२८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने भारतीय स्वातंत्र््यातील त्यांच्या योगदानाबरोबरच त्यांच्या अन्य कामगिरीचाही थोडा उहापोह करणे गरजेचे आहे. तसे स्वातंत्र्यवीर सावरकरांना पाच सातशे शब्दात समजून घेणे हे शक्य नाही. कारण ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. म्हणजे चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या हत्तीच्या दृष्टांताचा दाखला त्यांच्याबाबतही लागू पडतो. कारण सावरकर नेमके कोण होते? ते समाजसुधारक होते का? हो होते. ते दृष्टे होते का? हो होते. ते हिंदुत्ववादी होते का तर होते. ते विज्ञाननिष्ठ होते का? तर तेही होते. तसेच ते साहित्यिक होते का? तर याचेही उत्तर होच येते. त्यामुळे अशा अनेक गुणांनी संपन्न असलेल्या सावरकरांच्या आज एका अंगाबाबत आज इथे लिहीणार आहे. ते म्हणजे साहित्यिक सावरकर.सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी दिली. म्हणजे ज्योतीने तेजाची आरती म्हणतो त्याप्रमाणे एका साहित्यिकाने दुसºया साहित्यिकाचा केलेला तो गौरव होता. आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी सावरकरांनी आपल्या लेखणीचा वापर केला आणि साहित्यातून देशभक्तीची केलेली सेवा म्हणजेच सावरकरांचे साहित्य. सावरकरांनी १८५७ चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहीला आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की १८५७ हे बंड नसून हा एक स्वातंत्रसंग्राम होता. सावरकर हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत असत. त्यांनी आपला साहित्याचा यज्ञ सुरू ठेवला होता. या यज्ञात देशप्रेमाच्या आहुती देण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी शपथ घेतली. त्यांच्या आयुष्याचा दुसरा भागा म्हणजे भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर हे रुप आहे. त्यावरच याठिकाणी आज आपण चर्चा करणार आहोत. कारण सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जोरदार चर्चा, जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अशा परिस्थितीत मराठीसाठी योगदान देणारे सहित्यिक सावरकरांचे भाषा शुद्धी आणि त्या भाषेत घातलेल्या शब्दांची भर हे योेगदान लक्षात घ्यावेच लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबºयांचा लेखक, ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळ कोठडीत आणि रत्नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी आहे. शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत. सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझलाही लिहिल्या होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचार प्रवर्तनाबरोबरच भाषा शुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. मराठी भाषेत पूर्वी अन्य भाषांमधील शब्दांचा वापर होत होता. तो त्यांनी थांबवून चपखल असे मराठी शब्द दिले. हे योगदान फार महत्वाचे आहे. यामध्ये क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान, नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्ती वेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शेकडो शब्द मराठी भाषेत सावरकरांनी तयार केलेले आहेत. मुंबई येथे १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.एक साहित्यिक म्हणून योगदान देताना सावरकरांनी १० हजारपेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या सागरा प्राण तळमळला, हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, जयोस्तुते जयोस्तुते, तानाजीचा पोवाडा ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. याशिवाय काळेपाणी, मोपल्यांचे बंड, माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात, अथांग ही त्यांची साहित्य संपदा अजरामर आहे. १८ एप्रिल १८९८ रोजी दामोदर हरि चाफेकर फासावर गेले. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चाफेकरांना भगवद्गीतेची एक प्रत दिली. ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. गीतेच्या शिकवणुकीप्रमाणे आत्मा मरत नाही. तो फक्त वस्त्र बदलल्याप्रमाणे शरिर बदलत राहतो. त्यामुळे लोकमान्यांनी चाफेकरांना हातात गीता देवून फासावर जाण्याचे सुचवले याचा अर्थच तुमचा विचार मरणार नाही, स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांना हाकलण्यासाठी सशस्त्र क्रांतीसाठी नवा देह नव्या वस्त्राप्रमाणे त्या विचारांच्या आत्म्याला मिळतील हे सुचवले. त्याप्रमाणे ते आत्म्याने बदललेले वस्त्र म्हणजे वि. दा. सावरकर होते. त्या रात्री विनायक दामोदर सावरकर कितीतरी वेळ रडत होते. त्यांनंतर सावरकरांनी चाफेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. छत्रपती शिवरायांची त्यांनी आरती तयार केली होती. त्याच सावरकरांनी भविष्यात टंकलेखन आवश्यक बाब ठरणार हे गृहीत धरून इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठी अक्षरांची संख्या जास्त असल्यामुळे अ ची बाराखडी अन्य मुळाक्षरांप्रमाणे सुरु करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. साहित्यक्षेत्रातील त्यांचे हे योगदान फार मोठे आहे. त्यांनी निर्माण केलेल्या असंख्य शब्दांवर आज बरेच काही चालले आहे. अशा या साहित्यिक सावरकरांना त्यांचे जयंतीनिमित्ताने आदरांजली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा