मुंबई महापालिकेत सत्ता कोणाची आहे याचा शिवसेनेला विसर पडला आहे की तसे सोंग आणत आहे? मुंबईचे कारभारी असतानाही पाणी तुंबण्याचे खापर मुख्यमंत्री आणि आयुक्तांवर फोडून शिवसेनेने आपल्या नाकर्तेपणाची कबुलीच दिली आहे.शिवसेना म्हणते आहे की, विकासाच्या नावाखाली मुंबईच्या रस्त्यांवर सरकारने अराजक निर्माण केले आहे. मेट्रोचे स्वप्न हे अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनप्रमाणेच फसवे आहे. गरज नसताना सुरू केलेले हे नसते उद्योग आहेत. पावसाळ्यात तुंबणा-या मुंबईची जबाबदारी सरकार, त्यांचे मेट्रो कॉपोर्रेशन यांची आहे. अशावेळी मुंबई महापालिकेवर सत्ता कोणाची आहे याचा विसर सेनेला पडला का असा प्रश्न निर्माण होतो. मेट्रो प्रकल्प काही आज आलेला नाही. गेली दहा-बारा वर्षे त्याची चर्चा आहे. कामही सुरु आहे. एक टप्पा सुरु होऊन पाच वर्षे उलटली. या बारा वर्षात सेनेला हे सुचले नाही आणि आजच हे रडगाणे का सुरु केले आहे? विकासकामांसाठी खोदकाम होणार हे शिवसेनेला माहिती नव्हते की मेट्रो ट्रेन डायरेक्ट इस्टंट फिटींग होणार असे शिवसेनेला वाटत होते का? शिवसेना नेते म्हणतात, मुंबई महाराष्ट्रास मिळावी, मराठी माणसाला मुंबईत सन्मानाने जगता यावे म्हणून तो लढा झाला, पण त्यावेळी जी मुंबई महाराष्ट्रास मिळाली तेव्हा ती शानदार व जानदार होती. गेली तीन दशके शिवसेनेचे मुंबई महापालिकेत राज्य असताना शिवसेनेने मुंबापुरीची अशी वाताहात का केली? हे शानदार आणि जानदारपण जाऊ का दिले? सेना म्हणते, पूर्वी रस्ते लहान व निमुळते होते. माणसे आणि वाहने मर्यादित असल्याने मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त होते. पण काळाच्या ओघात सगळ्या जगाचे स्वरुप बदलत असताना मुंबईने बदलायला नको होते असे शिवसेनेला म्हणायचे आहे का? संपूर्ण देशात नागरीकीकरण वाढले आहे, लोकसंख्या वाढली आहे असे असताना मुंबईतील स्वरुप १९६० चेच असावे असे शिवसेनेला वाटते हाच अर्थ यातून प्रकट होतो. मग गेली तीन दशके सगळ्या बिल्डर्सना जवळ करुन मुंबईत टोलेजंग टॉवर का उभे राहिले याचे उत्तर शिवसेनेला द्यावे लागेल. शिवसेनेची मुंबईत सत्ता असताना परस्पर कोणी काही करतो आणि शिवसेनेला त्याचा पत्ता लागत नाही असेच त्यांच्या आताच्या भूमिकेवरून दिसते. याचा अर्थ शिवसेना मुंबईचा कारभार सांभाळण्यास असमर्थ आहे असेच दिसते. मेट्रो, मोनो आणि बरेच प्रकल्प सध्या मुंबईत सुरु आहेत. हे किमान चार-पाच वर्षापासून सुरू आहेत. ते प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच त्याला विरोध का केला नाही? प्रकल्पाला आधी मंजुरी द्यायची आणि नंतर लोकांना त्रास व्हायला लागल्यावर बोंबलायचे ही शिवसेनेची नेहमीचीच दुटप्पी भूमिका आहे. नाणारबाबत तेच केले. अगोदर उद्योग मंत्री, पर्यावरण मंत्री सगळ्यांनी हा प्रकल्प कोकणात आणण्याचा अट्टाहास केला. आता विरोध होतोय म्हटल्यावर आपली भूमिका बदलली. हा दुटप्पीपणा काय कामाचा? अगोदर विरोध केला असता तर शिवसेनेला मुंबईची काळजी आहे असे म्हणता आले असते. पण तसे बिल्कूल चित्र नाही. मुंबईकरांची सेनेला बिल्कूल काळजी नाही. महापालिका चालवण्यास शिवसेना असमर्थ असल्यामुळे आपल्या अपयशाचे खापर आता मुख्यमंत्री आणि आयुक्तांवर फोडण्याचा अधमपणा सेना करते आहे. पण मुंबईकर आता सेनेच्या या नौटंकीला फसणार नाहीत. शिवसेना म्हणते आहे, एम.एम.आर.डी.ए. नावाची बाजारबसवी मुंबई महानगरपालिकेच्या छाताडावर आणून बसवल्यापासून मुंबईचे हाल हे आत्महत्याग्रस्त शेतक-यांप्रमाणे झाले. म्हणजे मुंबईकरांना जगणे कठीण झाले आहे. एमएमआरडीए काही आज निर्माण झालेली नाही. मुंबई विकासासाठी एमएमआरडीएची गरज नाही असे त्याचवेळी ठणकावून सांगायला शिवसेनेला कोणी विरोध केला होता? तेव्हा शिवसेना मूग गिळून गप्प का बसली? त्यावेळी एमएमआरडीए म्हणजे आपल्याला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे असा समज सेनेने करून घेतला. मुंबईचा विकास या प्राधिकरणातून होईल अन् त्याचा फायदा आपल्याला होईल हे शिवसेनेचे तेव्हा स्वप्न होते. पण ‘घी देखा लेकीन बडगा नही देखा’ अशी सेनेची अवस्था झालेली आहे. त्यामुळे आपल्या निष्क्रियतेचे खापर मुख्यमंत्री आणि आयुक्तांवर फोडण्यात काहीही अर्थ नाही हे सेनेने लक्षात घ्यावे. मेट्रोमुळे या पावसाळ्यात साधारण २०० ठिकाणी मुंबईत पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली गेली आहे, पण हे तुंबणे राज्य सरकारच्या एम.एम.आर.डी.ए. या बाजारबसवीमुळे होणार आहे, असे शिवसेना म्हणते. पण ही बाजारबसवी आपल्या घरात शिवसेनेने आणलीच कशी हा प्रश्न मुंबईकरांना आहे. बाजारबसवी घरात येत नाही तर ती आणली जाते. त्यामुळे तिला विरोध न करणारेच दोषी असतात हे लक्षात घेतले पाहिजे. सेना नेते म्हणतात, मुंबई २०० ठिकाणी तुंबणार ही फक्त भविष्यवाणी नसून सत्य आहे व मेट्रोच्या खड्डयांइतकीच मग त्या पाणी तुंबण्याची जबाबदारी मुख्यमंत्री, महापालिका आयुक्तांनाही घ्यावीच लागेल. मग सत्ता असून शिवसेनेची काहीच जबाबदारी नाही का? महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक काय नंदीबैलाप्रमाणे गुबूगुबू मान हालवायला जातात का? एमएमआरडीएसारख्या बाजारबसव्या मुंबईत शिरत असतील तर त्या बाजारबसव्यांना आणणारे दलाल शिवसेनेचे आहेत हे मुंबईकरांच्या लक्षात आलेले आहे. मुंबईत, राज्यात, केंद्रात सगळीकडे सत्तेत तुमचा वाटा असताना जबाबदारी झटकून टाकण्याचे पाप शिवसेना करते आहे. ही त्यांना भावी पराभवाची भिती वाटत असल्यामुळे चाललेली बोंब आहे, दुसरे काही नाही. आपल्या चुकांचे आणि चुकीच्या कामाचे खापर शिवसेनेने दुस-यांच्या माथी फोडणे बंद केले पाहिजे. मुंबईचा खोटा पुळका आणण्याची आता मुंबईकरांना गरज नाही. मुंबईतील गिरण्या बंद पडल्या, मराठी माणूस बाहेर गेला, मुंबईतून लांब ठाणे, रायगडात मराठी माणूस जात असताना बघ्याची भूमिका घेणा-या आणि परप्रांतीय आणि बिल्डरलॉबीला लाल कारपेट घालणा-या शिवसेनेच्या दुटप्पीपणावर कोण विश्वास ठेवणार? नपेक्षा मुंबई महापालिकेची सत्ता सांभाळता येत नाही असे सांगून जबाबदारी सोडावी हेच बरे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा