कर्नाटकात भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी सत्ता स्थापनेचा दावा तर केला. मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. पण आज त्यांना अग्निपरिक्षा द्यावी लागत आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने आजच त्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत. या अग्निपरिक्षेत ते यशस्वी होतात की नाही याबाबत सगळेच अंधारात आहेत. कागदोपत्री असलेली आकडेवारी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणार असे दिसते. पण एखादा चमत्कार किंवा केलेले फार मोठे राजकारणच येडियुरप्पांना वाचवू शकते. पण एकूणच ही परिस्थिती अंदाधुंदीकडे आणि अनिश्चित राजकारणाकडे जाताना दिसते आहे. त्यामुळे कर्नाटकात कदाचित राष्टÑपती राजवट लागून काही महिन्यांत किंवा लोकसभेबरोबर निवडणुका लागू शकतील असे चित्र स्पष्ट आहे. येडियुरप्पांचा राजीनामा आल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर धर्मनिरपेक्ष जनता दल सत्ता स्थापनेचा दावा करणार हे निश्चित आहे. ते बहुमतही सिद्ध करतील हेही निश्चित आहे. फक्त काँग्रेसच्या बाहेरुन पाठिंबा असलेले हे सरकार किती काळ टिकेल याची कोणतीही निश्चितता नाही, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेस जनता दल हे सख्य म्हणजे विळा भोपळ्याचे नाते आहे. ते केव्हा एकमेकांना संपवायचा प्रयत्न करतील हे कोणीच सांगू शकत नाही. काँग्रेसने नेहमीच अशा खेळी केलेल्या आहेत. काँग्रेसचा पाठिंबा म्हणजे हरबºयाच्या झाडावर चढवण्याचा प्रकार असतो. काँग्रेसला ते चांगले जमते. आपण सत्तेत नसताना दुबळ्यांना बरोबर घेऊन त्यांच्या हातात नेतृत्व देऊन येरा गबाळ्याचे काम नोहे असे बिंबवण्याची काँग्रेसची ही परंपरा आहे. १९७७ साली सत्तेवर आलेले मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकार १८ महिन्यात कोसळल्यानंतर जनता पक्षातच फूट पाडून चौधरी चरणसिंग यांना पंतप्रधान करण्याचे आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा चमत्कार काँग्रेसने केला होता. हे सरकार आपल्याला पोषक वातावरण तयार होईपर्र्यंतच टिकवायचे हीच काँग्रेसची रणनिती होती. नेमके झालेही तसेच. काँग्रेसमय वातावरण झाल्यावर ते सरकार ७९ दिवसात काँग्रेसने कोसळवले होते आणि पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे अशा खेळात काँग्रेस माहिर आहे. त्यांच्या पुढील खेळाचा बळीचा बकरा हा आता धर्मनिरपेक्ष जनता दल असून औट घटकेचे मुख्यमंत्रीपद कुमारस्वामींच्या पदरात टाकून आपले महात्म्य वाढवण्यासाठी काँग्रेस आतूर झालेली आहे. या खेळाची काँग्रेसला चांगलीच आवड आहे. १९८९ साली जनता दलाचे व्ही पी सिंग सरकार केंद्रात सत्तेवर आल्यावर काँग्रेस विरोधात होती. जनता दल भाजपच्या पाठिंब्यावर होते. पण राममंदीर आणि रथयात्रेचा मुद्दा आला आणि व्ही पी सिंग सरकार कोसळले. तेंव्हा जनता दलातील एक गट फोडून त्याचे नेतृत्व चंद्रशेखर यांना करण्यास भाग पाडले आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर चंद्रशेखर यांचे सरकार स्थापन झाले. तोच खेळ जो चरणसिंगांच्या बाबतीत काँग्रेसने केला तोच पुन्हा खेळला गेला. चार महिन्यांत चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा राजीव गांधींनी काढून घेतला आणि निवडणुकांना सामोरे जावे लागले. आपल्या सोयीस्कर वातावरण झाले की पाठिंबा काढून घ््यायचा आणि निवडणुकांना सामोरे जायचे हा काँग्रेसच्या आवडीचा राजकारणातला खेळ आहे. प्रत्येक खेपेला जनता दल किंवा त्यांच्याच परिवारातील कोणी तरी त्याचा बळी ठरतो. आता कुमारस्वामींना असेच हार तुरे, गुलाल लावून सजवून काँग्रेसने ठेवले आहे. बळीचा बकरा जसा सजवतात तसा हा बळी देण्यासाठी काँग्रेसने तयारी केलेली आहे. हा इतिहास माहिती असूनही जनता दलाचे नेते पुन्हा पुन्हा काँग्रेसलाच जवळ करतात याचेच आश्चर्य वाटते. भाजप हा राजकीय अस्पृश्य पक्ष असल्याचे भासवून ज्यांच्यावर विश्वास ठेवता कामा नये अशा काँग्रेसबरोबर जनता दल शय्यासोबत करत आहे. अशा मधुचंद्रातून कसलेही फलीत निघत नसते हे त्यांच्या लक्षात येत नाही. १९९६ साली मे महिन्यातच अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार बहुमताअभावी १३ दिवसात कोसळले. तेंव्हा समविचारी पक्षांची आघाडी म्हणून जी आघाडी केली गेली त्यांचे नेतृत्व हाताच्या बोटावर मोजण्याइतके खासदार असलेल्या देवेगौंडा यांनी केले. काँग्रेसनेही राजकीय गंमत म्हणून पहात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या आघाडीला पाठिंबा दिला. जेमतेम वर्षभर हे सरकार चालले असेल पण काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला आणि देवेगौंडांना पंतप्रधानपदावरून हटवले. तोच खेळ काँग्रेस पुन्हा पुन्हा खेळत होती आणि जनता पक्ष बळी पडत होता. त्यानंतरही या आघाडीत फूट पडून इंद्रकुमार गुजराल यांना नेतृत्व दिले आणि त्यांना पंतप्रधान केले गेले. त्यांनाही काही महिन्यात काँग्रेसने सत्तेवरून दूर केले. हे सातत्याने घडत असतानाही जनता दल किंवा हे छोटे पक्ष काँग्रेसच्या गळाला लागतात हे विशेष. काँग्रेस या पक्षांचा वापर फक्त यूज अँड थ्रो सारखा करते तरी त्यांना काही वाटत नाही याचे आश्चर्य वाटते. आजही तसेच होणार आहे. जर येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करता नाही आले तर बळीचा बकरा बनवलेल्या कुमारस्वामींना काँग्रेसने सजवून ठेवलेले आहेच. काँग्रेस बाहेरूनच पाठिंबा का देते आहे, याचा सवाल हा पक्ष करणार नाही. सरकारमध्ये सामील होण्याचे आवाहन करणार नाही तर फक्त सरकार बनवून काँग्रेसच्या तालावर नाचेल. पण हे किती दिवस सरकार टिकेल याचे कोणतेही अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. सध्या फेरनिवडणुका लागल्या तर खर्चायला पैसा नसल्यामुळे या काळात भ्रष्ट आणि अन्य मार्गाने पैसा जमवण्याचे साधन एवढाच वापर या सरकाचा केला जाईल. त्याचा विकासकामांशी काहीही संबंध असणार नाही. स्पष्ट बहुमत नसल्यामुळे आम्हाला काही कामे करता येत नाहीत असे रडगाणे गायला पुन्हा हे मोकळे होतील. या गलिच्छ राजकारणाचे नाटक आपल्याला भविष्यात पहावे लागेल. आज येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करता आले नाही तर हे अटळ नाट्य आपल्याला पहावे लागणार आहे. त्यामुळे या अग्निपरिक्षेत नक्की काय खाक होते हे पहावे लागेल. लोकशाही की गलिच्छ राजकारण यातले नेमके काय टिकणार हे पहावे लागेल.
शुक्रवार, १८ मे, २०१८
अस्थिरतेचे शौकीन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा