बुधवार, १६ मे, २०१८

उच्च रक्तदाब दिन

१७ मे हा दिवस उच्च रक्तदाब दिन म्हणून जगभर पाळला जातो. साधारणपणे कोणताही दिवस हा साजरा केला जातो पण रक्तदाब दिन हा साजरा करता येण्यासारखा नसल्यामुळे तो पाळला जातो असा उल्लेख याठिकाणी करत आहे. आपल्याकडे शारिरीक व्याधींसंदर्भात अनेक दिवस साजरे केले जातात. जागतीक एडस दिन, जागतीक मधुमेह दिन, जागतीक हृदयरोग दिन वगैरे. पण हे दिवस साजरे नाही तर पाळले जातात कारण या दिवशी असे विकार आणि व्याधी आपल्या शरीरात निर्माण होऊ नयेत याची प्रार्थना करायची असते. त्याचप्रमाणे आजचा हा जागतीक रक्तदाब दिन. आजकाल रक्तदाबाचा त्रास माणसाला सातत्याने होत असतोच. कारण प्रत्येकाचे जीवन हे धकाधकीचे, ताणतणावाचे झालेले आहे. त्यामुळे या रक्तदाबाचे वर खाली होणे ही एक जागतिक समस्या होताना दिसते आहे. प्रत्येक गोष्टीत गडबड, घाई, पळापळ यामुळे या रक्तदाबाला सातत्याने माणसाला सामोरे जावे लागते. आजच्या जगात तणाव नाही असा माणूसच सापडणे कठीण झाले आहे. प्रत्येकाला कसली तरी काळजी लागून राहीली आहे, त्याचा तणाव माणसाला सहन करावा लागत आहे. या तणावामुळे रक्तदाबाचा विकार जडताना दिसतो. प्रत्येकाचे काम हे टार्गेट ओरिएंटेड असे झालेले आहे. ते टार्गेट किंवा उद्दीष्ट पूर्ण करण्याचा ताण मनावर आल्यामुळे माणूस सतत तणावपूर्ण वातावरणातच जगताना दिसतो. त्याला मनापासून हसायलाही वेळ नाही. आनदी आणि सुखी समाधानी जीवन नाही अशी अवस्था प्रत्येकाची झालेली आहे. वेळेवर न होणारे पगार, त्यामुळे देणी कशी भागवायची याचा येणारा तणाव हे माणसाला रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरतात. आपल्या हक्कासाठी, आपल्या केलेल्या कामाचा मोबदला मागण्यासाठी आपल्याला वारंवार हेलपाटे घालावे लागतात, पगारपैसा वेळेत मिळत नाही, त्यामुळे कार्यालयीन वातावरण तंग आणि तणावपूर्ण होते. त्याचा परिणाम रक्तदाबाच्या विकारांना बळी पडावे लागते. पगार वेळेत नाहीत तरी देणेकरी थांबू शकत नाहीत. मोबाईल बील, लाईट बील, पाण्याचे बिल, सोसायटीचे बिल, घरभाडे, दुधवाला, राशनवाला, गॅस असे कोणतेही खर्च माणसाला थांबवता येत नाहीत. बसचा, लोकलचा पास आहे, रोजचा खर्च आहे. हे करायचे कसे? पगारच वेळेत होत नसेल तर हे सगळे थांबवता येणे शक्य नसते. त्यामुळे ऋण काढून सण साजरे करावे लागतात, कर्जबाजारी होण्याची वेळ येते. त्याचा सगळा तणाव त्या कर्मचाºयाच्या मनावर राहतो. त्यातून एकेक दिवस जसा पुढे पुढे ढकलला जातो आणि एकेक दिवस जसा आजही पगार नाही हे समजते तसतसा त्या माणसाचा ताणतणाव वाढत जातो. घरी जाऊन कुटुंबियांना काय सांगायचे असा प्रश्न त्याच्या मनात असतो. एवढ्या मोठ्या कंपनीत काम करता अन पगार वेळेत मिळत नाही यावर कोणी विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ त्या कर्मचाºयावर येत असते. हे थांबवणे त्याच्या हातात नसते. त्याला फक्त आपला पगार वेळेवर मिळाला तर आनंदात राहता येणे शक्य असते. कारण वेळेवर पगार न होण्यामुळे तो कर्जबाजार होतो. त्याची बाजारातील पत कमी होते. वेळेवर पैसे न देणारी व्यक्ती अशी ख्याती त्याची मित्र परिवारात, आप्तेष्ठांत होत असते. अशावेळी अनेक संशयाच्या भोवºयात तो अडकतो. एवढी मोठी नाव असलेली कंपनी पगार वेळेवर देत नाही यावर कोणी विश्वास ठेवत नाही आणि सत्य परिस्थिती कुठे बोलता येत नाही याचे टेन्शन घेऊन जगताना त्या माणसाच्या चेहºयावरची रयाच गेलेली असते. अशावेळी रक्तदाबाचा विकार जडण्यापलिकडे त्याच्या पदरात काहीही पडत नाही. आजकाल खाजगी क्षेत्रातील नोकरदारांची हीच परिस्थीती पहायला मिळते. प्रत्येकजण रंजला गांजला असा होतो. त्यामुळे त्याची अवस्था ना घर का ना घाटका अशी होते. ना बायकामुलांचे लाड त्याला करता येतात ना वेळेत त्यांच्या गरजा त्याला भागवता येतात. हे सगळे अत्यंत लाजीरवाणे असे जीवन त्याच्या वाट्याला येते. त्यामुळे अशा पिडीत, शोषित नोकरदारांसाठी हा जागतिक रक्तदाब दिन पाळला जातो. आपले मरण आपल्या हाताने पाहण्याचे दिवस म्हणजे हे बिनपगारी कामाचे दिवस. या तणावातून माणसाला रक्तदाब जडतो. त्यामुळे माणसाची चीडचीड होते. आवाज वाढतो. तो मोठ्याने बोलू लागतो. दोन हाताच्या अंतरावर असलेल्या माणसांशी आपण जेंव्हा मोठ्याने बोलतो तेंव्हा त्या रक्तदाबाचा अर्थ काय असतो? माणसे जर खूप लांब असतील तर तर त्यांना मोठ्याने बोलावे लागते. पण समोरासमोरची माणसे जेंव्हा मोठ्याने बोलतात तेव्हा ती शरिराने जवळ असली तरी मनाने एकमेकांपासून दूर गेलेली असतात. माणसं दुरावतात तेंव्हा ती भांडताना मोठ्याने बोलतात. हे रक्तदाबाचेच लक्षण आहे. हे केवळ तणावाने निर्माण झालेले दैनंदिन जिवनातील दृष्य आहे. आज प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तणावाने, हायपर टेन्शनने ग्रस्त झालेला आहे. ही बदललेली जीवनशैली, वाढते ताणतणाव आणि आर्थिक कुत्तरओढ त्याला आजाराकडे घेऊन जाताना दिसते आहे. सगळ्याचा संबंध पैशाशीच जोडलेला आहे. कारण जोवरी पैसा, तोवरी  बैसा अशी म्हण आहे. किंवा असतील शिते तर जमतील भुते अशी परिस्थिती असते. जवळ पैसा नसेल तर केवळ मित्र, आप्तच सोडून जात नाहीत तर आरोग्यही साथ देत नाही. कारण सुख, समाधान निघून गेलेले असते. अशा व्यक्तिला रक्तदाबाला सामोरे जावे लागते. कधीकधी तो इतका वाढतो की त्याचा परिणाम त्याला हृदयविकाराचा झटका येतो. बघता बघता माणूस डोळ्यासमोरून होत्याचा नव्हता होतो. दररोज अशा घटना ऐकतो. आपण हळहळतो. पण त्यामागे असलेल्या तणावावर कोणीच बोलत नाही. त्यासाठी आजचा जागतिक रक्तदाब दिन आठवायचा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: