शनिवार, १४ जुलै, २०१८

भिंतींनाही असते भूक संगीताची

संगीत हा निसर्गाचा एक गुण आहे. निसर्गातील घटकांमधूनच तर निर्माण झालेले आहे संगीत. माणसाने ते विकसित केले आणि त्याचे प्रकार निर्माण केले. पण संगीत हा माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच आपल्या गृहसजावटीत किंवा गृहरचनेत संगीताचे स्थान योग्य ठिकाणी असले पाहिजे. कारण घरातल्या भिंतींनाही असते संगीताची भूक.काही आवाज हे माणसाला त्रासदायक असतात, वेदनादायक आणि मनात भीती निर्माण करणारे असतात. अशा वेळी मनातील या सर्व दोषांना, विकारांना दूर करण्यासाठी घरातील एक विशिष्ट जागा ही संगीताचे सूर निर्माण करणारी असली पाहिजे. संगीताने घराची वास्तू आनंदी राहण्यास मदत होते आणि घरातला एकाकीपणा नाहीसा होतो. घरातील वातावरण आनंदी बनते, घरात चैतन्य निर्माण होते.गेल्या काही दशकांत विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरातील माणसे यांत्रिक झालेली आहेत. त्यात घरातील हरवत चाललेला संवाद हा घरातील वातावरणात कुंद वातावरण निर्माण करतो, औदासिन्य निर्माण करतो. वाढत चाललेले आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी घरातील वातावरण संगीतमय होणे गरजेचे होते. पूर्वीच्या काळात रेडिओच्या संगीतमय कार्यक्रमांबरोबर माणसाची दिनचर्या सुरू व्हायची. माणसे आनंदी असायची. अगदी पहाटेच्या भक्तिगीतांपासून ते बातम्यांपर्यंत, आपली आवड, कामगार सभा आणि विविध भारतीवरील गाणी ऐकत कुटुंबातील सदस्यांना एकत्र ठेवत आपली कामे आटोपली जायची. आज टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्सचा जमाना असल्यामुळे एकाच कुटुंबात असूनही माणसे एकटी एकटी पडलेली दिसतात. हे वातावरण असताना घरातल्या भिंतीपण निस्तेज होतात. कारण घरातील वास्तूलाही घरातील माणसांचे संवाद, बोल, वादावादी, भांडणे यांबरोबरच शुभंकरोती ते अंगाई गीतापर्यंतची गीते ऐकण्याची भूक असते. त्या ध्वनी लहरी आपल्या वास्तूला नेहमीच सुखावत असतात. म्हणूनच घराच्या रचनेत आपल्याकडे म्युझिक सिस्टीम, जुन्या पद्धतीचा ग्रामोफोन, रेडिओ, रेकॉर्ड प्लेअर, यांची छान मांडणी करावी. त्याची देखभाल करावी. या वस्तू टाकाऊ झाल्या आहेत, असे न समजता त्याचा वापर करावा. घरातील वातावरण प्रसन्न होत जाते. सकाळी ६ वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होणारी मंगलधून अर्थात बिस्मिला खान यांची सनई ऐकून ते घर आणि घराच्या भिंतीच नाहीत तर सर्वाचेच मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही.या निसर्गानेच संगीत निर्माण केलेले आहे. आपल्याकडे संगीतातील पहिले वाद्य म्हणून बासरीकडे पाहिले जाते. श्रीकृष्णाच्या हातात ती बासरी असते. या बासरी किंवा पाव्याचा शोध जंगलातील वा-याचा प्रवाह वेळूच्या बनातून वाहताना जे सप्तसूर उमटले त्यातून लागला आहे. कोकिळेची कुहकुहू जेव्हा आपण सकाळच्या वेळी ऐकतो तेव्हा मन प्रसन्न होते. आजकाल आपली घरे गर्दीच्या ठिकाणी असतात. आसपासचे अनेक त्रासदायक आपल्याला ऐकावे लागतात. त्याने मन खराब होत जाते. त्यासाठी आपल्या वास्तूत संगीतातून सकारात्मक वातावरण तयार करणारा एक कोपरा असला पाहिजे, हे लक्षात घेतले पाहिजे. रस्त्यावरच्या ट्रॅफिकचे कर्कश आवाज, आसपासचे ऐकू नयेत ते आवाज, यामुळे निर्माण होणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी घरात विविध प्रकारचे संगीत लावले गेले पाहिजे. यासाठी आपल्याकडे भजन, कीर्तन, शुभंकरोती, आरती करण्याची प्रथा आहे. आता देवापुढे इतका वेळ घालवणे शक्य नसले तरी विविध प्रकारच्या धून आणि छानसे संगीत लावून आपल्या घरांच्या भितींना तृप्त करा. भिंतींना कान असतात. पण ते आपल्या फायद्याचे असतात. भिंतीपलीकडच्या कानांमुळे निर्माण होणारा ताण दूर करण्यासाठी आपल्या भिंतींची संगीताची भूक भागवा आणि वास्तू प्रसन्न ठेवा.घरामध्ये किमान झांजा असतात, घंटा असते त्यांची योग्य मांडणी, आपल्या घरात पूर्वी कधी असलेली पेटी, तबला, तंबोरा अशी विविध तालवाद्य, चर्मवाद्य, तार किंवा तंतुवाद्य यांना अडगळीत टाकून न देता घराच्या इंटेरिअर डेकोरेशनसाठी त्याचा अँटीक पिस म्हणून वापर करा आणि घराचे सूर चांगले निर्माण करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: