- ‘महाराष्ट्राचा हार्दिक पटेल कोण होणार’, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात जोरात चर्चेत आहे. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसात जे घडले त्याचे पडसाद मुंबईत आणि महाराष्ट्रात उमटणे साहजीकच आहे. त्यामुळे हार्दिक पटेलच्या आंदोलनानंतर पटेलांप्रमाणे महाराष्ट्रात पाटलांनी आंदोलन उभे करावे असे मत प्रकट करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे दोन पुत्रांपैकी अशा आंदोलनाचे नेतृत्त्व करणार का? स्वाभीमानी नितेश राणे सध्या आमदार आहेत परंतु माजी खासदार असलेल्या नीलेश राणे यांनी महाराष्ट्राचे हार्दिक व्हायला काहीच हरकत नाही. नारायण राणे यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेवून हे आंदोलन यशस्वी करून दाखवावे.
- गुजरात आणि महाराष्ट्राचे नातेसंबंध हे असेच घट्ट आहेत. महाराष्ट्रातील गुजराथी समाज हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रातही अनेक पटेल स्थिरस्थावर झालेले आहेत. पटेल समाजाचे प्राबल्य गुजराथी नावांमध्ये आहेच. पाटीदार किंवा पटेल हे कोण आहेत हे यापूर्वी कधी चर्चेत नव्हते. कारण आपलो धंदो बरा नी आपण बरा अशा प्रवृत्तीने वागणारा गुजराथी माणूस असतो. त्यामुळे गुजरातमधून आलेला तो गुजराती एवढी गुजराती लोकांची प्रादेशिक ओळख होती. पण आता पटेल, पाटीदार असे त्यांच्यातील सवर्ण आहेत आणि तरीही मागास, वंचित आहेत हे या देशाला नव्याने समजले. ते उच्चवर्णीय आहेत की इतर मागासवर्गात त्यांचा समावेश करायला हवा, पटेलांचे म्हणणे गुजरातमध्ये तरी असे झालेले आहे की ते खरे ओबीसीतच गणले जायला हवेत.
- महाराष्ट्रातील मराठा समाजाप्रमाणे गेली काही वर्षे गुजरातमधील हा समाज अस्वस्थ आहे. खरेतर जागतिक स्तरावर पटेल व्यावसायिक आहेत, धनिक आहेत. जगभरातील कोणत्याही शहराच्या टोलिफोन डिरेक्टरीमध्ये या आडनावाच्या लोकांची नावे सापडतीलच. मुळात शेती करणारा हा समाज व्यवसायात घुसला. मोठ्या संख्येने परदेशात त्यांनी चांगला पैसा कमावला. राजकारणात त्यांचे वजन आहे. आजही गुजरातचे चाळीस आमदार, सहा खासदार आणि डझनाने मंत्री हे पटेलच आहेत. त्या राज्याच्या मुख्यमंत्री आनंदीबेन या स्वतःच पटेल आहेत. तरीही ही मागणी होते आहे हे अनेकांना पटेलच असे नाही.
- परंतु गेल्या काही दिवसांपासून राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक अशा सर्वच राज्यात गुज्जर, जाट, कुर्मी, गौडा अशा जमिनदार, श्रीमंत गणल्या जाणार्या जाती-जमाती स्वतःचा समावेश ओबीसीमध्ये व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रात मराठा समाजाचेही हेच म्हणणे आहे. जसे पटेलांचे गुजरातमध्ये राजकारणात मोठे स्थान आहे तसेच महाराष्ट्रात पाटलांचे आहे. त्यामुळे हार्दिकच्या आंदोलनानंतर नारायण राणे यांची प्रतिक्रीया येणे स्वाभाविक होतेे. कारण मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या समितीत त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांची ही शिफारस मान्य केल्यानंतरही पुन्हा त्यात अडथळे निर्माण झाल्यावर आता महाराष्ट्रात पटेलांप्रमाणे पाटलांचे आंदोलन उभे राहणे आवश्यक आहे याची जाणिव नारायण राणे यांना झाली असल्यास नवल नाही. परंतु आता कोणत्याही आंदोलनाला लोकांना नवा आणि तरूण चेहरा हवा असतो. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात हार्दिकची जागा कोण घेणार? तर नारायण राणे यांनी आपला एक पुत्र या आंदोलनात सोडला तर त्यांना एका दगडता अनेक पक्षी मारता येतील. त्यामध्ये कॉंग्रेसला जीवदान देता येईल. राष्ट्रवादीच्या अगोदर हे आंदोलन उभे केले तर कॉंग्रेसमध्ये राणेंचे वजन वाढेल. कॉंग्रेसमध्ये निर्वासितासारखी अवस्था असलेल्या नारायण राणे यांना यातून प्रतिष्ठा प्राप्त करता येईल. त्यामुळे नारायण राणे यांनी आपला एक मुलगा या नेतृत्वासाठी महाराष्ट्राला देण्यास काहीच हरकत नाही.
- आज ग्रामीण स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत मराठा समाजाची मंडळी सर्वप्रकारच्या सत्ता स्थानांमध्ये सर्वश्रेष्ठच आहे. सहकार क्षेत्रात गावच्या सर्व सेवा संस्थेपासून ते राज्य स्तरावरच्या सहकारी बँका असोत, पतसंस्थांपासून ते साखर कारखान्यांपर्यंत आणि सूतगिरण्यांपर्यंत कुणाचे साम्राज्य असेल तर ते मराठ्यांचेच आहे. तरीही अण्णासाहेब पाटलांच्या नावाने चालणार्या मराठा महासंघापासून ते विनायक मेटेंच्या शिवसंग्रामपर्यंत सर्व मराठा संघटना आरक्षणासाठी आग्रही आहेत. कारण एकूणच आरक्षणाचे प्रमाण पन्नास टक्क्याच्या घरात पोहोचल्यामुळे आरक्षणाच्या बाहेर उरलेल्या जाती व समाजांना शिक्षण संस्थांमध्ये विशेषतः सरकारी, व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, व्यवस्थापन अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळण्यात अडचणी आहेत. सरकारी नोकर्यातही कोटाच चालत असल्यामुळे तिथेही महाराष्ट्रात मराठा व गुजरातमध्ये पटेलांना प्रवेश मिळत नाही. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतरच्या दहा वर्षातच या तक्रारी उग्र रूप धारण करू लागल्या. एकेक समाज पुढे येत नव्या आरक्षणाची मागणी करू लागला. गेली दोन वर्षे गुजरातचा पटेल समाज ही मागणी हळूहळू करीतच होता. पण गेल्या दोन महिन्यात त्याला तीव्रता आली आणि सर्वांना एकत्र करणारा एक आवाज लाभला तो हार्दिकचा. त्याच्या आंदोलनाला हे जे यश लाभले त्यामुळे सर्वांची बोटं तोंडात गेली. त्याने जी आरक्षणाची मागणी केली, त्याला पटेलांनी जो प्रतिसाद दिला तो केवळ नवल म्हणावे असाच होता. गुजरातमधील सर्व शहरांत लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. हार्दिक काय बोलतो ते ऐकायला तब्ब्ल पाच लाख पटेल रस्त्यांवर उतरले होते. सारे शहर ठप्प झाले होते आणि हार्दिकला अटक करताच गुजरातमध्ये सर्वत्र दंगलसदृश स्थिती निर्माण झाली. आनंदीबेन पटेलांना तातडीने हार्दिकला मुक्त करावे लागले. आज असे नेतृत्त्व देण्यासाठी महाराष्ट्रात नेता नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा हार्दिक होण्यासाठी राणेपुत्रांनी प्रयत्न करण्यास हरकत नाही.
सोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५
राणेपुत्र होणार का महाराष्ट्राचा हार्दिक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा