संधी मिळेल तिथे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कृती करणे आणि सरकारमध्ये राहुनच टीका करणे ही शिवसेनेची प्रवृत्ती इतकी विकोपाला गेली आहे की त्यातून शिवसेनेने दुष्टपणा सुरू केल्याचे आता महाराष्टÑ पाहतो आहे. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला पोटनिवडणुकीत अपयश आले म्हणून प्रत्येक पोटनिवडणुकीत भाजप हरणार या विचाराने शिवसेनेने पालघरची पोटनिवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे. पण यात भाजपचे काहीच नुकसान होत नसून शिवसेना मात्र मतदारांच्या आणि महाराष्टÑातील जनतेच्या मनातून पुरती उतरत आहे हे दिसत आहे. इसापनीतीतली एक गोष्ट साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी राजकीय नेते आपल्या भाषणात सांगायचे. एक राजा शिकारीला बाहेर पडतो. सोबत त्याचा प्रधान असतो. गावाच्या वेशीबाहेर गेल्यावर तिथे गाढवांना घेऊन चरत बसलेला कुंभार त्यांना अडवतो. ‘महाराज कुठे चालले तुम्ही या वक्ताला?’ म्हणून चौकशी करतो, तेंव्हा राजा हसतो. प्रधान सांगतो, ‘महाराज शिकारीला चालले आहेत.’ तेव्हा तो कुंभार म्हणतो, ‘महाराज जाऊ नका.. लवकरच सोसाट्याचा वारा येईल आणि पाऊसही कोसळण्याची शक्यता आहे.’ तेंव्हा महाराज खळखळून हसतात आणि म्हणतात, ‘तू काळजी करू नकोस. आमच्या हवामान खात्यांच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच बाहेर पडलो आहे. आज कुठेही पाऊस पडणार नाही हे सांगितल्यानेच आम्ही शिकारीला चाललो आहे.’ कुंभार गप्प राहतो. राजा प्रधानाचे घोडे पुढे जातात. जंगलात जेमतेम पोहोचतात आणि एकदम सगळीकडून काळवंडल्यासारखे वातावरण तयार होते. वारे वाहू लागते. पाहता पाहता जोरदार वादळी पाऊस सुरु होतो. राजा प्रधानाला एका झाडाच्या आडोशाला बसावे लागते. वीजांचा कडकडाट होत असल्यामुळे झाडावर वीज पडली तर काय होईल या चिंतेने दोघे व्याकूळ होतात. जरा जोर कमी झाल्यावर काही काळानंतर पुन्हा राज्याच्या दिशेने निघतात. दुसºया दिवशी राजा सगळ्या मंत्र्यांना बोलावून दरबारात झापतो. तुमच्या खात्याच्या अहवालामुळे आम्ही बाहेर पडलो. हे हवामानखाते मुख्य मंत्र्याकडे असते. ते दिलगीरी व्यक्त करतात. पण राजाचे समाधान होत नाही. राजा म्हणतो, त्या कुंभाराला आधी बोलवा. सगळे चूप होतात. कुभार राजवाड्यात हजर होतो. राजाने असे बोलावले म्हणजे शिक्षा करणार असे वाटते. तो गयावया करायला लागतो. पण राजा त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो,‘तू कालच्या पावसाचा अंदाज अचूक वर्तवला होतास. म्हणून तुला आता मुख्यमंत्री करायचे ठरवले आहे. आम्हाला वेळोवेळी हवा कशी बदलती आहे याचे सल्ले तू द्यायचे.’ कुंभार ओशाळतो आणि म्हणतो, ‘महाराज आपल्याला त्यातलं कायबी कळत नाही. पाऊस येणार असला की माझं गाढव मला तसा इशारा देते. म्हणून मी बोललो.’ राजा खूष होऊन बघतो आणि म्हणतो, ‘ठिक आहे. मग त्या तुझ्या गाढवालाच आता मुख्यमंत्री करुया.’ अन त्या गाढवाची नेमणूक झाली. तेंव्हापासून राज्यातल्या प्रत्येक गाढवाला मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडू लागले. ही कथा पंचवीस वर्षांपूर्वी खूप गाजली होती. तीच थोड्या फरकाने इथे होताना दिसते आहे. भाजपला पोटनिवडणुकीत यश येत नाही असे कोणीतरी म्हटल्यामुळे आपणच भाजप विरोधात लढून जिंकूया असे स्वप्न शिवसेनेला पडले. पण यात भाजपचे नुकसान काहीच होणार नाही. शिवसेनेचा दुष्टपणाच या कृतीतून अधोरेखीत झालेला आहे. ज्या कै. चिंतामण वानगा यांच्या जागेवर भाजपने त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्याचे टरवले होते त्याच उमेदवाराला पळवून शिवसेनेने आपला खासदार वाढेल असे स्वप्न पाहिले. पण शिवसेना निवडून जरी आली तरी ती राष्टÑीय लोकशाही आघाडीत असल्याने रालोआचे काहीच नुकसान होत नाही. कारण सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत शिवसेनेत नाही. केंद्रात युती असल्याने रालोआला काही फरक पडत नाही. पण शिवसेनेचा हा प्रकार म्हणजे मढ्याच्या टाळूवरचं लोणी ओरबाडून खाण्याचा प्रकार आहे. साधारणपणे पोटनिवडणूक जेंव्हा अनुकंपा प्रकाराने होते म्हणजे एखाद्या सदस्याचे निधनामुळे लागते तेंव्हा त्याच्या वारसांना, कुटुंबियांना संधी मिळाली तर त्या निवडणुकीत सहानुभूतीने त्या उमेदवाराचा विजय निश्चित असतो. अशा निवडणुकीत मतदानाची टक्केवारीही कमीच असते. परंतु एखादा सदस्य दुसरीकडे गेला, दुसरे पद मिळाल्याने जागा रिक्त झाली तर त्या पोटनिवडणुकीत ताकद पणाला लावली जाते. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत आणि पालघरच्या निवडणुकीत हाच फरक आहे. शिवसेनेने नेमकी तीच चूक करून वनगा कुटुंबाचा, मतदारसंघाचाच नव्हे तर महाराष्टÑाचा विश्वास या कृतीतून गमावला आहे. तीन वर्षांपूर्वी महराष्टÑाचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील आबा यांचे निधनानंतर झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सुमनताई पाटील या आबांच्या पत्नींविरोधात उमेदवार दिला नव्हता. आर आर पाटील यांचे मोठेपण मान्य करून आम्ही निवडणुकीत उतरणार नाही असे भाजपने जाहीर केले होते. २०१४ च्या निवडणुकीत आर आर पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवताना अजितराव घोरपडे यांना दुसºया क्रमांकाची मते पडली होती. भाजप स्वबळावर लढत होते. ८६ हजारच्या आसपास मते भाजपला मिळाली होती. शिवसेनेला दोन हजारही मते मिळाली नव्हती. त्यामुळे पोटनिवडणुकीत आबांनंतर भाजपने जोर लावला असता तर ही जागा जिंकणे शक्य होते. पण भाजपने तसे केले नाही. तीच शिवसेना भाजपचा उमेदवार पळवून आपला विजय मिळवण्याचे स्वप्न पाहते आहे. कारण भाजप पोटनिवडणुकीत हारते असा साक्षात्कार शिवसेनेला झालेला आहे. परंतु पोटनिवडणुकीत भंडारा गोदीयाबाबत शिवसेना गप्प आहे. तिथे स्वबळाची भाषा त्यांना सुचलेली नाही. आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आलेल्या शिवसेनेचे हेच मनसुबे यशस्वी होणार नाहीत, कारण यातून शिवसेनेने दुष्टपणा केलेला आहे. ही संधी शिवसेना साधायचा प्रयत्न करत असली तरी शिवसेनेचा संधीसाधूपणा मतदारांनी ओळखलेला असल्यामुळे ती आणखी जनतेच्या मनातून उतरल्याशिवाय राहणार नाही. भाजपच्या उमेदवाराला शिवबंधन बांधून शिवसेना वाढवायचा चाललेला प्रयत्न होत असताना दुसरीकडे शिवबंधन तोडून जाणाºयांची संख्या वाढते आहे असे दिसल्याशिवाय राहणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा