बुधवार, ९ मे, २०१८

जनतेलाच उल्लू बनवण्याचा डाव

शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष सध्या समोर दिसत असला तरी त्या दोघांचेही राजकारण ब-याचवेळा हे अनाकलकनीय असे दिसून आले आहे. राजीनामे खिशात ठेवण्याची भाषा करून सत्तेलाच चिकटून राहणारी शिवसेना आणि शिवसेनेच्या टीकेवर कसलेही भाष्य न करणारी भाजप. दोघांच्याही अनेकदा समोर आलेल्या भूमिका विसंगत असतात. त्यामुळे हे दोन्ही पक्ष मिळून जनतेला उल्लू बनवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, याचाच आता विचार करावा लागेल. आता निमित्त तसे पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे असले तरी शिवसेनेची स्वबळाची भाषा ही गेल्या अनेक दिवसांपासून आहे. पण तरीही ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना’ अशीच दोघांची अवस्था झालेली दिसते आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतही स्वबळाची भाषा करणा-या शिवसेनेने अखेरच्या टप्प्यात भाजपशी युती केली. त्यामुळे हे नक्की काय चालले आहे, असा प्रश्न जनतेला पडल्याशिवाय राहात नाही. बोलण्यात आणि वागण्यात या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये विसंगती आहे. त्यामुळे राजकारणाची दिशा नेमकी कुठे चालली आहे हे सर्वसामान्य माणसाला समजून येत नाही. पण या जनतेला उल्लू बनवण्याच्या राजकारणात सत्ताकेंद्रे आपल्याकडेच राखण्याचा डाव या उभय पक्षांचा नाही ना असा संशय यायला वाव आहे. भाजपवर सातत्याने टीकेची आसूड ओढणारी शिवसेना सत्तेतून बाहेर पडायला तयार नाही आणि भाजपही सेनेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत नाही. हे आजचे नाही, अगदी २०१४ पासून सुरू आहे. २०१४ च्या २५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी युती तुटल्याचे जाहीर झाले आणि भाजप-सेना स्वबळावर लढणार हे निश्चित झाल्यावरही जनतेपुढे हे दोन्ही पक्ष टीका करताना एकमेकांचीच जाहिरात करत राहिले. म्हणजे अन्य विरोधी पक्ष या मैदानात आहेत, असे वातावरणच तयार होऊ दिले नाही. महाराष्ट्रात फक्त असे चित्र उभे राहिले की या राज्यात फक्त भाजप आणि शिवसेना हे दोनच पक्ष अस्तित्वात आहेत. त्यांच्यातील कुरघोडय़ांकडेच लक्ष देण्यात मराठी माणूस अडकून पडला. त्याचा परिणाम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे हे पक्ष पूर्णपणे दुर्लक्षले गेले. त्यामुळे फक्त शिवसेना आणि भाजप यांचीच चर्चा होत राहिली. दोघे विरोधी लढून जवळपास २०० च्या आसपास संख्याबळ त्यांनी मिळवले. ते जर एकत्र लढले असते तर जेमतेम १५० जागा मिळाल्या असत्या. त्यामुळे जागा वाढवण्यासाठी, सत्ताकेंद्र आपल्याच ताब्यात राहण्यासाठी हा दोघांचे ‘तू कर मारल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं’ असला तर प्रकार नाही ना, असा प्रश्न आज जनतेपुढे आहे. म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसल्यावर आणि पैसा प्रचंड प्रमाणात खर्च झाल्यामुळे लगेच कोणालाच निवडणुका परवडणा-या नव्हत्या. साहजिकच सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला कोणीतरी बाहेरून पाठिंबा देणार हे शिवसेनेने गृहीत धरले होते. त्याप्रमाणे भाजपने न मागताच पाठिंबा देऊन राष्ट्रवादीने भाजप, शिवसेनेचे काम सोपे केले असावे असे वाटते. त्याचा परिणाम असा झाला की, सुरुवातीला मुख्यमंत्रीपद आणि विरोधी पक्षनेतेपद ही दोन्ही महत्त्वाची पदे या दोन पक्षांतच वाटली गेली. नंतर मंत्रीपद असले पाहिजे या लालसेपोटी शिवसेनेने युतीचा प्रस्ताव मांडला आणि सरकारमध्ये शिवसेना सामील झाली. काही मंत्रीपदांच्या बदल्यात शिवसेना भाजपशी मांडीला मांडी लावून बसली. विशेष म्हणजे तोपर्यंत शिवसेनेला जी खाती दिलेली होती त्या जागांवर भाजपचे स्वतंत्र मंत्री नव्हते. एकाच मंत्र्याकडे चार- चार खाती देऊन त्यांच्यावर भार टाकला गेला होता. अनेक जिल्ह्यांना मंत्रीपद नव्हते, तरीही तेथील आमदारांना संधी न देता ती खाती वाटली गेली, ती ठरावीक लोकांकडेच. याचा अर्थ असा होतो की, काही दिवसांनी शिवसेनेचे आमदार आपल्याकडे येणार आहेत, त्यांना ही खाती द्यायची आहेत. त्यामुळे ती अन्य कोणाला दिली गेली नाहीत. नेमके झालेही असावे तसेच. हे सगळे आता उलगडू लागले आहे. तेव्हा जनतेला भाजपचा मोठेपणा वाटला किंवा शिवसेना नरमली असे वाटले. पण सत्तेत आल्यानंतरही शिवसेनेने आपला विरोधी सूर सोडला नाही. आपणच विरोधी पक्षाची भूमिका करण्यास सुरुवात केली. विधानसभेत काँग्रेसच्या किंवा विधान परिषदेत असलेल्या राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्यापेक्षा शिवसेनेचा सत्तेत राहून विरोधाचा सूर मोठा येत राहिला. गेली साडेतीन वर्षे महाराष्ट्राची जनता हे पाहते आहे. हा सगळा जनतेला उल्लू बनवण्याचा धंदाच नाही काय? आजही तोच प्रकार सतत पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीतही तेच घडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घशाला कोरड पडेपर्यंत प्रचार सभांमधून सेनेवर टीकास्त्र सोडले आणि जास्तीत जास्त महापालिका हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेनेच्या ताब्यातील कोणतीही महापालिका म्हणजे ठाणे आणि मुंबई मात्र घेतली नाही. नंतर बाहेरून पाठिंबा देऊन मुंबईत शिवसेनेची सत्ता आणणारे किंगमेकर भाजप ठरले. त्यामुळे सत्ताकेंद्रे आपल्याकडे ठेवण्यासाठी हा नवा फॉर्म्युला सेना-भाजपने काढला आहे काय, असा प्रश्न पडतो. राज्यात चंद्रकांतदादा पाटील म्हणतात, आगामी निवडणुकीसाठी युती होणार. त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही कर्नाटकातून महाराष्ट्रात भाजप- शिवसेना युती असेलच असा दावा करतात. इकडे शिवसेना स्वबळाचा नारा देऊन भाजपचा संभाव्य उमेदवार पळवते.भाजप त्यावर टीका करून विरोधी लढण्याचे जाहीर करते. हे सगळे आपल्यावर लक्ष केंद्रित करण्याचे प्रयत्न आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्यालाच यश मिळाले पाहिजे. आपल्याला नाही तर सेनेला गेले तरी चालेल पण काँग्रेस, राष्ट्रवादी हद्दपार झाली पाहिजे. असला फंडा निर्माण करण्याचे काम या दोन्ही पक्षांनी केले आहे, असेच वाटल्याशिवाय राहात नाही. पालघर निवडणुकीत सेना किंवा भाजप यापैकी कोणीही विजयी झाले तर फरक काहीच पडत नाही कारण निवडून येणारा खासदार आघाडीचा असणार आहे. पण या राजकारणात जनतेला उल्लू बनवण्याचे प्रयत्न होत आहेत हे निश्चित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: