मंगळवार, १० जुलै, २०१८

पर्यटनस्थळांवरील सुरक्षितता वा-यावर

गेल्या काही वर्षापासून पावसाळी पर्यटनाचे आकर्षण फार वाढले आहे. तसे ते पूर्वीपासूनच असले तरी वर्षा सहल किंवा पावसाळी सहलीचे रूपांतर पावसाळी पर्यटनात झाले आणि पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता आला पाहिजे पण हा आनंद घेताना कधी कधी इतका अतिरेक होतो की त्यामुळे आनंदावर विरजण पडण्याचा प्रकार होतो.अति उत्साहाच्या भरात कधी कधी अघोरी धाडस केले जाते, ज्याला गाढवी धाडस असेच म्हणावे लागेल. त्यामुळे होणारे अपघात आणि सुरक्षा यांचे प्रमाण फार वाढले आहे. युवकांमध्ये नवनवे डोंगरातील धबधबे शोधून काढायचे आणि तिथे मजा करायला जायचे प्रमाण खूप वाढले आहे. जे पूर्वीचे प्रस्थापित धबधबे आहेत त्या ठिकाणी तर कितीही बंदोबस्त असला तरी सुरक्षेचा बो-या वाजलेला असतोच. त्यात नवनवे धबधबे शोधून काढण्यामुळे सुरक्षायंत्रणेलाही त्याची माहिती नसते. एखादा अपघात झाल्यानंतरच त्या ठिकाणाची माहिती होते. त्यामुळे अशा पर्यटनस्थळांची सुरक्षा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे अशा ठिकाणी जे मोकाट सुटण्याचे प्रकार चालतात त्याला आवर घालणेही पोलिसांच्या आवाक्याबाहेरचे झालेले आहे. पाच-पंचवीस जणांचे टोळके घेऊन यायचे आणि त्यात आपण कसे शूर आहोत, आपण कसे वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी काहीतरी अचाट साहस करायचे. त्यात अपघात आणि मृत्यूला आमंत्रण द्यायचे. हे प्रकार कोणी नियंत्रित करायचे? अशा पावसाळी पर्यटनाला गेल्यावर भान ठेवणे फार महत्त्वाचे आहे. त्या निसर्गाचे सौंदर्य पाहा. ते धबधब्यावरून लांबवर उडणारे तुषार पाहा. त्याचा येणारा आवाज कसा कानाला सुखावतो त्याचा आनंद घ्या. पाचही ज्ञानेंद्रिये कशी या ठिकाणी सुखावता येतील हे पाहा. पण तसे न राहता ज्ञान गहाण टाकून अक्कल घोडय़ापुढे धावत असल्यासारखे काहीतरी अचाट अफाट साहस करायचे आणि अपघाताला आमंत्रण द्यायचे हे प्रकार चांगले नाहीत. पाण्याशी आणि आगीशी कधी मस्ती करू नये असे आपल्याकडे पूर्वापार सांगितले आहे. पण हे ऐकायचे नसेल तर त्याचा झटका बसल्याशिवाय राहणार नाही. धबधब्यांना वाटेल तसे अव्याहतपणे ओसांडू देत, पण स्वत:ला मात्र बांध घालता आले पाहिजे. आग आणि पाण्यापासून किती दूर राहायचे हे समजले पाहिजे. बरे अशा अपघातात सापडणारी माणसे ही काही लहान नसतात. चांगली कळती-सवरती असतात. तरीही हे भान का सुटते हे न समजणारे आहे. त्यामुळे अशा पर्यटनस्थळांची धोकादायक पर्यटनस्थळ, बळी घेणारे पर्यटनस्थळ अशी बदनामी होते. पाण्याला आस लागली, पाण्याला ओढ लागली, दरवर्षी बळी लागतोच असल्या दंतकथा सुरू होऊन अंधo्रद्धांचे पेव फुटते. हे प्रकार थांबले पाहिजेत. महाराष्ट्रातील काही नामांकित धबधबे, पाणस्थळे यांची सुरक्षितता चांगली आहे; परंतु तरीही तिथे डोळय़ांसमोर बळी जाताना पोलिसांना पाहावे लागते. ठोसेघरच्या धबधब्याच्या वरच्या भागात पाय बुडवायला अनेक जण जातात. अनेकजण त्यात उतरतात. पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की डोळय़ांचे पाते लवते न लवते तोपर्यंत कोण वाहून जाते समजत नाही. तिथे रेलिंग केलेले आहे, आत उतरू नये असे सांगितलेले असले तरी लोक उतरतात यासारखा मूर्खपणा तो काय? एक वाहू लागला की त्याला वाचवण्यासाठी गेलेलाही त्यात वाहून जातो. मग दोन- दोन दिवस मृतदेह सापडत नाहीत. पोलीस बंदोबस्त असूनही तिथे बळी जातात. महाबळेश्वरच्या लिंगमळा धबधब्यावर असेच अनेकजण जातात. तिथेही अनेक बळी गेलेले आहेत. मालशेज घाटातील धबधबा हा पण पर्यटकांना खुणावत असतो. इथे पोलीस बंदोबस्त असतो; परंतु काही धबधबे नव्याने उदयाला आले आहेत, तिथे पर्यटकांच्या अतिरेकी वागण्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तर काही ठिकाणी अजून अपघात झालेला नसला तरी वातावरण इतके भयानक झाले आहे की, केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. खारघरजवळचा पांडवकडा हा धबधबा हा असाच असुरक्षित आहे. पोलिसांनी तिथे जाण्यावर बंदी घातलेली असली तरी चोरवाटांनी पर्यटक तिथे पोहोचतात. कर्जतजवळचा आषाणे हा धबधबा अत्यंत स्वैराचाराचा धबधबा आहे. म्हणजे या भागात अजून भिवपुरी आणि पळसदारीचा धबधबाही आहे.पण गेल्या काही वर्षात या आषाणे धबधब्यावरचे प्रकार हे फार भयानक आहेत. एक तर हा धबधबा मुख्य रस्त्यापासून खूप आत असल्यामुळे वाहन पार्क केल्यावर खूप आत चालावे लागते. त्यामुळे पोलिसांची गाडी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. इथे आतपर्यंत कोप-या-कोप-यांवर दारू, बिअर विक्री करणारी दुकाने वजा टप-या दिसतात. नशेत धूम्रपान करत या धबधब्यावर दंगा करायला तरुणाई उतरलेली असते. मग पाय घसरेल त्यात नवल ते काय? अपघात होणारच. अशाप्रकारे नव्याने विकसित झालेले धबधबे आणि पावसाळी पर्यटनस्थळे ही असुरक्षित झालेली आहेत. गेला आठवडाभर मुंबई आणि परिसरात जोरदाप पाऊस आहे. या पावसात भिजायला आणि मजा करायला जाणारे रसिकही काही कमी नाहीत. वसईजवळच्या एका धबधब्यावर दोन दिवसांपूर्वी ४० पेक्षा जास्त पर्यटक अडकून पडले होते. यात एकाला जीवही गमवावा लागला. हे असले धाडस करण्याचे कारण काय हे न समजणारे आहे. भरतीच्या वेळी उसळणा-या लाटा पाहायला मरिन ड्राइव्हवरही अनेकजण भर पावसात येत असतात. तेव्हा समुद्रकिना-यावरील त्या कठडय़ावर उभे राहून अनेकजण भलतेच साहस करत असतात. हे सगळे पावसाळी आनंदाचा विचका करणारे प्रकार असतात. पावसाच्या पाण्यात, थंड झालेले असताना मस्तपैकी चहा, गरम भजी किंवा मक्याच्या कणसाचा भुट्टा खायचे सोडून हातात बिअरची बाटली आणि सिगारेट पकडून नशा करण्याचे प्रकार म्हणजे भिकेचे डोहाळेच म्हणावे लागेल. काय गरज आहे अशा अघोरी साहसाची? काही दिवसांपूूवी त्या खोपोलीच्या एक्स्प्रेस हायवेवरील दोन पुलांवरून उडी मारण्याचा प्रकार करताना एकाने जीव गमावला होता. ही सुरक्षितता वा-यावर आहे. ती पोलीस तरी कशी रोखू शकणार आहेत? प्रत्येकाने या ठिकाणी जबाबदारीने वागून सर्वानाच आनंद द्यावा. नाहीतर समोर पावसाच्या पाण्यात डोळय़ांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: