लागली आहेत, पण असा अचानक सूर का बदलत गेला? नरेंद्र मोदी हे भाजपचे नाणे २०१४ ला इतके खणखणीत कसे ठरले? यावर नजर टाकली तर लक्षात येईल नरेंद्र मोदींना भाजपने नाही तर काँग्रेसनेच मोठे केलेले आहे. म्हणूनच आता आपणच मोठे केलेले हे प्रस्त आपल्यालाच महागात पडल्याचे लक्षात आल्यावर एकाएकी कलटी मारत मोदी विरोधाची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झालेला आहे.२०१४ ला जेंव्हा भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर राष्टÑीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेंव्हा अनेकांना वाटले असेल की यामागे राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा हात आहे. परंतु नरेंद्र मोदी हे जर संघातून आलेले असले तरी त्यांना संघाने किंवा भाजपने मोठे केलेले नाही तर त्यांना मोठे केले आहे चक्क काँग्रेसने. यासाठी थोडे मागे जावे लागेल आणि काही दाखले पहावे लागतील हे निश्चित. पण हे काही एका रात्रीत घडलेले नाही. हे काही २०१३ ला मोदींना प्रचारप्रमुख केल्यानंतर आणि २०१४ च्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित झाल्यानंतर हे झालेले नाही. यासाठी २००४ पासूनच प्रयत्न सुरु होते. ते कोणाचे प्रयत्न होते हे जरा तपासून पहावे लागेल. माणसाचा स्वभावच असा असतो की एखादी गोष्ट करू नको म्हटले की तरी करायची इच्छा होते. का करु नको? असा प्रश्न पडल्यावर मनाला आवर न घालता ती गोष्ट करायची इच्छा होते. ही मानसिकता आहे. त्याला कोणी मानसशास्त्र म्हणत असेल, पण या मानसशास्त्राचा अभ्यास काँग्रेसने केला असल्यामुळे म्हणा किंवा अजिबातच केला नसल्यामुळे नरेंद्र मोदी हे मोठे होत गेले, त्यांची लोकप्रियता नाही तर प्रसिद्धी खूप होत गेली आणि प्रसिद्धीनंतर ते लोकप्रिय होत गेले. त्यामागे भाजपचे कमळ किंवा संघाचा दंड नाही तर काँग्रेसचा हातच जास्त दिसून येतो आहे. अर्थात ही निती काँग्रेसची नवी नाही तर पूर्वापार चालत आलेली आहे. एखाद्याला छोटे करण्यासाठी दुसºयाला मोठे करायचे ही काँग्रेसची वृत्ती इतकी जुनी आहे की त्यांना त्यांच्याच या धोरणामुळे छोटे व्हावे लागले. यासाठी थोडी इतिहासावरुन नजर मारावी लागेल. नरेंद्र मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. १९९१ मध्ये कन्याकुमारी-श्रीनगरएकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला. १९९५ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. २००१ ते २००२ व नंतर २००२ ते २००७ तसेच २००७ ते २०१२ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यासारखा साधी चहाची टपरी चालवणारा महत्त्वाकांक्षी तरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकला. गुजरातमध्ये प्रचारक म्हणून संघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. २००१ मध्ये भाजपचे केशुभाई पटेल पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. संघटक एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. शंकरसिंह वाघेला व मोदी यांनी राज्यात भाजपास सत्तेत आणण्याचे कडवे आव्हान स्वीकारत १९९५ मध्ये दोन-तृतीयांश बहुमताने पक्षाची सत्ता प्रस्थापित केली. शालेय जीवनापासून संघाच्या कार्यास वाहून घेतलेल्या मोदींनी अडवाणींच्या सोमनाथ व अयोध्या रथ यात्रा आयोजनात मोठी भूमिका निभावली होती. राज्याची सत्ता राखतानाच राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेमध्ये राहण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार म्हणून अघोषित उमेदवारी ठसवण्यातही ते यशस्वी झाले. फक्त २००२ मधील गुजराथमधल्यात दंगलीने त्यांच्या सर्वपक्षीय स्वीकार्यतेस खो घातल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यांच्या चेहºयावरील हा काळा डाग त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकला नाही. आणि ते प्रचंड बहुमताने निवडून आले आणि भारताचे पंतप्रधान बनले. हा झाला थोडक्यात गोषवारा. पण यामागेच फार मोठे नियोजन होते. १९९६ नंतर तशी काँग्रेस नेतृत्वहीन बनली. कारण गांधी या नावाशिवाय कोणी नेता असूच शकत नाही हा काँग्रेसचा अलिखित नियम. सोनिया गांधींना पंतप्रधानपदासाठी कोणी स्विकारत नाही म्हणून त्यांची त्यागमूर्ती अशी प्रतिमा निर्माण केली आणि त्यांनी मनमोहनसिंग यांच्या नावाने पंतप्रधानपद उपभोगले. पण हे घोस्टवर्क किंवा छायाकृती काम किती दिवस करायचे? एक नवा गांधी नेता देशाला दिला नाही तर काँग्रेसचे अस्तित्व संपेल याची चिंता काँग्रेसला लागली होती. त्या तुलनेत प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षात एकापाठोपाठ नेत्यांची रांग लागली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपद भूषविले होते तर लालकृष्ण अडवाणी यांनी उपपंतप्रधानपद भूषविले होते. त्याचबरोबर प्रमोद महाजन, नितीन गडकरी या महाराष्टÑातील नेत्यांसमवेत राजनाथसिंग, सूषमा स्वराज असेही अनेक दिग्गज विद्वान नेते भाजपकडे होते. पण काँग्रेसकडे होते कोण? त्यामुळे भाजपच्या या मोठ्या नेत्यांना झाकण्यासाठी काँग्रेसने मोदींना मोठे करायचे धोरण आखले.तसे पाहता भाजपचे अनेक ठिकाणी मुख्यमंत्री होते. मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान होते. असे असताना फक्त गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची संधी कशी काय मिळू शकली? तेच इतके प्रकाशात कसे काय आले? यामागे फार मोठे राजकारण होते. २००४ ला भाजपला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागल्यावर सोनिया गांधींनी पंतप्रधानपदाची तयारी पूर्णपणे केलेली होती. परंतु भाजपने त्यांना रोखले. सूषमा स्वराज यांनी तर सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर मुंडण करेन आणि संन्यास घेईन अशी भिष्म प्रतिज्ञा केलेली होती. तांत्रिक अडचणींमुळे सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या नाहीत. तो मान मनमोहनसिंग यांना मिळाला. पण ही तात्पुरती सोय होती. पुढच्या निवडणुकीत भाजपकडे असलेल्या नेत्याच्या बळावर भाजप आपल्याला रोखणार याची जाणिव काँग्रेसला होती. त्यामुळे त्यांनी वाजपेयी, अडवाणी अशा दिग्गजांकडे दुर्लक्ष करत नरेंद्र मोदी हा भाजपचा चेहरा आहे हे समोर आणायला सुरुवात केली. गुजरातच्या निवडणुकीत त्यांच्यावर वाटेल तसे आरोप करत मौत का सौदागर म्हणत प्रचंड टीका केली. त्यामुळे मोदी हे सतत चर्चेत राहिले. गुजरातचे इतके मुख्यमंत्री झाले पण त्यापैकी फारसे कोणाचे नाव राज्याबाहेर चर्चेत राहिले नाही पण काँग्रेसच्या, सोनिया गांधींच्या टीकेमुळे मोदी हे मुस्लिम विरोधक, मौत का सौदागर, दंगलखोर असे व्यक्तिमत्व ठरविण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे दहशतवादावर संतापाने बोलणारा, कट्टर हिंदूत्ववादी वर्ग हा मोदींकडे वळला. भाजपचा मोदी हाच तारणहार आहे हा विचार रुजला. त्यामुळे मोदी मोदी मोदी नावाचा गाजावाजा झाला. नमो मंत्र जपला जाऊ लागला. वाजपेयी हे आजारपणामुळे राजकारणातून बाहेर पडले पण अडवाणी हे अजूनही सक्रीय आहेत. परंतु त्यांना डालण्यासाठी काँग्रेसने केलेला हा डाव त्यांच्या अंगलट आला. मोदींची प्रतिमा डागाळून भाजपला बदनाम करायचा केलेला काँग्रेसचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि काँग्रेसनेच निर्माण केलेल्या या भस्मासूराने काँग्रेसच्याच डोक्यावर हात ठेवला. हाच आहे नेमका इतिहास. ही काँग्रेसची जुनीच खोड आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर प्रजासत्ताकाची निर्मिती झाल्यानंतर या देशात कितीतरी विद्वान लोक होऊन गेले. त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी नवे कोणीतरी उभे करायचे ही काँग्रेसची नेहरुंपासून चालत आलेली परंपरा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाला थोपवण्यासाठी भारतीय जनसंघाला मोठे करण्याचे काम काँग्रेसनेच केले होते. या जनसंघाचा नंतर जनता पक्ष, त्यानंतर भारतीय जनता पक्ष झाला. तो डोईजड झाल्यावर त्यांच्यात फूट पाडून आपली सत्ता कायम राखण्याच्या नादात भाजपतील मोदी शहा गट मोठा होत गेला. काँग्रेसनेच मोठे केलेल्या या शक्तीला रोखणे आता शक्य नसल्यामुळे आता गळा काढण्याचे काम काँग्रेस करत आहे.काँग्रेसची ही परंपरा आहेच. पंजाबमध्ये १९७३ ला आनंदपूरसाहिब प्रस्ताव पारीत झाला होता. याप्रमाणे पंजाबला स्वतंत्र स्वायत्त राज्याचा दर्जा देण्याबाबत अनेक मागण्या होत्या. यातून शीखांची एक शक्ती निर्माण करून भिद्रनवाले नामक भूत उभे करण्याचे काम इंदिरा गांधींनी केले होते. पण हे भूतही इतके भयानक झाले की १९८० च्या दशकात शीख अतिरेकी हा नवा विचार निर्माण झाला. त्याला खतपाणी घालून काँग्रेसने शीख समाजात, हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम केले. शीखांना बदनाम केले आणि इंदिरा गांधीच्या मृत्यूलाही तेच कारण ठरले. या पापाचे क्षालन करण्यासाठी शीख पंतप्रधान देण्याचे काम काँग्रेसने केले असले तरी यामागे एका शक्तीला रोखण्यासाठी दुसºयाची निर्मिती करण्याची ही काँग्रेसची परंपरा आहे. ज्याप्रमाणे काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहीया यांचे खच्चीकरण केले त्याचप्रमाणे भाजप डोईजड झाल्यावर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांची वाटचाल रोखण्यासाठी मोदींना मोठे करण्याचा उद्योग केला. आज म्हणूनच काँग्रेसला वाजपेयी आणि अडवाणींची आठवण येऊ लागली आहे. राहुल गांधी सर्वात प्रथम वाजपेयींची भेट घ्यायला हॉस्पिटलला गेले, अडवाणींना आधारासाठी हात दिला हे करण्यामागे काँग्रेसचा हेतु या नेत्यांच्या आदरापेक्षा आता मोदींना छोटे दाखवण्याची ही केवीलवाणी धडपड आहे. पण ते काँग्रेसला इतक्या सहजासहजी शक्य होईल् असे वाटत नाही.
रविवार, १५ जुलै, २०१८
मोदींना मोठे कोणी केले?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा