ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि खासदार डॉ. शशी थरूर यांनी अलीकडेच एका लेखात भारतीय राजकारणात खोलवर रुजलेल्या घराणेशाहीच्या राजकारणावर अर्थात वंशवादावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजकीय पक्षांनी वंशपरंपरागत नेतृत्वाच्या पलीकडे जाऊन गुणवत्तेकडे जाण्याची वेळ आली आहे. थरूर यांच्या या विधानावर केवळ सत्ताधारी भाजपमध्येच नव्हे तर काँग्रेस पक्षातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी थरूर यांच्या विचारांना विरोध केला आणि म्हटले की, नेहरू कुटुंबाने देशासाठी दाखवलेला त्याग आणि समर्पण इतर कोणत्याही राजकीय कुटुंबापेक्षा अतुलनीय आहे. त्यांनी प्रश्न केला की, भाजपमध्ये असे कोणतेही कुटुंब आहे का, ज्याने देशासाठी आपले जीवनदान दिले आहे? तिवारी म्हणाले की, पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी त्यांच्या क्षमतेने, समर्पणाने आणि बलिदानाने देशाची सेवा केली.
वंशवाद किंवा घराणेशाही या विषयावर लेख लिहिल्यानंतर थरूर अक्षरश: खतरों के खिलाडी बनले. यावर भाजपने म्हटले, सर, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनीही थरूर यांना प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये अंतिम निर्णय जनतेचा असतो- कोणीही असे म्हणू शकत नाही की एखाद्याला त्यांचे वडील खासदार होते म्हणून निवडणूक लढवण्यापासून रोखले पाहिजे. काँग्रेसचे आणखी एक नेते उदित राज यांनी वादविवाद वाढवत म्हटले की, घराणेशाही ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, व्यावसायिकाचा मुलगा व्यापारी होतो, मग राजकारण्याचा मुलगा राजकारणी का होऊ शकत नाही? त्यांनी हे देखील मान्य केले की, भारतीय राजकारणात तिकीट वाटप बहुतेकदा जात आणि कुटुंबाच्या आधारावर होते.
दरम्यान, भाजपने या वादाचा फायदा घेत म्हटले की, थरूर यांचा लेख, भारतीय राजकारणाचे कौटुंबिक व्यवसायात रूपांतर यावर अचूक भाष्य आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी याला, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यावरील अप्रत्यक्ष हल्ला म्हटले आहे.
या ठिकाणी आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, शशी थरूर यांचा लेख अशा वेळी आला आहे जेव्हा काँग्रेस नेतृत्वाशी त्यांचे संबंध काही काळापासून ताणले गेले आहेत, विशेषत: जेव्हा त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवली तेव्हापासून. त्यांच्या अलीकडील विधानांमुळे पक्षाच्या धोरणात्मक अस्वस्थतेवर अधिक भर पडतो. भारतीय राजकारणाचे एक कायमचे वैशिष्ट्य म्हणजे नेतृत्व बहुतेकदा गुणवत्तेद्वारे किंवा जनसंपर्काद्वारे नव्हे तर घराणेशाही परंपरेने निश्चित केले जाते. जेव्हा राजकीय सत्ता घराणेशाहीद्वारे निश्चित केली जाते तेव्हा प्रशासनाचा दर्जा घसरतो, ही शशी थरूर यांची टिप्पणी आपल्या लोकशाहीतील एक खोल समस्या अधोरेखित करते. भारतीय राजकारणात घराणेशाही नवीन नसली तरी, नेहरू-गांधी कुटुंब स्वातंत्र्यापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे केंद्रबिंदू राहिले आहे, परंतु ही प्रवृत्ती आता जवळजवळ प्रत्येक पक्षात दिसून येते- मग ते समाजवादी पक्षात मुलायमसिंह यादव यांचे कुटुंब असो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार असो, द्रमुकमध्ये करुणानिधी असो किंवा अकाली दलात बादल कुटुंब असो. सत्तेचा वारसा हा राजकीय उत्तराधिकारचा एक प्रकार बनला आहे.
घराणेशाहीचे समर्थक याला, अनुभवाचे सातत्य किंवा लोकप्रियतेचा वारसा मानतात. प्रमोद तिवारी आणि रशीद अल्वीसारख्या नेत्यांचा, जनता ही अंतिम मध्यस्थ आहे, हा युक्तिवाद लोकशाहीदृष्ट्या योग्य वाटतो, परंतु हा युक्तिवाद संरचनात्मक असमानता लपवतो. जेव्हा राजकीय कुटुंबातील मुले लहानपणापासूनच सत्ता, संसाधने आणि जनसंपर्क यांच्या वर्तुळात वाढतात, तेव्हा त्यांना सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा सहज राजकीय संधी मिळतात. यामुळे लोकशाहीमध्ये संधीच्या समानतेची संकल्पना कमकुवत होते.
शिवाय, उदित राज यांचा, प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही अस्तित्वात आहे, हा युक्तिवाद अंशत: बरोबर असला तरी, राजकारणाच्या संदर्भात धोकादायक आहे. कारण राजकारण हा केवळ एक व्यवसाय नाही, तर सार्वजनिक सेवा आणि धोरण ठरवण्याचे माध्यम आहे. जेव्हा वंशपरंपरागत अधिकार या क्षेत्रात वर्चस्व गाजवतात तेव्हा लोकशाही हळूहळू प्रजासत्ताकातून कुलीनशाहीकडे वळते. शशी थरूर यांच्या लेखातील राजकीय संदेश असे सूचित करतो की, त्यांचा लेख केवळ सैद्धांतिक टीका नाही; तो काँग्रेससह भारतीय राजकारणाचे आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, नेहरू-गांधी कुटुंबाचे ऐतिहासिक योगदान निर्विवाद आहे, परंतु आता त्या ऐतिहासिक वैधतेचे, लोकशाही जबाबदारीत रूपांतर करणे आवश्यक आहे. त्यांचा संदेश असा आहे की, जर काँग्रेससारख्या जुन्या पक्षाला खरोखरच स्वत:चे पुनरुज्जीवन करायचे असेल तर त्यांनी घराणेशाहीच्या रचनेच्या पलीकडे जाऊन, गुणधर्म, कार्यक्षमता आणि जनसंपर्क यावर आधारित नेतृत्वाला प्राधान्य दिले पाहिजे. शशी थरूर यांची ही भूमिका भाजप आणि इतर पक्षांनाही अप्रत्यक्ष आव्हान आहे. कारण कुटुंबआधारित नेतृत्व घराणेशाहीचा त्रास फक्त काँग्रेसमध्येच नाही तर प्रत्येक राजकीय संघटनेत आहे. काँग्रेसला अनेकदा घराणेशाहीचा पक्ष म्हणणारा भाजप स्वत: राज्यस्तरीय नेत्यांनी भरलेला आहे. ज्यांचे पुत्र आणि नातेवाईक सत्तेत आहेत.
यात शंका नाही की, घराणेशाहीचा सर्वात मोठा धोका म्हणजे तो लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वाला - प्रत्येक नागरिकाला समान संधी - कमकुवत करतो. तो त्या वर्गाला बाजूला सारतो जो कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय केवळ त्यांच्या क्षमतेच्या आणि सार्वजनिक सेवेच्या आधारावर पुढे जाऊ इच्छितो. शशी थरूर यांचा संदेश असा आहे की, भारतीय राजकारणाने, घराणेशाहीच्या चिरस्थायी परंपरेपासून मुक्त व्हावे आणि एका नवीन राजकीय संस्कृतीकडे वाटचाल करावी, जिथे नेतृत्व जन्माने नव्हे तर कृतीने ठरवले जाते.
तथापि, घराणेशाहीमुळे निर्माण झालेली समस्या कोणत्याही एका पक्षापुरती मर्यादित नाही, तर ती भारतीय लोकशाहीच्या आत्म्याशी जोडलेली आहे. जर या प्रवृत्तीला आव्हान दिले नाही, तर भविष्यात आपली लोकशाही, लोकांचे, लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य कमी होऊन, कुटुंबाचे, कुटुंबासाठी चालवलेले, कुटुंबाचे राज्य होईल. म्हणून, शशी थरूर यांचा आवाज काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण करू शकतो, परंतु तो भारतीय राजकारणासाठी आवश्यक आत्मपरीक्षणाची सुरुवात आहे. त्यांचे आवाहन कोणत्याही एका नेत्याविरुद्ध किंवा कुटुंबाविरुद्ध नाही, तर गुणवत्तेला वंशापेक्षा गौण मानणाºया मानसिकतेविरुद्ध आहे.
प्रफुल्ल फडके/ अन्वय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा