तारा अस्तंगत होणे हा वाकप्रयोग साधारणपणे ज्योतिषशास्त्रात करतात. एखादा तारा किंवा ग्रहा जेंव्हा सूर्याच्या जवळ जातो तेंव्हा त्या सूर्याच्या तेजात त्या ताºयाचे तेज सामावून जाते आणि तो तारा दिसेनासा होतो, या खगोलशास्त्रीय प्रकाराला ज्योतिषशास्त्रात तारा अस्तंगत झाला असे म्हणतात. पण आज जो तारा अस्तंगत झालेला आहे तो खगोलशास्त्रातील नाही किंवा ज्योतिषशास्त्रातीलही नाही, तर हा तारा संगिताच्या भावविश्वातील तारा आहे. तो म्हणजे शुक्रतारा या भावगीताने आपला मखमली आवाज गेली ५ दशके मराठी संगितात अजरामर केलेले भावगायक अरूण दाते. अरुण दाते यांच्या निधनाचे वृत्त रविवारची सकाळ घेऊन आल्यावर नकळत त्यांच्याच आवाजातील अजरामर झालेले भावगीत समोर आले, ते म्हणजे, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, हे गीत.’ वैफल्याने पछाडलेल्या अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यास भाग पाडण्याची ताकद असलेल्या भावनांनी गायन केलेले हे अरुण दाते यांचे गीत अजरामर गीत आहे. मराठी भावगीतांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा गायक असेच अरुण दाते यांचे वर्णन करावे लागेल. वर्षानुवर्षे ही गाणी ऐकली तरी त्याची अविट गोडी कधीच कमी झालेली नाही. तो काळ अगदी आकाशवाणीचा होता, टीव्ही सगळ्या महाराष्टÑात पोहोचलाही नव्हता त्या काळात रात्रीची जेवणे झाल्यावर अंथरुणावर पडताना आपली आवड सारख्या कार्यक्रमातून हमखास अरूण दाते यांचे गाणे ऐकायला मिळायचे. तो मखमली आवाज ऐकत येणारी झोप म्हणजे स्वर्गीय स्वर असत. असाच हा सुंदर सूरांचा बादशहा आज स्वर गात गात स्वर्गात गेला आहे. पण त्यांचे अजरामर स्वर इथेच सोडून गेलेला आहे. ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी’ असे प्रेमिकेला साद घालणारे गाणे ऐकताना श्वासही आपला रोखून ठेवावा आणि त्या शब्दांचा उच्चार अरुण दाते कसा करतात हे ऐकत बसावे असे वाटते. किंवा..‘येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील’ हे गाणे ऐकताना त्या प्रियतमेच्या येण्याची वाट पहात रात्री झोपावे, पहाट होण्यापूर्वीच तिने स्वप्नात यावे असे वाटून आपले त्या गोड लोभस गाण्याबरोबर डोळे कधी मिटतात हे कळतही नाही. त्याचवेळी ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ या गाण्यातील सनईच्या संगिताने आनंदीत झालेले वातावरण गाणे संपताना डाव अर्ध्यावर मोडला या कल्पनेने डोळ्याच्या कडा ओलावण्याची ताकद या गायकीत होती. म्हणूनच दीर्घकाळ संगित सेवा करुनही अरुण दाते आपल्यातून गेले तरी अजूनही त्यांच्या गाण्यांची कहाणी अधुरी राहिली आहे असे वाटल्याशिवाय राहणार नाही. प्रियतमेला भेटल्यावर ‘दिवस तुझे हे फुलायचे’ हे सांगून त्या प्रेमाच्या आनंदलहरीत कसे डुंबायचे हे प्रेमिकांना सांगणारे गाणे अरुण दाते गातात तेंव्हा ते गाणे त्यांनी ७० व्या वर्षी म्हटले असले तरी ते अगदी विशितील नायक वाटतात. प्रेम हेच खरे असते, त्यात चुका या होतच असतात. पण प्रेमात सगळं काही माफ असलं तरी विश्वास हा महत्वाचा असतो. म्हणूनच प्रियकर प्रेयसीने आपल्या अखेरच्या टप्प्यातही चूकभूल देणे गरजेचे असते. आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी ही चूकभूल देताना नेमके काय म्हणायचे याचे अचूक भाव अरुण दाते यांच्या ‘अखेरचे येतील माज्या, तेच शब्द ओठी... लाख चुका असतील केल्या, केली पण प्रिती...’ हे गीत निरोपाचे गीत आहे. प्रियकर प्रियतमा यांच्यात ताटातूट होण्याचा आलेला हा क्षण जाताना फक्त प्रेमाची कबूलीच देऊन जातो. त्या भावनांचा अविष्कार अरुण दाते यांनी नेमकेपणाने केला आहे म्हणून हा शुक्रतारा संगिताच्या भावविश्वात धृवताºयाप्रमाणे अढळ आहे. अशी शेकडो भावगीते गेली अरुण दाते यांनी अजरामर केली. हे यश नेमके कुणाचे याबाबत अनेकजण वाद घालतील. हे त्या गीतकाराचे यश, संगितकाराचे यश की गायकाचे यश असा नाहक वादही घालतील. पण गीतकार आणि संगितकाराला आपल्या जादुई आवाजाने जोडणारा गायक अधिक महत्वाचा. त्या तिघांची भट्टी चांगली जमली म्हणून हे गाणे श्रवणीय झाले असले तरी त्या आवाजाचे श्रेयही अनमोल असते. तो आवाज आज कायम ठेऊन हा भावगायक आपल्यातून गेला आहे. अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवले. इंदूरजवळच्या धारमध्ये कुमार गंधर्वांकडे त्यांनी गायनाला सुरुवात केली. आणि आपल्या गायकीचा स्वतंत्र ठसा उमटवून ते गेले. त्या अजरामर ताºयाला भावपूर्ण आदरांजली. मराठी संगितात भावगीतांची परंपरा जुनीच आहे. गजानराव वाटवे, बबनराव नावडीकर यांनी भावगितांना ओळख दिली. त्या भावगीतांना अरूण दाते यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले. आपल्याकडे चित्रपट गीतेच फक्त लोकप्रिय होण्याचा जमाना होता. त्या काळात भावगिते लोकांच्या ओठांवर रेंगाळवण्याचे काम अरुण दाते यांच्या गायकीने केलेले आहे. मंगेश पाडगांवर, यशवंत देव, श्रीनिवास खळे यांच्याबरोबर अरुण दाते यांचे जे समिकरण जमले होते त्यामुळे असे वाटते की अरुण दाते यांचा आवाज पाडगांवकरांच्या शब्दांसाठीच विधात्याने निर्माण केला असावा. यशवंत देव यांची शब्दप्रधान गायकी ही अरुण दाते यांनीच एका उंचिवर नेऊन ठेवली असावी. श्रीनिवास खळे यांचे स्वर हे अरुण दाते यांच्या स्वरयंत्रासाठीच निर्माण झाले असावेत असे वाटण्याइतपत या लोकांची एकरुपता झालेली होती. त्यामुळे या सर्वांचेच स्थान एका तारामंडलाप्रमाणे मराठी संगितात असले तरी त्या तारामंडलातील अढळ तारा हा अरुण दाते नावाचा शुक्रतारा आहे हे निश्चित. सभ्यता आणि साधेपणाने त्यांनी आपले व्यक्तिमत्व जपले. आपल्या जाहीर कार्यक्रमातही कधी सुसंस्काराला आणि मर्यादेला त्यांनी ओलांडू दिले नाही. नाहीतर जाहीर कार्यक्रम करताना अनेकांना घसरण्याचा मोह आवरत नाही. फक्त आपल्या स्वरांवर प्रेक्षकांना आनंदात तरंगायला लावणे एवढेच त्यांनी अखेरपर्यंत जपले होते, त्या सभ्य व्यक्तिमत्वाने आज जगाचा निरोप घेतला आहे, जाताना आपले स्वर फक्त ठेवन गेले आहेत.
रविवार, ६ मे, २०१८
शुक्रतारा अस्तंगत झाला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा