गुरुवार, ३ मे, २०१८

शिवसेनेचे उल्लू बनवण्याचे प्रयत्न असफल

शिवसेनेने गेल्या महिनाभरात अगदी राणा भिमसेनी थाटात युती नाही म्हणजे नाही, काही झाले तरी स्वबळावरच लढणार असा आव आणला होता. पण हे उसने अवसान गळून पडले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही ६ उमेदवार उभे करण्याची ताकद नसणाºया शिवसेनेला आता कमळाबाईचा मुका घेण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. म्हणजे भाजपने कितीही मुका घेण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही स्वबळावरच लढणार असे म्हणणाºया शिवसेनेला मुकाच नाही तर पूर्ण अलिंगन देण्याची वेळ आली आहे आणि भाजपच्या स्वाधीन व्हावे लागले आहे यातून शिवसेनेची अगतीकता दिसते म्हणायचे की लाचारी? महाराष्टÑाच्या जनतेला उल्लू बनवायचे धंदे जे शिवसेनेने चालवले आहेत ते जनता आता खपवून घेणार नाही याची जाणिव बहुदा शिवसेना नेत्यांना झालेली दिसते त्यामुळे युतीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांना कबूलच करावे लागले आहे. म्हसोबाला नाही बायको अन सटवाईला नाही नवरा अशी गत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची झालेली दिसून येते आहे. पण त्यामुळे मराठी जनतेपुढे शिवसेनेचे ढोंग समोर आलेले आहे. ज्या शिवसेनेला विधानपरिषदेसाठी ६ उमेदवार मिळू शकत नाहीत त्यांना विधानसभेसाठी २८८ उमेदवार उभे करणे शक्य आहे का? हे सगळे शिवसेनेचे उसने अवसान पार गळून पडलेले आहे. सत्तेत राहायचे, त्याची फळे चाखायची आणि वर सरकारवरच टीका करायची. मग त्या सरकारमधील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या भाजपने टोमणे मारले, हिणवले किंवा शिवसेनेची जागा दाखवली तरी शिवसेना निर्लज्जपणे भाजपला हवे तेच करणार हे सगळ्यांना ठाऊक आहे. आज स्वबळाची भाषा करणाºया शिवसेनेचा मुखवटा पूर्णपणे गळून पडलेला असून शिवसेनेच्या मर्यादा आता स्पष्ट झालेल्या आहेत. शिवसेनेची ताकत आता थोडीफार उरली आहे ती फक्त ठाणे आणि मुंबईतच. पण हळूहळू तीसुद्धा कमी होताना दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराष्टÑाच्या जनतेने ओळखले आहे की शिवसेना फक्त मराठी माणसांची फसवणूक करते आहे. त्यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नाही. फक्त थापा मारणे हा कार्यक्रम आहे. पण बोलताना आपण काय चुकीचे बोलतो आणि जनतेपुढे हासे करून घेतो हेसुद्धा शिवसेना आणि त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांना कळत नाही. रत्नागिरीत नाणार येथे रिफायनरी प्रकल्प आणण्याचा घाट घालणारी शिवसेनाच. त्याचे नेतेच सर्व परवानग्या देतात. ना हरकत प्रमाणपत्र देतात. अधिसूचना काढतात. पण जेंव्हा नाणारवासिय त्याला विरोध करतात तेंव्हा हीच शिवसेना आमचा विरोध असल्याचे सांगते. असाच दुटप्पीपणा सेनेचा सातत्याने चाललेला दिसून येतो. चार दिवसांपूर्वी तर शिवसेनेच्या नेत्यांना कहरच केला. नाणार प्रकल्प गुजरातला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगताच हा प्रकल्प तुमच्या विदर्भात न्या मग आम्ही पावसाळी आधिवेशनाला परवानगी देतो असे बोलून बसले. बोलून बसले म्हणजे बोलून फसले. कारण त्यामुळे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी शिवसेनेची पूर्ण अक्कल काढली. हा रिफायनरी प्रकल्प विदर्भात आनंदाने नेला असता पण त्याअगोदर विदर्भात समुद्र पाठवावा लागेल असे सांगून हा प्रकल्प समुद्रातील आहे. त्यामुळे तो कोकणात नाहीतर गुजरातमध्ये जाईल असे सांगितले. पण त्या प्रकल्पाबाबत काहीच माहीती नसल्याने उद्धव ठाकरे यांचे पूर्णपणे अज्ञाान बाहेर पडले आणि शिवसेना थोबाड फोडल्यासारखी गप्प बसली. कसला स्वाभिमान हा प्रकारच आता शिवसेनेत राहिलेला नाही. त्यामुळे महाराष्टÑाने शिवसेना हा पूर्णपणे नाकारलेला पक्ष आहे हे भविष्यात दिसून येणार आहे. शिवसेनेला आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर भाजपबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही हे पूर्णपणे पटल्यामुळेच त्यांनी स्वबळाचा नाद सोडून दिला आणि युतीचे धोरण आखले. पण यातून शिवसेनेचे खरे स्वरूप जनतेसमोर आलेले आहे. शिवसेनेचे वाचाळ नेते काहीतरी बडबडतात आणि तेच बाकीचे लोक उगाळत बसतात. त्यांच्या कृतीत आणि वक्तव्यात नेहमीच विसंगती दिसून आलेली आहे. करतात एक, बोलतात एक आणि होते भलतेच. त्यामुळे भविष्यात एकट्या शिवसेनेला कोणीही विचारणार नाही हे सत्य आता लपून राहिलेले नाही. शिवसेनेने उल्लू बनवायचे आणि मराठी माणसांनी ते ऐकायचे दिवस आता संपले. शिवसेनेची विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे. केवळ स्वार्थासाठी वाटेल त्या थराला जाणाºया शिवसेनेला आता कोणी दारात उभे करणार नाही. कारण ही खोटे बोलण्याची, दुटप्पीपणाची शिवसेनेची काही पहिलीच वेळ नाही. २०१४ ला झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीही झाला असता. जागा वाटपात भाजपला योग्य वाटा दिला असता तर दोन्ही पक्षांच्या मिळून दोनशेपेक्षा जास्त जागा आल्या असत्या. भाजपने आपले संख्याबळ गाठले पण शिवसेनेला ते जमले नाही. कारण शिवसेना महाराष्टÑात पोहोचूच शकलेली नाही. ग्रामीण भागातून आलेल्या मराठी माणसाची अवस्था शिवसेनेने काय केलेली आहे हे माहिती असल्यामुळे ग्रामीण भागात शिवसेनेला जनाधार नाही. अशा परिस्थितीत भाजपला लाथाडून शिवसेनेने स्वत:च्या पायावर कुºहाड पाडून घेतली. भाजपच्या लाटेत युतीत जास्ती जागा मिळवून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याची मिळणारी संधी हातची गमावल्याने शिवसैनिक नाराज आहेत. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत एवढेच फक्त स्वबळाची भाषा करतात. बाकीचे सगळे मंत्री युती करायची म्हणतात. त्यामुळे जर शिवसेनेने स्वबळाची भाषा केली तर आत्ता जे आहेत त्यापैकी निम्मे लोक सेना सोडून जातील आणि भाजपच्या दावणीला आयते बांधले जातील, याची भीती वाटल्यानेच शिवसेनेने आता भाजपपुढे लोटांगण घातले आणि युती केली. भाजपचे शिवसेनेशिवाय काहीही अडणार नाही हे भाजपने २०१४ ला दाखवून दिले आहे. पण शिवसेनेला मात्र भाजपशिवाय पुढे जाता येणार नाही इतकी ती लंगडी झालेली आहे. अशावेळी लंगड्या घोड्याने शर्यत जिंकण्यासाठी वाघाचे उसने अवसान आणून डरकाळ्या फोडणे योग्य नाही. याची जाणिव झाल्यामुळेच शिवसेनेने पुन्हा दुटप्पी भूमिका घेत आपले युतीचे हत्यार बाहेर काढले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: