शुक्रवार, २७ जुलै, २०१८

अराजकतेच्या दिशेने पाकिस्तान

पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाने सर्वाधिक जागा पटकावून आघाडी घेतल्याने सत्तापालट निश्चित मानला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानची पुढची सूत्रे इम्रान खान यांच्या हातात जाणार हे स्पष्ट आहे.पाकिस्तानच्या संसदेत एकूण ३४२ पैकी २७२ जागांसाठी झालेल्या मतदानात इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक ११३ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या मुस्लीम लीग-एन पक्षाला अवघ्या ६४ जागा मिळाल्याने शरीफ यांना मोठा धक्का बसला आहे, तर बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला ४३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. एमक्यूएमला ५ आणि एमएमएला अवघ्या ९ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत पाकिस्तानी जनतेने अनेक दिग्गजांना घरचा रस्ता दाखवला आहे. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड, दहशतवादी हाफीज सईदलाही पाकिस्तानी जनतेने सपशेल नाकारले आहे. त्याच्या अल्लाह-ओ-अकबर पक्षाने २५६ उमेदवार उभे केले होते, मात्र पाकिस्तानच्या जनतेने या उमेदवारांना सपशेल नाकारले. माजी क्रिकेटपटू, उच्चविद्याविभूषित नेते व भारतीय उपखंडात प्लेबॉय अशी प्रतिमा असलेल्या इम्रान खान यांची राजकीय भूमिका प्रत्यक्षात कट्टरतावादी असल्याने त्यांच्या हाती पाकची सत्ता येणे हे भारतासाठी धोकादायक मानले जात आहे. इम्रान पंतप्रधान झाल्यास काश्मीर प्रश्न अधिक चिघळण्याची व भारतातील दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळेच भारताला धोका असला तरी पाकिस्तानची अवस्था आणखी अराजकतेच्या दिशेने जाणारी आहे. ज्या पद्धतीने इम्रान खानची पंतप्रधान होण्याची धडपड सुरू आहे त्याचा अर्थच वाईट शक्तींशी हातमिळवणी करून आणि भारत द्वेषातून पाकिस्तानात सत्ता स्थापनेचा चंग त्याने बांधलेला आहे. तशी पाकिस्तानची ती परंपराच आहे. खून, फाशी आणि पलायन करायला भाग पाडणे, सत्तेसाठी लष्कराची मदत घेणे आणि दहशतवादाला जवळ करून भारत द्वेषातून, पाकिस्तानातील तरुणांची माथी भडकवून सत्ता मिळवणे ही पाकिस्तानची परंपराच आहे. आता त्याच मैदानात बॅटिंग आणि बॉलिंग करून आपले राजकीय कौशल्य सिद्ध करण्यास इम्रान खान राजकारणाच्या रणांगणात उतरला आहे. पण हा राजकीय डाव म्हणजे क्रिकेटचा खेळ नव्हे, एकदा हरला तर पुन्हा जिंकायला मिळेल. पाकिस्तानात पराभूत आणि माजी पंतप्रधानांची काय अवस्था असते हे त्याने इतिहासात डोकावून पाहिले तर भविष्यात त्याच्याही बाबतीत तशीच अवस्था असेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. याचे कारण इम्रान खानमुळे जे वादळ, अराजकता येऊ शकते ते फार भयानक असेल. कदाचित आशिया खंडात युद्धासारख्या घटना घडू शकतात. नवाज शरीफ, जनरल परवेझ मुशर्रफ, बेनझीर भुट्टो, झुल्फीखार अली भुट्टो यांची जी अवस्था झाली तीच किंवा त्यापेक्षा भयानक अवस्था भविष्यात इम्रानची होईल, असा अंदाज आताच बांधला जात आहे. खुद्द पाकिस्तानातील उदारमतवादी वर्तुळातच इम्रान खान यांचा सत्ताकाळ भारत-पाकिस्तान संबंधांसाठी मारक ठरू शकतो, अशी चर्चा आहे. भारतद्वेषातून त्याला काहीच साध्य करता येणार नाही आणि तोच इम्रान खानचा आत्मघात असेल. पण आजची पाकिस्तानची आर्थिक अवस्था, तेथील अंदाधुंद परिस्थिती पाहता ती झाकण्यासाठी इम्रान भारतद्वेष, दहशतवाद आणि काश्मीर प्रश्न चिघळवणे याच मार्गाचा अवलंब करणार यात शंकाच नाही. नवाज शरीफ यांना पदच्युत करून इम्रान खान यांना सत्तेवर आणण्यात पाकिस्तानी लष्कराचा मोठा वाटा असल्याचे आधीपासूनच बोलले जात होते. निवडणूक प्रचार काळात इम्रान यांनी घेतलेल्या भूमिका या संशयाला बळकटी देणा-या ठरल्या. पाकिस्तानात लोकशाही प्रस्थापित करण्यापेक्षा, लष्करी ताकदीवर दहशत माजवणे यालाच इम्रान खानचे प्राधान्य असेल. त्याचा एक भाग म्हणून भारतद्वेषाचे राजकारण करून अशांतता माजवण्यास त्याचे प्राधान्य राहील. काश्मीरमधील हिंसाचाराला भारतच जबाबदार आहे, अशी इम्रान यांची भूमिका आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी ही भूमिका जोरकसपणे मांडली होती. प्रतिस्पर्धी नवाझ शरीफ हे भारतधार्जिणे असल्याचा ठपका इम्रान खानने ठेवला होता. नवाज शरीफ हे मोदींचे लाडके आहेत. मात्र, पाकिस्तानी लष्कराचा ते तिरस्कार करतात, अशी वक्तव्ये करून नवाज शरीफ यांना देशद्रोही ठरविण्याचा कुटिल डाव इम्रान खानने केला होता. त्यात तो यशस्वी झाला असला तरी यामध्ये पाकिस्तानचा सर्वनाश करण्याची तयारी सुरू आहे हेच यातून दिसते. या निवडणुकीत नवाज जरीफ यांना बदनाम करून स्वत:चे स्तोम माजवणे याकडेच इम्रान खानने लक्ष केंद्रित केले होते. त्याचा परिणाम लष्कराला जवळ करून लष्करी बळावर पंतप्रधान होण्याचे इम्रान खानचे मनसुबे सत्यात उतरताना दिसत आहेत. नवाज शरीफ यांचे भारतप्रेम दाखविताना इम्रान खानने शक्ती पणाला लावली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची ढासळत चाललेली प्रतिमा, पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा अमेरिकेपुढे येणे, त्याचवेळी भारताची प्रतिमा उंचावणे यामुळे पाकिस्तान चिंतेत आहे. साहजिकच आपली प्रतिमा उंचावण्यापेक्षा ज्यांची चांगली प्रतिमा आहे त्यांना बदनाम करणे हा इम्रान खानचा डाव असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दहशतवादाचे जाळे जगभर पसरण्यास मदत होऊ शकते. आज पाकिस्तानशी कोणीच सलोख्याचे संबंध ठेऊ इच्छित नाही. पाकिस्तानचे क्रिकेटमधील अस्तित्व धोक्यात आले आहे. कोणताही देश पाकिस्तानात क्रिकेट मालिका खेळण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत इम्रान खानकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा असताना, खिलाडूपणाची अपेक्षा असताना आणि एकेकाळचे क्रिकेटमधील आपण विश्वविजेते असताना ते सोनेरी दिवस परत आणण्याचे सोडून सत्तेची नशा त्याच्या डोक्यात घुसली आहे. त्यामुळे त्याची कारकीर्द अशांतता माजवणारी असेल. इम्रान खान हा पाकमधील कट्टरतावादी गटांची कायम पाठराखण करत आला आहे. २०१३ साली अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबानचा कमांडर वली-उर-रेहमान मारला गेला होता. त्यानंतर इम्रान खान यांनी त्याला शांती समर्थक या किताबाने गौरवले होते. इम्रान यांच्या या भूमिकांमुळे पाकच्या उदारमतवादी वर्तुळात त्यांना तालिबान खान या नावानेच ओळखले जाते. इम्रान यांच्या कार्यकाळात पाकमधील कट्टरपंथी शिरजोर होण्याची भीती आहे. तसे झाल्यास दहशतवाद्यांचा भारतातील उपद्रव वाढण्याचीही शक्यता आहे. इम्रानसारख्या कडव्या व्यक्तीकडे येणारी पाकिस्तानची सूत्रे भारतासाठी धोकादायक आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: