महामार्गावर आपण वाहतुकीचे जे नियम वाचतो, त्यामध्ये एक वाक्य नेहमी वाचतो. ते म्हणजे, ‘नजर हटी, दुर्घटना घटी।’ प्रत्येक घाटात, धोक्याच्या ठिकाणी वाहतूक सुरक्षेचे सूचना फलक असतात. पण, ते वाचले, तरच आपण वाचणार आहोत, हे कोण ध्यानात घेणार? शनिवारी महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात झालेला बस अपघात हा असाच ‘नजर हटी दुर्घटना घटी।’ अशा प्रकारातला आहे. त्यामुळे वाहन चालवताना चालकांनी किती सजग असले पाहिजे, हे लक्षात घेतले पाहिजे. दापोलीच्या कृषी विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सहलीची बस तब्बल ५०० फूट खोल दरीत कोसळून ३३ जण ठार झाले. रविवारी दुपापर्यंत हे दरीतील मृतदेह काढण्याचे काम सुरूच होते. तब्बल २६ तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर पोलादपूरच्या आंबेनळी घाटातील शोधकार्य थांबले. ट्रेकर्स आणि एनडीआरएफच्या टीमने ३३ पैकी ३० जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. या ३० जणांची ओळख पटली असून, इतर तीनजणांचा अद्यापही शोध लागलेला नाही. घाटात या तिघांशी संबंधित कोणताही सुगावा न लागल्याने अखेर या बचाव पथकाने त्यांचे शोधकार्य थांबवले आहे. इतकी भयानक घटना घडली कशी, तर केवळ नजर हटल्यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे वाहन चालवताना चालकाला बेसावध करण्याचा, त्याला व्यत्यय येईल असा प्रकार करण्याचा प्रयत्न होता कामा नये, हे पुन्हा एकदा सांगावे लागेल. ओव्हर कॉन्फीडन्सने वाहन चालवण्यात अनेकवेळा चालक आपल्या प्रवाशांवर इंप्रेशन पाडण्याचा प्रयत्न करतात.पण, त्याचवेळी स्वत:बरोबर इतरांचाही जीव ते धोक्यात घालत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. शनिवारी सकाळी १०च्या सुमारास आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी-प्राध्यापकांची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३३ जण ठार झाले होते. या अपघातातून केवळ एकच जण बचावला आहे. या बचावलेल्या प्रकाश सावंत यांच्याकडून सत्य समोर आल्यावर कोणालाही धक्का बसेल. कारण, अशा चुका अनेकजण करत असतात. या अपघातावरून एक लक्षात येते की, अतिउत्साहाच्या भरात सुस्थितीत नसलेली गाडी घेऊन जाण्यामुळेही अपघात घडला असावा. त्याचप्रमाणे चालकाचा अति आत्मविश्वास आणि वाहन चालवताना वाहनावर लक्ष केंद्रित न करता, ते लक्ष प्रवाशांच्या गप्पागोष्टी आणि हास्यविनोदात सामील होण्यामुळे हा प्रकार घडलेला दिसून येतो. या अपघाताचे फोटो पाहिल्यावर हे दिसते की, बसचे टायर पूर्णपणे गुळगुळीत झालेले आहेत. म्हणजे कोणतीही ट्रिप प्लॅन करताना गाडीची कंडिशन आणि ड्रायव्हर या गोष्टी पण पाहणे गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडला आहे. त्याचप्रमाणे ऐनवेळी घेतलेला शॉर्टकट या सहलीला महागात पडला, की ३३ मृतांची कुटुंबे आज अडचणीत सापडली आहेत. वास्तविक दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी दरवर्षी पिकनिकला जातात. शनिवारीही हे कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. हे कर्मचारी पोलादपूर ते महाबळेश्वर असा प्रवास करत होते. रायगड जिल्ह्यातून जाणारा हा शॉर्टकट त्यांनी प्रवासासाठी निवडला होता आणि हाच शॉर्टकट त्यांच्या जीवावर बेतल्याचे सांगण्यात येते आहे.विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झाला, तो परिसर अपघात प्रवणक्षेत्रात येत नाही. तरीही हा अपघात झाला. यात वाचलेले प्रकाश सावंत सांगतात की, आम्ही हास्यविनोद करत चाललो होतो. एका विनोदावर चालक जोरात हसला आणि त्याने मागे वळून पाहिले आणि त्याच क्षणी गाडीवरचा ताबा सुटला आणि अपघात घडला. म्हणजे चालकाला वाहन चालवताना प्रवाशांनी कधीही डिस्टर्ब करायचे नसते ते यासाठी. वाहन चालवताना चालकाशी बोलू नये हे साधे नियम असतात. पूर्वी राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये ड्रायव्हरच्या केबिनच्या पाठीमागे सूचना लिहिलेली असायची. गाडी चालवत असताना, चालकाशी कोणीही बोलू नये. चालकाला त्रास होईल एवढय़ा आवाजात गोंगाट करू नये. आजकाल एसटीतील हे नियमही दिसेनासे झाले आहेत. बहुतेक एसटीबस चालक हे वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना दिसतात. त्यामुळेच वाहन चालवताना चालकाचे भान असणे फार महत्त्वाचे असते. विनोदावर हसताना मान वळली आणि नजर हटली, त्यामुळे बस थेट दरीत कोसळली. वाहतुकीच्या नियमांचे पालन केले गेले नाही. आजकाल ओव्हरकॉन्फीडन्समध्ये गाडी चालवण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. माझा गाडीवर कन्ट्रोल आहे, हे दाखवण्यासाठी प्रसंगी अनेकजण नको इतके धाडस करतात. यातच अपघात घडतात हे लक्षात घेतले पाहिजे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे हे फार धोकादायक आहे. आज हा अपघात खासगी बसला झाला.पण, जर हाच अपघात राज्य परिवहन मंडळाच्या बसला झाला असता, तर फार मोठी टीका झाली असती. चौकशा झाल्या असत्या. पण, एसटीचे चालकही ब-याचवेळा असा धोका पत्करत असतात. सध्या ज्या एसटीच्या बसेस आहेत, त्यामध्ये निमआराम किंवा अगदी परिवर्तनच्या बसमध्येही ड्रायव्हरच्या केबिनमध्ये असलेल्या सिटवर वाहक न बसता ती प्रवाशांना दिली जाते आणि वाहक दरवाजातल्या सीटवर बसतो. ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसून जाणारे अतिउत्साही असतात. त्या सिटवर बसताना डाव्या बाजूचा आरसा ड्रायव्हरला दिसेल असे बसावे लागते. पण, ती व्यक्ती कशीही बसते आणि ड्रायव्हर वैतागतो. कधीकधी तिथे बसवले जाणारे प्रवासी ड्रायव्हरशी खूप गप्पा मारतात. फोनवरच्या गमतीजमती सांगतात. हे प्रकार सर्रास बघायला मिळतात. त्यामुळे ड्रायव्हरला डिस्टर्ब होणार नाही, याची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी ती जागा महामंडळाने आरक्षण करणे बंद करावे. खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्येही ड्रायव्हरबरोबरच क्लीनर आणि सीट गोळा करणारे एक-दोन कर्मचारी असतात. ते ड्रायव्हरच्या इतके जवळ बसतात आणि गप्पा सुरू असतात की, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटू शकते. त्यामुळे वाहन चालवताना चालकाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, त्याच्या कामात व्यत्यय येणार नाही आणि त्याची नजर गाडीवरून दुसरीकडे वळणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा