शुक्रवार, २५ मे, २०१८

होराकारांना अंदाज व्यक्त करू देत

कर्नाटकातील निकालानंतर निर्माण झालेले राजकीय नाट्य संपुष्टात आल्यावर माध्यम जगतात फार मोठी पोकळी निर्माण झाली. आता आपल्याकडे लक्ष देण्यासारखे काय आहे यासाठी चढाओढ सुरू झाली असतानाच केंद्रातील मोदी सरकारला चार वर्ष झाल्याचा साक्षात्कार झाला. त्यानंतर लगेचच २०१९ च्या निवडणुकीची ओढ अनेक वाहिन्यांना लागली आणि त्यांनी लगेच आत्ताच निवडणुका झाल्या तर काय होईल बुवा? म्हणून अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली. कर्नाटकात भाजपचा सत्तास्थापनेचा दावा फसला म्हटल्यावर लगेच मोदींची लोकप्रियता घसरु लागली आहे असे भाकीत करून अंदाज व्यक्त करणाºया होरा भूषणांनी आगामी काळात नरेंद्र मोदी सरकारला फटका बसेल म्हणून अंदाज जाहीर झाले. हा फटका उत्तर प्रदेशात सर्वात जास्त बसेल असा अंदाज व्यक्त केला गेला. तिथे भाजपच्या जागा ४६ पर्यंत कमी होतील असा अंदाजही वर्तवण्यात आला. फक्त एनडीएला मात्र बहुमत मिळेल यापासून हा अंदाज बदलता आला नाही. म्हणजे २०१९ ची लोकसभा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील आघाडी जिंकेल आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार याबाबत कोणतेही दुमत व्यक्त न करता फक्त भाजपच्या जागा कमी होतील हे सांगून मस्त खळबळ उडवून दिली.  म्हणजे मतांची टक्केवारी वाढणे कमी होणे, जागा कमी होणे जास्त होणे यात तसे नाविन्य काहीच नसते. ऐनवेळी काय बदल घडतो, झटका बसतो हे फार महत्वाचे असते. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या जागा कमी होतील, जास्त होतील यात तसे वेगळे किंवा आगळिक काही घडणारे नाही. जेंव्हा एखादी लाट येते तेंव्हा ती अचानक न थांबता थोडी थोडी कमी होणे हे स्वाभाविक आणि नैसार्गिकही आहे. त्यामुळे संख्याबळ कमी होणे यासाठी फार मोठा सर्वे केला आहे आणि खूप काही मोठा अंदाज व्यक्त केला आहे असे समजण्याचे कारण नाही. १९८५ ला राजीव गांधी यांना इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेवर पाशवी बहुमत मिळाले होते. तब्बल ४०२ इतक्या जागा एका काँग्रेस पक्षाला होत्या. या लाटेत भले भले पडले होते. पराभवाला सामोरे गेले होते. परंतु ती लाट पुढची पाच वर्ष राजीव गांधींनाही टिकवता आलेली नव्हती. राजीव गांधींची लोकप्रियता बिलकूल कमी झालेली नव्हती. त्या काळात राजीव गांधींच्या तरूणपणाचे, त्यांच्या दिसण्याचे, त्यांच्याबरोबरीने असणाºया सोनिया गांधींचे लोकांना खूप आकर्षण होते. त्यांचे ‘हमे देखना है’, ‘हमे २१ वी सदी में जाना है’ या वक्तव्यांनी देशवासियांना भारावून टाकले होते. खांद्यावरून मागे घेतलेली शाल, पांढरे शुभ्र कपडे या त्यांच्या राहणीमानाचे कौतुक होते. अग्नि क्षेपणास्त्राचे सफल प्रक्षेपण, संगणक युगात जाण्याचे त्यांनी केलेले आवाहन, दूरदर्शनचा देशभर झालेला प्रसार यामुळे राजीव गांधी त्या पाच वर्षात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. असे असतानाही १९८९ च्या  निवडणुकीत त्यांना सत्ता राखता आली नव्हती. ४०२ वरून राजीव गांधी यांना १९८९ ला १९२ संख्याबळापर्यंत खाली यावे लागले होते. बोफोर्ससारख्या घोटाळ्याचा फटका बसला म्हणा किंवा व्ही पी सिंग यांनी दिलेला झटका म्हणा पण राजीव गांधींना सत्तेपासून दूर जावे लागले होते. पाशवी बहुमतातून अल्पमतात यावे लागले होते. आज नरेंद्र मोदींच्या बाबतीत तसे काहीच नाही. त्यामुळे या अंदाजांची फारशी दखल घेण्याची गरज नाही किंवा भिती बाळगून गांभिर्याने पाहण्याचीही गरज नाही. हे सगळे ठोकताळे असतात. देशभरातून म्हणजे जवळपास १३२ कोटी लोकसंख्येतील सुमारे ८० कोटी मतदारांपैेकी जेमतेम १० हजार मतदारांशी चर्चा करून हा कौल कसा काय ठरवता येतो? पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गेल्या चार वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. कोणाही मंत्र्यावर तसा आरोप नाही. कोणताही घोटाळा झालेला नाही. अशा परिस्थितीत कोणत्त्या कारणाने मतदार सत्तांतर करतील? याला काहीही शाास्त्रीय आधार नाही. सततच्या सत्तेचा मतदारांना कंटाळा येत असतो. मतदारांना बदल हवा असतो. वर्षानुवर्षे ठिय्या मांडून बसलेल्यांना हलवणे हे मतदार करत असतात. त्यामुळे आज २१ राज्यांमधली ७ ते ८ राज्ये ही तीन तीन टर्म पूर्ण करणारी आहेत. परिणामी तीथे परिवर्तन घडणे अभिप्रेत असते. ते नैसर्गिक असते. गुजरातमध्ये २ दशके सत्ता भाजपची असल्यामुळे सहा महिन्यांपूर्वी तिथे मतदारांनी थोडासा बदलता कौल दिला. पण मोदींच्या भाजपची सत्ता काढून घेतली नाही. फक्त धक्का दिला. तोच प्रकार आगामी काळात मध्यप्रदेशात होणार, राजस्थान, छत्तीसगडला होणार यात शंका असण्याचे कारण नाही. कारण तसे असामान्य असे तिथे काहीच घडलेले नाही. त्यामुळे बदल हाच अपेक्षित आहे. साहजिकच तेथील खासदारांची संख्या कमी होणे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे ज्या राज्यांमध्ये नव्याने सत्ता मिळवली आहे तिथे संख्याबळ वाढूही शकते. उत्तर प्रदेशात नेहमीच संख्याबळ हे कमीजास्त होत असते. कारण सर्वात मोठे राज्य आहे ते, सर्वाधिक खासदार संसदेत पाठवणारे असे मागास राज्य आहे ते. त्यामुळे वादळाबरोबर, लाटेबरोबर वाहून जाण्याची त्यांची सवय आहे. पण महाराष्टÑ किंवा दक्षिणेत अशा लाटांचा फारसा प्रभाव होत नसतो. आज मोदींची लोकप्रियता घसरते आहे असे सांगून दर दोन तीन महिन्यांनी पुढील वर्षभर अंदाज व्यक्त करून हे संख्याबळ आणखी कमी आणले जाईल आणि मतदारांचा कौल लादला जाईलही. पण प्रत्यक्ष निवडणुकीत याच्या विपरीत चित्र असू शकते. २०१४ ला तरी मोदी सरकार सत्तेवर येईल हे सांगताना नरेंद्र मोदी भाजपचे संख्याबळ १८० च्या पुढे नेतील हे कोणी मान्य करत नव्हते. पण मोदींनी २८२ पर्यंत म्हणजे जवळपास १०० जागा जास्त मिळवल्या होत्या. त्यामुळे विनाकारण या अंदाजांना गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता नाही. होराकारांना अंदाज व्यक्त करू देत पण अजून वर्षभरांनी हे अंदाज बरोबर नाहीत हे सांगण्याचे धारिष्ट्य कोणाकडेही नसेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: