शनिवार, १९ मे, २०१८

आता स्प्रिंगमधला ‘पी’ काढणार का बाहेर?

गेल्या काही वर्षापर्यंत काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष होता. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. काँग्रेस सध्या अस्तित्वासाठी झगडत आहे. त्यामुळे काँग्रेस वाचवण्यासाठी काही नवा एक्का बाहेर काढला जातो का? काँग्रेसच्या स्प्रिंगमधला आता पी बाहेर काढला जातो का, हे आता पाहावे लागेल. बुडायला लागल्यावर महिला शक्तीने काँग्रेसला वाचवले आहे. त्यामुळे इंदिरा, सोनिया आणि आता प्रियांका गांधींकडे महत्त्वाची भूमिका देण्याविषयी काँग्रेस नेते विचार करतात का, हे आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल.काँग्रेसचे नेते हे निष्ठावंत म्हणून गणले जातात. या निष्ठा पक्षाशी निगडित नसून त्या फक्त नेहरू-गांधी या नावाभोवतीच असतात. त्यामुळे लोकशाहीतही काँग्रेसने सरंजामशाहीचाच प्रकार रुजवला. गांधी- नेहरू या नावाव्यतिरिक्त कोणी काँग्रेसचे नेतृत्व करूच नये असा जणू अलिखित करार काँग्रेसच्या निष्ठावान म्हणवल्या जाणा-या नेत्यांनी करून ठेवला आहे. हे लोक इतके कणाहिन आणि गांधी-नेहरू घराणे निष्ठ असतात की त्यांच्या पाठीत मणक्यांऐवजी स्प्रिंग बसवली आहे असेच वाटते. आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण या नेत्यांकडे पाहून किंवा महाराष्ट्राबाहेरच्या दिग्विजयसिंग, कपिल सिब्बल, गुलाम नवी आझाद अशा नेत्यांकडे पाहिले की त्यांना काँग्रेस म्हणजे फक्त गांधी-नेहरू कुळातील व्यक्ती एवढीच माहिती असते. त्यामुळे आता या गांधी-नेहरू गोत्रातला कोण नवा हुकमी एक्का बाहेर काढता येतो आणि काँग्रेसचा तारणहार होतो हे आता पाहावे लागेल.काँग्रेस पक्ष हा जरी सव्वाशे वर्षाची परंपरा सांगत असला तरी आज अस्तित्वात असलेली काँग्रेस ही काही सव्वाशे वर्षाची परंपरा असलेली वाटत नाही. ही इंदिरा काँग्रेसचीच परंपरा आहे. १९७७ ला आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अनेक तुकडे पडले. त्यापैकी काँग्रेस आय किंवा इंदिरा काँग्रेस हा एक महत्त्वाचा तुकडा इंदिरा गांधींनी वाढवला. त्याचे पुनरुज्जीवन करून तीच ही ओरिजनल काँग्रेस म्हणून मूळच्या काँग्रेसचा आभास निर्माण केला गेला. म्हणजे गांधी-नेहरूंची काँग्रेस ही बैलजोडी होती. त्यांच्यानंतर ही बैलजोडी फुटल्यानंतर काँग्रेस ही गाय-वासरू या चिन्हावर आली. तेव्हा इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचा पक्षावर पगडा होता. पण या गाय-वासरालाही जेव्हा १९७७ च्या निवडणुकीत मतदारांनी चारा घातला नाही तेव्हा इंदिरा गांधींनी इंदिरा काँग्रेस नावाचा पक्ष काढून हाताचे चिन्ह आणले. आता थांबा असा इशारा असलेला तो इंदिरा काँग्रेसचा हात तेव्हाच मूळच्या काँग्रेसला थांबवून नव्या प्रवाहात आला होता. पण या बुडीत निघालेल्या काँग्रेसचे पुनरुज्जीवन करणा-या पहिल्या डॅशिंग नेत्या म्हणून इंदिरा गांधींकडे पाहावे लागेल.काँग्रेसला जिवंत ठेवण्यासाठी इंदिरा काँग्रेस असे नामकरण करून गांधी-नेहरू या नावाशिवाय काँग्रेस जिवंत राहू शकत नाही यावर इंदिरा गांधींनी शिक्कामोर्तब केले. काँग्रेसचे नेतृत्व हे कायम या नावाभोवतीच फिरले पाहिजे असा अलिखित नियम तेव्हाच तयार झाला असावा. त्यामुळे काँग्रेसचे नेते हे अत्यंत कणाहीन झाले. पक्षापेक्षा एका घराण्याभोवती पिंगा घालण्यातच त्यांनी कायम धन्यता मानली आहे. ही परंपरा इंदिरा गांधींनी जपली. पक्षामध्ये व्यक्तिमहात्म्याला महत्त्व दिले. व्यक्तिकेंद्रित अशी पक्षाची प्रतिमा निर्माण केली. त्यामुळे साहजिकच अन्य कोणतेही नेतृत्व पक्षात तयार झाले नाही. कोणा एका गांधी नावाच्या व्यक्तीने हुकूम सोडायचा आणि बाकीच्यांनी नंदी बैलाप्रमाणे माना हालवायच्या हेच काँग्रेसचे स्वरूप झाले. त्यामुळे आज १३२ वर्षाची परंपरा सांगणारी काँग्रेस पूर्णपणे नामोहरम होण्याच्या बेतात आहे. भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा टप्पा म्हणून आणीबाणीनंतरचा १९७७ च्या निवडणुका हा टप्पा होता. त्यात नेस्तनाबूत झाल्यानंतर काँग्रेसला वर काढली ती इंदिरा गांधी यांनी. त्यामुळे काँग्रेसमध्ये महिला शक्ती यशस्वी होऊ शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा लाचार आणि खाली मान घालून बोलणारा असा कणाहीन करण्याचे काम इंदिरा गांधींनी केले. त्याच्या कण्यातील हाडांच्या जागी त्यांनी स्प्रिंग बसवली. त्या स्प्रिंगचा योग्य वापर करता आला तो काँग्रेसच्या राजकारणात टिकून राहतो. स्वाभिमान, मान, अपमान असले काही तिथे चालत नाही. अगदी जोडे उचलण्याचीही तयारी असावी लागते. एकदा कणा मोडून काढला आणि पाठीत ही स्प्रिंग बसली की हे सगळे जमते. त्या स्प्रिंगमधला एक वेढा जरा कमकुवत झाल्यामुळे पुढचा पी कधी येणार आणि काँग्रेसचा हा पीळ कधी सुटणार याकडे काँग्रेसचे लक्ष आहे.इंदिरा गांधींच्या हत्येनंतर इंदिरा काँग्रेसची जबाबदारी ही अर्थातच त्यांचे पुत्र राजीव गांधी यांच्याकडे आली. त्यांनी पक्षाध्यक्षपद आणि पंतप्रधानपद ही दोन्ही पदे भूषवून साधारण सात एक वर्ष पक्ष चांगला टिकवला, वाढवला. फक्त धोरण एकच राबवले की आपले कार्यकर्ते, नेते कसे नम्र राहतील. कणाहीन नेत्यांना नम्र, विनयशील अशा सात्त्विक शब्दात गुंफून त्यांनीही प्रत्येकाचा पाठीतला कणा पिरगळून त्या जागी लवचिक अशी स्प्रिंग टाकून ठेवली. या स्प्रिंगच्या हा आर चांगलाच लक्षात राहिला. पण त्यांच्यानंतर मात्र काँग्रेस पुन्हा गलीतगात्र झाली.राजीव गांधींच्या हत्येनंतर पी. व्ही. नरसिंह राव, सीताराम केसरी अशांकडे पंतप्रधानपदाची आणि अध्यक्षपदाची जबाबदारी आली. पण हे दोघेही गांधी- नेहरूंपैकी नसल्याने पाठीच्या कण्यातील स्प्रिंग कुरकुरू लागली. पक्षात गटतट तयार झाले. पक्ष पुन्हा लयाला जाऊ लागला. भारतीय जनता पक्षातील नेते आक्रमक झाले. त्यांनी मोठे आव्हान उभे केले. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज अशा एकापेक्षा एक नेत्यांपुढे काँग्रेस दुबळी दिसू लागली. त्यामुळे आता या काँग्रेसला वाचवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून कणाहीन काँग्रेसचे नम्र नेते विचार करू लागले. विचार करताना त्यांच्या लक्षात आले की गांधी-नेहरू या व्यतिरिक्त आपण विचार करू शकतो हेही नसे थोडके. तरीही पाठ, मान, कंबर एकच झालेले असल्यामुळे या स्प्रिंगशिवाय आपल्याला काहीच अस्तित्व नाही हाच विचार त्यांनी केला. साहजिकच आता हे भारतीय जनता पक्षाचे आव्हान पेलण्यासाठी, काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी आम्ही नेमके काय केले पाहिजे यावर त्यांना उपाय सापडला. युरेका, युरेका करत सगळे काँग्रेस नेते, कार्यकर्ते नाचू लागले. कारण त्यांना आता तारणहार सापडला होता.राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनिया गांधी या भारतात नव्हत्या. राजकारणापासूनही लांब गेल्या होत्या. तशा त्या राजीव गांधी असताना राजकारणात सक्रिय नव्हत्या. फक्त राजीव गांधींची साथ आणि पाठ कधी सोडत नव्हत्या. त्यांच्याबरोबर कायम असायच्या. भारतीयांनाही हे तसे अप्रूपच होते. कारण त्यापूर्वी झालेल्या कोणत्याही पंतप्रधानाला असे जोडीने बघायची वेळ आलेली नव्हती. त्यामुळे जिथे राजीव गांधी आहेत तिथे सोनिया गांधी हमखास बरोबर असायच्या. प्रत्येक कार्यक्रमात असायच्या. हेच त्यांचे योगदान होते. त्या कधी कुठल्या सभेत बोलायच्या नाहीत की भाषणही करत नव्हत्या. पण तरीही राजीव गांधींच्या हत्येनंतर त्या भारताबाहेर गेल्यावर मरगळ आलेल्या काँग्रेस नेत्यांना सोनिया गांधी या तारणहार वाटल्या. कारण त्यांच्या सासुबाई इंदिरा गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीतला कणा काढून इतकी भक्कम न तुटणारी लवचिक स्प्रिंग बसवली होती की त्याशिवाय काँग्रेस असूच शकत नाही इतके महत्त्व सगळय़ांना वाटत होते. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी ‘सोनिया लाओ, देश्ेा बचाओ..’ अशी घोषणा दिली. वास्तविक देश काही संकटात सापडलेला नव्हता. संकटात सापडली होती ती काँग्रेस. पण सोनिया लाओ, काँग्रेस बचाओ अशी हाक देऊन सोनिया गांधींना आणले गेले. यांच्यामध्ये एकही लायक नाही, नेतृत्व करायला योग्य नाही हे लक्षात आल्यावर सोनिया गांधींनी काँग्रेसची सूत्र हाती घेतली. काँग्रेस पुन्हा सक्षम झाली. आठ र्वष प्रचंड परिo्रम घेऊन देश पिंजून काढला. काँग्रेसला पुन्हा सोनियाचे दिवस आले. काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचवले. २००४ ते २०१४ पर्यंत सोनिया गांधींच्या छत्रछायेखाली काँग्रेसची सत्ता दहा र्वष चालली. पण २०१४ ला मात्र फार मोठे वादळ आले आणि त्यात काँग्रेसला झटका बसला.सोनिया गांधींनी आपले पुत्र राहुल गांधी यांना खासदार केले. उपाध्यक्ष केले. त्यांच्याकडे प्रचाराची धुरा दिली. आगामी काळात पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांचा बोलबाला केला. पण काही केल्या राहुल गांधींना यश मिळता मिळत नव्हते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला अपयश आणि अपयशच येत गेले. काँग्रेसची सत्ता असलेली एकेक राज्ये एकापाठोपाठ एक अशी हातातून जाऊ लागली. आता तर शेवटचे पण महत्त्वाचे असलेले कर्नाटक हे सुद्धा गेले. त्यामुळे आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचा विचार आला. कोणी तरी म्हटलेसुद्धा की या पाठीतील कण्याऐवजी टाकलेली स्प्रिंग थोडी ढिली झाली असावी. त्यामुळे या स्प्रिंगचा पी आता बाहेर काढला तर कदाचित पुन्हा काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतील. म्हणजे पहिली पिढी, दुसरी पिढी आणि तिस-या पिढीतल्या एखाद्या स्त्री शक्तीने जर पुढाकार घेतला तर काहीतरी चमत्कार होऊ शकेल. ज्योतिषशास्त्रावर विश्वास असलेल्या काँग्रेसमध्ये आता पुन्हा चैतन्याचे वारे आले. राहुल गांधींना बाजूला सारून आता प्रियांका गांधी-वढेरा यांना राजकारणात आणले तर काँग्रेसला पुन्हा एकदा संजीवनी मिळेल, असे वाटू लागले.पण ही स्प्रिंग नेमकी आहे तरी काय? तर स्प्रिंग म्हणजे, एसपीआरआयएनजी स्प्रिंग. एस फॉर सोनिया, पी फॉर प्रियांका, आर फॉर राजीव, आय फॉर इंदिरा, एन फॉर नेहरू आणि जी फॉर गांधी. यात दोन आर आले. आर फॉर राजीव आणि आर फॉर राहुल. पण आर फॉर राजीव यशस्वी झाल्यामुळे दुसरा आर बाजूला करायला पाहिजे हे कोणाच्या लक्षातच आले नाही. त्यामुळे आता या नवसंजीवनीसाठी स्प्रिंगमधला पी बाहेर काढणार का, असा प्रश्न आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: